कोरोनामुळे उद्योगधंदे बंद पडले आणि 60 टक्के लोक बेरोजगार झाल्याची माहिती नेहमी येत आहे. पण त्याही व्यतिरीक्त अनेक लोक बेरोजगार झालेले आहेत त्याचा हिशोबच नाही. याचे कारण आपण रोजगार हा फक्त नोकरीशी संबंधीत धरतो. अर्थाजनासाठी नोकरी व्यतिरीक्त स्वयंरोजगार किंवा काही छोटे व्यवसाय असतात त्याचा हिशोबच कोठे होत नाही, म्हणून कितीु नकी बेरोजगार झाले आणि कोणाकोणाचे आर्थिक नुकसान झाले याचा आता हिशोबच करणे अवघड आहे.
सधन वर्गात आपल्याकडे डॉक्टर, इंजिनीअर, वकील यांचा नेहमी उल्लेख केला जातो. पण लॉकडाउनमुळे न्यायालये बंद आहेत. काही प्रमाणात ऑनलाईन खटले चालत आहेत. पण यात मोठे नामांकीत वकील तरून जात आहेत. पण हजारो ज्युनिअर वकील आहेत ते अक्षरश: चार महिने घरी बसून आहेत. छोटी छोटी कामे करून दररोज कमाई करणारे हे वकील, कसले दस्त बनवून देणारे वकील, पिटीशन रायटर, तहसिलदार कार्यालया व्यतिरीक्त अन्य ठिकाणी कोर्टात आपले टेबल टाकून असणारे स्टँपव्हेंडर हे आज चार महिने उत्पन्न थांबल्याने हवालदिल आहेत. या लोकांची पोटे आणि त्यांच्या कुटुंबियांची पोटे या कामावर चालतात. पण वर्क फ्रॉम होम, न्यायालय बंद, यामुळे स्टँपव्हेंडर आणि त्यांचे सहाय्यक आज बेरोजगार झाले आहेत याचा हिशोब कोणीच केलेला नसतो.
आपल्याकडे कितीतरी लोक अनमोल खजिना जमवत असतात. दुर्मिळ नाणी, तिकीटे, कसल्या वस्तू, विविध प्रकारची पेंटींग, अशी कामे करणारे कलाकार आपल्या आयुष्याला वाहून घेत असतात. त्यांची अनेक ठिकाणी प्रदर्शने भरतात. कुठे कार्यक्रमात मानधन मिळते. अशा असंख्य अनमोल रत्नांना अशा लॉकडाउनमुळे बेरोजगारीची समस्या भेडसावत आहे. बरे हे लोक इतक्या मोठ्या प्रतिष्ठेला पोहोचले आहेत की ते कुठल्या रांगेत थांबू शकत नाहीत की अर्थार्जनासाठी अन्य काही करू शकत नाहीत. या कोणाचाच हिशोब नाही.
सध्या फक्त जीवनावश्यक वस्तु विकणारे विक्रेते, घरपोच डिलीव्हरी देणारे बॉय यांची चलती आहे. पण हॉटेल या खाद्यसंस्कृतीतून कितीतरी रोजगार मिळत असतो. टेबलवर सर्व्हीस देणारे वेटर, कॅप्टन, बारमधील वेटर, फडका मारणारे, सफाई करणारे, भांडी घासणारे कितीतरी लोक आज बेरोजगार झाले आहेत. देशभरात लाखो हॉटेल असतील. मुंबई, ठाणे, पुणे येथील हॉटेलसंस्कृती ही विशेष आहे. पण आज यातून रोजगार मिळणारे अनेकजण बेरोजगार आहेत. त्यांना कसलाही मोबदला नाही, मदत नाही. मुंबई, नवी मुंबई, ठाणे येथे बहुतेक हॉटेल आणि बारमध्ये असणारे वेटर हे ईशान्य भारतातील, यूपी, बिहार येथून आलेले आहेत. आज हे लोक बेरोजगार झालेले आहेत. कित्येकांना आपल्या गावीही जाता आलेले नाही. त्यामुळे उपासमारीने ते उद्धवस्त झालेले आहेत. अशा परिस्थितीत ते जर गुन्हेगारी जगताकडे वळले, चोर्या मार्या करू लागले तर काय करणार? पोटासाठी माणूस काहीही करू शकतो. त्यामुळे हा लॉकडाउन लवकरात लवकर संपला पाहिजे. लोंकांना कष्ट करून जगण्याची संधी मिळाली पाहिजे.
केवळ औषधे, सॅनीटायझर, मास्क विकून काही होणार नाही. हॉस्पीटल आणि वैद्यकीय व्यवसायच तेजीत येउन काही होणार नाही. तर देशातील छोटेमोठे सगळे व्यवसाय, उद्योग सुरू झाले पाहिजेत आणि सामान्यांना जगता आले पाहिजे. पण आपल्याकडे नेमक्या नोंदी नसल्याने किती बेरोजगार झाले याचा आकडा खरा समजत नाही. अपुरी माहिती समोर येते आणि राज्यकर्ते समाधान मानतात.
पार्लर, सलूनमधील कामगार, कपडे शिवणारे टेलर, छोटीमोठी दुरूस्ती करणारे लोक, गॅरेजमध्ये काम करणारे लोक, हेल्पर, इलेक्ट्रिशीयन असे कितीतरी नित्य सेवा लागणारे लोक आज कामाच्या शोधात आहेत, विवंचनेत आहेत. कंत्राटी काम करणारे, बांधकाम कामगार यांच्या पोटावर तर खूपच मोठी गदा आलेली आहे.
बेरोजगारी म्हटले की फक्त नोकरी करणारांचाच विचार केला जातो. पण असे अनेक लोक आहेत की ज्यांना फार मोठा फटका बसला आहे. त्यांची गणना कुठेही नाही. आज सरकार या परिस्थितीत धान्य वाटप करते असे सांगितले जाते. सोनिया गांधी जून महिन्यात सप्टेंबरपर्यंत हे धान्य मोफत गरीबांना दिले जावे म्हणून मागणी करतात. पण गरीब म्हणजे नेमके कोण? ते कोणापयर्र्त पोहोचते? जे लोक स्वत:च्या पायावर उभे राहिले आहेत ते आज ज्या परिस्थितीत बेरोजगार झाले आहेत. त्यांना काही मदत मिळायला नको का? गोदामातून जाणारे धान्य, स्वस्त धान्य खरोखरच लाभार्थींपर्यंत पोहोचते का याचाही कसला हिशोब नाही. पण भेदभावाच्या राजकारणात सामान्य, मध्यमवर्गीय आणि छोटे व्यावसायीक यांना फार मोठा फटका बसला आहे. त्याचा कसलाचा हिशोब नाही हे मात्र नक्की.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा