शुक्रवार, ३१ जुलै, २०२०

श्यामची आई आणि बबड्याची आई

 पूर्वीचा काळ हा वाचनाचा काळ होता. त्या काळात श्यामची आई हे पुस्तक प्रत्येकाने वाचावे असा अलिखित दंडक होता. कारण गोष्टीतून संस्कार करण्याच्या साने गुरुजींच्या विचाराचा तो महाराष्ट्र होता. त्यामुळेच संपूर्ण महाराष्ट्रात साने गुरूजी कथामालाही होत असत. त्यातून एक पिढी चांगली घडली. पण आज कथामालांचे नाही तर मालिकांचे दिवस असल्याने वाचनाचा प्रश्न संपुष्टात आला आहे. समोर दिसेल ते पहायचे असते. त्यात सध्या धुमाकूण घालतो आहे तो बबड्या. झी मराठी वाहिनी ही पूर्वी नात्यांचा अदार करणारी वाहिनी होती. पण आता ती विकृत कथानकांची वाहिनी म्हणून ओळखली जात आहे. त्यातीलच एक मालिका म्हणजे अग्गोबाई सासुबाई. त्यातील मायलेक म्हणजे बबड्या आणि त्याची बावळट आई आसावरी. पण यावरून कुठे श्यामची आई आणि कुठे बबड्याची म्हणजे सोहमची आई ही तुलना न कळत होते आहे. त्यातून संपूर्ण महाराष्ट्र हेची फळ काय मम तपाला, म्हणत आहे असे वाटते.
   एक काळ असा होता की नातेसंबंध जपण्यासाठी प्रत्येक पात्र कसे प्रयत्न करत आहे आणि त्यातून प्रेक्षकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावत होत्या. त्यासाठी झी मराठी झटत होते. पण आता तर्कशून्य आणि विकृतपणे विषय मांडण्याचे प्रयत्न या वाहिनीवरून होताना दिसतात. ही विचार या वाहिनीवरून कुठे डोकावला आहे? महिलांची अवहेलना होउ नये, त्यांचा सन्मान करावा असा विचार देणारी हीच का ती वाहिनी? असे आता वाटू लागले आहे.
 सध्या तर अगोब्बाई सासुबाईमध्ये हा बबड्या जो धुमाकूळ घालत आहे यावरून या निर्माता, दिग्दर्शक, लेखक आणि वाहिनी यांना नक्की काय सांगायचे आहे? असा प्रश्न पडतो. त्यामुळे हा बबड्या सध्या सोशल मिडीयावर इतका गाजतो आहे की त्याच्यावरून जोरदार विनोद होत आहेत. अर्थात ही कुप्रसिद्धीपण जर त्यांना आवडत असेल तर आवडू दे, पण ते दाखवले जाते आहे ते अत्यंत विकृत असेच आहे.
   या मालिकेतल्या आसावरीबाईंचे बबडूप्रेम पाहून अनेकांची बोबडी वळली.  आजपर्यंत ज्यांनी ही मालिका पाहिली नसेल त्यांच्यसारखे भाग्यवान कोणी नाही असेच म्हणावे लागेल. त्याशिवाय जे नियमीत ही मालिका पाहतात ते लोक  आपण,  ’ही महान सिरियल पाहण्याचा करंटेपणा का केला’,  या विचारानं प्रचंड अस्वस्थता आली.  विसावं शतक ’श्यामच्या आई’नं गाजवलं तसं एकविसावं शतक ’बबड्याची आई’ गाजवते आहे. ’घरात पूजा असून बबड्या मद्यप्राशन करुन येतो...’ हा प्रसंग फारच धक्कादायक असाच होता. आता सिरियलमधे ’पुढे काय होणार’ याची उभा महाराष्ट्र श्वास रोखून वाट पाहतो आहे.
   आजकाल मूल एकलतं एक असतं म्हणून त्याचे लाड होतात. पण आहे म्हणून मुलांना वाटेल ते देणे योग्य आहे का याचा सर्वच आयांनी विचार करायला हवा. आपला मुलगा अगदी श्याम नाही झाला तरी बबड्या तरी होणार नाही याची काळजी घेण्याची आता गरज आहे.
  म्हणजे एखाद्या कुटुंबातल्या मुलाचा बबड्या कसा होतो? हा खरोखरच आवर्जून वेळ काढून अभ्यासण्यासारखा विषय आहे. वयाची विशी उलटून गेलेल्या आपल्या बबडूच्या अंथरूणाची घडी घालणं, बेडवरची विस्कटलेली बेडशीट व्यवस्थित घालणं, बबडूचे कपडे धुवायला टाकणं, त्याच्या खोलीतलं टॉयलेट स्वच्छ करणं, चहा-कॉफी-दूध-नाश्ता सगळं सगळं अगदी हातात आणून देणं, बबडूला डबा देणं, रोज संध्याकाळी त्याच्या सॅकमधून तो डबा काढून धुवून ठेवणं, बुटात तसेच राहीलेले किंवा इतरत्र पडलेले पायमोजे शोधून धुवायला टाकणं इत्यादी कामं रोजच्या रोज अगदी नियमितपणे करणार्‍या आया आहेत. हे खरोखरच प्रेम आहे का? यातून आपण मुलांना बिघडवत तर नाही ना? त्याला बबड्या बनवत नाही ना याचा विचार केला पाहिजे.
   मालिकेतील कथानकं कुठेतरी बीज मिळाले त्यातून तयार होते. त्यात ते भडक केले जाते. पण आज कित्येक घरं आहेत जिथं केवळ मुलाला अमुक भाजी आवडत नाही म्हणून दुसरी केली जाते.! सकाळी झोपेतून उठवून टूथब्रशवर पेस्ट लावून हातात देणार्‍या सुद्धा आया आहेत. या घरातल्या बबड्यांना साधं शर्टाचं तुटलेलं बटणसुद्धा सुईदोरा घेऊन शिवता येत नाही, इस्त्री करता येत नाही, भाज्या निवडतां येत नाहीत, दळणाचा डबा घेऊन पिठाच्या गिरणीत जाणं त्यांना कमीपणाचं वाटतं, घरातला संडास धुणं कमीपणाचं वाटतं. ही कोणतेही काम कमीपणाचे वाटण्याची जी भावना निर्माण केली जाते त्यातूनच आम्ही मुलांना बेरोजगार बनवत असतो. आज प्रचंड प्रमाणात बेरोजगारी असताना मी अमूक एक कमा करणार नाही म्हणून चांगल्या उत्पन्नाच्या नोकर्‍या नाकारणारी मंडळी आहेत. मी गाव सोडून जाणार नाही म्हणणारे लोक आहेत. हे अशा आयांनी घडवलेले आहेत. म्हणजे साने गुरुजींच्या श्यामची आई मधील आई मुलाला धीट बनवते. पोहायला भिणार्‍या श्यामला लपवून ठेवता विहिरीत ढकलते. पण आजकालच्या अनेक आया मुलांना आपले गाव सोडून दुसरीकडे नोकरीला जाउ देत नाहीत. अशा आयांमुळे बबडू घडत असतात. मग हेच बबडे बेवडे होतात आणि आईची अवहेलना करतात. हेच या अग्गोबाई सासुबाई या मालिकेतून दाखवले आहे. मुलांना घडवणारीही आईच आणि बिघडवणारीही आईच असते. त्यामुळे आज जगाला बबड्याच्या आईची नाही तर श्यामच्या आईची गरज आहे हे लक्षात घेतले पाहिजे.
काही लोक अतीशय भावनीक होउन अशा मालिका बघतात. डोळ्यात पाणी आणतात. त्यावेळी प्रचंड राग येतो. अरे असल्या बावळट बाईकरता कसले अश्रू ढाळता? डोळ्यात पाणी यावे ते श्यामच्या आईसाठी. श्यामची आई हे पुस्तक वाचताना किंवा त्यावरचा चित्रपट पाहताना डोळ्यात पाणी आले नाही तो माणूसच नाही. त्याचप्रमाणे बबड्या ज्याप्रकारे त्याच्या आईशी घाणेरडेपणाने वागतो आहे आणि त्यावरून आईबद्दल कोणी हळहळत असेल तर त्यांनी सावधान राहिले पाहिजे. तुम्ही अशा आयांसाठी डोळ्यातील पाणी वाया घालवाल तर तुमच्याही घरात बबड्या तयार व्हायला वेळ लागणार नाही. कारण बबड्याची पावले त्याला आळशी बनवल्याने गुन्हेगारी जगताकडे वळत आहेत. तो आता फसवाफसवी आणि घरात बसून, कष्ट न करता भरपूर पैसा कमावण्याच्या मार्गावर जातो आहे. अशा ऑफर देणारे अनेक असतात की जे आपल्या लोंकांच्या ओळखीची गैरफायदा घेत असतात. त्यामुळे आता गरज श्यामच्या आईची आहे, शतक बदलले असले तरी बबड्याची आई नाकारायचेच दिवस आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: