दहावी बारावीचा निकाल या महिन्यात लागेल असे बोलले जाते. कोरोनाच्या संकटामुळे एकुणच शिक्षणाची वाट लागलेली आहे. त्यात आता दहावी आणि बारावीचा निकाल लागल्यानंतर फार मोठा गोंधळ उडण्याची भिती आहे. हा गोंधळ अर्थातच महाविद्यालयीन प्रवेशाचा असणार आहे.
मुळात नेमके पुढचे शैक्षणिक वर्ष कसे असेल हेच आता अनाकलनीय आहे. शाळांच्या बाबतीत मुलांना घरातून, ऑनलाईन अभ्यास करायला सांगितला आहे. किती जणांना ते जमते आहे हे समजणेच अवघड आहे. पण आठवीपर्यंत कोणाला पास नापासची भिती नसल्याने शाळेत बिनकामाची बसवायची ती घरात बसणार अशी स्थिती झालेली आहे. पण दहावी बारावीनंतर काय हा फार मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. म्हणजे यावर्षी जे दहावी परिक्षेला बसले होते किंवा बारावीची परिक्षा ज्यांनी दिली आहे त्यांच्या आयुष्याचा अक्षरश: जुगार होणार आहे असेच दिसते आहे.
जुगारात जसे कोणीतरी जिंकतो, कोणीतरी हरतो, कोणी सर्वस्व गमावतो तर कोणी उद्ध्वस्त होतो तशीच अवस्था दहावी बारावीची परिक्षा देणारांची झालेली असणार आहे. म्हणजे आता 15 जुलैपर्यंत बारावीचा आणि महिना अखेरीस दहावीचा निकाल लागणार आहे असे बोलले जाते आहे. पण खरोखरच काहींच्या बाबतीत हा निकालच लागणार आहे असे दिसते.
मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून आपल्याकडे कोरोनाची लागण सुरू झाली. दुसर्या आठवड्यापासून सगळे बंद सुरू झाले. दहावीचा शेवटचा भूगोलाचा पेपर झालेलाही नव्हता तोपर्यंतच लॉकडाउन झाले आणि पेपर रद्द केला. त्यामुळे दहावी आणि बारावीचे पेपर सुरक्षितपणे पेपर तपासनिसापर्यंत पोहोचले आहेत का? तपासणार्या शिक्षकांनी ते काळजीपूर्वक तपासले आहेत का? या पेपरच्या गठ्ठयातून कोरोनाचा व्हायरस नाही ना म्हणून लांबूनच न तपासताच मार्क दिलेले नाहीत ना? अशाही शंका उपस्थित होत आहेत. परिक्षार्थींनी पेपर दिल्यानंतर तो तपासनीसापर्यंत जाईपर्यंतच्या कालावधीतच हे सगळे लॉकडाउन झाल्यामुळे मुळात पेपर नीट तपासले आहेत का हा प्रश्न आहे. त्यामुळे ज्यांनी खर्या अर्थाने चांगला अभ्यास केला आहे आणि चांगले गुण मिळवून गुणवत्तेच्या जोरावर पुढचा प्रवेश ज्यांना मिळवायचा आहे त्यांचे आयुष्य आज पणाला लागलेले आहे. ज्यांना कसल्याही सवलती नाहीत, कसलेही आरक्षण नाही, फी भरूनच शिक्षण घ्यावे लागते आणि तेही चांगले मार्क चांगली टक्केवारी असेल तरच ज्यांना शिक्षण घ्यावे लागते अशांना पुढील शिक्षणात फार मोठा अडथळा निर्माण होणार आहे. कारण बहुतेक अंदाजपंचे मार्क दिले जाण्याची शक्यता आहे. पोस्ट आणि पार्सल व्यवस्था ठप्प झालेली असताना पेपरचे गठ्ठे तपासणीसाठी पोहोचले होते का नाही इथपर्यंत प्रश्न यातून निर्माण होत आहेत. त्यामुळे जर खिरापतीसारखे पेपर न तपासताच मार्क दिले गेले आणि सरसकट कोणालाच नापास करायचे नाही असे काही धोरण अवलंबले गेले तर फार मोठा गोंधळ निर्माण होणार आहे. कारण या जुगारात हुषार आणि कर्तबगार विद्यार्थी मरणार आहेत. त्यामुळेच येत्या 15 जुलैला बारावीचा निकाल काय आणि कसा लागतो आणि महिनाअखेरीला दहावीचा निकाल कसा लागतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दहावी बारावीचा निकाल म्हणजे पालक, विद्यार्थी यांना उत्सुकता असते. पण आज मात्र हा संभाव्य निकाल म्हणजे पालकांची चिंता वाढवणारी परिस्थिती निर्माण झालेली आहे.
समजा पेपरचे गठ्ठे तपासले नसतील, गहाळ झाले असतील, कोरोनाच्या संशयामुळे कोणी त्याला हातही लावले नसतील आणि लज्जारक्षणासाठी म्हणून निकाल लावायची परिस्थिती निर्माण झालेली असेल तर हे गुण कशाच्या आधारे दिले जाणार आहेत? आता शाळांमधील वार्षिक परिक्षा झाल्या नाहीत पण सर्व शाळांनी वर्षातील कामगिरीच्या आधारावर सर्वांना मार्क किंवा ग्रेड देउन वरच्या वर्गात पाठवले आहे. पण दहावी बारावीच्या बाबतीत नेमके काय करणार आहे शिक्षण खाते? दहावीच्या भूगोलाच्या पेपरचे मार्क कसे देणार आहे? त्याचा कोणाला फायदा होणार आणि कोणाला तोटा होणार हे समजेनासे झालेले आहे. दहावीला बेस्ट फाईव्हच्या आधारावर टक्के दिले जातात. पण भूगोल हा विषय त्यातून उडाल्यामुळे बेस्ट फाईवची वाटच लागली असेच म्हणावे लागेल. त्यामुळे एकुणच सर्वांचे नुकसान करणारे हे शैक्षणिक वर्ष ठरले आहे.
जर समजा सरकारने शक्यतो कोणालाच नापास करायचे नाही असे ठरवले आणि सरासरीने अंदाजपंचे मार्क दिले तर केवढा गोंधळ उडणार आहे? शंभर टक्केच्या आसपास लागलेला निकाल भविष्यात प्रवेशासाठी किती गोंधळ निर्माण करणारा असेल? त्यामुळे पुढचे शैक्षणिक वर्ष नेमके कधी सुरू होईल हेही सांगता येणार नाही. आज सरासरी 80 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण होत असतात. ते प्रमाण जर 95 टक्केपर्यंत गेले तर वाढलेला टक्का प्रवेशाला किती आव्हान निर्माण करणारा असेल? उच्च शिक्षणासाठी किंवा महाविद्यालयीन शिक्षणासाठी प्रवेश घेण्यासाठी तेवढ्या जागा उपलब्ध असतील का हा फार मोठा प्रश्न या राज्यात असणार आहे. त्यात येत्या शैक्षणिक वर्षात सोशल डिस्टन्सच्या आधारे प्रवेश देण्याचे ठरले तर जागा कमी असतील आणि प्रवेशासाठी धडपडणारे असंख्य असतील. अशा परिस्थितीत शिक्षणात किती काळाबाजार होईल? घोडेबाजार होईल याचा विचारच करणे अवघड आहे. यामध्ये ज्याच्याकडे पैसा आहे तो शिकेल आणि बाकीचे भिकेला लागतील अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे आपल्याला जे शिक्षण घ्यायचे होते ते घेता येणे शक्य नसल्याने विद्यार्थीवर्गात वैफल्य निर्माण होउन आत्महत्येचे प्रमाण वाढण्याची शक्यताही अधिक आहे. त्यामुळे या शिक्षणाच्या जुगारात नेमका कोण जिंकतो आणि कोण हरतो हे पाहणाराचा हा यंदाचा दहावी बारावीचा निकाल असणार आहे. कारण हा निकाल आणि एकुणच शिक्षणाचे हे कोरोना धोरण सामाजिक, आर्थिक दरी निर्माण करणारे असणार आहे. कोणाचे फासे कसे पडतात यावर कोण जुगार जिंकणार आणि कोण हरणार हे स्पष्ट होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा