शनिवार, ११ जुलै, २०२०

तिसर्‍याला लाभ मिळू नये यासाठी


इसापनीतीतील कथांमधून आपण दोघांचे भांडण तिसर्‍याला लाभ हे लहानपणी शिकलो. दोन बोक्यांच्या भांडणात माकड आपला लाभ कसा करून घेते आणि दोघी बोक्यांना उपाशी रहावे लागते. हा प्रकार राजकारणात अनेकवेळा घडत असतो. विशेषत: आघाडीच्या राजकारणात तर नेहमीच घडतो. म्हणूनच या दोघांच्या भांडणात तिसर्‍याला म्हणजे भाजपचा फायदा होउ नये यासाठी सेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आपापसातील प्रकरण, वाद, भांडण, मतभेद यापैकी काहीही म्हणा पण मिटवले आणि सरकार पडण्यासाठी आ करून बसलेल्या भाजपच्या नेत्यांना आशेवरच ठेवले. अर्थात हे सगळे शरद पवारांमुळेच होउ शकले. कारण दोन बोक्यांच्या भांडणात आपला लाभ करसा करून घ्यायचा याबाबत राजकारण करण्यात शरद पवरांची हयात गेली. त्यामुळे महत्प्रयासाने हातात आलेला लोण्याचा गोळा जाउ न देण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यासाठी मातोश्रीवर जाउन तडजोडी केल्या.
आता आमचं ठरलं आहे आम्ही निलेश लंके यांच्या बरोबर राहणार आहे. शिवसेनेनं परत बोलावलं तरी जाणार नाही. आम्ही पदाचा राजीनामा देऊ, पण शिवसेनेत परत जाणार नाही, पारनेरचे नगरसेवक नंदकिशोर देशमुख यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश करण्याआधी बरोबर 24 तास आधी ही प्रतिक्रीया दिली होती. पण ती फार काळ टिकली नाही. कारण या फुटाफुटीचा फायदा भाजप घेईल हे दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी ओळखले. त्यामुळे त्यांनी नगरसेवकांना परत स्वगृही जाण्याचा सल्ला दिला. काही झालं तर शिवसेनेत न जाण्याचा विडा उचलणार्‍या नगरसेवकांना परत सेनेत जावे लागले. त्यामुळे सर्वांनाच प्रश्न आहे की 24 तासांमध्ये असं काय घडलं की हे पाचही नगरसेवक पारनेरमधून थेट मुंबईत पोहोचले आणि नंतर पुन्हा शिवसेनेत गेले. महत्त्वाचं म्हणजे ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निलेश लंके यांच्यासाठी या मंडळींनी शिवसेना सोडली होती, तेच राष्ट्रवादीचे निलेश लंके त्यांना मातोश्रीवर शिवसेना प्रवेशासाठी घेऊन गेले हे विशेष.
प्रथम दर्शनी सध्या तरी शिवसनेचे 5 नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले आणि मग ते पुन्हा शिवसेनेत गेले असं सरळसोपं दिसत असलं तरी ते तितकं  सरळ खरंच आहे का की त्यामागे खूप मोठं राजकारण आणि राजकीय खेळी आहे?
 निलेश लंके आत्ता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत ते आधी शिवसेनेचे पारनेर तालुका प्रमुख होते. तत्कालीन स्थानिक शिवसेना आमदार विजय औटी यांच्याविरोधात जाऊन त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2019ची विधानसभा निवडणूक लढवली. स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये विजय औटी यांच्याविरोधात नाराजी होती. तसंच बंडखोरी करणारे हे नगरसेवक सुद्धा  निलेश लंके यांचे जुने कार्यकर्ते होते. त्यातच पारनेर नगर पंचायतीच्या निवडणुकीला अवघे 3 महिने असताना 5 शिवसेना नगरसेवकांनी लंकेंच्या साथीनं राष्ट्रवादीमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. अजित पवार यांच्या उपस्थितीत बारामतीमध्ये तो झाला सुद्धा. आमचा विरोध स्थानिक माजी आमदारांना आहे उद्धव ठाकरेंना नाही असं त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलं होतं.
  या प्रवेशाआधी अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी 26 जून रोजी पारनेरचा दौरा केला. पण त्यांची ही कौटुंबिक भेट असल्याचा दावा निलेश लंके यांनी केला होता. त्यानंतर 4 जुलैला बारामतीमध्ये अजित पवार यांच्या उपस्थितीत शिवसेनाच्या 5 नगरसेवकांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला.
  स्थानिक पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्याचं या नगरसेवकांनी सांगितलं होतं. पुढे 2 दिवसांना म्हणजेच 6 जुलै रोजी खुद्द शरद पवार यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यांच्यात वेगवेगळ्या मुद्द्यांवर प्रदीर्घ चर्चा झाली. ही चर्चाच फार महत्वाची होती. म्हणजे अशा परिस्थितीचा फायदा कोणी घेउ नये यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता. कारण असे राजकारण करण्यातच त्यांचे आयुष्य गेले आहे. शरद पवार यांच्या मातोश्रीवरील भेटीनंतर आम्ही शिवसेनेत परत जाणार नाही असा पवित्रा घेणारे नगरसेवक मुंबईत पोहोचले, त्यांनी अजित पवार यांची भेट घेतली आणि नंतर मातोश्रीवर जाऊन पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला.
म्हणजे 23 नोव्हेंबरला ज्या चपळाईने अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत राज्यपालांकडून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि दोन दिवसांनी परत माघारी आले, तसेच हे राजकारण केले. त्यात भाजपला त्यांनी दणका दिला आता नक्की दणका कोणाला दिला आहे हे लवकरच समजेल. पण यातून एक मुलभूत प्रश्न उपस्थित होतो तो म्हणजे, तुमच्या पक्षाचा मुख्यमंत्री असताना पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी राष्ट्रवादीमध्ये जाण्याचं कारण काय? शिवसेनेचे नगरसेवक ही फक्त लिटमस टेस्ट असू शकते. शिवसेनेचे आमदार आम्ही असेच फोडू शकतो ही झलक तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना दाखवली नाही ना? म्हणजे आज जरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वरचढ दिसले, पोलीसांच्या बदल्या रद्द करण्याची खेळी केली असली, नगरसेवक परत मिळवले असले तरी या तहात त्यांची हार झालेली नाही ना? असा प्रश्न यातून निर्माण होतोच. कारण समोर तह करण्यासाठी शरद पवार आहेत, खेळी त्यांनी अजित पवारांकडून करून घेतलेली आहे. जसे 23 नोव्हेंबरला औट घटकेचे मुख्यमंत्रीपद देउन आम्हीच राज्यात कोणाबरोबरही सरकार स्थापन करू शकतो असा धडा फडणवीसांना शिकवला तसा तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांना शिकवला नाही ना? असा प्रश्न यातून निर्माण होतो. या सर्व घडामोडींमागे नेमकं काय राजकारण आहे, त्याचा नेमका अर्थ काय, नेमकं कोण कुणाला काटशह देण्याचा प्रयत्न करत आहे? यामुळे राज्यातलं सरकार अस्थिर होईल का?
उद्धव ठाकरे यांनी हा विषय प्रतिष्ठेचा केल्यानेच उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भेटीत यावर चर्चा झाली असणार असं दिसून येत आहे. पण यातून राष्ट्रवादीचा पचका झाला असे दिसत असले तरी प्रत्यक्षात तशी परिस्थिती असेलच असे नाही. स्थानिक नगरपंचायतीच्या मुद्यात शरद पवार लक्ष घालतात यातच सगळे काही आले. मी केंद्रातला नेता आहे, स्थानिक तिकीट वाटपाचा विचार मी करत नाही असे विधानसभा निवडणुकीत वक्तव्य करणारे शरद पवार नगरपंचायतीत कसे काय लक्ष घालतील? त्यामुळे या लीटमस टेस्टमागे एखादा फार मोठा इशारा असू शकतो.
पण सेना राष्ट्रवादीतील या मतभेदाच्या ठिणगीचा वणवा पेटवण्याचे काम भाजपकडून होउ नये यासाठी हा प्रकार केलेला आहे हे नक्की.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: