दुटप्पी राजकारण
विकास
दुबे या गुंडाचा खात्मा झाला आणि त्याचे दु:ख आमच्या असंख्य राजकीय
पक्षांना झाले. म्हणजे त्या गुन्हेगारांच्या नातेेवाईकांना झाले नसेल एवढे
दु:ख काँग्रेस, समाजवादी, बसपा या उत्तर प्रदेशात दशकानुदशके राज्य
करणार्या पक्षांना झाले. की या राज्याला अविकसीत ठेवण्याचे, गुन्हेगारी
राज्य बनवण्याचे काम ज्यांनी केले त्यांनाच याचे दु:ख झाले. बाकी सामान्य
माणसाला आनंदच झाला. ज्यावेळी सामान्य माणूस आनंदी होतो ते राज्य चांगले
असते. पण सामान्य माणसांना आनंद वाटेल असे काही करायचे नाही या
प्रवृत्तीनेच गुन्हेगारी जगताची निर्मिती अशा राजकीय पक्षांकडून झालेली
दिसते.
60 गंभीर गुन्हे नावावर असलेला, आठ पोलिसांना ठार करणारा गुंड
विकास दुबे मारला गेला! त्याने 8 पोलिसांना मारले आणि पोलिसांनी त्याचा
बदला घेतला. बस्स. एवढीच बातमी आहे आणि ती तेवढीच हवी. आता त्याला फाटे
फोडणारे फोडत बसतील. आम्ही मात्र कुठल्याही संशयाला थारा देता कामा नये.
याची अनेक कारणे आहेत. पण त्यामध्ये कारणापेक्षा राजकारण करायला काँगे्रेस
आदी पक्षांना विषय मिळाला याचेच आश्चर्य वाटते. कोरोनामुळे बोलायला काही
नव्हते त्यामुळे प्रियंका गांधींपासून ते अखिलेश यादव, मायवती यांना विकास
दुबेचा पुळका अचानक आला. अर्थात प्रियंका गांधींकडून अपेक्षा करताच येणार
नाही, कारण त्या इतक्या अहिंसावादी, गांधीवादी आहेत की देशातला प्रत्येक
गुन्हेगार मोकाट सुटावा, त्याला शिक्षा होउच नये असे वाटते. म्हणून तर
आपल्या पित्याची हत्या करणार्यालाही फाशी होउ नये अशी अपेक्षा त्यानी
व्यक्त केली होती. इतकेच नव्हे तर त्या नलीनीला भेटायलाही त्या जात होत्या.
म्हणजे विकास दुबेने आठ पोलिसांना ठार करून पळ काढला, तेव्हा यांच्या
प्रतिक्रिया होत्या- योगी सरकार त्याला पकडणारच नाही. तो त्यांचा माणूस
आहे. काहींचे म्हणणे होते की, योगी सरकार दुबेचे ‘एन्काऊंटर’ करणार नाही.
त्याचे नाव सोहराबुद्दीन किंवाइशरत जहाँ थोडीच आहे! उज्जैनमध्ये दुबेला
पकडल्यावर या लोकांच्या प्रतिक्रिया होत्या- बघा, म्हटले होते ना
‘एन्काऊंटर’ करणार नाही म्हणून! पण दुबे पकडला गेला की शरण आला? आता दुबे
उत्तरप्रदेशच्या तुरुंगात आलिशानपणे राहील. ज्या उत्तरप्रदेशच्या पोलिसांना
त्याने मारले, त्याच राज्याचे पोलिस त्याचे संरक्षण करतील आणि तो
तुरुंगातून आपले राज्य चालवेल. या प्रतिक्रिया कालपर्यंतच्या होत्या. पण
शुक्रवारी सकाळी पळून जात असताना दुबे पोलिसांकडून मारला गेला, हे समजताच,
एकदम विरुद्ध प्रतिक्रिया यायला लागल्या. म्हणजे स्वत:ला लिबरल समजणारे
म्हणू लागले की, त्याच्याकडे अनेक राजकीय गुपिते होती आणि ती बाहेर येऊ नये
म्हणून त्याला मारण्यात आले. अपघातात गाडी उलटली वगैरे खोटे आहे. योगी
सरकारची ‘पोलखोल’ वाचली. उत्तरप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि ज्या पक्षाचा
विकास दुबे कार्यकर्ता होता असे सांगण्यात येते त्या पक्षाचे अध्यक्ष
अखिलेश यादव म्हणाले की, कार उलटली आणि योगी सरकार उलटणे वाचले.
प्रतिक्रिया देणारे इतके उलटसुलट मत व्यक्त करीत आहे की, सर्वसामान्यांचे
डोके वैतागून जाईल. केवळ राजकारणासाठी कोणाची तळी उचलतात हे लोक? म्हणजे या
थराराचा घटनाक्रम इतका वेगवान होता की, ठेवणीतील प्रतिक्रिया व्यक्त करून
ही लिबरल मंडळी निवांत बसली होती. परंतु, असे काही अचानक घडेल याची त्यांना
कल्पनाच नव्हती. त्यामुळे ही मंडळी चांगलीच गडबडली आहे.
वास्तविक हा
गुंड विकास दुबेे सापडला तो मध्यप्रदेशात. तिथेही भाजपाचे राज्य. मात्र
गेल्याचवर्षी हैदराबादजवळील शमशाबाद येथे एका महिला पशुवैद्यकावर बलात्कार
करून तिची हत्या करण्यात आली. तिचा मृतदेह 28 नोव्हेंबर 2019 रोजी सापडला.
या घृणित घटनेचा देशभरात संतप्त निषेध करण्यात आला. ठिकठिकाणी प्रदर्शनेही
झालीत. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या फूटेजवरून चार संशयितांना अटक केली. पोलिस
म्हणाले की, या चौघांनी गुन्हा कबूल केला आहे. त्या चौघांना घटनास्थळी नेत
असताना, दोघे पोलिसांना हुलकावणी देत पळाले व सोबत पोलिसांच्या बंदुकापण
नेल्या. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ते चौघे संशयित
आरोपी मरण पावले. देशभरात विशेषत: महिलांनी विजयोत्सव साजरा केला. तेलंगणा
पोलिस रातोरात हिरो झालेत. या घटनेत राज्य तेलंगणा आहे. मुख्यमंत्री
चंद्रशेखर राव आहेत. ते भाजपाचे नाहीत. त्याचवेळी हे लोक अगदी गप्प बसले.
मानवाधिकारवाले, राजकीय नेतेमंडळी देखील चूप. हा या लोकांचा खोटेपणा नाही
का? जी कृती बिगरभाजप राज्यात घडली तर बरोबर आणि भाजपच्या राज्यात घडली तर
ती चूक, असा दुजाभाव कसा काय करता येईल? त्यावेळी प्रियंका गांधीपासून
मायावती, अखिलेश त्या कृतीचे कौतुक करतात. मग विकास दुबे घटनेत त्यांनी
पोलिसांचे कौतुक का केले नाही? कालच्या घटनेत काहींनी सावध पवित्रा घेतला
आहे. विकास दुबेला मारल्याचे त्यांनाही दु:ख आहे. परंतु, यांना वेगळीच
काळजी आहे. दुबेकडे राजकारणातल्या ज्या प्रभावी व्यक्तींची गुपिते होती,
त्याचे काय? ती आता कायमची नष्ट झालीत. पोलिस चौकशीत राजकारण आणि गुन्हेगार
यांचे संबंध उघड झाले असते. त्यामुळे त्याला मारणे योग्य नव्हते. असे
यांचे म्हणणे आहे. हा युक्तिवाद निश्चितच योग्य असेलही. परंतु, यावरून
विकास दुबेला पोलिसांनी खोटी चकमक करून ठार केले, हे काही सिद्ध होत नाही.
विकास दुबेकडे राजकीय गुपिते होती, हे मान्य केले तरी, ती कुठल्या राजकीय
नेत्यांची असतील? तीन वर्षांपूर्वी सत्तेत आलेल्या भाजपा नेत्यांची असतील
की, आतापर्यंत त्याला पोसणार्या राजकीय पक्षांची असतील? विकास दुबे योगी
आदित्यनाथांचा खास माणूस असता तर त्याला पकडण्यासाठी योगींनी कशाला धडपड
केली असती? त्या 8 पोलिसांचे प्राण तरी वाचले असते ना! म्हणजे, ज्याच्याकडे
गुपिते आहेत त्याला जगातूनच संपविले जाते, असे यांना म्हणायचे आहे. विकास
दुबे मारला गेला नसता तर तो आपल्या न्यायव्यवस्थेच्या कृपेने एखाद्या
तुरुंगात राहिला असता. तिथून त्याने आपला कारभार सुरू केला असता. पोलिस
खाते त्याच्या खिशात होते, असे हेच लोक म्हणत आहेत. त्यामुळे त्याला कसलीच
अडचण आली नसती. कदाचित पुढच्या लोकसभा अथवा विधानसभेच्या निवडणुकीला तो उभा
झाला असता आणि निवडूनही आला असता. असे तुरुंगात असूनही निवडून आलेले बरेच
आमदार भारतात आहेत. त्यावर अनेक हिंदी चित्रपटही निघाले आहेत. त्यामुळे
प्रतिक्रिया देवून हे राजकीय नेते, लिबरल लोक पुरोगामी किंवा विचारवंत
ठरणार नाहीत तर त्याच्या या दुटप्पीपणाची ओळख झाल्याने ते जनतेच्या मनातून
उतरल्याशिवाय राहणार नाहीत. आता मेल्या म्हशीला दहा शेर दूध या प्रमाणे
विकास दुबेच्या नावाखाली कसे राजकारण हे लोक करतात हे पाहणे मनोरंजकच असेल.

|
|
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा