एक शरद बाकी सगळे गारद या मुलाखतीच्या दुसर्या भागातून ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी बाकी सगळे म्हणजे कोण हे माहिती नाही पण काँग्रेस आणि शिवसेना खासदार संजय राउत यांनाच गारद केल्याचे दिसून आले. कारण जी अस्त्रे प्रश्न म्हणून संजय राउत यांनी भाजपवर सोडली होती ती उत्तरातून शरद पवारांनी काँग्रेसवर फिरवली. त्यामुळे संजय राउत यांचे हे अस्त्र बुमरँगसारखे त्यांच्याच अंगावर उलटले. त्यातून सेनेला फायदा होण्याऐवजी भाजपलाच फायदा झाल्याचे दिसत आहे.
म्हणजे गेला महिना दीड महिना काँग्रेसकडून मोदींवर आरोप होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनसमोर शरणागती पत्करली असून आपली भूमी चीनला बळकावू दिली आहे, या आरोपांनी गेला महिना गाजवला आहे. काँग्रेसची ही भाषा संजय राउत यांनी या मुलाखतीत वापरली आणि मोदींवर शरसंधान करण्याचा प्रयत्न केला. मोदींनी भारताचा भूभाग गमावला आहे काय असा प्रश्न थेट शरद पवारांना विचारल्यावर शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितले की तो भाग आज नाही पूर्वीच म्हणजे जवाहरलाल नेहरूंच्या काळातच चीनने बळकावला आहे. त्यामुळे अप्रत्यक्षपणे याला काँग्रेस, नेहरू जबाबदार आहेत हे स्ष्ट करून मोदी किंवा भाजप याला जबाबदार नाहीत हे स्पष्ट केले आहे. भाजपला अडचणीत आणण्यासाठी टाकलेला गुगली संजय राउत यांच्यावरच उलटला आणि या मुलाखतीचा काही फायदा होत नाही हे त्यांच्या नजरेवरून दिसले. त्याचप्रमाणे काँग्रेसने केलेले आरोप शरद पवारांनीच खोडून काढल्यामुळे शरद पवारांची उत्तरे ही काँग्रेसलाच चपराक देणारी ठरली आहेत.
म्हणजे ज्या पक्षाच्या सत्ताकाळात लडाखची 38 हजार चौरस किलोमीटरची भूमी चीनच्या घशात गेली त्या पक्षाच्या नव्या पिढीतील नेत्यांनी मोदींवर (अधिक भूमी गमावलेली नसताना) केलेले शरसंधान तसे हास्यास्पदच. पण या नेत्यांच्या सुरात सूर मिसळून मोदींवर आगपाखड करणा़र्या विचारवंतांना आणि पुरोगाम्यांनाही ‘मोदींची खाशी जिरल्याचा’ आनंद लपविण्याचा प्रयत्न करूनही लपविता येत नव्हता. पण या सर्वांची तोंडे शरद पवारांनी बंद केली आहेत. आता हे लोक शरद पवारांना खोटे ठरवण्याचा प्रयत्न करणार का?
मोदी म्हणतात तसे खरोखरच शरद पवार त्यांचे गुरू असतील तर गुरूने शिष्याच्या मदतीला धावून आलेच पाहिजे. ही संस्कृतीच आहे. पण यावरही संजय राउत यांनी प्रश्न विचारला तेंव्हा शरद पवारांनी चपखल उत्तर देउन संजय राउत यांनाच गारद केले. कारण शरद पवारांनी असे बोलायचे असते, परस्परांचा आदर करण्याची ती प्रथा आहे त्यात गैर काही नाही अशा आशयाचे उत्तर दिल्याने मोदींची खिल्ली उडवण्याचा मनसुबा धुळीला मिळाला होता. पण एकुणच मुलाखतीच्या दुसर्या भागात शरद पवारांनी काँग्रेसला चपराकीवर चपराकी मारल्या आणि संजय राउत यांचे बुमरँग त्यांच्यावर उलटले.
मुलाखतीचा पहिला भाग प्रसिद्ध झाल्यावर एकंदर मोदी सरकारविरोधी गटात एकाएकी अतिशय उत्साह संचारल्याचे दिसत होते. चीन प्रश्नावरून मोदींवर टीका करता येईल आणि तीही शरद पवारांच्या तोंडून असा विचार मुलाखत घेणाराचा होता. कारण अगोदरच चीन प्रश्नावरून पुरोगामी विचारवंत म्हणवणार्या वृत्तपत्रांमधून, टीव्ही वृत्तवाहिन्यांच्या चर्चात्मक कार्यक्रमातून आणि समाजमाध्यमांतूनही ही मंडळी दात ओठ खाऊन मोदींवर आरोपांचा भडिमार करीत होती. हाच विषय गरम असताना तो प्रश्न म्हणून उचलण्याचा प्रयत्न संजय राउत यांनी केला. या संपूर्ण परिस्थितीत मोदी सरकारने मौन राखले होते. कारण सत्य परिस्थिती लवकरच जगासमोर येईल याचे त्यांना भान होते. विरोधकांनी कोंबडे झाकून ठेवले म्हणून उजाडायचे राहणार नव्हते. त्यामुळे अनेक बोलघेवडे नेते असतानाही भाजपकडून या आरोपांना कोणी उत्तर देत नव्हते. त्यामुळे काँग्रेस जास्तच तो प्रश्न उचलून धरत होती. सभागृहात चर्चा न करता राहुल गांधी ट्टिट करून जगाला आपली हुषारी दाखवून देत होते. तर हुसेन दलवाई यांच्यासारखे हुजरे लाचार लोक भारतीय सैन्याच्या हातात बंदुका देण्याऐवजी काठ्या का दिल्या? ती काय संघाची शाखा होती का असा आचरट प्रश्न विचारत होते. पण या सर्व काँगी नेत्यांना शरद पवारांनी चांगलीच चपराक संजय राउत यांच्या माध्यमातून मारली. सरकारचे, विशेषतः मोदींचे मौन हे त्यांचे ‘तोंड बंद झाल्या’चेच द्योतक आहे, अशा थाटात विरोधी नेते व विचारवंत सरकारवर तुटून पडत होते. इतके, की अस्सल मोदी भक्तांच्या मनातही आपल्या नेत्याच्या क्षमतेसंबंधी शंकेची पाल चुकचुकावी. ही परिस्थिती शनिवारपर्यत होती. अर्थात त्यापूर्वीच म्हणजे गेल्या शनिवारी पंतप्रधान मोदींनी अचानकपणे लेह-लडाखचा दौरा केला. 15 जूनच्या संघर्षात जखमी झालेल्या सैनिकांची विचारपूस केली. प्रत्यक्ष त्या भूमीत जाऊन वरिष्ठ सेनाधिका़र्यांकडून परिस्थिती समजावून घेतली. त्यानंतर त्वरित स्थिती बदलू लागली. रविवारी देशाचे सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी चीनचे मंत्री वँग यी यांच्याशी दूरध्वनीवरून दोन तास बोलणी केली. त्यानंतर चोवीस तासांमध्ये चिनी सेना प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून माघारी जाण्यास प्रारंभ झाल्याचे वृत्त थडकू लागले. प्रारंभी त्यावर कोणाचा विश्वास बसला नाही. तथापि, नंतर हे वृत्त खरे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतरच्या तीन दिवसांमध्ये सीमेवरील जवळपास सर्वच संघर्ष बिंदूंवरून चिनी सेना साधारणतः दोन किलोमीटर मागे गेल्याचे स्पष्ट झाले आणि दोन महिने सातत्याने राहिलेला तणाव निवळू लागल्याचे अनुभवास आले. भारताने सावध पवित्रा घेत पडताळणी केल्याशिवाय काही बोलणार नाही, अशी यथायोग्य भूमिका घेतली. अखेर गुरूवारी चीनची सेना सर्वच क्षेत्रांमधून माघारी गेल्याचे, तसेच भारतानेही आपली नियंत्रण रेषेवरची सेना तितकीच मागे घेतल्याचे अधिकृतरित्या स्पष्ट करण्यात आले. आता आवाक होण्याची वेळ सरकारच्या विरोधकांवर आली. पारडे फिरल्याचे दिसू लागले होते. ज्या कथित चिनी आक्रमणाच्या भरवशावर सरकारचा नक्षा उतरविण्याची स्वप्ने जे दिवसाढवळया पहात होते, त्यांची दिवास्वप्ने भंग पावून त्यांना खडबडून जागे व्हावे लागले. आपल्या अपेक्षांच्या विपरीत घडत आहे, याचा साक्षात्कार त्यांच्यासाठी असहय होत होता, हे देखील स्पष्ट कळत होते. पण त्यांचा नाईलाज होता. नियंत्रण रेषेवरून चीनचे सैन्य मागे हटणे म्हणजे मोदींविरोधातील एक कोलीत विझण्यासारखेच होते. त्याचवेळी शरद पवार यांनी मुलाखतीतून काँग्रेसला गारद केले. 1993 ला नरसिंहराव पंतप्रधान असताना आपण संरक्षणमंत्री होतो आणि तेव्हाच चीनबरोबर करार केला होता की दोन्ही सैन्यांनी शस्त्र वापरायचे नाहीत. फार तर काठीचा वापर करता येईल. त्यामुळे शस्त्र न वापरता भारतीय सैन्याने संयम राखला आणि धक्काबुक्की केली. त्यावेळी त्यांच्या हातात काठी होती ती काँग्रेसच्या सरकारने केलेल्या करारामुळे होती, ती संघाची काठी नव्हती हे शरद पवारांनी स्पष्ट करून हुसेन दलवाईंसारख्या विचारवंत टीकाकारांवर हल्ला चढवून काँग्रेसला चपराक दिली. हे त्यांच्यासाठी एक प्रकारे तोंडघशी पडणेच होते. काँग्रेसचे पाप भाजपच्या माथी फोडणे शक्य नाही हे दाखवून काँग्रेसचे दात घशात घालण्याचे काम शरद पवारांनी केले. सेनेच्या फायद्यासाठी संजय राउत यांनी मुलाखत घेतली पण त्या शरद पवारांनी काँग्रेसला प्रत्यक्ष आणि सेनेला अप्रत्यक्ष गारद केले. भाजप आणि राष्ट्रवादीची छुपी मैत्री आहेच याचे अप्रत्यक्ष संकेत दिलेत का हे भविष्यातच कळेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा