मराठी रंगभूमीवर विनोदी नाटककार म्हणून सर्वाधिक सातत्याने कामगिरी केलेले नाटककार म्हणजे वसंत सबनीस यांचे नाव घ्यावे लागेल. कोणत्या कलाकारासाठी आपण नाटक लिहिणार आहोत याचे भान ठेवून त्यांची सगळी नाटके लिहिली होती. त्यामुळे नाटकातील पात्र ही अत्यंत जिवंत अशी ठरली आहेत. ती सर्वच विनोदी नाटके अजरामर झालेली आहेत. अशा अजरामर विनोदी नाटकांचे लेखक म्हणून वसंत सबनीस यांची कामगिरी फारमोठी आहे. त्यामुळे हुकमी विनोदाचे नाटककार, अशी त्यांची ख्याती झाली होती.
वसंत सबनीस यांचे मूळ नाव रघुनाथ दामोदर सबनीस असे होते. त्यांचा जन्म सोलापूर येथे झाला होता. पंढरपूरच्या लोकमान्य हायस्कूलमधून वसंत सबनीस मॅट्रिक (१९४२), पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातून बी.ए. (१९४६). शासकीय नोकरीत असताना ते साहित्यनिर्मितीही करीत. त्यांच्या कविता अभिरूचीसारख्या दर्जेदार नियतकालिकातून प्रसिद्ध होत. पुढे ते विनोदी लेखक म्हणून प्रसिद्धी पावले. रंगभूमीवर त्यांची नाटकेही तुफान गाजली.
पानदान हा त्यांचा ललित लेखसंग्रह १९५८ मध्ये प्रसिद्ध झाला. त्यांच्या विनोदी लेखसंग्रहांपैकी चिल्लरखुर्दा (१९६०), भारूड (१९६२), मिरवणूक (१९६५), पंगत (१९७८), आमची मेली पुरुषाची जात (२००१) हे प्रसिद्ध लेखसंग्रह होत. आत्याबाईला आल्या मिशा (१९८५), विनोदी द्वादशी (१९८८), बोका झाला संन्यासी (२००१) हे त्यांचे काही विनोदी कथासंग्रह. निळावंती (१९६३), म्हैस येता घरा (१९६९), सौजन्याची ऐशीतैशी (१९७५), घरोघरी हीच बोंब (१९७७), मामला चोरीचा (१९८६), कार्टी श्रीदेवी (१९८८), गेला माधव कुणीकडे (१९९४) ही त्यांची रंगभूमीवर गाजलेली नाटके. विच्छा माझी पुरी करा (१९६८) या त्यांच्या लोकनाट्याने यशस्वितेचा विक्रम केला. ते प्रथम वीणा मासिकातून छपरी पलंगाचा वग या शीर्षकाने प्रसिद्ध झाले. तमाशा या लोककला प्रकाराला आधुनिक रूप देण्याचा पहिला महत्त्वाचा प्रयत्न म्हणून हा वग उल्लेखनीय ठरतो. दादा कोंडके, राम नगरकर या अभिनेत्यांची सबनीसांच्या उत्कृष्ट, चुणचुणीत संवादांना समर्थ साथ मिळाली. मार्मिक राजकीय भाष्य आणि चतुर संवाद हे या लोकनाट्याचे वैशिष्ट्य. लोकनाट्याला नवी परिमाणे देणाºया विच्छाचे सैंया भये कोतवाल हे हिंदी रूपांतरही लोकप्रिय झाले. या लोकनाट्याच्या बतावणीत आरंभी सबनीस स्वत: काम करीत असत. अदपाव सुतार, पावशेर न्हावी व सवाशेर शिंपी (१९५९) हे त्यांचे विच्छाच्या आधीचे लोकनाट्य. प्रेक्षकांनी क्षमा करावी (१९६१) आणि चिलखतराज जगन्नाथ (१९७१) हे त्यांच्या एकांकिकांचे संग्रह. त्यांच्या दोन विनोदी नाट्यकृतींना १९६३ व १९७२ चे महाराष्ट्र राज्याचे उत्कृष्ट वाङ्मयीन पुरस्कार लाभले. ते किशोर मासिकाचे संपादक होते. विनोदी लेखकाला जीवनाकडे, त्यातील विसंगतींकडे पाहण्याचा वैशिष्ट्यपूर्ण दृष्टिकोण, मार्मिक निरीक्षणशक्ती आणि सहज, उत्स्फूर्त शैली यांमुळे त्यांच्या लेखनाला जिवंतपणाचा, रसरशीत स्पर्श असे.
वसंत सबनीस यांच्या संहितेमुळे विच्छा माझी पुरी करा या वगनाट्यामुळे दादा कोंडके हा हिरा महाराष्ट्राला मिळाला. वगनाट्य हे सहकुटुंब पाहण्याची आणि सुजाण प्रेक्षकांना या प्रकाराकडे वळवण्याची फार मोठी कामगिरी वसंत सबनीस यांनी केली आहे.
शरद तळवलकर यांच्यासाठी घरोघरी हीच बोंब हे नाटक त्यांनी लिहिले असे जाणवते. यात शरद तळवलकर दाजिबा आणि लता थत्ते राधाकाकू ही जोडी सुपरहिट ठरली होती. १९८० च्या दशकात घरोघरी हीच बोंब या नाटकाने धुमाकूळ घातला होता. संपूर्ण महाराष्ट्रातून जोरदार दौरे या नाटकाचे झाले. अत्यंत हलकेफुलके असे विनोद निर्माण करत खसखस पिकवत हे नाटक प्रेक्षकांची पकड घ्यायचे. लग्न करायचे नाही असे ठरवलेल्या दोन फोटोग्राफरचे घरमालक म्हणून दाजिबा आणि राधाकाकू वावरत असतात. आपला लग्नातला मुंडावळ्या घातलेला फोटो काढायची राहिलेली हौस पुरवण्यासाठी म्हातारपणी मुंडावळ्या बांधून फोटो काढणारे दाजिबा-राधाकाकू म्हणजे शरद तळवलकर आणि लता थत्ते यांचे फोटो नाटकाच्या जाहिरातीचे मॉडेल बनले होते.
वसंत सबनीसांच्या आणखी एका विनोदी नाटकाने धुमाकूळ घातला होता ते म्हणजे सौजन्याची ऐशीतैशी. राजा गोसावी, लता थत्ते, अविनाश खर्शीकर, प्रकाश इनामदार, जयमाला काळे, जयंत सावरकर, पद्माकर आठवले यांच्या विनोद आणि अभिनयाची खºया अर्थाने जुगलबंदी त्यात असायची. सतत भांडणारे नाना-नानी आणि चाळीत त्यांची असलेली दहशत यातून होणारी विनोद निर्मिती ही खºया अर्थाने पोट धरून थकेपर्यंत हसवणारी होती. ही कमाल वसंत सबनीसांच्या लेखणीची होती.
१९९० च्या दशकात वसंत सबनीसांनी प्रशांत दामलेला डोळ्यासमोर ठेवून लिहिलेले गेला माधव कुणीकडे हे नाटक तर तुफान गाजले. प्रशांत दामलेने या नाटकाचे एका दिवसात तीन-तीन प्रयोग करून विक्रमही केला. मूळ इंग्रजी नाटकाची कल्पना असलेल्या नाटकाचे अस्सल मराठीकरण वसंत सबनीसांनी केले होते. प्रशांत दामले, विनय येडेकर यांची जुगलबंदी इथे पहायला मिळायची.
वसंत सबनीस यांनी अनेक चित्रपटांसाठी कथा-पटकथा संवाद लिहून प्रेक्षकांना हसवलेच. दादा कोंडके आणि सचिन पिळगांवकर यांच्या अनेक चित्रपटांच्या कथा-पटकथा संवाद वसंत सबनीसांनीच लिहिले होते, पण विनोदी नाटककार म्हणून त्यांची ख्याती खूपच झालेली होती. प्रेक्षकांची निखळ करमणूक करणे या ध्येयाने लेखन करून त्यांनी मराठी रंगभूमीच्या इतिहासात फार मोठे योगदान दिलेले आहे. मराठी रंगभूमीला प्रत्येक काळात दमदार विनोदी अभिनेते देण्याचे काम आणि विनोदी अभिनेत्यांसाठी चपखल लेखन करण्याचे काम वसंत सबनीसांनी केले. त्यांच्यामुळे दादा कोंडके, राजा गोसावी, शरद तळवलकर आणि प्रशांत दामले हे वेगवेगळ्या दशकात गाजवणारे अभिनेते प्रेक्षकांना मिळाले हे फार मोठे काम म्हणावे लागेल.
प्रफुल्ल फडके/ तिसरी घंटा
9152448055
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा