गेल्या काही दिवसांपासून तालिबान आणि अफगाणिस्तान हे चर्चेचे विषय झाले आहेत. वृत्तवाहिन्यांवर सतत त्याच विषयावरच्या बातम्या येताना दिसत आहेत. तालिबान हा एक कटू शब्द झाला आहे. ती एक वाईट संस्कृती आहे, असे सर्वत्र बोलले जाते. पूर्वी जसे जुलमी राजवट, जहागीरदारी लागून गेली काय, असे वाक्प्रचार वापरले जायचे तसे एखाद्याने काही हुकूम काढला की, लगेच तालिबानी निर्णय घेतला असे बोलले जाते. म्हणूनच हे तालिबान, अफगाणिस्तान नेमके काय आहे? अफगाणिस्तानातच तालिबानी का निर्माण झाले हे समजून घेणे आवश्यक आहे.
अफगाणिस्तानात सत्तेवर असलेल्या तालिबान संघटनेला २००१ मध्ये अमेरिकेने बाहेरचा रस्ता दाखवला होता, पण हळूहळू या संघटनेने स्वत:ची पाळेमुळे पुन्हा देशात रोवली आहेत. तालिबानचे सैनिक अफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबूल शहराच्या सीमेपर्यंत पोहोचले आणि अफगाणिस्तानातील सर्व मोठ्या शहरांवर तालिबाननं कब्जा केला आहे. आता संपूर्ण हुकूमत ही तालिबानने मिळवली आहे. अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांना पळून जाण्यास भाग पाडले. नाहीतर त्यांनी त्यांना जिवंत फासावर लटकावले असते. असे प्रकार यापूर्वी तिथे घडलेले आहेत.
तालिबानचा अर्थ विद्यार्थी असा आहे. म्हणजे पश्तो भाषेत विद्यार्थ्यांना तालिबान म्हणून संबोधलं जातं. साधारण ९० च्या दशकात सोव्हिएत संघ आपले सैनिक अफगाणिस्तानातून परत बोलवत होतं, त्याचदरम्यान देशात तालिबान संघटना उदयाला आली. पश्तो आंदोलन सुरुवातीला धार्मिक मदरशांमधून सुरू झालं. या माध्यमातून कट्टर सुन्नी इस्लामचा प्रसार-प्रचार केला जायचा. त्यासाठी सौदी अरेबियाने आर्थिक पुरवठा केला होता. याचदरम्यान दक्षिण-पश्चिम अफगाणिस्तानात तालिबानचा प्रभाव वेगाने वाढला. सप्टेंबर १९९५ मध्ये त्यांनी इराणशी लागून असलेल्या हेरात प्रांतावर ताबा मिळवला. त्यानंतर एक वर्षाने तालिबानने अफगाणिस्तानची राजधानी काबूल शहरावरही नियंत्रण मिळवलं होतं. त्यावेळी अफगाणिस्तानची सत्ता बुºहानुद्दीन रब्बानी यांच्या हाती होती. ते त्यावेळी सोव्हिएत सैनिकांचा विरोध करणाºया अफगाण मुजाहिद्दीन संघटनेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक होते. परंतु तालिबानने सर्वप्रथम रब्बानी यांनाच सत्तेवरून हटवलं होतं. तीन ते चार वर्षांच्या कालावधीत १९९८ येता-येता सुमारे ९० टक्के अफगाणिस्तानवर तालिबानने ताबा मिळवला होता.
सोव्हिएत संघाचे सैनिक परतल्यानंतर अफगाणिस्तानातील सर्वसामान्य नागरिक मुजाहिद्दीन सत्ताधाºयांचे अत्याचार आणि अंतर्गत कलहाला कंटाळले होते. त्यामुळे सर्वसामान्यांनी सुरुवातीला तालिबानचं स्वागत केलं. भ्रष्टाचारावर अंकुश, अराजकतेच्या परिस्थितीत सुधारणा, रस्तेबांधणी तसंच विशिष्ट पद्धतीची प्रशासन यंत्रणा उभारणं, लोकांना सुविधा पुरवणं यांसारख्या कामांमुळे सुरुवातीच्या काळात तालिबान संघटना लोकप्रिय झाली. याचदरम्यान तालिबानने शिक्षा देण्यासाठी इस्लामिक पद्धतीचे कायदे देशात लागू केले. यामध्ये हत्या आणि अत्याचाराचे आरोप असलेल्या दोषींना सार्वजनिकरीत्या फासावर लटकवणे, चोरीच्या प्रकरणातील दोषींचे अवयव कापणे, अशा प्रकारच्या शिक्षांचा समावेश होता. तसेच पुरुषांनी दाढी वाढवणं आणि महिलांनी संपूर्ण शरीर झाकणाºया बुरख्याचा वापर करणं सक्तीचं करण्यात आलं. विशेष म्हणजे, तालिबानने टीव्ही, संगीत आणि सिनेमा यांच्यावर बंदी घातली. १० वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या मुलींनी शाळेत जाण्यावर बंदी घालण्यात आली. हा अतिरेक सुरू झाला. एकीकडे जग बदलत असताना, ग्लोबल होत असताना, माहिती तंत्रज्ञानाकडे झुकत असताना तालिबानी कायद्यांमुळे अफगाणिस्तान मागास बुरसटलेल्या विचारांना कवटाळत होता. त्यानंतर तालिबानवर मानवाधिकाराचं उल्लंघन आणि सांस्कृतिक गैरवर्तणुकीशी संबंधित अनेक आरोप होऊ लागले. याचंच एक उदाहरण म्हणजे २००१ मध्ये पाहायला मिळालं. त्यावेळी तालिबानने आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठा विरोध होऊनसुद्धा अफगाणिस्तानातील बामियान येथील भगवान बुद्ध यांची प्रतिमा नष्ट केली. सुमारे दोन हजार बुद्ध मूर्तींची त्यांनी तोडफोड केली आणि जगाला हादरवून सोडले. बुद्ध म्हणजे शांततेचे प्रतीक, पण या निर्बुद्ध लोकांनी शांततेवर, अहिंसेवर हल्ला करून दहशतवादाला स्वीकारले. तालिबानची स्थापना आणि त्याला बळकटी देण्याचे आरोप पाकिस्तानने नेहमीच फेटाळून लावले आहेत, पण सुरुवातीच्या काळात तालिबानी आंदोलनाशी संबंधित लोक पाकिस्तानातील मदरशांमधूनच निघाले होते, यात काहीही शंका नाही. आजही पाकिस्तान त्यांचे समर्थन करत असते. या तालिबानी प्रवृत्तीमुळेच तर ओसामा बिन लादेनला आसरा पाकिस्तानने दिला होता, पण अमेरिकेने पाकिस्तानात घुसून लादेनला संपवले आणि पाकिस्तानचा दहशतवादाला खतपाणी घालणारा चेहरा समोर आला. अफगाणिस्तानवर तालिबानचं नियंत्रण होतं, त्यावेळी त्यांना मान्यता देणाºया तीन देशांमध्ये पाकिस्तानचा समावेश होता. ११ सप्टेंबर २००१ रोजी न्यूयॉर्क वर्ल्ड ट्रेड सेंटरवर कट्टरवाद्यांकडून हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर संपूर्ण जगाचं लक्ष तालिबानकडे वेधलं गेलं. हल्ल्याचा मुख्य आरोपी ओसामा बिन लादेन आणि अल कायदाच्या हल्लेखोरांना शरण दिल्याचा आरोप तालिबानवर लावला गेला. ७ आॅक्टोबर २००१ रोजी अमेरिकेच्या नेतृत्वाखालील संयुक्त सैन्याने अफगाणिस्तानवर हल्ला केला. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात तेथील तालिबानचं शासन संपुष्टात आलं, पण जगातील सर्वात मोठ्या शोधमोहिमेदरम्यान ओसामा बिन लादेन आणि तालिबान प्रमुख राहिलेला मुल्ला मोहम्मद उमर तसंच इतर सहकारी अफगाणिस्तानातून पळून जाण्यात यशस्वी ठरले. तालिबान संघटनेतील अनेक नेत्यांनी पाकिस्तानच्या क्वेट्टा शहरात आश्रय घेतला. तिथूनच ते आपला कारभार चालवू लागले, मात्र पाकिस्तान सरकारने क्वेट्टामधील तालिबानचं अस्तित्व कधीच मान्य केलं नाही. याच तालिबानने मुल्ला उमरचा मृत्यू झाल्याची माहिती दोन वर्षांपेक्षा जास्त काळ लपवून ठेवली होती. मुल्ला उमरचा मृत्यू कथितरीत्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे पाकिस्तानमधील एका रुग्णालयात झाला होता. यावरून तालिबानी नेत्यांना आसरा देणारे पाकिस्तान हे मुख्य केंद्र आहे हे लक्षात येते. फेब्रुवारी २०२० मध्ये अमेरिका आणि तालिबान यांच्यात शांतता करार झाला. अनेक टप्प्यात चर्चा होऊन अखेरीस हा करार झाला होता. सुरुवातीच्या काळात शहरं आणि लष्करी तळांवर हल्ले करणाºया तालिबानने यानंतर विशिष्ट प्रकारच्या लोकांवर निशाणा साधण्यास सुरुवात केली. या हल्ल्यांमुळे अफगाणिस्तानची जनता पुन्हा एकदा भयभीत झाली. तालिबानने पत्रकार, न्यायाधीश, शांतता कार्यकर्ते आणि मोठ्या पदावरील महिलांना निशाणा बनवलं. म्हणजेच तालिबानने आपली कार्यपद्धती बदलली, पण कट्टरवादी विचारसरणी सोडली नाही. हेच जगाच्या दृष्टीने घातक असे चित्र आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा