कोरोना रुग्णांच्या बाधितांचा आकडा गेल्या आठवड्यात वरखाली होताना दिसत आहे. त्यामुळे दुसरी लाट ओसरली म्हणता-म्हणता पुन्हा चिंता वाढवल्याचे दिसत आहे. मागच्या आठवड्यात दररोज बाधितांचा आकडा तीस हजारांच्या आत आला होता. तो पुन्हा एकदा चाळीस हजारांच्या पार गेला. त्यामुळे दुसरी लाट ओसरता ओसरताच लगेच तिसरी लाट सुरू झाली आहे का, अशी शंका येताना दिसत आहे. त्यातच केंद्र सरकारने निर्बंध शिथील करू नका, ३१ आॅगस्टपर्यंत कायम ठेवा, काही ठिकाणी कडक निर्बंधांचे आदेश दिलेले आहेत. अशा परिस्थितीत सामान्य माणूस चिंताग्रस्त झालेला आहे. हे किती दिवस चालणार? केवळ बंद करून, घरात बसून जगरहाटी कशी चालणार? दीड वर्ष बंधने पाळली, तरी नियंत्रण नसेल, तर ती बंधने आता झुगारली पाहिजेत, असा विचारही अनेकांच्या मनात आता येऊ लागलेला आहे. ते काही चुकीचे आहे असे नाही. कोरोनावर नियंत्रण आणण्याचे भरपूर प्रयत्न सरकारने केले, जनतेने त्याला सहकार्यही केले आहे. असे असताना आता यातून बाहेर पडण्यासाठी सर्वांनी बाहेर पडूनच पाहिले पाहिजे, असे वाटू लागले आहे.
सामान्य माणसांना हव्या असणाºया सोयी-सुविधा लसीकरण मोठ्या प्रमाणात झाल्याशिवाय दिल्या जाणार नाहीत, असे सरकार म्हणते. आरोग्य मंत्र्यांनी तर स्पष्टच केले आहे की, मुंबई लोकल सर्वसामान्यांना सुरू करण्यासाठी ७० टक्के लसीकरण होणे आवश्यक आहे. प्रत्येकाचे दोन डोस होणे आवश्यक आहे. या विरोधाभासात सामान्य माणूस होरपळत आहे. एक तर लसीकरणाचा वेग जास्त नाही. लसींची उपलब्धता नाही. त्यात प्रचंड गोंधळ आहे. लसीकरण करून घेण्यास नागरिक तयार आहेत; पण त्यांना त्या वेगाने लसीकरण करण्याची क्षमता सरकारमध्ये नाही. खाजगी हॉस्पिटलमध्ये मुबलक लसी उपलब्ध आहेत; पण सरकारी दवाखान्यात टंचाई आहे. हे कसे काय घडू शकते ते न उलगडणारे कोडे आहे. अनेक ठिकाणी अशाही घटना घडल्या आहेत की, दोन-दोन डोस घेतले, तरी कोरोनाची लागण झालेली आहे. त्यामुळे त्यावर किती अवलंबून रहायचे आणि आपले जनजीवन किती काळ बंद ठेवायचे याचा विचार हा केलाच पाहिजे.
खरं तर काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार थंडीमुळे भारतात दर वर्षी सुमारे सहा लाख तर उष्णतेमुळे सुमारे ८४ हजार लोकांचा मृत्यू होतो. दीड वर्षात कोरोनाने अजून ५ लाख लोकांचाही मृत्यू झालेला नाही. तो आकडा यापेक्षा कमीच आहे. त्यामुळे आपण जर फक्त मृत्यूची चिंता करत कामधंदे न करता बसलो, तर चालणार कसे? यामुळे देशात गुन्हेगारी, अनागोंदी वाढेल, शोषणाची प्रवृत्ती वाढेल त्याचे काय?
आॅस्ट्रेलियाच्या मोनाश विद्यापीठाच्या संशोधकांच्या मतानुसार जगभरात दर वर्षी पन्नास लाखांहून अधिक मृत्यू अस्थिर तापमानामुळे होतात. देशात कोरोना आणखी बºयापैकी काळ ठाण मांडणार की जगभर जनसामान्यांची या त्रासापासून लवकर सुटका होणार, या प्रश्नाचं आश्वासक उत्तर सध्या कोणाकडेच नसलं, तरी लसीकरणानंतरचा काळ आश्वासक असल्याची भावना अनेकांच्या ठायी आहे. लसीकरण झाल्यानंतर आपण नियमित आयुष्य जगू शकतो, असं अनेकांना वाटत आहे. असं वाटणं चुकीचं नसलं, तरी यासंदर्भात वास्तवाचं भान असणं गरजेचं आहे. याबाबत तज्ज्ञांकडून स्पष्टीकरण पुढे येत आहेत. लस घेतल्यानंतरच्या काळातही काळजी घेणं गरजेचं आहे, हे तथ्य जसं पुढे येत आहे, तसंच कोरोनामुळेच अलीकडच्या काळात मोठी मनुष्यहानी झाली नसल्याचा, वाढत्या मृत्यूंना इतर काही बाबी कारणीभूत असल्याचा मुद्दाही पुढे आला आहे. कोरोनावरील लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर जणू आता काहीच भीती बाळगायचं कारण नाही, असं वाटत असेल तर तो गैरसमज आहे. लसींचे दोन डोस मृत्यू टाळत असले, तरी नियम न पाळल्यास कोरोनाचा संसर्ग कधीही होऊ शकतो, हे सत्यही पुढे येत आहे. इंडियन काऊन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) केलेल्या नव्या अभ्यासात ही बाब उघडकीस आली आहे. कोरोना लसीचे दोन डोस घेतल्यानंतर अनेकांना कोरोना झाल्याचं आढळलं, तेव्हा कोरोनावरील लसीच्या परिणामकारकतेबाबत साशंकता व्यक्त व्हायला लागली. त्यात गेल्या काही दिवसांपासून त्या व्हायरसचे बदलते स्वरूपही पुढे येताना दिसत आहे. म्हणूनच यातून एकदाचे बाहेर पडण्यासाठी काही तरी करावे लागणार आहे. स्वयंशिस्तीनेच हा प्रश्न सुटेल. नाही तर हे किती काळ चालेल हे सांगता येत नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा