अफगाणिस्तानावर तालिबानने पूर्णपणे ताबा मिळवला आहे. तालिबान राजवट परत येऊ लागल्याने अनेकांनी देश सोडण्यासाठी काबुल विमानतळावर गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे अफगाणिस्तानमधील महिला, तरुणींसमोर दुसरेच मोठे संकट उभे राहिले आहे. तालिबानने काही दिवसांपूर्वी त्यांच्या ताब्यात येत असलेल्या प्रांतांच्या मौलवींकडून ठिकठिकाणच्या १५ वर्षांवरील तरुणी आणि विधवा महिलांची यादी बनविण्याचे आदेश दिले होते, तसेच तालिबानचे दहशतवादी घरोघरी जाऊन तरुणींचा शोध घेत होते. या महिलांना उचलून नेत सेक्स गुलाम बनविले जात होते. अफगाणिस्तानातील मुस्लिम महिला-मुली या संकटात असताना, भारतात आपण धर्मनिरपेक्षपणे किती महिलांचा सन्मान करतो, त्यांच्या सुरक्षेसाठी, सन्मानासाठी सातत्याने झटत असतो, हे जगापुढे आदर्श असे उदाहरण आहे.
अफगाणिस्तानातील परिस्थितीवर ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर आणि बांगलादेशी लेखिका तस्लिमा नासरीन यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जावेद अख्तर म्हणाले, 'अमेरिका जर का तालिबानी लोकांचा खात्मा करू शकत नसेल, तर अमेरिका कुठली महाशक्ती आहे? अफगाण स्त्रियांना दया नसलेल्या धर्मांधांच्या भरवशावर सोडलंय. मानवाधिकारांचे रक्षणकर्ते असल्याचा दावा करणाºया सर्व पाश्चात्य देशांना लाज वाटली पाहिजे.' असं जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे; पण भारतात मुस्लिम महिलांचे शोषण थांबवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले, तेव्हा त्यांचे कौतुक करण्याचे काम मात्र या जावेद अख्तर यांच्याकडून का झाले नाही याचे आश्चर्य वाटते. तिहेरी तलाक, बुरखा अशा पद्धतीत शोषण होत असलेल्या महिलांना मोकळा श्वास घेण्याची व्यवस्था मोदी सरकारने केली, तेव्हा एक गट सतत मोदी सरकारवर टीका करत होता. अर्थात मोदी सरकारने त्याला भीक घातली नाही; पण अमेरिकेला नावे ठेवण्यापूर्वी भारतातील तालिबानी वृत्ती संपवणाºया मोदींचे कौतुक करण्याचे काम राहू दे निदान त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करायला काहीच हरकत नव्हती.
लेखिका तस्लिमा नासरीन यांनी ट्विट करत चिंता व्यक्त केली आहे. त्या म्हणाल्या, 'तालिबान अफगाणी महिलांना नष्ट करत आहेत. यापुढे तिथं कुठेही महिला दिसणार नाहीत. महिला केवळ लैंगिक गुलाम आणि मूल जन्माला घालणारी मशीन म्हणून घरीच राहतील. कट्टरतावादी तालिबानच्या राज्यात महिलांवरील अत्याचारांमध्ये वाढ होईल.' हे मत व्यक्त करताना आणि कायम वादग्रस्त लिखाणाबाबत प्रसिद्ध असलेल्या तस्लिमा नासरीन यांनी भारतात ज्या प्रकारे मुस्लिम महिलांच्या अधिकारासाठी सरकार पुढाकार घेत आहे, त्यावर भाष्य करायला पाहिजे होते. सरकारी भूमिकेचे स्वागत करायला पाहिजे होते. हे स्वातंत्र्य त्यांच्या धर्मियांनी दिले नाही, तर सरकारने दिले आहे. नाही तर धर्माच्या अधीन होऊन सर्वच स्त्रियांची हीच अवस्था झाली असती. त्यामुळे भारताची भूमिका जगाच्या दृष्टीने एका भक्कम विचारांच्या दिशेने आहे हे नक्की.
अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ घनी यांचे सरकार कोसळले असून, तालिबानने काबुलचा ताबा घेतला आहे. तालिबानी दहशतवाद्यांनी युद्धग्रस्त देश ताब्यात घेतला आहे. तालिबानी दहशतवादी रविवारी काबुलमध्ये घुसले व त्यानंतर घनी यांचे सरकार कोसळले. त्यामुळे घनी यांच्यासह नागरिक व परदेशी व्यक्ती यांना देश सोडावा लागला. त्यामुळे अफगाणिस्तानातील बहुतांश दुतावास रिकामे करण्यात आले. तेथील नागरिक आणि कर्मचाºयांना परत नेण्यासाठी अनेक देशांनी काबुल विमानतळावर विमाने पाठवली आहेत. असं असतानाच अफगाणिस्तानमध्ये २०० भारतीय नागरिक अडकून पडल्याची माहिती समोर येत असून, त्यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली जात असतानाच तालिबानने भारतीयांना आणि हिंदू धर्मियांना अभय दिल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर सोशल नेटवर्किंगवर भारताच्या नेतृत्वाबद्दल एका भाजपाच्या महिला नेत्याने वक्तव्य केलं आहे. या महिला नेत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींची तालिबान्यांनाही भीती वाटते, अशा आशयाचं ट्विट केलं असून, हे ट्विट सध्या व्हायरल झालं आहे. अर्थात हे फार चुकीचे आहे किंवा ते फक्त भाजपच्याच कार्यकर्त्यांनी नाही, तर संपूर्ण देशाने म्हणायला पाहिजे; पण तेवढे आमचे मोठे मन नाही हे कबुल केले पाहिजे. आम्ही अमेरिकेवर टीका करू शकतो की, त्यांनी हे का केले नाही; पण ते काम मोदींनी केले, तर मात्र आम्हाला वाईट वाटते. यावर जावेद अख्तर, शबाना आझमी यांच्यासारख्या विचारवंतांनी विचार केला पाहिजे.
दिल्ली भाजपाच्या प्रवक्त्या निघट अब्बास यांनी हे ट्विट केलं आहे. तालिबानने म्हटलं आहे की, ते अफगाणिस्तानमधील भारतीयांना लक्ष्य करणार नाहीत. म्हणजे त्यांना पण ठाऊक आहे की, मोदींजी त्यांना तीतर बनवू शकतात, असं अब्बास यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. या ट्विटमधील तीतर हा शब्द कोंबडा या अर्थाने वापरण्यात आलाय. अब्बास यांनी तालिबानने भारतीयांवर नजर टाकली, तर मोदी त्यांची अवस्था एखाद्या लाचार पक्षाप्रमाणे करून टाकतील, असे संकेत ट्विटमधून दिलेत. अर्थात हे अतिप्रेमापोटी आणि निष्ठेपोटी मत व्यक्त केले असले तरी आपल्या देशाचे नेतृत्व खंबीर आहे, हे विचारवंतांनी मान्य करायला हरकत नाही. अफगाणिस्तानातील महिलांच्या सुरक्षेवरून अमेरिकेने काही केले नाही, म्हणून गळा काढण्यापेक्षा इथल्या मुस्लिम महिलांच्या सन्मानार्थ सरकारने जी पावले उचलली आहेत, त्याचेही थोडे कौतुक केले, तर त्यामुळे भारतातील सामाजिक ऐक्याचे गोडवे सगळे जग गाईल.
अफगाणिस्तानातील जागतिक दहशतवादाच्या धोक्याशी लढण्यासाठी जगाने एकत्र यावे, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अन्तोनिओ गटेरस यांनी केले. ती भूमी पुन्हा दहशतवाद्यांसाठी स्वर्ग ठरू नये, असे ते म्हणाले. तालिबानने अफगाणिस्तानातील सत्ता काबीज केल्यानंतर देशाबाहेर पडण्यासाठी भीतीग्रस्त लोकांचे लोंढे काबुल विमानतळावर दाखल झाल्याने सोमवारी सकाळी तेथे अभूतपूर्व अनागोंदी माजली. यावेळी झालेल्या रेटारेटीत सात जणांचा मृत्यू झाला. केवळ महिलाच नाही, तर सर्वच नागरिक असुरक्षित आहेत. त्यामुळे जी पळापळ झाली ती दयनीय होती. अशा परिस्थितीत सर्वांना बरोबर घेऊन जाणारी भारताची भूमिका आणि भारताचे गोडवे विचारवंतांनी गायला हवेत. अमेरिकेच्या नावाने बोटे मोडण्यापेक्षा आपण केलेल्या कामाचेही मूल्यमापन व्हायला हवे.
प्रफुल्ल फडके/बिटवीन द लाईन्स
9152448055\\
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा