गुरुवार, १९ ऑगस्ट, २०२१

सामान्यांचा आवाज ‘बाबा’


जगभरात असंख्य वर्तमानपत्र, प्रसारमाध्यमे आहेत; पण त्यात कोणत्या तरी मोठ्या व्यक्तीचा दबदबा असतो. त्या व्यक्तीचा, पक्षाचा उदोउदो करण्यासाठी, अशी वर्तमानपत्रे चालवली जातात; पण सामान्य माणसांचे विषय घेऊन चालणारे कोण आहे? हा विषय आदरणीय मुरलीधर तथा बाबा शिंगोटे यांच्या मनात सतत घोळायचा. वर्तमानपत्र हे राजकारण्यांचा अड्डा असता कामा नये, तर त्यातून सर्वसामान्यांचे प्रश्न समोर आले पाहिजेत. सामान्यातल्या सामान्य माणसाच्या बातमीला, कर्तृत्वाला प्रोत्साहन मिळाले पाहिजे, असा विचार त्यांच्या मनात होता. त्याप्रमाणे सर्वसामान्यांचे दैनिक, सामान्यांचा आवाज, सामान्यांना आनंद देणारे वर्तमानपत्र देण्यासाठी बाबांनी पुढाकार घेतला आणि त्यातूनच मुंबई चौफेर, आपला वार्ताहर, पुण्यनगरी, यशोभूमी, कर्नाटक मल्ला, अशा वृत्तपत्रांची मालिका त्यांनी वाचकांना दिली आणि सामान्यांचा आवाज अशी ख्याती संपूर्ण महाराष्ट्रात मिळवली. आज बाबांचा प्रथम स्मृतिदिन आहे. त्यांना जाऊन लौकीकार्थाने वर्ष झाले असले, तरी अजूनही ते आसपास आहेत हे जाणवत राहते.

न कंटाळता, कायम उत्साहात काम करत राहणे, ही त्यांची ख्याती होती. अविश्रांत मेहनत आणि प्रामाणिकपणा हेच यशाचे रहस्य आहे, असे धोरणच त्यांनी अवलंबले होते. आपल्या कर्तृत्वाचा आणि कामे कशी करायची असतात, त्याचा ठसा उमटवून मराठी वृत्तपत्रसृष्टीत एक वेगळा ठसा उमटवणारे मालक, संपादक, प्रकाशक, वितरक म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे नाव घेतले जाते. बाबा शिंगोटे हे मराठी वृत्तपत्रसृष्टीतील एक चमत्कारच म्हणावे लागेल, म्हणूनच राज्य सरकारने त्यांच्या कर्तृत्वाची दखल घेऊन कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर कसे मोठे होता येते याचे शिक्षण मिळण्यासाठी शालेय अभ्यासक्रमातील पाठ्यपुस्तकात त्यांच्यावर एखादा पाठ घेण्याची आवश्यकता आहे. इतिहासातले कर्तृत्वाचे दाखले आपण नेहमीच वाचत आलो आहोत; पण वर्तमानातले साक्षीदार आणि वर्तमानात रमणारे हे व्यक्तिमत्व फार महत्त्वाचे आहे.


आपण वाचकांना जो अंक देणार आहोत, तो अत्यंत अचूक असला पाहिजे. माहितीने परिपूर्ण असला पाहिजे. त्यात मनोरंजनही असले पाहिजे, याकडे बाबांचा कटाक्ष असायचा. त्यामुळेच प्रस्थापित वर्तमानपत्रांतूनही आपली वेगळी वाट निर्माण करण्याचे त्यांचे धोरण हे यशस्वी झाले. अतिशय अल्प काळात त्यांनी आपली सर्वच वर्तमानपत्रे संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय केली. अवघ्या दोन दशकांत त्यांनी अनेक दशके लोकांच्या मनात असलेल्या वर्तमानपत्रांना मागे टाकत वाचकप्रियता मिळवली. हे काम सोपे नव्हतेच; पण ते त्यांनी सहजपणे करून दाखवले. यासाठी लागते ती जिद्द आणि प्रामाणिकपणा, जो त्यांच्याकडे होता, त्याचेच हे यश होते.


आजकाल मॅनेजमेंटच्या पदव्या घेणारे लोक आपल्या काही तरी कल्पना लढवून प्रयोग करत असतात; पण असली कसलीही प्रस्थापित डिग्री नसताना, बाबा त्यांच्या कल्पकतेने जो यशस्वी प्रयोग करत होते, त्यामुळे मुंबई चौफेर, पुण्यनगरी ही वर्तमानपत्रे यशाच्या उत्तुंग शिखरापर्यंत पोहोचली. याचे कारण दीर्घकाळ वितरण व्यवस्थेत राहिल्याने त्यांना वाचकांची नाडी सापडलेली होती. वाचकांना जे पाहिजे तेच दिले पाहिजे, यावर त्यांचा कटाक्ष होता. त्यामुळे बाबांच्या मार्गदर्शनाखाली उभारलेली सर्वच वर्तमानपत्रे आणि अंबिका ग्रुप वृत्तपत्रसृष्टीतील एक विश्वासपात्र आणि यशस्वी कंपनी ठरली.

बाबांच्या प्रत्येक वागणुकीतून आणि कृतीतून काही ना काही तरी सतत शिकायला मिळायचे. अन्य साखळी वर्तमानपत्रे किंवा त्यांची वितरण साखळी, त्यासाठी हिंडणारे कर्मचारीही या व्यवसायातले बारकावे नेमके कसे असले पाहिजेत, याचे मार्गदर्शन घेण्यासाठी सतत बाबांकडे येत असत. बाबा नेहमी सांगायचे की, सगळ्या वर्तमानपत्रांची आज कुठे, किती अंक विक्री झाली आहे, किती वितरीत केले आहे याची आकडेवारी दुसºया दिवशी समजायची; पण बाबांना मात्र ही आकडेवारी डोक्यात असायची. ती त्याच दिवशी सकाळी ११ वाजता त्यांना माहिती असायची. महाराष्ट्राच्या कानाकोप‍ºयात कोणत्या गावात कोणते वर्तमानपत्र किती ठिकाणी जाते, किती खप आहे, हे त्यांना माहिती असायचे. त्यामुळे कोणीही कितीही दावे केले, कसलीही आकडेवारी जाहीर केली, कोणाचेही दाखले दिले, कोणत्याही एजन्सीचे हवाले दिले, तरी बाबांचे त्यावर शिक्कामोर्तब असेल, तरच ती आकडेवारी खरी आहे का खोटी आहे, हे समजायचे. कारण बाबांना वाचकांची, विक्रेत्यांची, पत्रकारांची, संपादकांची सर्वांचीच माहिती व मर्यादा माहीत होती. प्रत्येकाची क्षमता माहिती होती. इतके ते सगळं कसं काय करत होते? तर एखादा चमत्कार असावा, अशी काम करण्याची त्यांची क्षमता होती. तो मशीनचा आवाज, कागदाचा वास आणि वाचकांपर्यंत पेपर पोहोचवण्यासाठी राबवण्यात येणाºया वितरणाचा आनंद हे त्यांना सतत हवे हवेसे वाटायचे. जास्तीत जास्त ताजी बातमी आपल्या अंकातून दिली पाहिजे यासाठीच त्यांनी अविश्रांत मेहनत घेतली आणि वाचकांची पसंती मिळवली.


बाबा नेहमी म्हणायचे की, लग्न समारंभात सजवलेले ताट असते, त्याप्रमाणे वर्तमानपत्र असले पाहिजे. चमचमीत भाजी, चटणी, कोशिंबीर, झणझणीत रस्सा, आमटी, आंबट ताक, कढी, चुरचुरीत तळण, भजी, गोडवा जपणारे मस्तपैकी पक्वान्न, अशी परिपूर्ण थाळी जशी लोकांना आवडती, तसेच वर्तमानपत्र असले पाहिजे. त्यात सगळे रस असले पाहिजेत. ज्ञान, विज्ञान, मनोरंजन, अध्यात्म, राजकारण, इतिहास, भूगोल, कला, नाटक, सिनेमा असे सगळे विषय असले पाहिजेत. गुन्हेगारी जगत असले पाहिजे, आरोग्य असले पाहिजे, शिक्षण असले पाहिजे. सगळं काही एकाचवेळी देता आले पाहिजे. दोन रुपये देऊन आपला पेपर विकत घेतल्यावर ते पैसे वसूल झाले, असे प्रत्येकाला वाटले पाहिजे. इतका छान अंक आपण दिला पाहिजे. यासाठी बाबा कायम आग्रही होते.

अत्यंत उत्साही आणि न कंटाळणारे बाबा अतिशय प्रेमळ होते. एखादी गोष्ट आवडल्यावर त्याचे मनापासून कौतुक करण्याचे मोठे मन हे बाबांचे होते. बाबांच्या सानिध्यातला प्रत्येक दिवस आणि क्षण हा काही ना काही तरी शिकण्यासारखा असाच होता. कोणी कितीही बढाया मारल्या, कितीही काहीही सांगितले, तरी त्याच्याकडे नेमके काय आहे, हे बाबा ओळखून होते. त्यामुळेच बाबांनी नेहमीच भेदभाव विरहीत काम केले. कोणी मोठा, कोणी छोटा, असा भेदभाव त्यांनी कधीच केला नाही. त्यामुळेच त्यांच्यावर प्रेम करणारी माणसे असंख्य होती.


माणसाचे मोठेपण त्याच्या कर्तृत्वात असते. त्याच्या कपडे, राहणीमानावर माणसाचे कर्तृत्व ठरत नसते. हे बाबांनी दाखवून दिले. रात्र-रात्र जागून आणि कमीत कमी विश्रांती घेऊन बाबांनी आपली कंपनी मोठी केली. कंपनीचा विस्तार मोठा केला.

महाराष्ट्रातल्या सगळ्या वर्तमानपत्रांना आपले बॅनर उभे करावे लागतात. जाहिराती कराव्या लागतात; पण आपण कधीही बॅनर उभा करायचा नाही, असा त्यांचा कायम कटाक्ष असायचा. कायम वाचकांचा विचार करण्याची त्यांची विचारधारणा होती. त्यामुळेच त्यांचे या क्षेत्रात मोठे योगदान होते. सामान्य माणूस, मध्यमवर्गीय आणि साधी माणसे हा आपला वाचक आहे, ती आपली ताकद आहे, त्यांना जपायचे आहे, हे बाबा नेहमी सांगायचे. त्यामुळे अत्यंत कमी कालावधीत सर्व वर्तमानपत्रे लोकप्रिय होत गेली. लोकमत उद्योग समूहाचे संचालक आणि पत्रकार, संपादक, माजी मंत्री राजेंद्रबाबू दर्डा हे बाबांचा नेहमीच अभ्यास करायचे. लांबून दिसले, तरी बाबांना सन्मानाने बोलवायचे आणि त्यांचा गौरव करायचे. या माणसाकडून बरेच काही शिकण्यासारखे आहे, असे ते आवर्जून सांगायचे. आसपास भव्य ताफ्यात हिंडणारे आमदार, खासदार, मंत्रिगण असतानाही लांबच्या गर्दीतून अत्यंत साधेपणाने दिसणाºया बाबांचा गौरव जेव्हा बाबूजी करायचे, तेव्हा सर्व जण बाबांकडे आश्चर्याने बघायचे, कारण या मागे बाबांची फार मोठी तपश्चर्या होती.


आज बाबांच्या जाण्याने अंबिका ग्रुपची, आमची सर्वांची कधीही भरून न येणारी हानी झाली आहे, कारण आमचे मार्गदर्शक गेले आहेत; पण त्यांनी घालून दिलेल्या वाटेवरच आम्ही पुढेही जाऊ, असे वचन त्यांना यानिमित्ताने देऊन आमची आदरांजली या ठिकाणी अर्पण करतो. बघता-बघता वर्ष कधी संपले हे कळलेच नाही; पण त्यांच्या आठवणीशिवाय कधी दिवस गेला नाही.

अत्यल्प शिक्षण आणि पत्रकारितेची कोणतीही पार्श्वभूमी नसताना केवळ वृत्तपत्र वितरण व्यवसायातील अनुभवाच्या जोरावर बाबांनी वृत्तपत्र काढण्याचे धाडस केले आणि ते यशस्वी करून दाखवले. त्यांनी अल्पावधीत स्वतंत्र वृत्तपत्र समूह सुरू केला. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असलेल्या उंब्रज या गावी ७ मार्च, १९३८ या दिवशी बाबांचा जन्म झाला. त्यांनी शाळेत प्रवेश केला; मात्र शिक्षणात त्यांचे मन रमले नाही. त्यांनी इयत्ता चौथीमधूनच शिक्षण सोडून दिले आणि नशीब काढण्यासाठी मुंबई गाठली. मुंबईत सुरुवातीला त्यांनी फळविक्रीचा व्यवसाय सुरू केला. या काळात त्यांनी बुवाशेठ दांगट यांच्याकडे वृत्तपत्र वितरणाच्या कामाला सुरुवात केली. ते घरोघरी जाऊन वृत्तपत्र टाकत असत. दरम्यानच्या काळात संयुक्त महाराष्ट्र आंदोलन टीपेला पोहोचले होते. याच काळात ते वृत्तपत्रांकडे अधिक आकृष्ट झाले. सर्वसामान्यांना आपले वाटेल, त्यातील भाषा साधी व सोपी असेल, असे वृत्तपत्र काढण्याचे स्वप्न घेऊन ते कामाला लागले. अखेर प्रदीर्घ काळानंतर म्हणजे १९९४मध्ये त्यांनी प्रथम मुंबई चौफेर नावाचे एक सायंदैनिक सुरू केले. या दैनिकाचा जम बसवत त्यांनी पुढे आपला वार्ताहर, दैनिक यशोभूमी, दैनिक कर्नाटक मल्ला, तामिळ टाईम्स, हिंदमाता आदी दैनिकेही सुरू केली. पुढे १९९९मध्ये दै. पुण्यनगरी हे दैनिक सुरू केले. सध्या हे दैनिक महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यांत वितरीत होते आणि प्रसिद्धही होते. मराठी भाषिक वृत्तपत्रांसोबत इतर भाषिक दैनिक प्रकाशित करणारे बाबा शिंगोटे हे एकमेव होते, म्हणूनच त्यांच्या कर्तृत्वाची दखल राज्य सरकारने घेतली पाहिजे, असे वाटते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: