आजवर विरोधकांच्या एकजुटीचे कमी प्रयत्न झालेले नाहीत, म्हणजे ही सातत्याने घडणारी प्रक्रिया आहे. जात्यातले सुपात सुपातले जात्यात याप्रमाणे चक्र फिरत असते. काँग्रेसने पंचावन्न वर्ष या देशात राज्य केले. याचे कारण विरोधकांमध्ये एकजूट होणार नाही, हे तंत्र त्यांना माहिती होते. तशी एकजूट कधी झाली नाही. ती जशी झाली तेव्हा १९७७ला जनता पक्ष अस्तित्वात आला आणि भारतीय लोकशाहीत तो एक मैलाचा दगड ठरला; पण ही एकजूटही फार काळ टिकली नाही आणि काँग्रेस पुन्हा सत्तेवर आली हा झाला इतिहास. आताही नेमके तेच घडते आहे. आज भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधकांचे प्रयत्न चालू आहेत. मोदींना सत्तेपासून दूर ठेवण्याचे स्वप्न आहे; पण त्यासाठी विरोधकांची एकजूट, ऐक्य होणे शक्य आहे का, हा खरा प्रश्न आहे.
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या घरी झालेली विरोधी पक्षांच्या नेत्यांची बैठक हादेखील विरोधकांच्या एकजुटीचाच प्रयत्न होता; पण तो फारसा यशस्वी होऊ शकला नव्हता. २०१९च्या फेब्रुवारी महिन्यात आम आदमी पक्षानेही मोदी सरकारच्या विरोधात सभा घेतली होती. त्यास ममता बॅनर्जी याही उपस्थित होत्या. जंतरमंतरवर झालेल्या त्या सभेत हुकूमशाही हटवा, देश वाचवा, अशी घोषणा देण्यात आली होती. पवारांच्या घरी झालेली बैठक अयशस्वी झाली, तरी मोदींच्या विरोधात काही पक्ष एकत्र येऊ पाहत असल्याची ती निदर्शक होती. आता ममता बॅनर्जी प्रयत्न करताना दिसत आहेत; पण ही एकजूट तेव्हाच होईल, जेव्हा सर्वात प्रथम नेतृत्वाला मान्यता मिळेल. जो नेतृत्व करेल ते पंतप्रधान पदाचा उमेदवार असेल, असे प्रत्येकाच्या मनात आहे. त्यामुळे शरद पवारांनी प्रयत्न केले की, काही पक्ष विरोध करतात. ममता बॅनर्जींनी प्रयत्न केले की, काही पक्ष विरोध करतात. केजरीवाल यांचाही तोच प्रश्न. विरोधकांची एकजूट सर्वमान्य झाली ती जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वातील, कारण जयप्रकाश नारायण ना निवडणूक लढवणार होते ना पंतप्रधानपदाचे त्यांचे स्वप्न होते; पण आज जोपर्यंत सर्वांना एकत्र आणू शकेल आणि सत्तेची अभिलाषा न ठेवणारे व्यक्तिमत्व समोर येत नाही तोपर्यंत विरोधकांची एकजूट हे स्वप्नच राहील.
नुकतेच ममता बॅनर्जी यांना विरोधकांच्या आघाडीच्या नेतृत्वाबद्दल पत्रकारांनी प्रश्न केला, तेव्हा त्यांनी हा मुद्दा आता चर्चेचा करण्याचे कारण नसल्याचे सांगितले. विरोधकांची एकजूट महत्त्वाची. नेता कोणीही असला, तरी बिघडत नाही, असे त्या म्हणाल्या आहेत. मोदींच्या विरोधात जनमत संघटित होत असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे; मात्र केवळ मोदी विरोधाचा मुद्दा विरोधकांची आघाडी घडवून आणण्यास पुरेसा ठरणार नाही. यासाठी समान कार्यक्रम ठरवावा लागेल. आघाडीचे नेतृत्व करण्याची महत्त्वाकांक्षा काही काळ बाजूला ठेवावी लागेल. आघाडीचे नेतृत्व कोण आणि कोणता पक्ष करणार, यावरच चर्चा केंद्रित झाली, तर आघाडीचा प्रयोग यशस्वी होणे अवघड आहे. सध्या तरी सोनिया गांधी आणि ममता बॅनर्जी यांची झालेली भेट आणि या भेटीतून विरोधकांच्या ऐक्याची व्यक्त झालेली गरज, या बाबी आघाडी आकार घेण्याच्या दृष्टीने लाभदायी ठरू शकतात.
काँग्रेस आणि भाजपला सोडून कोणतीही मजबूत आघाडी होऊ शकत नाही, हे वास्तव आहे. शरद पवारांना काँग्रेसला लांब ठेवून तिसरी आघाडी हवी आहे; पण ४० खासदार असले, तरी सर्वात मोठा पक्ष म्हणून विरोधकांमध्ये काँग्रेसची ख्याती आहे. त्यामुळे त्यांना डावलणे सोपे नाही. ममता बॅनर्जींनी हेच हेरले आणि सोनिया गांधींची भेट घेतली असावी; पण शरद पवारांच्या मित्रांना आणि त्यांच्या पक्षाला आता यूपीएचे नेतृत्व शरद पवारांकडे यावे असे वाटते; पण काँग्रेसचा त्याला विरोध आहे, म्हणून काँग्रेस सोडून तिसरी आघाडी हवी असे त्यांना वाटते.
शरद पवारांबरोबर आणि ममता बॅनर्जींबरोबर जाण्यास शिवसेना तयार आहे; पण शरद पवार जेव्हा उत्तर प्रदेश निवडणुकीत समाजवादी पार्टी आणि राष्ट्रीय जनता दलाबरोबर जातात, तेव्हा संजय राऊत यांना ते आवडत नाही. ते उत्तर प्रदेशात स्वबळाची भाषा करतात. केंद्रातील एनडीएमधून शिवसेना बाहेर असली, तरी यूपीए बरोबर नाही. राज्यात समाजवादी पार्टीच्या अबू आझमींचा महाविकास आघाडीला पाठिंबा आहे, तरी उत्तर प्रदेशात अबू आझमींचा समाजवादी पक्ष शिवसेनेला सोबत नको आहे. अशा त्रांगडे झालेल्या अवस्थेत तिसरी आघाडी कधी अस्तित्वात येणार आणि कशी अस्तित्वात येणार?
भारतीय जनता पक्षाने जोपर्यंत स्वत:ची ताकद वाढवली नाही, तोपर्यंत त्यांच्या आघाडीला कधी यश मिळाले नाही. त्यामुळे राजकीय पक्षांनी आपण मोठे होण्याचा विचार करणे हेच योग्य ठरेल. आज भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू झालेल्या दिसतात. अशावेळी सर्व छोटे-मोठे विरोधी पक्ष, प्रादेशिक पक्ष एकत्र येण्यासाठी खंबीर नेतृत्वाची गरज आहे. असे नेतृत्व निर्माण होईल, तेव्हाच विरोधकांची आघाडी तयार होईल. आजकाल कोणत्याही पक्षाचे नेतृत्व कोण हे जाहीर केले जात नाही, तोपर्यंत मतदार त्याला महत्त्व देत नाही. हा राजकारणातील बदलता प्रवाह लक्षात घेऊनच भारतीय जनता पक्षाने २०१३ला सर्वात प्रथम नरेंद्र मोदींना प्रचारप्रमुख हे पद दिले. त्यानंतर २०१४च्या निवडणुकीपूर्वी पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून घोषित केले. त्यामुळे मोदी लाट निर्माण झाली.
१९७७ला जयप्रकाश नारायण नावाची लाट अशीच निर्माण झाली होती. त्यांच्यावर विश्वास होता सर्वांचा. ही काँग्रेस विरोधी आघाडी म्हणजे एक चळवळ म्हणून उभी राहिली होती. तशी परिस्थिती आज आहे का? कोणामध्ये एवढे मोठे नेतृत्व करण्याची हिंमत आहे? आघाडी बांधणीसाठी मार्गदर्शकाच्या भूमिकेत कोण पुढे येणार आहे? आज प्रत्येकाला रिमोट हवा आहे. सत्तेची चावी आपल्या हातात हवी आहे. किंग मेकर बनायचे आहे. अशा अवस्थेत विरोधकांची एकजूट, ऐक्य हे स्वप्नच असणार आहे.
विरोधकांच्या आघाडीचे मागील अनुभव लक्षात घेऊन विरोधकांच्या ऐक्याचे प्रयत्न व्हावयास हवेत. मोदींविषयीचा व्यक्ती दोष बाजूला ठेवून तात्त्विक मुद्यांवर, व्यापक देशहिताच्या मुद्यावर विरोधक एकत्र येणे, ही आजची खरी गरज आहे. विरोधकांच्या आघाडीचे नेतृत्व करण्यास ममता बॅनर्जी उत्सुक असल्या, तरी काँग्रेसशिवाय अशी आघाडी होणे शक्य नाही. काँग्रेससह आघाडी झाल्यास, सोनिया गांधी किंवा राहुल यांच्या नेतृत्वाशिवाय ती होऊ शकेल का, असाही प्रश्न आहेच. अशावेळी ममता बॅनर्जी, शरद पवार यांच्यासारखे नेते लांबच राहतील. त्यामुळे हे स्वप्नवत प्रयत्न वाटतात. खरंतर भाजपची राजवट २०२४च्या निवडणुकीपर्यंत १० वर्षांची झालेली असेल. अशावेळी सत्तांतर करणे सोपे असते; पण त्यासाठी सक्षम पर्याय, सक्षम नेतृत्व दाखवणे महत्त्वाचे असते. भाजपने जर मोदींच्या नंतरचा पुढचा चेहरा याचदरम्यान पुढे आणला तर पुन्हा त्यांची लाट येऊ शकते. नितीन गडकरींचे नाव समजा जाहीर केले, तर वातावरण पुन्हा बदलू शकते. अशा परिस्थितीत विरोधकांची एकजूट होईल का हा प्रश्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणात आणलेल्या फॉर्म्युल्याप्रमाणे ७५ वर्षांपुढच्या नेत्यांनी काम करू नये. त्याप्रमाणे त्यांनी लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी अशा ज्येष्ठांना लांब ठेवले. त्याच न्यायाने २०२४ला नाही, तर त्यानंतर २ वर्षांनी ते ७५ वर्ष पूर्ण करतील. अशावेळी ते आपण होऊन पंतप्रधान पदाचे उमेदवार असणार नाहीत, असे घोषित केले, तर नवा चेहरा पुन्हा भाजपला नवे बळ देईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने एक महिन्यांपूर्वीच दिल्लीत झालेल्या बैठकीत आता इथून पुढे मोदी हा चेहरा निवडणुकीसाठी वापरायचा नाही, असे सांगितले. याचा अर्थही सर्वांनी लक्षात घेतला पाहिजे. त्यामुळे भाजपने नवा एक्का काढला, तर विरोधकांकडे कोणता एक्का असेल की, ज्याच्यामागे सगळे धावून जातील?
प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स
9152448055\\
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा