शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१

चोर पोलीस खेळ


कोणता धंदा केव्हा तेजीत येतो याचे व्यावसायिक गणित प्रत्येक व्यावसायिकाचे असते. मालाचा साठा करणे, माल केव्हा मार्केटमध्ये आणणे, कोणते दिवस चांगले, टंचाई केव्हा निर्माण होते याचे नेमके वेळापत्रक प्रत्येक व्यावसायिकाकडे असते. हे गणित ज्याला जमते तो व्यवसायात यशस्वी होतो. मग धंदा तो कोणताही असला. रात्रीचा, काळा धंदा असला, तरी कोणते काम केव्हा करायचे याचे गणित ठरलेले असते. पोलिसांनी दुर्लक्ष केले, म्हणजे सगळे धंदे मोकाट चालतात. कोणत्यावेळी माणसे बेसावध असतात, हे पोलीस जाहीर करतात आणि त्याचा लाभ सामान्य माणसांना न होता चोराचिलटांना होतो, असे वास्तव आहे. सरकार आणि पोलीस प्रशासनातील नियोजनात होणारा गोंधळ हे गुन्हेगारी जगताचे प्रेरणा स्थान आहे. पोलीस यंत्रणा राजकीय नेत्यांचे संरक्षण, त्यांच्या सभा आणि दौरे यात गुंतत असेल, तर गुन्हेगार, चोराचिलटांना ती संधी निर्माण होते, म्हणूनच चोर पोलीस किंवा गुन्हेगारी जगत आणि पोलिसांचे प्रमाण याचे काहीतरी गुणोत्तर जमणे आवश्यक आहे.


             आता सणवार, समारंभ असल्यामुळे चोरांचा धुमाकूळ वाढला आहे. त्यांचा धंदा तेजीत आहे. लग्नाचा सीझन नसला की, मोटारसायकल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होते. याशिवाय मोबाईल चोर, पाकिटमारी असे अन्य धंदे फावल्या वेळात केले जातात. या सगळ्यांचे नियोजन करणे तेवढे सोपे नाही; पण आमची प्रशासकीय यंत्रणा ते नियोजन यशस्वी होण्यास हातभार लावतात. आधी मोटारसायकली चोरी करायची मग त्याच मोटारसायकलवरून येऊन मंगळसूत्र खेचायचे. डोळ्यादेखत मंगळसूत्र, चेन खेचण्याचे प्रकार होतात; पण त्याबाबतची तक्रार घेण्यास पोलीस टाळाटाळ करतात. अर्थात त्यांनी तरी कुठंकुठं लक्ष ठेवायचे? नेत्यांच्या यात्रा सुरू आहेत तिथे लक्ष ठेवा. मोर्चे आहेत तिथे लक्ष ठेवा. लसीकरणाची केंद्र आहेत, तिथे लक्ष ठेवा. कुणी विनामास्क, कोरोनाचे नियम पाळत नाही तिकडे लक्ष द्या. ही अवांतर कामे वाढल्याने आणि पोलिसांची संख्या कमी असल्याने चोरांचे फावते. किती लोकसंख्येच्या प्रमाणात किती पोलीस असले पाहिजेत याचे काही नियोजन आहे की नाही?

            पोलिसांनी जर मनात आणले, तर हे चोर पकडणे अवघड नसते. कोणत्यावेळी कोणता पोलीस कुठे जातो याचे वेळापत्रक जसे रस्त्यावरचे विक्रेते, अवैध वाहतूक करणारे, चोरटे यांच्याकडे असते, तसेच कोणता चोर कशा पद्धतीने चोरी करतो, त्याची चपळता कशी आहे, तो मोटारसायकल कशी वाकडी करून मधून घुसवतो, तोंड झाकण्यासाठी कसे नाटक करतो, चेन मंगळसूत्र कसे खेचतो, याची सगळी माहिती पोलिसांकडे असते. कोरोनाच्या मास्कमुळे तर चोरांना सोपेच झाले आहे. पूर्वी तोंडाला मास्क लावून येणारे तोंड लपवणारे गुन्हेगार असत. त्यामुळे कोणी तोंडाला मास्क घातलेला दिसला की, पोलीस त्याला संशयीत म्हणून अडवत असत; पण आता आयतेच मास्कचे कारण मिळाले आहे. एटीएम लुटण्याचे प्रकारही गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणावर पहायला मिळाले आहेत. पूर्वी एटीएम सेंटरमध्ये तोंडावरचा मास्क काढा अशी सूचना असायची; पण आता कोरोनामुळे मास्कशिवाय प्रवेश नाही. चोरांचे फावणारच ना मग?


पोलिसांकडून सामान्यांच्या तक्रारी घेतल्या जात नाहीत ही ओरड फार आहे. चोर, गुन्हेगारांपेक्षा सामान्य माणसांनाच पोलिसांची भीती वाटते. या सारखे दुर्दैव काय असेल? सर्वात प्रथम आपले मंगळसूत्र किंवा चेन खेचली गेली, म्हणून तक्रार देण्यासाठी सामान्य माणूस गेला तर त्याला पोलीस इतकी हिडीस फिडीस करतात की, या माणसाची चेन चोरीला गेलेली नाही, तर ती याने चोरली आहे, अशा अविर्भावात पोलीस वावरतात. आधी तक्रार घेण्यास टाळाटाळ करतात. मग विचारतात, किती तोळ्याचे होते तुमचे गंठन? जर उत्तर दिले की, तीन तोळ्यांचे होते. तर लगेच विचारतात पावती आहे काय? पावती घेऊन कोणी हिंडतो काय? कोणीतरी आज माझे मंगळसूत्र मारणार आहे. चला पावतीबरोबर घेऊन गेलेले बरे, असा विचार करून महिलांनी बाहेर पडले पाहिजे, असे गृहखात्याला वाटते काय? असे पोलिसांना वाटते काय? कशी शुक्लकाष्ट काढायची आणि सामान्य माणसाला जेरीस आणायचे याचे चांगले ज्ञान पोलिसांना असल्यामुळे ते बरोबर सामान्य माणसांची छळवणूक करतात आणि या चोरट्यांना पाठीशी घालतात. माणूस चोरी झाल्या झाल्या पोलिसांकडे जाणार ना? की, ते काही तरी मदत करतील म्हणून? पण जर पोलिसांच्या म्हणण्याप्रमाणे आधी पोलीस ठाण्यात न येता पावती घेऊनच मग आला तर लगेच का नाही आला? आता तो कुठल्याकुठे लांब गेला असेल की, म्हणून छळणार. पावती बघू? तुमचे नाव काय? त्या महिलेने सांगितलेले नाव आणि पावतीवरचे नाव वेगळे असते. ती सांगते अहो साहेब, हे गंठन माझ्या लग्नात माझ्या वडिलांनी घातले होते त्यामुळे त्यांच्या नावाने ही पावती आहे. मग बोलवा तुमच्या वडिलांना किंवा म्हणजे हुंडा घेतला काय? तुमची कुठे चोरी झाली आहे? वडील का तक्रार करीत नाहीत? असे अनेक गुंतागुंतीचे प्रश्‍न निर्माण करून त्या माणसाला अक्षरश: पिळून काढतात. जर एखादी महिला म्हणाली, पावती मिस्टरांच्या नावावर आहे, तर पोलीस म्हणतात मग तक्रार त्यांना करू देत. त्यांचे मंगळसूत्र तुमच्याकडे कसे आले? आता एक पतीच आपल्या बायकोच्या गळ्यात मंगळसूत्र घालतो याचे ज्ञान असूनही असे निरर्थक प्रश्‍न विचारून पोलीस त्या सामान्य माणसाला छळतात. याचे कारण असे की, चोरांना आणि चोरीचा माल विकत घेणाºया दोघांनाही पाठिशी घालण्यासाठी ही सारी धडपड चाललेली असते. बुरखा लावून मोटारसायकलवरून फिरणाºयांना पोलीस का अडवत नाहीत? कोरोनाचे निमित्त आहे. तोंड का झाकून घेतले आहे? मग हेल्मेट का घातले नाही? असे का पोलीस विचारत नाहीत? तोंडावर रूमाल बांधून झाकून गेलेली मोटारसायकल जवळून गेली की ओळखायचे की, इथून दहा किलोमीटर अंतरापर्यंतचा मार्ग हा चोरांसाठी सुरक्षित आहे. एकही पोलीस इथे आता येण्याची शक्यता नाही.

पूर्वी चोर पोलीस हा खेळ असायचा. या चोर पोलीस खेळातही मुले एकमेकांना पकडण्याचा प्रयत्न करायची. ज्यांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने शिक्षण घेतले आहे ते पोलीस मात्र चोरांना पकडण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत. त्यामुळेच चोर पोलिसांचा हा खेळ सुरू आहे. या चोर पोलिसांच्या खेळात आणि लहान मुलांच्या खेळात हाच फरक आहे. लहान मुलांच्या खेळात पोलीस चोरांना पकडतात आणि चोर पोलिसांपासून पळण्याचा प्रयत्न करतात; पण इथे चोर पोलीस एकत्रितपणे सामान्य माणसाला पकडण्याचा प्रयत्न करतात. त्याला लुटल्यावर चोराला पळायला नकळत पोलीस मदत करतात, असे वास्तव आज जाणवू लागले आहे. त्यासाठी पोलिसांवरचा अतिरिक्त ताण कमी करणे गरजेचे आहे.


बिटवीन द लाईन्स/ प्रफुल्ल फडके\\

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: