रक्षाबंधन हा सण आपल्याकडे साजरा केला जातो; पण पहिले रक्षाबंधन कोणी कुणाला केले? ती राखी कशी होती, हा प्रश्न अजून कुणी कुणाला विचारला नाही; पण खरे पहिले रक्षाबंधन कोणी केले असेल, तर ते महाभारतात द्रौपदीने श्रीकृष्णांना केलेले होते. अश्वमेघ यज्ञावेळी अग्रपूजेचा मान कोणाला द्यायचा यावरून शिशुपालाने श्रीकृष्णांचा आणि तेथील उपस्थितांचा अपमान केला होता. त्यावेळी शिशुपालाची शंभरी भरेपर्यंत श्रीकृष्ण गप्प बसले आणि त्यानंतर आपले सुदर्शन चक्र सोडले आणि शिशुपालाचा वध केला. वध करून सुदर्शन चक्र परत आले तेव्हा क्षणभर श्रीकृष्ण विचलीत झाले, तेव्हा ते सुदर्शन चक्र बोटात अडकण्याऐवजी बोटाला लागले आणि रक्त भळाभळा वाहू लागले. त्यावेळी कसलाही विचार न करता सम्राज्ञी असलेल्या द्रौपदीने आपल्या भरजरी साडीचा पदर फाडून त्याची पट्टी श्रीकृष्णांच्या बोटाला धावत येऊन बांधली आणि तो रक्तपात थांबला. ती पहिली राखी. त्यागाची. त्यावेळी या चिंधीच्या प्रत्येक धाग्याचा मी ऋणी आहे, हे बंधन मला तुझे रक्षण करण्यासाठी बांधलेले मनोबंधन आहे, हे कृष्णांनी वचन दिले आणि त्यानंतर वस्त्रहरणाच्यावेळी याच बंधनाची उतराई होण्यासाठी त्यांनी द्रौपदीची लाज राखली आणि भावाचा धर्म निभावला.
आज शिशुपालाकडून सुटलेले चक्र परत येऊन कोणाच्या बोटाला लागणार नाही; पण ते दीड वर्षापासून सुरू असलेले मृत्यूचे चक्र जे चीनप्रांतातून आले आणि कोरोना कोव्हिड-१९ नावाने जे सर्वांना छळत आहे, त्यापासून रक्षण करण्याची आता जबाबदारी आहे. पहिली लाट, दुसरी लाट आता तिसºया लाटेची प्रतिक्षा, अशी त्या कोरोनाची शंभरी भरत आली असली, तरी आपल्या भावांचे आणि बहिणींचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली आहे. बहिणींनी भावांना मास्कची राखी बांधायची आहे. मास्कशिवाय कुठे जाऊ नका, असे सांगायचे आहे. भावांनी बहिणींना लसीकरण केले का, हे आवर्जून विचारायचे आहे. या संकटापासून तर आपण बाहेर पडणार आहोतच; पण जागतिक पातळीवर दुसरे संकट येऊ पाहते आहे, ते म्हणजे तालिबानी संकट.
महिलांची कोंडी करणारी तालिबानी राजवट शेजारील प्रांतात अफगाणिस्तानात येऊन दाखल झालेली आहे. या राजवटीचा कुठेही इथे स्पर्श होणार नाही आणि आपल्या देशातील बंधुभगिनी सुखासमाधानाने राहतील, अशी या निमित्ताने आपण अपेक्षा करायची आहे.
भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, अशी आपण प्रतिज्ञा शाळेत असताना म्हणायचो; पण ही प्रतिज्ञा विसरण्यासाठी आहे का? हे बंधुत्व, हा बंधुभाव नंतर कुठे गेला? दररोज प्रत्येक क्षणाला अनेक ठिकाणी महिला अत्याचाराला बळी पडत आहेत, त्यांची अब्रू लुटली जात आहे. हे प्रकार का घडतात? आपल्या समोर घटना घडत असताना, आम्ही मदतीला का धावून जात नाही? स्मार्ट फोन आल्यापासून तर एक प्रकार अत्यंत निंदनीय असा बघायला मिळतो आहे. तो म्हणजे एखादा अपघात झाला, दुर्घटना घडली, भांडणे-मारामारी झाली, कोणी कोणाची छेड काढत असेल, तर अनेक जण तो क्षण, ते दृश्य आपल्या मोबाईल कॅमेºयात बंदीस्त करण्यासाठी धडपडतात; पण तोपर्यंत त्याचा जीव गेलेला असतो. त्याला फोटोची, व्हिडीओ क्लिपची गरज नाही तर मदतीची, उपचारांची गरज असते; पण अशा घटना, अपघात घडत असताना अनेक जण कॅमेºयात गुंतत असतात, त्यांनी आपल्या मनाला काही बंधन घालून घेतले, मनोबंधन घालून घेतले, तर खºया अर्थाने ते रक्षाबंधन होईल, कारण त्या संकटात सापडलेला तो कोणाचा तरी भाऊ असतो, कोणाची तरी बहीण असते. त्यामुळे फक्त आपल्याच बंधू आणि बहिणीचा विचार न करता सारे भारतीय माझे बांधव आहेत, याचा विचार केला पाहिजे, तर खºया अर्थाने ते रक्षाबंधन होईल.
रक्षाबंधन हा एक दिवसाचा सण न राहता ती नैतिक जबाबदारी असली पाहिजे. एक दिवसाची कोणी कुणाची बहीण असत नाही, तर ते आजन्म असे पालन करण्याचे व्रत असते. ही मनोवृत्ती तयार करण्याची आज गरज आहे. आज जातीपातीत, धर्मात मनुष्य विभागला जात आहे. प्रत्येक जण आपल्या जातीपुरता, धर्मापुरता विचार करत आहे; पण संपूर्ण मनुष्यजातीचे रक्षण करण्याची ही वेळ आहे. कोरोनाच्या संकटाने कधी कोण कोणत्या जातीचा, धर्माचा, गरीब की श्रीमंत असा विचार केला नाही. समोरून येणारा शत्रू सरसकट हल्ला करत असतो. अशावेळी सगळे भेदभाव विसरून सर्वांचे रक्षण करण्याची जबाबदारी आपली सर्वांची आहे. कोरोना योद्धे म्हणून ज्यांचा गौरव केला जातो, ते डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी सर्वांना सरसकट मदत करत असतात. अशावेळी त्यांचे रक्षण करणे, त्यांना सहकार्य करणे, त्यांचा सन्मान करणे हे खरे रक्षाबंधन, मनोबंधन असेल. अनेक जण डॉक्टरांवर हल्ले करतात, हॉस्पिटलमध्ये दंगा करतात, नर्स आरोग्य कर्मचाºयांशी गैरवर्तन करतात, हे प्रकार थांबले पाहिजेत, तर खºया अर्थाने रक्षाबंधन साजरा केला, असे म्हणता येईल. देशाच्या सीमेवर लढणारे सैनिक खरे आपल्या रक्षाबंधनाचे कार्य पार पाडत असतात. एका सैन्यदलातील वरिष्ठ अधिकाºयांशी नुकतेच बोलण्याची वेळ आली होती, तेव्हा त्यांनी व्यक्त केलेला विचार फार महत्त्वाचा आहे. सीमेवरच्या शत्रूला आम्ही मारत नसतो, तर या सीमेच्या आत असलेले माझे बांधव आहेत, त्यांना कसलाही त्रास होऊ नये म्हणून आमच्या हातात शस्त्र आहेत. आमच्या हातात शस्त्र शत्रूला मारण्यासाठी नाही, तर आमच्या बांधवांचे रक्षण करण्यासाठी आहे. शत्रूवर आमचा कसलाही राग नाही; पण आमचे आमच्या भारतीयांवर प्रेम आहे, त्या प्रेमापोटी आम्ही लढत असतो. हा विचार प्रत्येकाने समजून घेतला पाहिजे. सीमेवर लढणारा सैनिक हा प्रत्येक भारतीयांचा विचार करतो, तर आम्ही तसा विचार करायला काय हरकत आहे? हेच मनोबंधन आज असण्याची गरज आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा