मंगळवार, ३१ ऑगस्ट, २०२१

बटबटीत कथानकांचा मारा


झी मराठीवरील मालिकांना नक्की काय झाले आहे हा प्रश्न पडतो. ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेने तर कमालच केली आहे. कथानकात रंजकता असली पाहिजे, कलाटणी असली पाहिजे, संघर्ष असला पाहिजे, पण हे प्रकार विकृतपणे मांडले की त्याची किळस येते. आज ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेची अवस्था तशीच झालेली आहे.


रविवारी या मालिकेचा विशेष भाग होता. या भागात स्वीटू आणि ओमच्या लग्नाचा विशेष भाग होता. या भागात ती मालविका त्या दादा साळवींना इतके अपमानित करते आणि तरातरा ओढत नेऊन आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करते. ते वरून उडी मारत असतात. ती त्यांना तिथपर्यंत पोहोचवते. लग्नातल्या गर्दीतून ती घेऊन जाते आणि आत्महत्या करायला सांगते. त्यावेळी तिचे जे संवाद आहेत, बाहेर त्यांना हाताला धरून घेऊन जाणे आहे हे न पटणारे आहे. इतक्या गर्दीत असे चोरून ती कशी काय घेऊन जाऊ शकते असा प्रश्न तर पडतोच, पण या एकूणच मालिकेत काळ, वेळ आणि ठिकाण आणि अंतर याचे काही भानच नाही असे दाखवले आहे.

मालविका साळवींना उडी मारून मरायला सांगते, मरण्यापूर्वी ओमला फोन करायला लावते. ओम तो फोन ऐकून लग्नमंडपातून सेकंदात पळत येतो. या सेकंदात मालविका सगळे अंतर कापते आणि ओम दादांना वाचवतो. त्यांना हॉस्पिटलमध्ये नेऊन उपचार करतो. तोपर्यंत ओम लग्नातून पळून गेला असे भासवून त्या स्वीटूचे लग्न मोहितशी लावून देतात. अरे हा काय पोरखेळ आहे की झिम्मा? ही काय भातुकली आहे की बाहुला-बाहुलीचे लग्न? असले कसले कथानक?


स्वीटूसारखी हुशार मुलगी ओम नाही म्हणून त्या मोहितशी लग्नाला तयार होते, आई आणि घरच्यांसाठी सगळे सहन करते हे कधीही न पटणारे आहे. लग्न नाही झालं म्हणून परत जायचं होतं. कुणाशी तरी लग्न लावलेच पाहिजे हा अट्टाहास कशासाठी? स्वीटूशी लग्न करण्यासाठी मालविका मोहितला तब्बल वीस कोटी रुपये देते हे न पटणारे आहे.

साळवींना, स्वीटूच्या वडिलांना काहीतरी झाले आहे हे समजल्यावर लग्नातून पळत जाताना ओम रॉकीला मदतीला घेऊ शकला असता, पण झी मराठीच्या मालिकांच्या कथानकांत इतरांपासून काहीतरी लपवून ठेवणे हेच तंत्र प्रत्येक मालिकेत अवलंबिले गेल्यामुळे हा सगळा लोचा होतो. याच मालिकेत लग्नाच्या आधी हळदी जी दाखवली आहे ती हळद साजरी करण्यासाठी मुलाकडची हळद झाल्यावर उष्टी हळद घेऊन अंबरनाथमध्ये सगळे दाखल होतात, तिथला आचरटपणा हा पोरकट वाटतो.


विशेष म्हणजे ओमच्या ऐवजी मोहितशी स्वीटूचे लग्न झाल्यावर मोहितची आई त्यांना घरात घेत नाही. म्हणून शकू या दोघांना आपल्या घरी घेऊन येते. स्वीटू माप ओलांडून खानविलकरांच्या घरात येते. बेडरूममध्ये गेल्यावर मात्र मोहितच्या विचाराने ती भडकते. तुझ्या गळ्यात मंगळसुत्राचा पट्टा बांधला आहे, मी तुझा मालक आहे म्हटल्यावर ती ते मंगळसूत्र काढून टाकते आणि या चार भिंतीच्या आत आपले कसलेही नाते असणार नाही. फक्त लोकांना दाखवण्यासाठी आपण लग्न केले आहे. असे सांगून ते लग्न नाकारते. हाच बाणेदारपणा ती मंडपात दाखवू शकली असती, तर मालिका आणखी चांगली वाटली असती. लग्न हा काही खेळ नाही, मी कोणाशीही लग्न करायला काय निर्जीव आहे का, असे म्हणू शकली असती. या सगळ्या गडबडीत आपले वडील कुठेच नाहीत याचेही तिला समजत नाही हे आणखी विचित्र आहे. ज्या वडिलांवर तिचे खूप प्रेम आहे, त्यांच्यासाठी काहीही करायला तयार होणारी स्वीटू आपले वडील इथे कुठेच नाहीत म्हणून तिला कसलीही शंका येत नाही. ओम नवरा मुलगा असल्यामुळे त्याचे जाणे लक्षात येते पण वडील कुठे गेले याची जाणीव ना स्वीटूला आहे, ना नलूला होते. दुसºया दिवशी लग्नानंतर ओम हॉस्पिटलमधून दादांना घेऊन येतो तेव्हा नलूला समजते. तोपर्यंत कोणालाही काही माहिती नसते. त्यांची आठवणही होत नाही. त्यामुळे अत्यंत ढिसाळ आणि बटबटीत कथानकात ही मालिका घसरत चालली आहे. सहा महिन्यांपूर्वी ही मालिका जेव्हा सुरू झाली तेव्हा तिचे दाखवलेले प्रोमो पाहता ही मालिका हलकीफुलकी असेल, विनोदी असेल असे वाटत होते, पण ती मालिका भयानक असेल, असा कोणीच विचार केला नव्हता.

आपल्या नवºयाला, दादा साळवींना वाचवण्यासाठी ओम लग्नातून गेला होता. त्याच्यामुळे साळवींचा जीव वाचला हे माहिती झाल्यावर नलू ओमला जवळ करते. आपल्या घरात आसरा देते, पण शरद, चिन्या या कोणाला ते कळत नाही. ते सगळे ओमची हिडीसफिडीस करायला लागतात. ओमची अवस्था अत्यंत केविलवाणी केली जाते. ज्याच्यासाठी चिन्या, शरद जीव टाकत होते त्याच्या एकाएकी विरोधात जातात. साळवींचे घर मोठे नाहीये. त्यामुळे नलू अचानक ओमला मदत का करते आहे, त्याला थारा का देत आहे हे त्यांच्या लक्षात आल्याशिवाय कसे राहील? सगळंच अनाकलनीय असे आहे. साळवींना हॉस्पिटलमध्ये ठेवल्यानंतर ओम परत लग्नकार्यालयात पळत येतो. त्यावेळी मोहित स्वीटूला मंगळसूत्र घालत असतो. हे तो जवळून पाहतो. त्यावेळी तिथे असलेले कोणीच ओमला कसे काय पाहत नाहीत? तिथून पळून गेल्यावर रॉकी त्याच्या मागे धावतो. तो त्याला अर्धवट सोडून कसा जाईल? त्यामुळे अत्यंत हिणकस आणि भरकटलेले कथानक दाखवून ही मालिका बटबटीत केली आहे.


प्रफुल्ल फडके/ छोटा पडदा


9152448055

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: