यावर्षीचा स्वातंत्र्य दिन हा विशेष आहे. याचे कारण हा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिन आहे. त्यामुळे या वर्षात वर्षभर सरकारी पातळीवर कार्यक्रम घेण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला आहे. ही अतिशय आनंदाची बाब आहे. कोरोनाच्या संकटातून सुटून नव्याने स्वातंत्र्य मिळाल्याचा आनंद या वर्षात सर्वांना मिळेल, अशी अपेक्षा आहे. त्याप्रमाणे राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयात ध्वजारोहण केले गेले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित करताना पुढील वर्षीचा स्वातंत्र्य दिन कोरोनामुक्त वातावरणात साजरा करणारच, अशी प्रतिज्ञा करण्याचं आवाहन केलं, तसेच स्वातंत्र्य दिनानंतर १६ आॅगस्टपासून राज्यात निर्बंध शिथिल करण्यात येत असले, तरी कोरोनाविषयीचे नियम पाळण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. एकूणच कोरोनाचे संकट आल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ज्याप्रकारे सर्व परिस्थिती हाताळली आहे, ते पाहता खºया अर्थाने त्यांनी या सकंटाशी सामना करण्याचे व्रतच गेले दीड वर्ष घेतल्याचे दिसते. कोणत्याही भावनिक दबावाला बळी न पडता योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याच्या या शैलीमुळेच आपण यावर्षीच्या १५ आॅगस्टला कोरोना निर्बंधातून बाहेर पडत आहोत. एकप्रकारे ते स्वातंत्र्यच आहे. त्यामुळे पुढील वर्षी मोकळा श्वास घेत पुन्हा चांगल्या प्रकारे स्वातंत्र्य दिन साजरा करू शकतो, हा दिलेला विश्वास फार महत्त्वाचा आहे. अर्थात त्यासाठी निर्बंधाचे पालन करणे आवश्यक आहे.
मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणातून तसे स्पष्ट संकेत दिलेच आहेत, जर परिस्थिती बिघडली, तर राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करावा लागू शकतो, असा इशाराही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला. आॅगस्ट ते सप्टेंबरदरम्यान देशात पुन्हा तिसरी लाट येण्याची चर्चा होत आहे, त्यामुळे खबरदारी ही घेतलीच पाहिजे. कोणताही निर्णय भावनेच्या आहारी जाऊन घ्यायचा नाही, ही व्यवहार्य भूमिका मुख्यमंत्र्यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीही घेतली हे फार महत्त्वाचे आहे.
राज्यात कोरोना पुन्हा उसळू नये, म्हणून आपल्या भाषणात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाविषयी भूमिका स्पष्ट केली. गेल्या दीड वर्षापासून कोरोनाचं संकट आहे आणि त्यातून मुक्त होण्यासाठी आपण प्रयत्न करत आहोत. १६ आॅगस्टपासून राज्यातील काही बंधनं शिथिल करत आहोत; पण कोरोनाचं संकट अजूनही टळलेलं नाही. काही देशांत ते पुन्हा उसळलं आहे. आपल्याकडे ते उसळू नये, यासाठी काळजी घ्यायला हवी. शिथिलतेसोबतच इशाराही दिला आहे, तोही नागरिकांनी लक्षात घ्यावा. हे धाडसाने सांगणे फार महत्त्वाचे आहे. यात कुठेही राजकीय स्वार्थ त्यांच्या भाषणात नव्हता, तर राज्याबाबत एकप्रकारची तळमळ होती. येत्या चार-पाच महिन्यांत विविध महापालिकांच्या निवडणुका आहेत. राज्यात पुन्हा लोकशाहीचा उत्सव होणार, गर्दी होणार याचे गांभीर्य त्यांच्या बोलण्यात दिसत होते, म्हणूनच लोकशाहीच्या या उत्सवाचा आनंद नागरिकांना घेता येण्यासाठी पुढचे काही दिवस खबरदारी घेण्याचे त्यांनी केलेले आवाहन महत्त्वाचे आहे.
मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, कोरोना काळात आपण आरोग्यसुविधा वाढवत आहोत; पण आॅक्सिजनची कमतरता चिंतेचा विषय आहे, म्हणून ही शिथिलता देत असताना आॅक्सिजनच्या साठ्याचं प्रमाण ठरवून आपण ही शिथिलता दिली आहे. त्यामुळे कृपा करून दिलेल्या शिथिलतेमध्ये देखील आवश्यक असलेले निर्बंध पाळावे लागतील, कारण आॅक्सिजनचा पुरवठा त्या मर्यादेच्या पुढे गेला, तर कदाचित आपल्याला लॉकडाऊन पुन्हा लावावा लागू शकतो, असं ते म्हणाले. हा इशारा न भीड बाळगता देणे महत्त्वाचे आहे. लोकांना बरं वाटावं, म्हणून गुळगुळीत बोलणे आणि त्यांना अंधारात ठेवण्याचे काम त्यांनी केले नाही.
काही दिवसांपूर्वी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यात लॉकडाऊन पुन्हा लागू करण्यासंदर्भात राज्य मंत्रिमंडळात झालेल्या चर्चेची माहिती दिली. राज्यात १६ आॅगस्टपासून काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत; मात्र आॅक्सिजनची पातळी आणि वापर यांची मर्यादा महत्त्वाची ठरणार आहे. जर राज्यात तिसरी लाट आली आणि त्यामध्ये दिवसाचा आपला आॅक्सिजन वापर ७०० मेट्रिक टनच्या वर गेला, तर राज्यात आॅटोमॅटिक मोडवर कठोर लॉकडाऊन लागू केला जाईल, असं राजेश टोपेंनी स्पष्ट केलं होतं. त्यासंदर्भात स्वातंत्र्य दिनी मंत्रालयात ध्वजारोहण केल्यानंतर केलेल्या भाषणात मुख्यमंत्र्यांनी पुन्हा इशारा दिला आहे. हे चांगले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा