शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१

कौन बनेगाची क्रेझ


गेल्या दोन महिन्यांत वाहिनी जगतात सोनी मराठी या वाहिनीने प्रेक्षकांच्या मनाची जोरदार पकड घेतलेली दिसते. एकापेक्षा एक सरस मालिकांनी स्पर्धेतील झी मराठी, स्टार प्रवाह, कलर्स या वाहिन्यांचा प्रेक्षकवर्ग ओढण्यास ही वाहिनी यशस्वी ठरताना दिसत आहे. यामध्ये सर्वात महत्त्वाचे दोन कार्यक्रम म्हणजे कोण होणार करोडपती आणि गाथा नवनाथांची हे कार्यक्रम खुपच आवडीने पाहिले जात आहेत.


कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाची सुरुवात २००० साली झाली आणि अमिताभ बच्चन यांचे सूत्रसंचालन, आदरपूर्वक स्पर्धकांशी वागणे, सुसंस्कृतपणा आणि कार्यक्रमाची शैली याने संपूर्ण देशाला वेड लावले. त्याची अनेक पर्व झाली; पण अमिताभ बच्चन यांच्या सूत्रसंचालनाला तोड नव्हती. हा कार्यक्रम सुरुवातीला सोमवार ते गुरुवार स्टार प्लस या वाहिनीवर दाखवला जात होता. त्यावेळी स्टार प्लस ही वाहिनी लोकप्रियतेच्या उत्तुंग शिखरावर होती. त्यापाठोपाठ गेल्या वीस वर्षांत असंख्य वाहिन्या आल्या, प्रादेशिक वाहिन्या आल्या; पण कौन बनेगा करोडपतीची क्रेझ कायम राहिली. स्टार प्लसवरून हा कार्यक्रम सोनीकडे गेला. सोनी टीव्हीनेही या कार्यक्रमाची रंगत कायम राखली. त्यानंतर तो विविध प्रादेशिक भाषांमध्ये सादर होऊ लागला. एका पर्वात अमिताभ बच्चनऐवजी शाहरूख खानने हा कार्यक्रम सादर केला; पण तो कार्यक्रम अत्यंत वाईट होता, कारण शाहरूख खान हा अत्यंत मगरूर आणि मस्तवालपणे स्पर्धकांशी बोलायचा. अमिताभ बच्चन हे वयाने मोठे असूनही आपल्यापेक्षा कितीही लहान स्पर्धक असला, तरी त्याच्याशी आदराने बोलायचे. कोणालाही अरेतुरे केले नाही. अगदी छोट्या बालकांसाठी एक पर्व अमिताभ बच्चन यांनी चालवले, तरी त्यांचा मान-सन्मान अमिताभ बच्चन यांनी केला होता; पण शाहरूख खानने मात्र अरेतुरे करून कार्यक्रमाची लाज काढली होती. त्यामुळे कौन बनेगाला अमिताभशिवाय पर्याय नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली.

प्रादेशिक पातळीवर मराठीत कोण होणार करोडपतीमध्ये अमिताभ बच्चन यांची पोकळी खºया अर्थाने भरून काढली ती निश्चितच सचिन खेडेकर यांनी. अत्यंत सभ्यपणे सचिन खेडेकर स्पर्धकांशी वागतात आणि स्वत:बद्दलही आदर निर्माण करताना दिसतात. मराठीत यापूर्वी हा कार्यक्रम स्वप्नील जोशी यांनीही बºयापैकी केला होता. मागच्या पर्वात नागनाथ मंजुळे यांनी हा कार्यक्रम केला होता; पण त्यांचे बोलणे अजिबात प्रभावी नव्हते. त्यांचे शब्दोच्चार ऐकायला चांगले वाटत नव्हते. त्याचप्रमाणे त्यांच्या वावरण्यात कोणतेही आकर्षक आणि प्रेक्षकांना आवडेल असे काही नव्हते; पण सचिन खेडेकर यांनी आपण हा कार्यक्रम किती सुरेखपणे सादर करू शकतो हे दाखवून दिले आहे. प्रेक्षकांवर प्रभाव पाडत, माहिती देत आणि संयमी भाषेत प्रसन्न मुद्रेने ते हा कार्यक्रम करत असल्याने सोनी मराठीला चांगले दिवस आले आहेत.


सचिन खेडेकर हे ज्याप्रकारे समोरच्या स्पर्धकाला बोलके करतात, त्याच्याशी आदराने वागतात, त्याच्यातील कलाकाराला उलगडतात हे पाहून समाधान वाटते. त्यांनी हा कार्यक्रम खºया अर्थाने समजून घेतला आहे. त्यामुळे खºया अर्थाने त्यांना अमिताभ बच्चन यांच्याप्रमाणे पकड घेता आली आहे. पूर्वी आठवड्यातून चारच दिवस हा कार्यक्रम होता. या पर्वात सोमवार ते शनिवार असा सहा दिवस ठेवल्याने प्रेक्षकांना भरपूर पर्वणी मिळत आहे. यात कर्मवीर स्पेशल भागात नाना पाटेकर, जितेंद्र जोशी असे कलाकारही येऊन गेले. त्यामुळे तो अत्यंत रंजक कार्यक्रम झाला आहे.

महिना दोन महिन्यांत सोनी मराठीने एकसे एक कार्यक्रम देऊन प्रेक्षकांना काय हवे असते हे दाखवून दिले आहे. संध्याकाळी साडेसहाला लागणारी गाथा नवनाथांची ही मालिका, तर लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. कोणत्याही नवनाथ भक्ताच्या मनात उभे राहणारे मच्छिंद्रनाथांचे दर्शन, गोरक्षनाथांचे दर्शन यात होते. कुठेही खोटेपणा जाणवत नाही. अत्यंत नैसर्गिक अभिनयाने संपन्न अशी ही मालिका आहे. नवनाथांचे तत्वज्ञान अत्यंत सहज सोपेपणाने उलगडून दाखवले आहे. गेल्या पंधरा दिवसांत गोरख हा तर सर्वांचा लाडकाच झालेला आहे. या मालिकेतील दिग्दर्शक आणि कॅमेरामनची खºया अर्थाने कौतुकास्पद कामगिरी आहे. तांत्रिक बाजू तर अत्यंत जबरदस्त अशा सांभाळल्या आहेत. विशेषत: आपल्या गुरूसाठी भिक्षेला बाहेर पडल्यावर गुरूला भाजणीचा वडा आवडला, म्हणून परत वडा मागायला गेलेल्या गोरक्षाला ती बाई डोळा काढून देण्यास सांगते. त्यावेळी आपला डोळा सहजपणे गोरक्ष काढून देतो हा प्रसंग अत्यंत जबरदस्त घेतला आहे. कुठेही बिभत्सपणा न आणता, रक्त न दाखवता अत्यंत कौशल्याने दिग्दर्शकाने कॅमेरा अँगल राखून डोळ्याचे बुबुळ काढल्याचा जो सिन आहे, तो निश्चितच कौतुकास्पद आहे. गोरक्षाच्या हातून घडणारे चमत्कार हे अत्यंत लाघवी असे आहेत. गोरक्षाला दिक्षा देत असताना जे शिक्षण मच्छिंद्रनाथ देताना दिसतात ते अत्यंत प्रभावी आहे. नाथ संप्रदायात मेखला का घालायचा? रूद्राक्ष कशासाठी घालायचे? भस्म का लावायचे? कानात कुंडले का घालायची? हातातील त्रिशूल कशासाठी हे अत्यंत प्रभावीपणे सांगितले आहे. नाथ संप्रदायातील प्रत्येक आभूषणाची माहिती ही अत्यंत अभ्यासपूर्ण दिलेली आहे. यातून लेखकाचा अभ्यास दिसून येतो. प्रेक्षकाला काय आवडेल हे बरोबर समजलेले दिग्दर्शक असल्यावर कोणतीही कलाकृती लोकप्रिय होते याचे जीवंत उदाहरण म्हणजे गाथा नवनाथांची ही मालिका. त्यामुळे सोनी मराठीने प्रेक्षकांची चांगली पकड घेत बाजी मारल्याचे दिसते.


प्रफुल्ल फडके/ छोटा पडदा

9152448055\\

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: