शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१

इतिहास घडवणारा लोकप्रतिनिधी


शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख यांचं शुक्रवारी रात्री निधन झालं. महाराष्ट्राच्या विधानसभेत सर्वाधिक वेळा निवडून येण्याचा विक्रम करणारे कर्तव्यदक्ष आमदार म्हणून त्यांची ओळख होती. सांगोला मतदारसंघातून गणपतराव देशमुख तब्बल ११ वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. तब्बल ५५ वर्षे त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधीत्व केलं. हे करत असताना आपण जनतेचे प्रतिनिधी आहोत, जनतेची कामं करण्यासाठी आपण आहोत याचे भान त्यांनी कायम राखले होते, अशी निस्पृहपणे काम करणारी व्यक्ती आता पाहायला मिळणे दुर्मिळ आहे.


विधानसभेतले सर्वात ज्येष्ठ सदस्य असणाºया गणपतराव देशमुख यांनी २०१९मध्ये निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्यांच्याऐवजी शेतकरी कामगार पक्षाने त्यांचा नातू डॉ. अनिकेत चंद्रकांत देशमुख यांना उमेदवारी दिली होती; पण शिवसेनेच्या अ‍ॅडव्होकेट शहाजीबापू पाटील यांनी अनिकेत देशमुख यांचा ७६८ मतांनी पराभव केला. यावरून एक स्पष्ट होते की, गणपतराव देशमुख हे उत्तम कार्यकर्ते, जनतेसाठी झटणारे नेते म्हणून ख्यात होते, तशी किर्ती अन्य कोणाला मिळणे शक्य नाही. त्यामुळेच गणपतराव नसतील, तर अन्य लोकांना आम्ही नाकारतो हे मतदारांनी दाखवले होते. हाच त्यांच्या कार्यशैलीचा विजय होता.

१९६२ साली गणपतराव देशमुखांनी शेकापच्या तिकिटावर पहिल्यांदा आमदार म्हणून महाराष्ट्राच्या विधानसभेत प्रवेश केला. त्यानंतर १९७२ आणि १९९५चा अपवाद वगळता ते सांगोला मतदारसंघाचं विधानसभेत प्रतिनिधीत्व करत होते. आपल्या मतदारसंघावर त्यांची पकड होतीच; पण संपूर्ण महाराष्ट्रातील बारीक खाचाखोचा, जलनीती हे त्यांना मुखोदगत होते. त्यामुळेच पाण्याच्या प्रश्नावर त्यांनी सातत्याने लढा दिला होता.


आपली बहुतांश कारकीर्द गणपतरावांनी विरोधी बाकांवरच काढली; मात्र १९७८ आणि १९९९ सालची सरकारं त्याला अपवाद राहिली, कारण १९७८ साली गणपतराव देशमुख हे शरद पवारांच्या पुलोद सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री होते. राजशिष्टाचार, वन, खाणकाम आणि मराठी भाषा ही खाती गणपतरावांकडे होती, तर १९९९ साली शेतकरी कामगार पक्षानं काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारला पाठिंबा दिला होता. महाराष्ट्राच्या विधिमंडळात ५५ वर्षांची प्रदीर्घ कारकीर्द पूर्ण केल्याबद्दल महाराष्ट्र विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात त्यांचा २०१७ साली सन्मान झाला होता. कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर व उपेक्षितांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे ज्येष्ठ नेते, अशीच कायम गणपतराव देशमुख यांची ओळख होती. महाराष्ट्राच्या चार पिढ्यांच्या मतदारांशी घट्ट नाळ जुळलेला गणपतरावांसारखा लोकप्रतिनिधी खरंच विरळा म्हणावा लागेल. साधारण दोन अडीच वर्षांपूर्वीचीच गोष्ट आहे. ग्रामीण भागातील एका शाळकरी मुलीने ते आमदार असताना, त्यांना पत्र पाठवून आपली व्यथा मांडली होती. शाळेसाठी एसटीने प्रवास करावा लागतो; पण एसटी वेळेवर येत नाही, आम्ही काय करायचे, असा प्रश्न तिने त्यांना विचारला होता. त्यावेळी ते तात्काळ तिथे आले आणि एसटीच्या कर्मचाºयांची हजेरी घेतली आणि त्या गावासाठी एसटी सुरू करून घेतली. लोकप्रतिनिधींनी काय करायचे असते, याचा हा अलिकडचा उत्तम नमुना आहे. सामान्य माणसांना काय हवे असते हो? त्यांचे जनजीवन सुरळीत असेल, रस्तेपाणी वीज असेल, शिक्षणात खंड पडत नसेल, तर त्यांची लोकप्रतिनिधींंकडे काही तक्रार नसते. हे कायम गणपतरावांनी जपले आणि पन्नास-पंचावन्न वर्ष आपल्या मतदारांचा विचार केला. कोणत्या वाडी-वस्तीत, गावात काय आहे याची सगळी माहिती त्यांना मुखोदगत होती. लोकाभिमुख राजकारणाची कास धरत सोलापूर जिल्ह्यातील सांगोला मतदारसंघातून ११ वेळा निवडून येण्याची किमया गणपतरावांनी साधली. त्यांच्या निधनामुळे जनसामान्यांचे आणि कार्यकर्त्यांचे निस्सीम प्रेम लाभलेला स्वच्छ प्रतिमेचा, ध्येयवादी नेता आज महाराष्ट्राने गमावला आहे. गणपतराव देशमुख यांच्या निधनाने मुल्याधिष्ठित राजकारण करणारा आदर्श लोकप्रतिनिधी हरपला आहे, हे नक्की. खºया अर्थानं गणपतराव देशमुख यांच्या निधनाने सामान्य माणसाचे असामान्य नेतृत्व हरपले आहे. विधानसभेने एक अतिशय चांगला मार्गदर्शक गमावला आहे. विधानसभेचे विद्यापीठ, अशी त्यांची ख्याती होती. आमदारांना दिलेल्या आयुधांचा केव्हा कसा वापर करायचा याची त्यांना जबरदस्त जाण होती. त्यामुळेच ते जेव्हा भाषणाला उभे राहत, तेव्हा सभागृह स्तब्ध होत असे. महाराष्ट्र विधानसभेत इतिहास घडवणारा लोकप्रतिनिधी महाराष्ट्राने गमावला आहे.

अखेरपर्यंत आपल्या खांद्यावर शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा घेणाºया एका जनताभिमुख नेत्याच्या जाण्याने शेतकरी कामगार पक्षाचा बुरुजच ढासळला आहे. ज्या शेतकरी कामगार पक्षाची एकेकाळी प्रचंड ख्याती होती, दबदबा होता, सर्वसामान्यांचा पक्ष म्हणून त्यांची ओळख होती, अशी ओळख निर्माण करण्यात जे महान नेते होते त्यात गणपतराव देशमुख हे अग्रेसर होते. भाई दाजीबा देसाई, भाई जेधे, दि. बा. पाटील, एन. डी. पाटील या महत्त्वाच्या डाव्या विचारांच्या नेत्यांमधील हा फार मोठा दुवा होता. उद्या शेतकरी कामगार पक्षाचा वर्धापन दिन आहे. त्याच्या पूर्वसंध्येलाच पक्षाला फार मोठा फटका बसला आहे. गणपतराव देशमुखांपुढे बोलण्याची भल्याभल्यांची टाप नसायची. याचे कारण अभ्यास केल्याशिवाय बोलणे, वायफळ बोलणे त्यांना कधी खपायचे नाही. आपल्या पक्षाच्या आमदारांना ते सतत काम कसे करायचे याचे धडे देत असत. शेकापक्षाच्या मीनाक्षीताई पाटील असोत, जयंत पाटील असो वा विवेक पाटील, धैर्यशील पाटील या नेत्यांना ते सतत मार्गदर्शन करत असत. त्यांची फार मोठी हानी झालेली आहे. काय करू नका यापेक्षा काय करा हे सांगणारे ते व्यक्तिमत्व होते, ते आज निघून गेले आहे, त्यांना अखेरचा लाल सलाम.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: