आज आठ वर्ष पूर्ण होतील डॉक्टर दाभोळकर यांच्या हत्येला. त्यांचे मारेकरी सापडू शकले नाहीत. जे काही पकडले आहेत त्यांच्याकडून तपास पुढे गेलेला नाही. तपासयंत्रणेचे हे अपयश आहे. पण लक्षात घेतले पाहिजे की डॉक्टर दाभोळकरांची हत्या झाली असली तरी त्यांचा मृत्यू झालेला नाही. ते त्यांच्या विचारांनी अजरामर आहेत. त्यांचा विचार जीवंत आहे हे मारेकरी आणि त्यांच्या पाठीराख्यांनी लक्षात घेतले पाहिजे. भगवतगीतेतील तत्त्वज्ञानाप्रमाणे शरीर मरते आत्मा अमर राहतो. आत्मा म्हणजे दुसरे तिसरे काही नाही तर विचार हाच आत्मा आहे. आज डॉक्टर दाभोळकरांचा विचारांचा आत्मा जीवंत आहे आणि त्याला कोणीच इजा करू शकणार नाही हे मारेकरी प्रवृत्तींनी लक्षात घेतले पाहिज.
डॉ. नरेंद्र अच्युत दाभोलकर हे मराठी बुद्धिवादी, विज्ञानवादी, समाजसुधारक व सामाजिक कार्यकर्ते होते. त्यांनी अंधश्रद्धांच्या निर्मूलनासाठी समविचारी कार्यकर्त्यांना जमवून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही संघटना स्थापली.नरेंद्र दाभोलकरांचे माध्यमिक शिक्षण सातार्यातील न्यू इंग्लिश स्कूल शाळेत झाले. त्यांनी सांगलीतील विलिंग्डन महाविद्यालयातून विज्ञान शाखेतील उच्च माध्यमिक शिक्षण पूर्ण केले. ते राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरचे उत्तम कबड्डीपटू म्हणून क्रीडाजगतात प्रसिद्ध होते. कबड्डीवर उपलब्ध असलेले एकमेव शास्त्रशुद्ध पुस्तकही त्यांनी लिहिले. कबड्डीतील योगदानासाठी त्यांना मानाचा शिवछत्रपती पुरस्कारही मिळाला आहे. मिरज वैद्यकीय महाविद्यालयातून वैद्यकीय शाखेचे शिक्षण पूर्ण केले होते.
बाबा आढाव यांच्या एक गाव - एक पाणवठा या चळवळीत डॉक्टर दाभोलकर यांचा सक्रिय सहभाग होता. त्यानंतर त्यांनी श्याम मानव यांच्या 1983 साली स्थापन झालेल्या अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती मध्ये कार्य सुरू केले. त्यानंतर 1989 पासून त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती स्थापन केली. साने गुरुजींनी स्थापन केलेल्या साधना या लोकप्रिय साप्ताहिकाचे ते डिसेंबर 2006 पासून मृत्यूपर्यंत संपादक होते.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट रुढी, परंपरा मोडीत काढण्यासाठी लोकप्रबोधन करण्याचे काम त्यांनी केले. डॉक्टर दाभोळकरांनी नेहमीच विवेकावर भर दिला होता. विवेकाने विचार करण्याचे आवाहन करून सर्वांना एका समानतेच्या पातळीवर जगण्याचा मंत्र दिला होता. महाराष्ट्र जादूटोणाविरोधी विधेयक विधीमंडळात मंजूर व्हावे, यासाठी दाभोलकर गेल्या काही वर्षांपासून कार्यरत होते. यासंदर्भात सातत्याने विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांची भेट घेऊन विधेयकाच्या बाजूने सर्वपक्षीय मत बनवण्याचे काम ते करीत होते. समाजातील अनेक भोंदू बाबांचे पितळ दाभोलकर आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी सप्रयोग उघडे केले होते.
शोषण करणार्या, दिशाभूल करणार्या अंधश्रद्धांना विरोध करणे हे त्यांचे ध्येय होते. वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार करणे व त्याआधारे विविध घटना तपासणे, धर्माची विधायक कृतिशील चिकित्सा करणे म्हणजे धर्माबाबत काही आकलन व धर्मनिरपेक्षतेचा वेगळा दृष्टिकोन रुजवणे यासाठी त्यांनी आपले आयुष्य पणाला लावले. व्यापक परिवर्तनाचे भान जागृत करणे, समाजाला सजग करणे ही तत्वे मनात ठेवून त्यांनी कार्य केले. वैज्ञानिक दृष्टिकोनचा विचार, प्रसार, अंगीकार करण्याचे आवाहन त्यांनी सातत्याने केले होते.
पैशाच्या पावसाच्या लोभापायी नांदोस येथे घडलेल्या हत्याकांडाच्या निमित्ताने लिहिलेल्या एका लेखात डॉ. दाभोलकर लिहितात, ‘शिक्षणक्षेत्र, प्रसारमाध्यमे व ओपीनियन लीडर यांनी कणखर कृतिशील भूमिका घेण्याची गरज आहेच, पण त्याचबरोबर आणखी काही बाबींचे अवधान राखावयास हवे. संयम शिकवणारा धर्म आज आंधळ्या अतिरेक्यांच्या मुठीत कैद झाला आहे. एका बाजूला कथित धार्मिकतेला उदंड उधाण आलेले आहे, तर दुसरीकडे सर्वच धर्मानी उद्घोषिलेली नीतितत्त्वे मात्र सरपटणार्या प्राण्याप्रमाणे खुरडत चाललेली आहेत. असे का घडत आहे, का घडवले जात आहे, याचाही विचार करावयास हवा. हे चित्र बदलण्यासाठी प्रबोधनासोबतच एका व्यापक समाज परिवर्तनाची गरज आहे. उघडपणे शोषणावर आधारलेल्या व्यवस्थेने ज्या समाजाचा पाया रचला आहे, त्या समाजातील माणसाच्या मनाचे उन्नयन करणे, हे चर्चेने घडणारे काम राहत नाही. त्यासाठी शोषण संपवून व सृजनशील जीवन शक्य होईल, अशा समाज-व्यवस्था निर्मितीचे आव्हानही पेलावे लागेल, याचे भानही आवश्यक आहे’ असे ठामपणे डॉक्टर दाभोळकरांनी सांगितले होते.
शिक्षणक्षेत्र, प्रसारमाध्यमे, ओपीनियन लीडर, सुशिक्षित असणारा मध्यमवर्ग, वेगवेगळ्या पदांवरील उच्चशिक्षित, इंजिनिअर, डॉक्टर, वकील वगैरे व्यक्तींनी सभोवतीच्या अंधश्रद्धेच्या दूषित पर्यावरणाची सखोल चिकित्सा केली पाहिजे, यासाठी डॉक्टर नेहमीच आग्रही होते. आपण अंधश्रद्धा शोषणाच्या व्यवस्थांना खतपाणी घालत आहोत का? या व्यवस्थेचा आपण घटक आहोत का, हे समजून घेतले पाहिज यासाठी त्यांनी सातत्याने प्रबोधन केले होते. ‘वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे कार्यकारण भाव, चमत्कार म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव, हे नाते प्रकाश अंधारासारखे आहे. एकाचे असणे म्हणजे अपरिहार्यपणे दुसर्याचे नसणे.. मानसिक गुलामगिरीची सर्वात भयानकता ही आहे की त्या अवस्थेत माणसाच्या बुद्धीला प्रश्न विचारलेला चालत नाही मग तो पडणे तर दूरच राहिले. व्यक्तीचे बुद्धिवैभव, निर्णयशक्ती, सारासार विचारांची क्षमता या सर्व बाबी चमत्काराच्या पुढे गहाण पडतात, हे डॉक्टर दाभोळकरांनी सप्रमाण सिद्ध केले होते. दाभोळकरांना आपले बलिदान करावे लागले असले तरी त्यांच्या विचाराला जिवंत ठेवण्यासाठी युवापिढी, नवी पिढी पुढे येत आहे ही जमेची बाजू आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा