एका वेगळ्या हेतूने किंबहुना आगामी काळात येणाºया निवडणुका डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्यानेच शपथ घेतलेल्या ३९ मंत्र्यांना जन आशीर्वाद यात्रा काढण्यास सांगितली होती. हे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून होते, हे अगदी स्पष्ट होते. अर्थात आपण केलेले काम, सरकार काय करत आहे, ते सांगण्याचा प्रयत्न राजकीय पक्षाने करणे यात गैर काहीच नाही. तसा तो देशभरातून विविध केंद्रीय मंत्री करत होतेच; पण मुंबई ते कोकण या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रेला मात्र एक शाप लागला. जनतेचा आशीर्वाद मिळण्यापूर्वीच त्यांना अटक करण्याची वेळ आली. अर्थात हा जो प्रकार झाला तो निश्चितच धक्कादायक आहे, वाईट आहे. पुरोगामी म्हणवून घेणाºया महाराष्ट्रात हे व्हायला नको होते.
राजकारणात वादग्रस्त वक्तव्ये करून, लोकांच्या भावना दुखवून, शिवराळ भाषा वापरून एकमेकांवर जी चिखलफेक केली जात आहे, ते थांबण्याची कुठे तरी गरज आहे. वैयक्तिक आकसातून आपण कुठे तरी घसरतो आहोत, हे जाणकार, अनुभवी नेत्याकडून अभिप्रेत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून बोलण्याच्या ओघात झाली असेल चूक की, हिरक महोत्सव की अमृत महोत्सव नक्की शब्द सुचला नसेल; पण त्याचे इतके भांडवल करून त्यावरून आक्षेपार्ह वक्तव्य करायची काहीच गरज नव्हती. नारायण राणे हे राज्याचे मुख्यमंत्री झालेले आहेत. त्यांना ती संधी शिवसेनेने दिली होती. आज आपण जे काही आहोत ते हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच आहोत, हे आजही ते कबूल करतात. त्याच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात करताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकावर दर्शन घेतले होते. नारायण राणे यांना कोणते वक्तव्य केल्याने मुख्यमंत्र्यांचा अपमान होतो, याची चांगली जाण आहे. नियम, कायदे सर्व काही नारायण राणे कोळून प्यायलेले आहेत. त्यामुळे कोणत्या वक्तव्याचे काय परिणाम होतील याची जाण असताना त्यांच्याकडून सोमवारी असे वक्तव्य झाले, हे फार आश्चर्यजनक म्हणावे लागेल. त्यामुळे भारतीय जनता पक्षासाठी ही जन आशीर्वाद यात्रा कोकणात प्रवेश केल्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यात शापीत ठरली, असे म्हणावे लागेल. अर्थात याचे नक्की परिणाम आगामी काळात दिसून येतील. नारायण राणे यांच्या अटकेचे परिणाम मतदारांवर, त्यांच्या मतदारसंघावर, भाजपवर नेमके काय होतात, यासाठी कोणत्या तरी निवडणुकांमधील निकालच सांगतील. त्यावेळी जनता आशीर्वाद देणार की, शाप देणार हे कळायला किमान सहा महिने लागतील; पण अशा प्रकारे जन आशीर्वाद यात्रा रोखण्याचे काम शिवसेनेकडून केले गेले आणि आपले शक्तिप्रदर्शन त्यांनी केले हे नक्की. ठाकरे सरकारने ही जन आशीर्वाद यात्रा रोखली. ही जन आशीर्वाद यात्रा चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इच्छेने काढलेली होती. त्यांच्या आदेशाने काढलेली होती. त्यामुळे या यात्रेला विशेष महत्त्व होते. त्यामुळेच या यात्रेला आशीर्वाद लाभणार की, शाप हे येत्या काळात दिसेल.
खरं म्हणजे चिखलफेक करण्याची संस्कृती आता संपवण्याची गरज आहे. आज देशात अनेक महासंकटे असताना, आपण एकमेकांची उणीदुणी काढत बसतो हे काही चांगले नाही. दुसरा किती वाईट आहे, मूर्ख आहे, बेकार आहे हे सांगण्यापेक्षा मी कसा चांगला आहे, माझे काम कसे चांगले आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न केला गेला पाहिजे. शिवसेनेचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री चुकीची माहिती देतात हे सांगण्यासाठी आपण चुकीचे वक्तव्य का करावे, असा विचार नारायण राणे यांनी केला असता, तर ही जन आशीर्वाद यात्रा थांबली नसती.
अर्थात भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना या वक्तव्याचे परिणाम सकाळीच समजले होते. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांच्या वाक्याचे भाजप कधीच समर्थन करणार नाही; मात्र पक्ष त्यांच्या पाठिशी असेल, असे स्पष्ट केले होते. त्याचवेळी नारायण राणे यांना जर पोलिसांनी अटक केलीच, तर जन आशीर्वाद यात्रा थांबणार नाही, भाजपचे नेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार ही यात्रा पूर्ण करतील, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे अटक होणार हे नक्की झालेच होते; पण यामुळे खºया अर्थाने महाराष्ट्राची नाचक्की संपूर्ण देशात झालेली आहे. एका केंद्रीय मंत्र्याला, मोदी सरकारमधील एका महत्त्वाच्या मंत्र्याला वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे अटक करण्याची वेळ आली, हा संदेश संपूर्ण देशभरात जात आहे. तो संदेश भाजपसाठीही धोक्याचा आहे. सगळीकडे जन आशीर्वाद यात्रा सुरळीत पार पडत असताना, कोकणात मात्र ती यात्रा शापीत ठरावी हे चुकीचे आहे.
नारायण राणे यांना मोदी सरकारने चांगले खाते दिले आहे. त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या फार अपेक्षा आहेत. कोकणात उद्योग, लघुउद्योग, रोजगार या दृष्टीने ते चांगले काम करू शकतात. नारायण राणे यांची कामाची शैली चांगली आहे; पण हे सगळं करण्यासाठी जिभेवर ताबा असण्याची गरज आहे. नेमका तो नसल्यामुळे हा फटका बसला आणि ही यात्रा शापव्रत झाली, असे म्हणावे लागेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा