भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते कल्याण सिंह यांचे निधन झाले. आॅगस्ट महिना हा भारतीय जनता पक्षाच्या इतिहासात गेले दोन वर्षे वाईटच जाताना दिसत आहे. अटलबिहारी वाजपेयी, सुषमा स्वराज या महत्त्वाच्या नेत्यांचे आॅगस्ट महिन्यात निधन झाले. आता कल्याण सिंह यांचे आॅगस्ट महिन्यात निधन झाले आहे. भारतीय जनता पक्षाच्या इतिहासात कल्याण सिंह यांचे वेगळे महत्त्व आहे. वेगळे स्थान आहे. वेगळे योगदान आहे. त्यामुळे त्यांची दखल ही घ्यावीच लागेल. वास्तविक भारतीय जनता पक्ष आणि संघ परिवारात व्यक्तीस्तोम माजवले जात नाही. तो पक्ष व्यक्ती केंद्रीत नसला, तरी पक्षासाठी योगदान आणि वेगळी भूमिका मांडणाºयांची नोंद म्हणून कल्याण सिंह यांचे नाव वेगळ्या प्रकारे घ्यावे लागेल. तसे कल्याण सिंह कायम वादग्रस्त आणि सनसनाटी म्हणूनच पक्षात राहिले; पण ते एक दखलपात्र नेते होते.
उत्तर प्रदेशचे माजी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते कल्याण सिंह यांचे शनिवारी रात्री लखनऊ येथील संजय गांधी वैद्यकीय विज्ञान संस्थेत (एसजीपीजीआय) निधन झाले. वयाच्या ८९व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला; पण त्यांना कोणी कधीच विसरू शकणार नाही, कारण भाजपच्या इतिहासात अयोध्यातील राम मंदिर, बाबरी मशीद आणि कल्याण सिंह ही पर्व कायमची असणार आहेत. खरं तर कल्याण सिंह यांनी भारतीय जनता पक्षामध्ये असताना, राज्यात आणि केंद्रात अनेक महत्त्वाची पदे भूषवली. ते राजस्थान व हिमाचल प्रदेशचे राज्यपालदेखील राहिले होते. १९९०च्या दशकात उत्तर प्रदेशात भाजपचा प्रचार-प्रसार करण्यात आणि सत्ता स्थापनेत कल्याण सिंह यांचा मोलाचा वाटा होता. कारसेवकांनी अयोध्येतील बाबरी मशीद ६ डिसेंबर, १९९२ रोजी पाडली, तेव्हा कल्याण सिंह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. मशीद पाडल्याप्रकरणी दोषमुक्त केलेल्या ३२ जणांमध्ये ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांच्यासह कल्याण सिंह यांचाही समावेश होता. त्या काळात नरसिंह राव हे देशाचे पंतप्रधान होते. कारसेवकांना सगळीकडून अडवले जात असताना, नरसिंहराव यांनी कल्याण सिंह यांना तंबी दिली होती की, कोणत्याही परिस्थितीत बाबरीला धक्का लागला नाही पाहिजे; पण बाबरी पाडली आणि कल्याण सिंह यांनी लगेच राजीनामा दिला. आपण बाबरी वाचवू शकलो नाही, जनमतापुढे झुकलो, असे सांगत त्यांनी आपले कार्य पूर्ण केले आणि सर्वांना सुखद धक्का दिला. त्यामुळे अयोध्येतील राम मंदिर निर्माणाच्या कार्यातील सर्वात मोठा अडसर होता तो बाबरी मशिदीचा. तो दूर करण्यात सिंहाचा वाटा या सिंहाचा होता, म्हणून कल्याण सिंह यांचे वेगळे स्थान आहे.
अनेकवेळा कल्याण सिंह यांची कारकीर्द चर्चेत आणि वादग्रस्त ठरली. कल्याण सिंह यांचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्यासोबत अनेकदा मतभेद आणि वाद झाले. त्यानंतर १९९९मध्ये सार्वजनिकरित्या अटलबिहारी वाजपेयी यांच्यावर टीका केल्यामुळे सिंह यांना पक्षातून काढून टाकण्यात आले होते. भाजपमधून काढल्यानंतर कल्याण सिंह यांनी राष्ट्रीय क्रांती दल नावाने स्वत:चा पक्ष स्थापन केला आणि २००२ ची विधानसभा निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी भाजपविरोधात जोरदार प्रचार केला आणि त्यांच्या पक्षाने चार जागा मिळवत ७०पेक्षा जास्त जागांवर भाजपला नुकसान पोहोचवलं. २००३ मध्ये ते समाजवादी पक्षासोबत सत्तेत सहभागी झाले; मात्र त्यांची सपासोबतची मैत्री जास्त काळ टिकली नाही आणि जवळपास पाच वर्षांनी २००४ मध्ये ते पुन्हा भाजपवासी झाले, परंतु त्यांच्या भाजपमधील पाच वर्षांच्या गैरहजेरीत बरीच राजकीय समीकरणं बदलली होती. २००७मध्ये पुन्हा भाजपने त्यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनवत निवडणूक लढवली; पण त्याचा फायदा झाला नाही. त्यामुळे अगदी तीन वर्षांपूर्वी भाजपमध्ये परतलेल्या सिंह यांनी पुन्हा २००९ मध्ये सपासोबत हातमिळवणी केली आणि लोकसभेत खासदार झाले. २०१२ च्या विधानसभा निवडणुकीत पुन्हा त्यांनी राष्ट्रीय क्रांती दलाचे तब्बल २०० उमेदवार उभे केले; मात्र त्यांना एकही जागा जिंकता आली नाही. पक्ष बदलण्याचा आणि ठाम राजकीय भूमिका नसल्याचा फटका त्यांना स्वत:च्या अतरौली मतदारसंघातही बसला. ज्या मतदारसंघातून कल्याण सिंह ८ वेळा निवडून आले होते, त्या पारंपरिक अतरौली मतदारसंघात त्यांच्या सून प्रेमलता यांचा पराभव झाला. त्यानंतर कल्याण सिंह २०१३ मध्ये पुन्हा भाजपमध्ये परतले आणि त्यांनी राष्ट्रीय क्रांती दल या पक्षाचं भाजपमध्ये विलिनीकरण केलं. त्यानंतर त्यांनी त्यांच्या १४-१५ वर्ष भाजपपासून लांब राहिल्याबद्दल खंत व्यक्त केली. यावेळी कल्याण सिंह यांनी एका सभेत भावुक होऊन भाषण दिलं आणि त्यांच्या संघ आणि भाजपसोबतच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी त्यांनी म्हटलं होतं की, संघ आणि भाजपचे संस्कार माझ्या रक्तातील प्रत्येक थेंबात सामावलेले आहेत. त्यामुळे मी आयुष्यभर भाजपात राहणार आणि ज्या दिवशी माझ्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल, त्यादिवशी माझा मृतदेह भाजपच्या झेंड्यात गुंडाळून यावा, अशी माझी इच्छा आहे. अखेर तेच घडले; पण जोपर्यंत बाबरी मशिदीचा उल्लेख होईल तोपर्यंत कल्याण सिंह यांचे नाव सर्वांच्या स्मरणात राहिल आणि त्यांचे सनसनाटी व्यक्तिमत्व लोकांना आठवत राहिल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा