बुधवार, २५ ऑगस्ट, २०२१

अफलातून डोकी


छोट्या पडद्यावर ज्या मालिका दाखवल्या जातात, त्यामध्ये झी मराठीने सध्या अफलातून डोकी चालवली आहेत. त्याचे कौतुक करावे तेवढे थोडेच आहे. मुळात लपवाछपवी आणि एकमेकांना काही सांगायचं नाही, यामुळे मालिकांचे कथानक वाढवायचे, ही झी मराठीची अल्फा टीव्ही असल्यापासूनची सनातन परंपरा आहे. त्यामुळे ती परंपरा जपताना लेखक, दिग्दर्शक अशी काही डोकी लढवतात आणि त्या कथानकात असा काही मसाला घुसवतात की, पाहणाºयांचे डोके सुन्न होऊन जावे.


मागच्या आठवड्यात येऊ कशी तशी मी नांदायला या मालिकेत ती मालविका त्या साळवी कुटुंबाला इतकी छळते. बेघर करते, रस्त्यावर आणते. हे सगळं मालविकानं केलं आहे हे माहिती असूनही लपवाछपवीच्या थीममुळे स्वीटू ओमला यातलं काही सांगत नाही. ओमला त्याची आई शकू सांगते; पण तरीही ओम स्वीटूवर नाराज असतो. ओमला शकूने हे सगळं सांगितलं म्हणून मालविका शकूला घरातून बाहेर काढते, हाकलून देते. ज्या शकूने हा बिझनेस उभा केला आहे, त्या शकूला तीची मुलगी अशाप्रकारे घरातून हाकलून देते हे किती घाणेरडे आहे? दिवसेंदिवस समाजातील गुन्हेगारी मानसिकता वाढीस लागत असताना हे असलं काही, तरी दाखवणं किती भयानक आहे? एका मुलीनं आपल्या आईला अशाप्रकारे धक्के मारून बाहेर काढणं हे काही चांगलं वाटत नाही. इतकं क्रौर्य कसं काय दाखवलं जातं? ही मालविका मोठा बिझनेस आहे, आपण श्रीमंत आहोत. आंतरराष्ट्रीय स्तरावरचा बिझनेस आहे, असे बोलत असते; पण बिझनेसचे काम करताना कधीच दिसत नाही. बिझनेसच्या नावाखाली त्या मोहितला थपडा मारणं, त्याच्याकडून कारस्थानं करून घेणं यापलीकडे काही करत नाही. पूर्वी मराठी चित्रपटातून खास्ट नणंदा दाखवल्या जायच्या; पण त्या अशिक्षित असायच्या. पण, शिक्षण घेऊनही महिलांमध्ये अशीच प्रवृत्ती वाढीस लागते का, असा प्रश्न पडतो. त्यामुळे कसला संदेश या मालिका देत असतात हे न कळणारेच आहे.

झी मराठीला सावरण्यासाठी लिटील चॅम्स सारेगमपचे पुढचे पर्व आता सुरू केले आहे; पण त्यातही पोरकटपणा फार होताना दिसत आहे. मागच्या आठवड्यात मराठी संगीताचा, मराठी चित्रपटसृष्टीचा सुवर्ण काळातील युगात आपल्याला घेऊन जात आहे आणि जुनी गाणी आपल्याला लिटील चॅम्पसकडून ऐकायला मिळतील, असे सांगितले. मराठीतील गोल्डन इरा वगैरे त्याचे वर्णन केले आणि पहिल्याच दिवशीच्या भागात या गोल्डन इरामध्ये सैराट चित्रपटातील गीत सादर केले. सैराटमधील गाणे असेल चांगले; पण ते काही सुवर्ण काळाचे साक्षीदार नाही. जेमतेम पाच वर्षांपूर्वीचे हे गाणे आहे. ते ब्लॅकव्हाईटच्या जमान्यात कसे काय गणले जाते? गाण्यांमध्ये काही नाविन्य आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे की नाही? जी गाणी बारा वर्षांपूर्वी या पाच परीक्षक स्पर्धक गायकांनी गायलेली होती, तीच पुन्हा या बाल गायकांकडून गाऊन घेण्यात, मी पण अशीच वेशभूषा केली होती, मी कशी तयारी केली होती हे स्पर्धकांना परीक्षकांनी सांगणे अत्यंत पोरकटपणाचे वाटते. तीच तीच गाणी किती वर्ष वाजवली जाणार आहेत? इतका चांगला वाद्यवृंद आहे, चांगले संगीतकार आहेत, त्यांच्याकडून नवीन न सादर केली जाणारी अशी वेगळी गाणी का लावली जात नाहीत? आजपर्यंत सादर केलेल्या गाण्यामंध्ये नव्वद टक्के गाणी ही प्रत्येक गाण्याच्या कार्यक्रमात तीच ती असतात. लावणी, लोकगीतं हे प्रकार हाताळताना चार-दोन लावण्याच पुन्हा पुन्हा ऐकवल्या जातात. त्यामुळे हे रिअ‍ॅलिटी शो न वाटता कधीकधी शाळेत गॅदरींगला गाणी, नाच बसवून घेतात आणि पाहुण्यांपुढे सादर केली जातात, असे काहीसे वाटते. इतकी टॅलेंटेड छोटी मुले असताना, त्यांच्याकडून वेगळी गाणी सादर केली, तर या कार्यक्रमाचा दर्जा आणखी वाढेल. मुग्धानं बारा वर्षांपूर्वी गायलेलं, आर्यानं गायलेलं, प्रथमेशनं गायलेलं, कार्तिकीनं गायलेलं गाणंच जर म्हणायचे असेल, तर ते लिटील चॅम्सचे दुसरे पर्व न राहता तो नव्या संचातला रिमेक म्हणावा लागेल. त्यामुळे जी उत्सुकता सुरुवातीला होती ते नाविन्य आता या कार्यक्रमाबाबत राहत नाही.


देवमाणूसचे आता शेवटचे काही भाग आहेत. तो शेवटच्या घटका मोजत आहे, म्हणून ठिक. आता पोलिसांपेक्षा चंदाच्या कुरघोड्यांनी ही मालिका संपणार. ती संपवताना ते गुजराती पात्र कशाला शू छे करायला आणि डॉक्टरच्या मोहात पडायला आणले हे अनाकलनीय आहे; पण जे काही चालले आहे, ते भन्नाट डोकी चालवून दाखवले जात आहे. आता या महिन्यात झी मराठीच्या बºयाच मालिका संपत आहेत. १६ ,२३ आणि ३० आॅगस्टपासून काही नव्या मालिका सुरू होणार आहेत. तेवढीच जमेची बाजू आहे. रात्रीस खेळ चालेपण पुन्हा सुरू होणार, असे म्हटले जाते. त्याची संजिवनी आता या वाहिनीला मिळते का, ते येत्या काही दिवसांत पहायला मिळेल. झी मराठीला बाकीच्या वाहिन्यांच्या तुलनेत आता आपला टीआरपी सावरण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागणार आहे, हे नक्की. त्यासाठी चांगल्या आणि दर्जेदार मालिका आणाव्या लागतील. एखादी चांगली पौराणिक मालिका आणली, तरी फरक पडू शकतो. आज कलर्स, सोनी मराठी, स्टार प्रवाह सगळीकडे अशा मालिका आहेत; पण जय मल्हारनंतर झी मराठीकडे दमदार मालिका आलेली नाही. यासाठी प्रयत्न होणेही आवश्यक आहे. कलर्सवर जय जय स्वामी समर्थ, सोनी मराठीवर असलेली गाथा नवनाथांची या मालिका प्रेक्षकांची पकड घेत आहेत, प्रेक्षकांना खेचून घेत आहेत, अशा परिस्थितीत स्पर्धेत टिकण्यासाठी झी मराठीला चांगल्या मालिकांची कमतरता भासत आहे, हे स्पष्ट झाले आहे.

प्रफुल्ल फडके/छोटा पडदा


9152448055\\

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: