मान्याच्या वाडीत लई उत्साह दिसत होता. पारावर शंकर माने, आप्पा माने, नामदेव माने, दौलती, हैबती, हंबिरराव, अशी सगळी गडी माणसं लई म्हणजे लईच उत्साहात दिसत हुती. त्याला कारण बी तसंच हुतं म्हणा. विषय हुता गटारीचा. आता सोमवारधरनं श्रावन लागायचा म्हणून आज कंच्या बी परस्थितीत गटारी झालीच पायजेल याची चर्चा रंगली हुती. ‘म्या काय म्हणतो, वाईच जरा लवकरच बसुया... म्हंजी दोन पेग जास्तीच हाणता येतील अन् जेवान बी हुईल.’ दौलतीनं प्रस्ताव ठिवला तशा समद्यांनी माना डोलावल्या. ‘व्हय व्हय... आनी स्टॉक बी वाईच जादाचा आणू... लवकर बसल्यावर कमी पडाया नगं..’
हंबीररावांनी सांगितलं, ‘कोण आणाय जातंय त्यानं लागलीच निगा... चारनंतर काई मिळणार न्हाई अन् ऐन गटारीचा इचका व्हायचा.... चारपतुर स्टॉक आणला की लगीच प्यालाच बसू...मस्त धा पतुर पित बसलो अन् मंग जेवान करून द्याची ताणून.. कसं?’
‘पर जेवणाचं कोण बगणार? न्हाई म्हंजे...’ हैबतीनं इचारलं तसं शंकरप्पा कावलंच. म्हणालं, ‘आलेका पारूबाईला सांगितलंय ना बनवायला. खळ्यावरच सकाळधरनं गेलीय.. मस्त बोकडाचं पाठीचंमटान बी दिलंय की आणून. झालाच तर तिला तांबडा-पांडरा करायला सांगितलाय. गरमागरम चुलीवरच्या भाकºया बनवून देईल ती. खळ्यावरच प्याचं अन् खळ्यावरच जेवायचं. घरात घाण कराय नगं उगा...’
गटारीचा जोरदार प्लॅन ठरत असतानाच गावात नव्यानंच आलेल्या सुधारणावादी मास्तरीणबाई आल्या आणि बोलाय लागल्या, ‘हे पहा.. मी सगळं ऐकलं आहे तुमचं... गटारीच्या नावाखाली गावात कुठेही दारूपार्टी होऊ द्यायची नाही. गावात दारूबंदी केली आहे.’
आता मास्तरनीच्या तोंडाला कोण लागणार म्हणून सगळे गप्प बसले अन् आतल्या आवाजात पुटपुटत एकेकजण खसकले; पण गावात ठिकठिकाणी अशाच चर्चा होत्या. परत्येक पुरुष आज रातचाला घरला जेवायला येणार न्हाय, असं आपल्या बायकोला सांगत हुता. पण बायकांना समजत न्हवतं की, दारू पिऊन हे सगळे टाईट हुणार मंग यांचा सैपाक कोण करणार? जेवान कोण बनवणार?
अनुबाईनं रंगाला इचारलं, ‘आवं.. म्या काय म्हंते... तुमी ते विंजक्शन टोचून घेतलं ना काल? मंग तुमाला चार दिस दारू प्याची नाय, असं सांगितलं हाय ना डाक्टरांनी?’
रंगा बिथरलाच. कोरोनाची लस काय घितली अन् ती घेतल्यामुळं आता आपली गटारी हुकणार याचं त्याला दु:ख झालं. तेवढ्यात तात्या माने रात्तीचं आवतान देया आला. ‘रंगाभाऊ हायस का घरला...’ तात्याची हाळी पडली तसा रंगाच्या जिवात जीव आला. तात्या लईच हिकमती माणूस. कायतरी टकुरं चालवलं अन् आपल्याला पियाला मिळंल या आनंदानं तो धावतच बाहीर आला. ‘ये ये तात्या...’
आत यीत तात्या म्हणला, ‘ठिक हाय ना समदं...’
‘व्हय तर... समदं ठिक हाय... काय काम काडलं आज?’
‘न्हाई म्हंजी आज गटारी हाय न्हवं... म्हणून बोलावणं कराय आल्तो.. सांचाला वाईच लवकरच ये... समदी लवकरच याचं ठरलंय... वाईच दोन घोट जास्ती जातील पोटात.’ तात्यानं सांगितलं तसा चुळबुळत रंगा म्हणाला, ‘न्हाई मंजी मला न्हाय येता येणार... आरं म्या ते विंजेक्शन घितलंय ना... लस का कायते.. तेनं मला चार दिस प्यायची नाय सांगितलंय.’
तात्या जोरदार हसत म्हणाला, ‘आरं डाकटरांचं ते कामच हाय... दारू पिऊ नका म्हणण्याचं... तर गटारी काय रोजरोज असती व्हय? म्या कालच मुंबईच्या डाक्टरशी बोललो. तवा त्यो म्हणाला असं कुटंही म्हणलं नाई की, इंजक्शन घेतल्यावर तीन-चार दिस दारू प्याची न्हाय... पर आमी सहज म्हणून सांगतो.’ रंगा खूश झाला. गटारीला खाडा पडणार नाई अन् पियाला बि मिळणार.
ज्या-ज्या गावकºयांनी लस घेतली हुती त्यांची लईच कुचंबना झाली हुती. यंदाची गटारी वाया जाणार म्हणून लई जण दु:खी झालं होतं. कुणी सरपंचाला शिव्या घालत हुतं. लसीकरणाचं शिबीर चार दिस उशिरा घेतलं असतं, तर काय सरपंचाचा बाबळ बुडत हुती का? पण तात्यासारखे हिकमती लोक योग्य ते प्रबोधन करून लसीचा अन् दारूचा काही संबंध नाही हा गैरसमज दूर करून अनेकांना दिलासा देत होते.
सांच्यावेळी गावाबाहेर गटागटानं लोक जाताना दिसले. समद्यांनी गावाबाहेर माळावरच शेतात गटारीचे प्लॅन केले होते. कुणी चौघात, तर कुणी धा जणात तरुणांचा गट वेगळा, पोरांचा वेगळा, म्हाताºयांचा वेगळा, असे सगळे गावातले पुरुष गटारीसाठी गावाबाहेर जमले. ठिकठिकाणी घोळका करून बसले. सतरंज्या आल्या. ग्लासं आली. बाटल्या आल्या. पाण्याच्या कळशा आल्या. समद्यांनी जंगी तयारी केली हुती. एका गटात चर्चा सुरू झाली, ‘आरं समदं आणलं पण चकन्याला काईच न्हाय व्हय?’ दौलत्यानं भुवया उंचावून इचारलं तसा परबत्या म्हणाला, ‘आरं आपल्या परत्येकाच्या घरात आकाड तळला हाय... भोपळ्याच्या घाºया, तिकट पुºया, भजी, काय-काय करून ठिवलं हाय... म्हंजी आकाड तळायचा नेमच हाय आपल्या गावात. परत्येकानं थोडा-थोडा आकाड आणला, तर चकना हुईल ना भारीपैकी?’
तिकडे तरुणांच्या गटात पिंट्या मानेनं अदुगरच सुरू केलं हुतं. त्यामुळं त्याला भाषन देण्याची लईच हुक्की आली. त्यानं सुरू केलं, ‘गटारी ही आपली सनसनसुकृती न्हाई. आपल्याकडं आकाडी म्हणत्यात. पर नाव काय बी असलं, तरी पिनं अन् मटनावर ताव मारनं हे आजच्या दिवसांच म्हत्व हाय. म्हणून सर्वांना मी गटारीच्या शुबेच्छा देतो. वीश यू आॅल हॅपी गटारी...’
हळूहळू ग्लास वाजत होते. पेग भरले जात होते. गप्पांचा आवाज वाढत होता. अन परत्येक घरात बाया घरं साफ करून उद्यापासून घरात कोनचं बी वंगाळ वाईट अस्वच्छ राहता कामा नये. श्रावण म्हैनाभर पुण्याचं काम करायचं, म्हणून साफसफाई करत होत्या. गोमुत्र शिंपडत होत्या. चिंच मिठानं पितळी हांडे, पातेली, घागरी कळशा स्वच्छ करण्यात रमल्या होत्या. परत्येकीच्या तोंडात एकच विचार होता, ‘बरं बाई आज घरात कुणी जेवायला पुरुष माणूस न्हाई... त्यामुळं ही जादाची कामं तरी करता आली. मान्याच्या वाडीत संध्याकाळी बायकांचे भांडी घासणे, साफसफाईचे घासल्याचे आवाज, पाण्याचा आवाज, तर माळावर ग्लासांचे, वादाचे, भांडणाचे आवाज येत होते. गावातले आवाज स्वच्छतेचे होते. कुणा घरातून लहान मुलं म्हणत होती, ‘घरातली इडापिडा बाहेर जावो, बाहेरची लक्ष्मी घरात येवो.’ हे ऐकून बायका खूश होत्या. दारू पिणारी पिडा घराबाहेर गेली होती आणि सगळ्या लक्ष्म्या आपापल्या घरात भांडी कुंडी उजळत होत्या. अशाप्रकारे आकाडी साजरी होत होती.
प्रफुल्ल फडके/ रविवारची कथा
9152448055\\
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा