शनिवार, ७ ऑगस्ट, २०२१

पदकांचा दुष्काळ संपणार कधी?


आॅलिम्पिक या जागतिक क्रीडा सोहळ्यात भारतीय खेळाडूंनी फार काही चमक दाखवलेली नाही. १००-२०० खेळाडूंपैकी फक्त दोन पदके मिळाली, म्हणजे फारशी समाधानाची बाब नाहीच. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असूनही आपल्याला खेळाडूंमधील टॅलेंट आजवर शोधता आले नाही का? क्रिकेटशिवायही काही खेळ आहेत हे अजूनही आम्ही मान्य करत नाही का? लोकसंख्येत मोठा, बेरोजगारीने मोठा, दारिद्र्याने मोठा अशीच आम्ही बदनामी किती काळ सहन करायची? आपल्या लोकसंख्येच्या एक दशांश लोकसंख्या नसलेले देशही डझनाने पदके नेत आहेत, आपल्यापेक्षा थोडीशीच जास्त लोकसंख्या असलेला चीनही डझनाने सुवर्ण पदके, रौप्य पदके नेत असताना आम्ही इतके मागे का? याचा विचार करायची वेळ आलेली आहे. हा पदकांचा दुष्काळ संपणार कधी?


१४० कोटी लोकसंख्येत १४० स्पर्धक आम्हाला तयार करता येत नाहीत? किमान दहा पदके तरी आणण्याची अपेक्षा असताना, आपण एखाद दुसºया पदकावर किती वर्ष समाधान मानणार आहोत? चांगल्या खेळाडूंचा, पदके मिळवू शकतील, अशा खेळाडूंचा शोध आम्ही कधी घेणार आहोत? एखाद्याने चांगली कामगिरी केल्यावर त्याचे कौतुक करायचे, बक्षिसांची खैरातकरायची पण तो संघर्ष करत असताना, ते कोणापर्यंतच पोहोचत नाही. संघर्ष करणाºया खेळाडूंना वेळीच सुविधा मिळवून दिल्या, तर आम्ही सहज डझनावारी पदके मिळवू शकू; पण जोपर्यंत तो खेळाडू काही चमक दाखवत नाही, तोपर्यंत आपण त्याच्यापर्यंत पोहोचतच नाही. खेळाडू घडवावे लागतील. पदके मिळवण्यासाठी नियोजन करावे लागेल हे आम्ही कधी समजणार आहोत?

खरं तर अशा स्पर्धा वा सोहळे पार पडतात, तेव्हा त्यात सहभागी होण्याविषयी माध्यमातून अकारण अपेक्षा वाढवल्या जातात. यातून अपेक्षाभंग झाला, मग गदारोळ सुरू होतो. अपेक्षाभंगाचे दु:ख फार असते. फाजील अपेक्षांचे ओझे तर अतीच असते. १४० कोटी लोकांच्या अपेक्षा शे सवाशे खेळाडूंवर म्हणजे फारच बोजा म्हणावा लागेल. या अपेक्षाच मुळात खोट्या व चुकीच्या असतील, तर त्या पूर्ण होण्याचा प्रश्नच कुठे येतो? पदकांची अपेक्षा करण्यापूर्वी त्यांना सुविधा मिळाल्या का? त्यांना पुरेसा वेळ मिळाला का, याचाही विचार होणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे नवनवे खेळाडू तयार केले पाहिजेत. एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या देशात इतके कमी स्पर्धक कसे सहभागी होतात? क्रिकेटमध्ये आयपीएलच्या निमित्ताने शेकडो खेळाडू तयार केले आहेत, तर बाकीच्या खेळांकडे का लक्ष दिले जात नाही? आज दोन वेगवेगळे संघ दौºयावर पाठवण्याचा विक्रम भारताने क्रिकेटमध्ये केला आहे. मनात आणलं, तर क्रिकेट खेळणाºया प्रत्येक देशाविरोधात एक स्वतंत्र टीम देता येईल इतके खेळाडू आयपीएलमुळे तयार झाले आहेत. मग बाकीच्या खेळांबाबत हे तंत्र आम्ही का नाही निर्माण करू शकत?


हॉकी खेळ आमचा. कुस्ती, कबड्डी आमची. तिरंदाजी आमची संस्कृती. भालाफेक आमचे शौर्य. असे असताना त्या खेळांमध्ये आम्ही का नाही सुवर्ण पदके, रौप्य पदके मिळवू शकत? खेळाडूंचा शोध घेण्यासाठी आम्ही कमी पडतो आहे. फार मोठा सागरीकिनारा या देशाला लाभलेला आहे. समुद्रात भरती-ओहोटीत पोहणारे, महापुरात पुलावरून उड्या मारणारे स्टंटबाजही आपण पाहिले आहेत. त्यांच्यातील पोहण्याचे कौशल्य आम्हाला कधी दिसणार? ते खेळाच्या शास्त्रीय नियमांप्रमाणे, आॅलिम्पिकच्या नियमात बसवून आम्ही कधी शिकणार आहोत की नाही? असे असंख्य टॅलेंटेड लोक भारतात आहेत. त्यांच्यापर्यंत जर आपण पोहोचलो, तर लोकसंख्येप्रमाणे पदक संख्येतही आपण नंबर एक वर राहू; पण खेळात येणारे राजकारण अशा कामांमध्ये अडथळा आणत असावे असेच दिसते. किमान २०२४च्या आॅलिम्पिकचे नियोजन नक्की करून किमान दोन आकडी पदकसंख्या गाठायचे ध्येय आताच ठेवले पाहिजे. हा पदकांचा दुष्काळ संपला पाहिजे.

खेळाचे नियोजन न करता केवळ अपेक्षा बागळगणे यातून मग अपेक्षाभंग होऊन जातो, कारण ठोस क्रीडा धोरण नावाचा कुठलाही प्रकार आपल्याकडे नाही. त्यासाठी एक मंत्रालय स्थापन करायचे आणि त्याच्याकडे ठराविक कोटी रुपये वेगळे काढून द्यायचे; हा आपल्याकडे समस्या सोडवण्याचा सोपा मार्ग झाला आहे, म्हणूनच कुठल्याही बाबतीत यश संपादन करताना मर्यादा येतात. खेळाडूंनी यश मिळवल्यावर त्यांच्यावर बक्षिसाची लूट होते; पण अगोदर त्यांना प्रोत्साहन मिळत नाही. अगोदरच प्रोत्साहनपर खर्च केला, तर हा पदकांचा दुष्काळ संपेल. योजना याचा अर्थ खेळाडू तयार करण्याचे धोरण व त्याची अंमलबजावणी! त्याचीच बोंब असली मग काय व्हायचे?


दहा-बारा वर्षांपूर्वी आपल्या देशात राष्ट्रकुल स्पर्धांचे आयोजन झाले. अशा स्पर्धांवर सरकारने आपल्या तिजोरीतून अब्जावधी रुपये खर्च केले; पण अशा खर्चातून काहीही निष्पन्न होत नाही. अशा स्पर्धांचे आयोजन करण्याचा हेतू त्यातून प्रेरणा घेऊन मायदेशी क्रीडापटू निर्माण व्हावेत. अनेक देशांनी ते उद्दीष्ट साध्य केलेले आहे.

चीन हा देश दिर्घकाळ जगापासून अलिप्त होता, म्हणूनच त्याची हजेरी आॅलिम्पिकमध्येही दिसत नसे. त्यावेळी रशिया, अमेरिका व जपान यांचाच त्यावर वरचष्मा असे; पण चीनने त्यात उतरण्याचा निर्णय घेतला, तेव्हा जपान कुठल्या कुठे मागे पडला. पहिल्या फटक्यातच चीनने महत्त्वाचे स्थान प्राप्त केले. ते अकस्मात घडलेले नव्हते, तर चार-पाच वर्षे आधीपासून चीनने त्याची तयारी आरंभली होती. देशाच्या कानाकोपºयातून लक्षावधी मुलांच्या चाचण्या घेऊन निवडक पंधारा-वीस हजार मुले निवडली गेली. मग त्यातून प्रशिक्षणासाठी आणखी चाळण लावण्यात आली. पुढल्या दोन-तीन वर्षांत स्पर्धेत पात्र ठरू शकतील, अशा शेकडो खेळाडूंची सज्जता चीनपाशी होती, म्हणूनच पहिल्या फटक्यात त्याने पदकांवर हक्क प्रस्थापित केला. भारतालाही हेच करता आले असते; पण ते होत नाही, कारण त्यासाठी खेळाडू निर्माण करण्याचे कुठले धोरण नाही. आपल्याकडे समुद्रात पोहणारे कोळी बांधव आहेत. त्यातील कोणाला जलतरणामध्ये संधी दिली आणि प्रशिक्षण दिले, तर यश मिळू शकते, कारण पाण्यावर स्वार होण्याची नैसर्गिक शक्ती त्यांच्यात आहे, तसेच आदिवासी आणि दुर्गम भागातील लोकांमधील टॅलेंट शोधण्याचे नियोजन केले, तरच आपला हा दुष्काळ संपेल. नाहीतर एक, दोन किंवा शून्याच्यापुढे आम्ही जाणार नाही.


प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स

9152448055\\

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: