बुधवार, २५ ऑगस्ट, २०२१

कसली मानसिकता ही?


मागील काही दिवसात उघडकीस आलेल्या दोन-तीन घटना या अत्यंत सुन्न करणाºया आहेत. त्यापैकी पहिली म्हणजे नवी मुंबईत एका १५ वर्षीय मुलीने कराटे बेल्टने गळा आवळून आईची निर्घृण हत्या केली ती आत्महत्या भासवण्याचाही तिने प्रयत्न केला. इतक्या लहान वयात हे क्रौर्य मनात कसे काय आले असेल? कसली ही मानसिकता म्हणायची? दुसरी घटना म्हणजे पत्नी माहेरी निघून गेली आणि वारंवार विनवण्या करूनदेखील घरी परतत नसल्याने पतीने स्वत:च्या मुलीला फासावर लटकवले. मालाडच्या कुरार परिसरात रविवारी हा धक्कादायक प्रकार घडला. इतक्या खालच्या थराला माणसं कशी काय पोहोचू शकतात. अशा व्यक्तीच्या मानसिकतेचा शोध घेण्याची गरज आहे. एखादी वाईट घटना घडली की, आपल्याकडे त्याची पुनरावृत्ती होते, तशा प्रकारच्या पाठोपाठ घटना घडताना दिसतात. २०१२ला दिल्लीत सामूहिक बलात्काराचा प्रकार घडल्यानंतर दररोज अशा सातत्याने घटना समोर येताना दिसत आहेत. त्यामुळे या प्रवृत्तीला रोखण्यासाठी कुठेतरी प्रबोधन होण्याची गरज आहे.


पहिली घटना तर खूपच भयावह आणि चिंताजनक अशी आहे. नवी मुंबईत १५ वर्षीय मुलीने कराटे बेल्टने गळा आवळून आईची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना ३० जुलै रोजी ऐरोलीत घडली. हे का घडले त्याचे कारणही चिंताजनक आहे. आईने अभ्यासाचा तगादा लावल्याने मुलीने आईची हत्या केल्याचं समोर आलं आहे. वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी पीडित ४१ वर्षीय महिला वारंवार मुलीच्या मागे लागली होती. यामुळे दोघींमध्ये जोराचं भांडण झालं होतं. आईने अभ्यास कर म्हणून मागे लागणे हे इतके त्रासदायक असते का? ते चुकीचे असते का? इतके चुकीचे की, मुलीने आईचा खून करण्यास प्रवृत्त व्हावं? ही घटना ३० जुलै रोजी घडली असली, तरी गेल्या आठवड्यात मुलीने हत्येची कबुली दिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तीन दिवसांपूर्वी मुलीने आईविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी पोलिसांशी संपर्क साधला होता. यानंतर पोलिसांनी तिच्या पालकांना समुपदेशनासाठी बोलावलं होतं. मुलीने नीट परीक्षेसाठी तयारी करावी, यासाठी महिला तिच्या मागे लागली होती. मुलीने डॉक्टर व्हावं अशी त्यांची इच्छा होती. ३० जुलैला परीक्षेच्या तयावरीवरून दोघींमध्ये पुन्हा एकदा भांडण झालं. मुलीने आईला धक्का दिल्या, ज्यानंतर त्यांच्या डोक्याला जखम झाली. यानंतर मुलीने कराटे बेल्टने गळा आवळून आईची हत्या केली. मुलीने आईचा मृतदेह बेडवर ठेवला आणि आत्महत्या दर्शवण्यासाठी आईच्या मोबाइलवरून मामाला मेसेज पाठवला. मी सर्व प्रयत्न केले; पण आता माघार घेते, असं तिने मेसेजमध्ये लिहिलं होतं, म्हणजे या बालवयात खून करण्याचं धाडस केलंच; पण पुरावे मिटवण्याचे प्रकारही केले. हे कशामुळं घडलं असावं? ही प्रेरणा तिला कशी मिळाली असेल? आॅनलाईन शिक्षणामुळे हातात आलेला मोबाईल, सतत टीव्ही पाहणे यामुळे नको ते पाहिल्याने, तर ही प्रवृत्ती बळावली नसेल ना? ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणाºया अनेक वेबसीरिज या अशाप्रकारे असतात. त्याचा हा दुष्परिणाम नाही ना? याचा विचार केला पाहिजे.

दुसरीकडे पत्नी माहेरी निघून गेली आणि वारंवार विनवण्या करूनदेखील घरी परतत नसल्याने पतीने स्वत:च्या मुलीला फासावर लटकवले. मालाडच्या कुरार परिसरात रविवारी हा धक्कादायक प्रकार घडला. अजय गौड असे त्या माणसाचे नाव आहे. माणूस कसं म्हणायचं खरं तर अशा प्रवृत्तीला असा प्रश्न पडतो. गौड याला नशेचे व्यसन आहे. त्यातच तो पत्नी आणि दोन मुलांना बेदम मारहाण करायचा. ज्याला कंटाळून ती दोन वर्षांपूर्वी दोन्ही मुलांना घेऊन उत्तर प्रदेश येथील गावी निघून गेली; मात्र गौड काही दिवसांपूर्वी तेरा वर्षांची मुलगी आणि आठ वर्षांच्या मुलाला घेऊन मुंबईत परतला होता. त्यानंतर नशेत पुन्हा त्याने मुलांना मारहाण करण्यास सुरुवात केली. गौड याचा भाऊ सुचित याने कुरार पोलिसांना तक्रार दिली होती. ज्यात अजयने त्याच्या तेरा वर्षांच्या मुलीला प्लास्टिकच्या बादलीवर उभे करत तिच्या गळ्यात ओढणीने फास टाकत पंख्याला लटकवून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. मुलीला तो पाया खालील बादली हटविण्यास सांगत होता. ज्याला तिने नकार दिल्यावर त्याने पंखा सुरू करण्याची धमकी दिली आणि मुलगी घाबरून ओरडू लागली. तिचा आवाज ऐकून शेजाºयांनी घरी धाव घेत अजयला अडविले. कुरार पोलिसांनी अजय गौड याच्या ताब्यातून दोन मुलांची सुटका केली आणि अजयला अटक केली. अजय गौड याने मुलालाही जमिनीवर झोपवून त्याच्या अंगावर सफेद चादर टाकत दोन्ही मुलांचे फोटो काढले व पत्नीला पाठवले. मुलगा मेला आणि मुलगी गळफास घेतेय लवकर मुंबईत परत ये, अशी धमकी त्याने पत्नीला दिली. ही गुन्हेगारी मानसिकता कशातून तयार होते? कुटुंब व्यवस्था अशी मोडकळीस का येताना दिसत आहे? आपल्याच माणसांची इतक्या क्रूरपणे वागण्याची विकृती मनात कशी काय तयार होते? ही बाब चिंतेची आणि चिंतनाचीही आहे.


अशा वाढत्या घटना, हिंसक मनोवृत्ती रोखण्यासाठी प्रबोधनाची गरज आहे. एकाकी पडत चाललेली माणसं अशा एकलकोंडेपणातून, समाजापासून दूर होताना दिसत आहेत. हे प्रकार रोखण्याची गरज आहे. वाईट घटनांची पुनरावृत्ती होत असते. त्याचे कळत नकळत अनुकरण होत असते, म्हणूनच अशा कौटुंबिक हिंसाचारांच्या प्रकारांना रोखण्याचे एक फार मोठे आव्हान आता समोर आहे.

- प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स


9152448055\\

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: