शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१

शिव नीतीचे दर्शन घडवणारे ‘जय शिवराय’


आपल्याकडे फार प्राचीन काळापासून विदूर नीती, चाणक्य नीती, कृष्ण नीती, इसापनीती असे अनेक प्रकार लोकप्रिय आहेत. त्यातून बोध घेऊन जगण्याचा मार्ग दाखवला जातो, पण चारशे वर्षांपूर्वीचे आमचे महान राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नीतीचा अभ्यास केला तर ती पण एक सर्वश्रेष्ठ नीती आहे. या नीतीचा उहापोह करून कोणत्या वेळी कसा विचार करावा, कसा निर्णय घ्यावा, याचा बोध देणारे पुस्तक म्हणजे ‘जय शिवराय’. शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांच्या ओघवत्या आणि लोभस अशा गोड, सात्विक भाषेतून या नीतिमूल्यांचे दर्शन घडते तेव्हा हा एक धर्मसिंधू असल्याचा भास होतो. आपल्याकडे कोणताही बाका प्रसंग उभा राहिला, कोणतेही संकट उभे राहिले की, त्याला धर्मसंकट असे म्हणतात. या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवणारा तो धर्मसिंधू. असाच सध्याच्या काळात कसे वागले पाहिजे, कोणती भूमिका घेतली पाहिजे हे छत्रपती शिवरायांच्या भूमिकेतून बघताना फार काही शिकायला मिळते. हे महत्त्वपूर्ण काम प्रशांत देशमुख यांनी ‘जय शिवराय’ या पुस्तकातून केले आहे. त्यामुळे प्रत्येक माणसाकडे हे पुस्तक असले पाहिजे. आपल्याकडे पोथ्या, पुराणे असतात, ग्रंथ असतात, त्याची पारायणे आपण करतो तशी या जय शिवराय या पुस्तकाची पारायणे होण्याची गरज आहे, त्यावर मनन, चिंतन होण्याची गरज आहे. प्रत्येक खेपेला वेगवेगळ्या भूमिकेतून ते वाचले गेलेपाहिजे, असे सर्वांगसुंदर असे हे पुस्तक.


छत्रपती शिवाजी महाराज समजणे इतके सोपे काम नाही. त्यांचे चरित्र इतिहास किंवा रंजन म्हणून न पाहता एक नीतिवचनांचे शिक्षण देणारे व्यक्तिमत्त्व म्हणून पाहिले, तर या देशात खºया अर्थाने शिवशाही प्रकट होईल आणि सर्वजण सुखी होतील. किती पुढचा विचार करणारे आमचे राजे होते. आपल्या माणसांचा विचार करणारे त्यांचे स्वभाववैशिष्ट्य विविध पैलूंतून उलगडून समोर येतात तेव्हा हे पुस्तक म्हणजे केवळ ग्रंथ न राहता ते आपल्याला आधार देणारे, मनाला उभारी देणारा आपला मित्र होऊन जाते.

शिवरायांच्या आयुष्यात आलेले प्रसंग या पुस्तकात आहेतच, पण आजच्या परिस्थितीत शिवराय असते, तर त्यांनी काय निर्णय घेतला असता हे सुचवण्याचे अचूक काम प्रशांत देशमुख या महान लेखकाने केले आहे असे म्हणावे लागेल. या पुस्तकात एकूण ५५ लेख आहेत. या पंचावन्न लेखांमधून छत्रपती शिवराय वेगळ्या पद्धतीने उलगडत जातात. नव्याने समजतात. आजच्या तरुणांना, सामान्य माणसांना, महिलांना, व्यावसायिकांना, राजकारण्यांना मार्गदर्शन करणारे हे पुस्तक आहेच, पण खºया अर्थाने शिवरायांचे विचार माणसांच्या मनात रुजवणारे हे पुस्तक आहे. शिवरायांच्या पराक्रमाच्या कथा आपण वाचतो, त्यातून आनंद मिळतोच, अभिमानही वाटतो, पण त्याची मानसिक तयारी कशी झाली, त्या निर्णयापर्यंत ते कसे पोहचले, त्यांनी हा नेमका निर्णय कसा घेतला, यावर प्रकाश टाकणारे हे बोधप्रद असे पुस्तक आहे, म्हणून शिवचरित्राबाहेरच शिवराय आपल्याला या पुस्तकातून कळतात.


शिवरायांच्या अफाट कर्तृत्वावर अफाट प्रेमाने त्यांचा विचार जाणून घेऊन तत्कालीन आणि सद्य परिस्थितीची तुलना करत लिहिलेले हे पुस्तक असल्याने हे पुस्तक वाचकाला मार्गदर्शन करत राहते. पेरते व्हा मधून काय पेरले म्हणजे काय उगवते हा विचार मांडताना सुरतेच्या स्वारीवरील कथेचा भाग समोर येतो आणि शिवरायांच्या दूरदृष्टीचा परिचय घडत जातो. आपल्याकडे आपण अपयश आल्यावर खचून जातो, पण अपयशातील प्रयत्नही फार महत्त्वाचे असतात हे आमचे जाणते राजेच जाणतात. म्हणून तर त्यांना जाणता राजा म्हणतात हे उलगडते. म्हणूनच अपयशातील प्रयत्नांचे कौतुक आमचे राजे करतात. या कौतुकात पुढच्या यशाचे रहस्य दडलेले असते. हे खरे महाराज आपल्यासमोर या पुस्तकातून येतात. महाराजांसाठी जीवाला जीव देणारे वतनदार, मावळे कसे होते आणि त्यांचा आदर, सन्मान महाराज कसे करत होते याचे दर्शन या पुस्तकातून होते.

महाराजांनी माणूस वाचायला शिकवला, नेता कसा असावा, याचे उदाहरण घालून दिले. आपल्या ध्येयावर कसे ठाम असावे, केव्हा स्थितप्रज्ञ असावे हे त्यांनी वागून, जगून दाखवले. याचे दाखले आजच्या काळातील तुलनेसह या पुस्तकातून समोर येतात. आजचे राजकारणी, पोलीस यंत्रणा, समाजसुधारक, नेते, नोकरदार या सगळ्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देणारे हे पुस्तक आहे. आजचे राजकारणी, आजचे विरोधक, प्रस्थापित या सगळ्यांना हे पुस्तक बरेच काही सांगून जाते. त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे आजकाल कोणत्याही गोष्टीवरून वाद निर्माण होतात. काही गोष्टी वादग्रस्त केल्या जातात. अशी परिस्थिती कशी हाताळायची असते, यावर भाष्य हे पुस्तक करते.


शिवरायांनी कोणतीही गोष्ट विनाकारण केली नाही. कोणतीही गोष्ट चुकीची केली नाही. त्या प्रत्येक गोष्टीमागे जे महत्त्वाचे कारण होते ते कथेबाहेर जाऊन त्याची नेमकी कारणमीमांसा हे पुस्तक करते आणि त्याचा गूढ, न समजलेला अर्थही हे पुस्तक पोहचवते. त्यामुळे या पुस्तकातून राजांचा इतिहास नव्हे, तर राजांचे तहहयात असे स्वरूप, धोरण समजते. राजे हा कधी भूतकाळ होऊ शकत नाहीत, तर शिवराय हे जीवन जगण्याचे, जीवनाचा संघर्ष करणारे तत्त्वज्ञान आहे हे तत्त्वज्ञान देणारे, कठीण प्रसंगात किंवा कोणत्याही आनंदी प्रसंगातही कसे वागायचे, कसा विचार करायचा याचा बोध देणारे हे पुस्तक आहे. आज अशा पुस्तकांची गरज आहे. साध्या सोप्या आणि ओघवत्या भाषेत सांगितलेल्या या तत्त्वज्ञानाबद्दल शिवव्याख्याते प्रशांत देशमुख यांचे अभिनंदन करावे लागेल.

प्रफुल्ल फडके/वाचन संस्कृती


9152448055

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: