शुक्रवार, २७ ऑगस्ट, २०२१

कारावासाची संस्कृती

 


कालपर्यंत जे खूप चांगले काम करत होते, ते अचानक कसल्या तरी अडचणीत, भानगडीत सापडतात आणि त्यांच्या नशिबात तुरुंगवास येतो. आयुष्यभर कमावलेली इज्जत, अब्रू धुळीला मिळते. असे भल्याभल्यांच्या वाट्याला येताना आपण गेल्या काही वर्षांपासून पाहत आहोत. जे आपल्याला आदर्शवाद शिकवत होते किंवा ज्यांची प्रेरणा घेणे अभिमानाचे होते, जे लोक कोणाचे आयडल, आदर्श होते, तेच अचानक काळ्या यादीत जातात. अशा घटनांना किती महत्त्व द्यायचे याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. किंबहुना ज्या व्यक्ती अशाप्रकारे कारावासात जातात त्यांच्या चांगल्या कामाकडे दुर्लक्ष करणे हे कितपत योग्य आहे? ही कारावासाची संस्कृती आपल्याकडे का रुजते आहे? केव्हापासून आहे?


२०१७पर्यंत डीएसके विश्व म्हणून करिअर मार्गदर्शन करण्यासाठी दररोज सकाळी डी. एस. कुलकणी हे बिल्डर, उद्योजक तरुणांना मार्गदर्शन करायचे. मराठी तरुणांना व्यवसायात पुढे या म्हणून मार्गदर्शन करायचे. त्यांची व्याख्याने दररोज सकाळी आकाशवाणीवरून असायची. लहानपणापासून कशाप्रकारे संघर्ष करून ते मोठे झाले हा एक आदर्श होता. न फसवणारा बिल्डर अशी त्यांची ख्याती होती. इतकेच नाही तर शेअर मार्केटमध्येही त्यांचा शेअर लिस्टेड झाला होता. अचानक एखादे वादळ यावे याप्रमाणे आर्थिक अडचणीत ते सापडतात आणि गेली तीन वर्ष ते तुरुंगवासात आहेत. सहकुटुंब तुरुंगात आहेत. आयुष्यभर जमा केलेली इज्जत, अब्रू, नावलौकीक एकाएकी धुळीला मिळू शकते? घोटाळेबाज, फसवणूक करणारे म्हणून लेबल लागते आणि सगळं बदलून जाते.

अशी अनेक उदाहरणे आपल्याला पहायला मिळतात. क्रीडा क्षेत्रासाठी, डान्सबारला विरोध करून तरुणांना व्यसनमुक्त करण्यासाठी धडपडणारे कार्यसम्राट आमदार म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे आमदार विवेक पाटील हे युवा पिढीचे आदर्श होते. अचानक कर्नाळा बँकेच्या घोटाळ्याच्या निमित्ताने त्यांचे नाव पुढे येते आणि गेले दोन महिने ते तुरुंगात आहेत. आर. आर. पाटील गृहमंत्री असताना डान्सबारवर बंदी घालावी यासाठी एक लाख महिलांचा मोर्चा काढून डान्सबारवर बंदी घालणारे आमदार म्हणून त्यांची आतंरराष्ट्रीय स्तरावर ख्याती झाली होती. इंग्लंड, अमेरिका आणि फ्रान्सच्या पत्रकारांनी त्यांचे इंटरव्ह्यूव्ह घेतले होते. कर्नाळा स्पोर्टस अकॅडमीच्या माध्यमातून त्यांनी आलिम्पिक दर्जाची शूटिंग रेंज, तायक्वांदो आणि स्पोर्टस अकॅडमी उभी केली होती. यातून अनेक आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार करण्याचे काम घडत असतानाच एखादा बँकेचा घोटाळा पुढे येतो आणि हे सगळे पुसले जाते. कालचे हिरो एका रात्रीत झीरो होतात? हे न पटणारे आहे? भले-भले प्रतिष्ठित लोक, नेते, कार्यकर्ते अचानक कोणत्यातरी घटनेने तुरुंगात जातात आणि होत्याचे नव्हते होण्याची वेळ येते. त्यातून सावरणे सोपे नसते. ईडीच्या ससेमिºयातून दोन वर्ष तुरुंगवास भोगल्यानंतर छगन भुजबळ यांनी जी फिनिक्स भरारी घेतली आहे, ती याबाबतीत वाखाणण्यासारखी आहे; पण ही कारावासाची संस्कृती ज्याप्रकारे आज फोफावती आहे, ते कुठे तरी समाजकार्याला बाधक आहे.


माणसं अडचणीत येऊ शकतात. आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. त्यासाठी त्यांनी अगदी भ्रष्टाचार केलेलाच असेल असे नाही; पण कोणतीही संस्था उभारताना फार मोठे कष्ट घ्यावे लागतात. ती नावारूपाला येण्यासाठी अनेक वर्ष मेहनत करावी लागते. नावारूपाला आल्यावर अचानक काही तरी घडते आणि संस्था बरबाद केली जाते. हा जो खेळ सातत्याने पहायला मिळतो, त्यावर कुठे तरी मंथन होणे गरजेचे आहे. विशेषत: सहकार क्षेत्रात हे प्रकार फार पहायला मिळतात. अनेक मोठे लोक या पायी कारावासात जातात. त्यांना पुन्हा उभे राहण्याची संधीही न देता संस्था मोडीत काढल्या जातात. हा एकमेव उपाय आहे का? संस्था वाचवण्यासाठी काही पर्याय असले पाहिजेत. उद्योगात निर्माण झालेल्या अडचणी आणि पैसा कुठे तरी थांबल्यामुळे लागलेला हा ब्रेक असतो. त्यावर तोडगा काढला पाहिजे. आज जे सुपात आहेत तेच उद्या जात्यात येऊ शकतात. आजचे आदर्श उद्याचे खलनायक होणार असतील, तर आदर्शावरचाच लोकांचा विश्वास उडेल. यासाठी कोणतीही कारवाई करताना त्यातील राजकारण बाहेर काढून सुधारण्याची, दुरुस्ती करण्याची संधी दिली, तर कारावासात जाणाºया चांगल्या विभूतींना काळिमा लागणार नाही.

अनेक बँका, संस्था मोडीत निघतात. त्या उभे करणारे तुरुंगात जातात. बँकेत पैसा अडकलेले बरबाद होतात. माध्यमे त्याच्या बातम्या करून आपली जागा व्यापतात; पण त्यातून निष्पन्न काहीच होत नाही. विजय मल्ल्या हा एकेकाळचा हिरो होता. हजारो लाखो लोकांना रोजगार देणारा, देशाला भरपूर महसूल देणारा दारू उत्पादक होता. त्याने उभ्या केलेल्या दारूच्या बिअरच्या कंपन्या ब्रँड आजही तेजीत आहेत. त्याच्याकडून सरकारला महसूल मिळत आहेच. असे किती तरी फसलेले लोक असतात. त्यांना बाहेर पळून जाण्यास भाग पाडण्यापेक्षा त्यांच्याशी संवाद साधून सेटलमेंट करणे आवश्यक असते.


आज सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स यांच्याकडून मोठ्या प्रमाणात आॅडीट होते, धाडी टाकल्या जातात. त्यात काही सापडल्यावर दंडात्मक कारवाई करून अशा लोकांना धडा शिकवता येईल व महसुलातही वाढ होईल; पण आज ही कारावासाची जी संस्कृती उभी होताना दिसत आहे ते चित्र कुठे तरी बदलण्याची गरज आहे. कालपर्यंत जे सज्जन, हिरो, आदर्श होते त्यांची प्रतिमा एकाएकी खराब होणे हे चांगले नाही. आपल्याकडे पूर्वीच्या काळात अनेक पापी लोक, राक्षस असायचे त्यांनी एखादे सत्कर्म केले असेल, तरी परमेश्वर त्यांच्यावर कृपा करायचा अशा कथा आपण ऐकल्या आहेत. मग या लोकांच्या चांगल्या कामाकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: