रविवार, २८ फेब्रुवारी, २०२१

बंगालकडे लक्ष

निवडणूक आयोगाने शुक्रवारी पाच राज्यांतील निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या. यात सर्वात लक्षवेधी निवडणूक असणार आहे ती पश्चिम बंगालची निवडणूक. ८ टप्प्यांत घेतल्या जाणाºया या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे सत्ता हस्तगत करण्याचे स्वप्न साकार होणार का, हा उत्सुकतेचा विषय आहे. काँग्रेस आणि भाजप हे दोन मोठे पक्ष आहेत. या दोन पक्षांना पश्चिम बंगालमध्ये शिरकावर करता आलेला नाही. २४ वर्ष डाव्यांची सत्ता उलथवून तृणमूल काँग्रेसने २०१२ला सत्ता हस्तगत केली. काँग्रेसची मदत घेतली; पण काँग्रेसला शिरकाव करू दिला नाही. अशा परिस्थितीत भाजप गेल्या सहा महिन्यांपासून तिथे ज्या आक्रमकपणे पावले टाकत आहे ते पाहता भाजपला जास्त जागा मिळतील यात शंकाच नाही. शिरकाव चांगल्या प्रकारे तिथे भाजप करणार हे नक्कीच. ममता बॅनर्जींच्या तृणमूलचे अनेक आमदार भाजपकडे वळलेले आहेत. म्हणूनच या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अन्य राज्यातील निवडणुकांचे तेवढे आकर्षण नाही; पण प. बंगालकडे मात्र देशाचे लक्ष लागले आहे. पश्चिम बंगालमधील गुंडगिरी, दहशतीचे वातावरण, नक्षलवादी वातावरण पाहता ८ टप्प्यांत या निवडणुका घेतल्या जात आहेत हे योग्यच आहे. त्यामुळे निवडणुकीतील गैरप्रकार कमी होतील, पोलीस बळ योग्य ठिकाणी वळवणे सोपे जाईल; पण भाजपला रोखण्यासाठी तिथे सर्व विरोधी पक्ष एक होऊन आघाडी तयार करतात का, हाही उत्सुकतेचा भाग असेल.


पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजपविरोधात तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष आणि काँग्रेस एकत्र येऊ शकतात का, हे पहावे लागेल. अर्थात ज्या डाव्यांना ममता बॅनर्जींनी बाजूला केले, त्यांच्याशी त्या हातमिळवणी करणार का हा प्रश्न आहेच. अर्थात ममता बॅनर्जी या संधीसाधू आहेत. त्या वेळ येईल त्याप्रमाणे संधी साधत असतात. एनडीएमध्ये वाजपेयी सरकारमध्ये त्या रेल्वेमंत्री होत्या. नंतर पुन्हा यूपीएमध्ये गेल्या. मागच्या निवडणुकीत डाव्यांना हरवण्यासाठी काँग्रेसची मदत घेतली. त्यामुळे आता भाजपला रोखण्यासाठी डावे आणि काँग्रेस दोघांनाही त्या बरोबर घेतील यात शंका नाही. भाजपचा विजयरथ थांबवण्यासाठी या तिनही पक्षांची एकजूट होऊ शकते. भाकप (माले)चे महासचिव दीपंकर भट्टाचार्य यांच्या सूचनेवर गांभीर्याने लक्ष दिलं, तर पश्चिम बंगालमध्ये वेगळं चित्र दिसू शकतं; मात्र पश्चिम बंगालमधील डाव्या पक्षाच्या नेत्यांची वागणूक पाहिली, तर डाव्या नेत्यांनी बंगालमध्ये सर्वपक्षीय एकजूट विरोधी भाजप अशा चित्रावर केव्हाच पाणी सोडल्याचं पाहायला मिळत आहे. भाजप विरोधी आघाडी हा फॉर्म्युला यशस्वी होताना दिसतो आहे. महाराष्ट्रात निवडणुकीनंतर तो फॉर्म्युला यशस्वी केला गेला. बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर पश्चिम बंगालमध्ये आगामी काळात होणाºया निवडणुका लक्षात घेता, दीपंकर भट्टाचार्य यांच्या विधानाने बंगालच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. डाव्या पक्षांनी पश्चिम बंगाल आणि आसाममध्ये भाजपला नंबर एकचा शत्रू मानून निवडणुकीची रणनीती आखली पाहिजे. यासाठी गरज पडल्यास तृणमूल काँग्रेससोबत हातमिळवणी शक्य आहे, असे भाष्य दीपंकर भट्टाचार्य यांनी केले होते. आता ते शक्य होईल का हे पहावे लागेल. अर्थात त्यावेळी दीपंकर भट्टाचार्य यांच्या सूचनेला डाव्या पक्षांनी स्पष्ट नकार दिला आहे, तर दुसरीकडे तृणमूल काँग्रेसने या प्रस्तावाचं स्वागत केलं आहे. याचा अर्थ ममता बॅनर्जींनी भाजपचा धसका घेतलेला आहे. भाजप विरोधी मतांचे विभाजन होऊ नये, यासाठी त्या या प्रस्तावाचे स्वागत करणे स्वाभाविक आहे; पण हे प्रत्यक्षात येणार का, हे येत्या काही दिवसांत दिसून येणार आहे; मात्र भाजपने प. बंगालमध्ये हवा निर्माण केलेली आहे. ती नुसती हवाच राहते का त्याची लाट निर्माण होते, हे २ मेच्या निकालादिवशीच कळेल. पण भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) नेते दीपंकर भट्टाचार्य यांच्या नेतृत्वाखाली बिहारमध्ये डाव्या पक्षांनी १९ पैकी १२ जागांवर विजय मिळवला. बिहारमध्ये डाव्या पक्षांना यश मिळालं असलं, तरी पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांचे नेते निवडणुकीचं हे नवं मॉडेल मानण्यासाठी अजिबात तयार नाहीत. डाव्या पक्षांचे अध्यक्ष विमान बसू सांगतात, बंगालचं एक वेगळं मॉडेल आहे. या राज्यात बिहार मॉडेलचा वापर करण्याची गरज नाही. त्यामुळे काँग्रेसला कोणाचाच आधार नसल्याने ती तृणमूल बरोबर जाईल आणि मिळेल ते पदरात पाडून घेईल; पण डाव्यांबरोबर तृणमूलच्या वाटाघाटी तशा अवघड आहेत. म्हणूनच येत्या काही दिवसांत जोरदार उलथापालथ बघायला मिळेल हे नक्की.

पश्चिम बंगालमध्ये भाजप फार मोठा जुगार खेळेल, असे दिसत आहे. गेल्या सहा महिन्यांत त्यांनी ज्या प्रकारे शक्तिप्रदर्शन केले आहे त्यावरून त्यांची प्रचाराची पहिली फेरी पूर्ण झालेली आहेच. भाजपने बंगालमध्ये २०० जागांचे लक्ष ठेवलेले आहे. त्यासाठी लाट निर्माण करण्याचे त्यांचे प्रयत्न जोरदार आहेत. नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात पश्चिम बंगालवर भरपूर उधळण केल्याची टीकाही विरोधकांनी केली होती. त्यामुळे प. बंगालमध्ये मतदार सजगपणे मतदान करून भाजपच्या बाजूला जाणार की, पारंपरिक दंडेलशाहीने नक्षलवादी ताकदीवर मतदारांवर दबाव टाकून काही गैरप्रकार होणार का, हे पहावे लागेल. प. बंगालबरोबरच तामिळनाडू आणि केरळमध्येही निवडणुका आहेत. भाजपने तिथे सध्या तरी कंबर कसलेली नाही. दक्षिणेत शिरकाव करणे सोपे नाही. त्यामुळे तिथे घुसण्यासाठी भाजपला अजून काही वर्ष वाट पहावी लागेल; पण म्हणूनच बंगालकडे लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे.

देऊळबंद

काशीबाई नावाच्या एक आजी होत्या. पती निधनानंतर मुलाला मोठे केले होते. सगळं व्यवस्थित लागी लावलं होतं. मुलाचे लग्न झाल्यावर संसारातून निवृत्ती घेणे स्वाभाविक होते. सुनबाई घरी आल्या तशा त्यांनी काही दिवसांतच आपली वाट अध्यात्माकडे वळवली. आता माणसं अध्यात्माकडे नेमकी कशी वळतात, तर सगळं करून झाल्यावर वळतात, तसेच सगळे सर्वांचे लागी लागल्यावर त्या देव देव करू लागल्या.


अर्थात त्यांनी अवडंबर माजवलं नव्हतं काही; पण दिवस दिवस देवळात जाऊन बसायच्या. तिथेच डोळे मिटून जप करायच्या. सतत त्यांच्या नामस्मरणाने येणारे जाणारेही कौतुकाने बघत. एखादी साध्वी असावी, अशी ख्याती काही दिवसांतच काशीबार्इंची झाली. मंदिरात नियमित येणारे लोक असतात. त्यांची तोंड ओळख, हळूहळू विचारपूस सुरू झाली. त्या मंदिराच्या वातावरणातच त्या रमून जात. एक छान देवभक्त आजी देवळात बसतात याचे कौतुक आणि आकर्षण सगळ्यांना वाटायचे. कित्येक जण देवाला नमस्कार केल्यावर काशीबार्इंनाही नमस्कार करायचे. त्यावेळी मला कशाला नमस्कार, देवाला करा असे त्या सांगायच्या; पण पुढे पुढे त्यांना सवय झाली आणि कुणीही नमस्कार केला, तरी काही न बोलता आशीर्वादाचा हात वर करायच्या. गणपतीचे देऊळ हेच त्यांचे विश्व झाले होते. खूप उशीर झाल्यावरच त्या घरी जात असत. घरी गेल्यावर सुनेने वाढून ठेवलेले असेल ते जेवायचे आणि बाहेर झोपायचे. मुंबईतील चाळीतील घर. छोट्याशा दोन खोल्या होत्या. त्यात सगळा वर्षानुवर्षाचा पसारा, भांडी कुंडी, फ्रीज, टीव्ही, कॉट, कपाट, पुस्तकं खचाखच भरलेली. त्यामुळे छोट्या जागेत हा मुलगा सूनेचा संसार चाललेला होता. त्यामुळे आजीबार्इंना बाहेरच झोपायला लागत होते. रात्री ठिक होते; पण दिवसाचे काय? दिवसा ऊन यायचे वºहांड्यात.

आपलाच उभा केलेला संसार, सुनेच्या हातात दिला खरा; पण आपल्याच घरात आपण परके झाल्यासारखे वाटायला लागले काशीबार्इंना. मुलगा सुनेला एकांत मिळावा, यासाठी आपणच जास्त वेळ बाहेर रहायचे, असा निर्धार करून त्या देवळात जाऊ लागल्या. देवळात जाणारा प्रत्येक माणूस भक्तच असतो असे नाही. तर देऊळ ही अनेकांची अशीही सोय असते. घरात अडगळ नको म्हणून देवाला जाणारेही खूप असतात. म्हणजे देवळात किंवा मंदिरात येणारे भक्त असतात. नवस बोलणारे, गाºहाणे घालणारे असतात. आपली प्रार्थना करणारे असतात. देवाने आपली मागणी पूर्ण केली, म्हणून देवाचा नवस फेडणारे असतात. पण ते येतात जातात, दर्शन घेतात, हार फुले प्रसाद अभिषेक आदी कर्मकांड करतात आणि निघून जातात; पण काही असेही असतात की, ते नामस्मरण, देवाच्या दारात बसण्याच्या निमित्ताने केवळ वेळ काढण्यासाठी आलेले असतात. चांगल्या घरचे असतात, परिस्थिती बरी असते; पण घरात अडचण होते म्हणून जास्तीत जास्त काळ मंदिरात बसणारेही असतात. त्यापैकीच एक काशीबाई होत्या.


पण गेल्यावर्षी मार्च महिन्यात मंदिरे बंद करण्याची घोषणा झाली. काशीबाई अक्षरश: वेड्यापिशा झाल्या. मी देवाचे नामस्मरण करते, मी देवळात बसते; पण ती केवळ सोय म्हणून बसते. घरात अडचण होते, मुलगा सुनेला एकांत मिळावा त्यांना संकोच नको म्हणून मंदिरात येऊन बसते. माझ्या अध्यात्माचा अर्थ मुलगा सुनेच्या अध्यात मध्यात नको यायला हाच होता; पण आता करायचे काय? छोट्याशा चाळीतल्या घरात, खचाखच भरलेल्या सामानात मुलगा सून असताना आपण कुठल्या कोपºयात बसायचे याचीच चिंता त्यांना लागली होती. कोरोनाच्या संकटाने आता बाहेर वºहांड्यातही झोपणे शक्य नव्हते. सुरुवातीचे दिवस तर फारच कडक बंदोबस्त होता. जरा बाहेर पडलं की, पोलीस काठी आपटत होते. सगळं बंद होतं. अशात घरातच कोंडून घेण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यात मुलगाही घरात आणि सूनही घरात. आपली अडगळ होणार या कल्पनेनेच काशीबार्इंना चक्कर आली. कोसळून पडल्या खाली.

मुलाने तातडीने डॉक्टरांना फोन केला. आईला चक्कर आली आहे; पण डॉक्टरांनी सध्या कोरोनाचे पेशंट खूप आहेत. कोरोना टेस्ट केल्याशिवाय कोणताही पेशंट घेणार नाही, असे सांगितले आणि नकार दिला. थोड्या वेळाने शुद्धीवर आलेल्या काशीबाई सांगत होत्या, मला काही होणार नाही. मी ठिक आहे. नको डॉक्टरकडे जायला; पण म्हातारीला तसे सोडून चालणार नव्हते आणि दोघांची अडचणही झाली असती. काहीतरी मार्ग काढलाच पाहिजे. शेवटी सरकारी दवाखान्यात म्हातारीला नेले. तिच्या इच्छेशिवाय नेले. तिथल्या डॉक्टरांनी सांगितले की, कोरोनाच्या सगळ्या टेस्ट करणार. तोपर्यंत अलगीकरण कक्षात रहावे लागेल. घरच्यांना भेटायला मिळणार नाही. १४ दिवसांनी चौकशी करा. मुलगा खूशच झाला. तसं आईच्या जवळचं नात्याचं कोणीही नसल्यामुळे ती कधीच बाहेर गावीही जात नव्हती. आता आयतीच तिला ही कोरोनाच्या निमित्ताने माहेरपणाची संधी मिळाली आहे. म्हातारीला हॉस्पिटलला पाठवलं आणि मुलगा, सून घरी आले.


काशीबाई डॉक्टरांना एकेदिवशी म्हणाल्या, तुम्ही देताय ते मी खातेय, देताय ते पितेय, पालथं झोपा म्हणता म्हणून झोपते आहे. वाफारा घेते आहे. सगळं ठिक आहे; पण मला काहीच झालेले नाही. देऊळबंद झाल्यामुळे माझी बसण्याची अडचण झाली, म्हणून मी इथे आली आहे; पण तुम्ही काळजी करू नका. याचा तुम्हाला फायदाच होईल. तुमच्या परिश्रमाने एक रुग्ण बरा झाला याचे श्रेय तुम्हाला मिळेल. डॉक्टरही हसले आणि त्यांनी १४ दिवस ठेऊन घेतले; पण लॉकडाऊन उठण्याचे कसलेही चिन्ह दिसेना. मंदिर उघडल्याची बातमी येईना. आता करायचे काय? शेवटी म्हातारीने निर्णय घेतला. डॉक्टर तुम्हाला लागेल ती मदत मी करते, रुग्णांची सेवा करते, इथली साफसफाई करते; पण मला घरी पाठवू नका. अजून थोडे दिवस इथं राहू द्या. म्हातारीचं म्हणणं डॉक्टरांनी ऐकलं. त्या काळात म्हातारीच्या लक्षात आले की, आपल्यासारखे अनेक जण इथे आहेत. क्वारंटाईन होणे, विलगीकरण कक्षात राहणे हे बहाणे आहेत; पण त्यांना घरात स्थान नाही असेच इथे बहुतेक आहेत. ज्यांना खरोखरच लागण झाली आहे किंवा पॉझिटीव्ह आहेत ते होम क्वारंटाइन होऊन उपचार घेत आहेत. हे लक्षात आल्यावर काशीबार्इंनी मनापासून आता देवाची प्रार्थना केली, देवा आता आमच्यासारख्यांसाठी तरी तुझी मंदिरं उघडू देत.


शनिवार, २७ फेब्रुवारी, २०२१

वाघिणीचा संताप

पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणावरून भाजप प्रचंड आक्रमक झाली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी गुरुवारी पुण्यात घटनास्थळी भेट दिली. पूजा चव्हाण ज्या इमारतीत राहत होती, जिथे तिने आत्महत्या केली त्या इमारतीची चित्रा वाघ यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी पूजा चव्हाण राहत होती ती रूम सील करण्यात आली असल्याचं सांगितलं. यामुळे त्यांनी इमारतीमधील दुसºया घरात जाऊन गॅलरीची उंची तसंच इतर गोष्टींची पाहणी केली. यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत जो आक्रमकपणे संताप व्यक्त केला तो अत्यंत सुन्न करणारा होता. एखादी वाघीण खवळलेली असेल तर ती जशी डरकाळ्या फोडून समोरच्याला घायाळ करते तितका संताप चित्राताई वाघ यांच्या बोलण्यात होता. त्यांचे नावही योगायोगाने वाघ आहे. त्यामुळे वाघाच्या थाटात त्या माध्यमांपुढे अक्षरश: डरकाळ्या फोडत होत्या. त्यामुळे यावर आता महाविकास आघाडी सरकार काही पावले उचलणार का, हा महत्त्वाचा प्रश्न आहे.


बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत वनमंत्री संजय राठोड उपस्थित होते. आदल्या दिवशीच त्यांनी नियमभंग करून शक्तीप्रदर्शन केले होते. सर्व महिला संघटना, विरोधक भाजप नेत्या चित्रा वाघ या संजय राठोड यांच्या विरोधात आग ओकत होत्या. अगदी चपलेने बडवला पाहिजे इतपत त्यांनी भाषा वापरली होती. असे असतानाही मंत्रिमंडळ बैठकीत याकडे कोणी ढुंकूनही पाहिले नाही. संजय राठोड प्रकरणावरून आघाडीतील घटक पक्षांनीही नाराजी व्यक्त केलेली होती. तरीही त्यावर कसलीही चर्चा झाली नाही आणि मंत्रिमंडळ बैठकीत संजय राठोड यांना सन्मानाने वागणूक दिली गेली. त्यामुळे विरोधक संतापले. त्यांचा सगळा संताप गुरुवारी चित्राताई वाघ यांच्या तोंडून व्यक्त होत होता.

गुरुवारी चित्रा वाघ वानवडी पोलीस ठाण्यात पोहोचल्या होत्या, मात्र यावेळी त्यांचा संताप झाला आणि त्यांनी थेट पोलिसांसमोरच तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, लाज वाटली पाहिजे अशा शब्दांत टीका केली. महाराष्ट्राच्या जनतेच्या डोळ्यात हे धूळ फेकत आहेत. लेखी परवानगी नाही असं सांगत आहे. जी दोन मुलं प्रत्यक्षदर्शी होती त्यांना तर सोडून दिलं. हे प्रशासन हातावर हात ठेवून बसले आहे. लाज वाटली पाहिजे यांना, अशा शब्दांत चित्रा वाघ यांनी पोलीस स्थानकाबाहेर संताप व्यक्त केला. या संतापाकडे सरकार केवळ गंमत म्हणून पाहणार की संजय राठोड यांच्यावर कारवाई करणार? संजय राठोड यांना पाठीशी घालणे सरकारला अडचणीचे ठरू शकते. या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि दोषींवर कारवाई केली गेली पाहिजे. संशयाची सुई राठोड यांच्याकडे वळत असताना त्यांना मंत्रिमंडळातून वगळून जोपर्यंत निर्दोष सिद्ध होत नाही तोपर्यंत मंत्रिपदाचा कारभार काढून घेण्याची कृती खरे तर सरकारने करणे अपेक्षित होते. भारतीय जनता पक्ष शिवसेनेचे सरकार असताना मागच्या पाच वर्षांत भोसरी प्रकरणावरून एकनाथ खडसे यांच्याकडे संशयाची सुई वळली तेव्हा खडसेंचा ताबडतोब राजीनामा घेतला होता. मंत्रिपदावर बसलेली व्यक्ती कधीही संशयाच्या भोवºयात अडकलेली असता कामा नये. त्यातून संजय राठोड हे १५ दिवस बेपत्ता राहिल्याने सर्वत्र संताप निर्माण झाला होता. हा सर्व संताप चित्राताई वाघ यांच्या तोंडून बाहेर पडल्याचे दिसले. त्यांनी जर एवढे धडधडीत पुरावे दिले आहेत, आरोप केले आहेत, तर गृह खाते त्यांची दखल का घेत नाही? शिकारीत जखमी झालेली वाघीण अत्यंत धोकादायक असते. ती कशी शिकाºयाला संपवेल हे सांगता येत नाही. आज चित्राताई वाघ यांना धमक्या येत आहेत, संतापलेल्या आहेत. अशा परिस्थितीत नेमकी काय परिस्थिती आहे यामध्ये सरकारने लक्ष घालणे गरजेचे आहे. नाहीतर ते सरकारच्या अंगलट येऊ शकते.


संजय राठोड प्रकरणावरून महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसनेही नाराजी व्यक्त केलेली आहे. त्यातच त्यांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या शक्तीप्रदर्शनावर सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत कसलीच प्रतिक्रिया न देणे हे सरकारपेक्षा शिवसेनेच्या अंगलट येऊ शकते. हजारोंचा समुदाय या शक्तीप्रदर्शनाला जमला. त्यांच्यावर गुन्हे दाखल करताना संजय राठोड यांना वगळण्यात आले. ही गर्दी जमण्यासाठी जे कारणीभूत होते त्यांच्याकडे दुर्लक्ष केले गेले. त्यामुळे शिवसेनेचे नेते, मंत्रीच शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाहीत, असाही संदेश सगळीकडे गेलेला आहे. कोणतेही धार्मिक कार्यक्रम, गर्दी जमवणारे सामाजिक कार्यक्रम, आंदोलने करू नयेत. गर्दीची कारणे टाळावीत, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केल्यावर २४ तासांत लगेचच १५ दिवस गायब असलेले संजय राठोड शक्तीप्रदर्शन करतात ही कोणालाही न आवडणारी गोष्ट आहे. त्यांच्या या कृतीकडे सरकार गप्प बसून बघ्याची भूमिका घेते. याचा सगळा संताप चित्राताई वाघ यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला. आता राठोड यांच्या विरोधात रान पेटवणे हाच कार्यक्रम त्यांनी हाती घेतलेला स्पष्ट दिसत आहे, पण यामध्ये शिवसेनेची आणि सरकारची नाचक्की होत आहे. कर नाही त्याला डर कशाला? आरोप झाले आहेत, ते खोटे असतील, तर घाबरायचे कारण नाही. असे असताना चौकशीला सामोरे जाणे, तक्रार नोंदवून न घेणे, कसलीही कारवाई न करणे हे चुकीचे आहे. ज्या छत्रपतींचे नाव घेऊन आपला पक्ष आहे, त्यांच्या विचारांचा हा अपमान असल्याने चित्रा वाघ यांचा संताप अनावर झाला. या संतापाची दखल घेणे गरजेचे आहे.

....

दादा कोंडके


दादा कोंडके हे मराठी चित्रपटसृष्टीला आणि महाराष्ट्राला पडलेले एक सुंदर स्वप्न होते. स्वप्न अशासाठी की, त्यांनी फार काळाच्या पुढचे विषय मांडले होते. अत्यंत मिश्कीलपणे आणि व्यंगात्मक पद्धतीने त्यांनी आपल्या चित्रपटांतून फटकारे मारलेले होते. दादा कोंडके हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दैवत मानणारे कलाकार होते. त्यामुळे त्यांनी शेवटपर्यंत शिवसैनिक म्हणून काम केले, पण चित्रपटातूनही राजकीय फटकारे मारणे सोडले नव्हते. त्यांच्या सगळ्याच चित्रपटातून तत्कालीन परिस्थितीवर भाष्य केले जात होते.

‘राम राम गंगाराम’, ‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’, ‘आली अंगावर’ या चित्रपटांमधून तर त्यांनी काँग्रेसवर तुफान फटकेबाजी केलेली होती. कारण शिवसेनेचा नंबर एकचा विरोधक काँग्रेस होता. दादा कोंडके यांचे विनोदाचे टायमिंग चांगले होते. ‘विच्छा माझी पुरी करा’ या वगनाट्यातून काम केल्याने त्यांची राजकीय निरीक्षण शक्ती आणि तुफान असे ऐनवेळचे फटकारे मारणे सर्वांनी पाहिले होते. हेच दादा आपल्याला मराठी चित्रपटातून दिसले पाहिजेत, ही प्रेक्षकांची अपेक्षा त्यांनी आपल्या चित्रपटातून पूर्ण केलेली होती.


‘बोट लावीन तिथं गुदगुल्या’मध्ये मेहुणीबाई म्हणून कराटे खेळणारी पद्मा चव्हाण गावात आलेली असते. या मेहुणीबाईचा तडाखा दादांना पण खावा लागतो. त्यामुळे दादांना मारहाण करणाºया बाईला गावातून बाहेर काढा असे सांगत काही महिला दादांची आये रत्नमालाकडे येतात. तेव्हाचा संवाद अतिशय मिश्कील आहे. रत्नमाला म्हणते, कुणाला हुसकावून लावायचं आहे? सगळ्या गावातल्या बायका म्हणतात, त्या मेहुणीबाईला. त्यावर रत्नमाला म्हणते, इतक्या साध्या कामाला मला बोलावता व्हंय? अगं दिल्ली हालवायची असेल, तिथली बाई हुसकावून लावायची असेल तर मला सांगा, गल्लीतल्या बाईला तुम्हीच बाहेर काढा.

हा डायलॉग आल्यावर चित्रपटगृह अक्षरश: दणाणून हासायचे. हा टोला अर्थातच इंदिरा गांधींना आहे हे प्रेक्षकांना सहज समजायचे. काँग्रेसवर टीका करण्याची संधी दादांनी सोडलीच नाही. ‘ज्याला आय नाय त्याला काय नाय’ असे म्हणून ज्याच्यावर आयची कृपा आहे तो राजकारणात मोठा होतो, हा टोला ते सहज पोहोचवायचे. कारण काँग्रेसच्या राजकारणात जनतेने निवडून देण्याच्या नेतृत्वाला काहीच किंमत नसायची. ज्याच्यावर इंदिरा गांधींची कृपा आहे त्यालाच संधी मिळायची नाही. त्यावेळी काँग्रेसचे नाव आय काँग्रेस म्हणून होते. त्यामुळे आयचे ऐकले तर सगळं काही मिळते. ज्याला आय नाय त्याला काय नाही असे म्हटल्यावर चित्रपटगृहात शिट्ट्या वाजायच्या.


‘आली अंगावर’ या चित्रपटात ‘आडला नारायण धरी गाढवाचं पाय हो...’ हे एक गीत आहे. या गीतात ‘पुरुषाच्या जागेवर बसली ती बाय हो...’ अशी एक ओळ आहे. ही ओळ चित्रीत करताना इंदिरा गांधींसारखी बॉबकटची हेअरस्टाइल असलेली बाई पाठमोरी खुर्चीत बसलेली दाखवली आहे आणि हातात छडी घेऊन तिच्या समोर डोक्यावर गांधी टोपी असलेल्या माणसाला उठाबश्या काढताना दाखवले आहे. इंदिरा गांधी यशवंतरावांना कशा उठाबश्या काढायला लावतात हे त्यातून दादांनी दाखवले होते. याचे कारण त्या काळात काँग्रेसमधून १९७७ च्या पराभवातून बाहेर पडलेले यशवंतराव चव्हाण पुन्हा स्वगृही परतण्यासाठी इंदिरा गांधींकडे आले होते. त्यांना खूप वेळ इंदिरा गांधींनी कुंपणावरच ठेवल्याचे त्यावेळी खूप गाजले होते. ही नस पकडून दादांनी ‘आडला नारायण धरी गाढवाचे पाय हो...’ या गाण्यात त्यावर कटाक्ष टाकला होता.

पोलिसांची घरे हा नेहमी चर्चेत राहणारा विषय. आघाडी सरकारच्या काळात गृहमंत्री असताना छगन भुजबळ यांनीही पोलिसांठी लवकरच १० हजार घरे बांधणार हे पाचगणीत जाहीर केले होते. त्यानंतर प्रत्येक गृहमंत्र्याने अशा घोषणा केल्या होत्या. अलीकडेच पाटणमध्ये गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनीही पोलिसांच्या घरांबाबत भाष्य केले होते, पण गेली ५० वर्षं हा प्रश्न रेंगाळलेलाच आहे. पांडू हवालदारमध्ये दादांनी पोलिसांची होणारी ससेहोलपट दाखवली होती. चित्रपटाच्या शेवटी दादांनी ‘पांडू हवालदार’ने चांगली कामगिरी केली म्हणून सरकार त्यांना बक्षीस देणार, असे मंत्री जाहीर करतात असा सीन आहे. यामध्ये पांडू हवालदार सांगतो की, मला काही नको पण इतक्या मोठ्या पोलीस कॉलनीत फक्त दोनच संडास आहेत. आम्हाला बक्षीस म्हणून चार-पाच संडास बांधून द्या, असे सांगतो. लोक खळखळून हसतात या डायलॉगला. पण त्यामागे जे पोलीस अहोरात्र आपले रक्षण करतात त्यांना किती अडचणींना सामोरे जावे लागते ही भीषणता त्यांनी मांडलेली होती.


‘राम राम गंगाराम’मध्ये काळा पैसा कसा बाथरूममध्ये, सीलिंगमध्ये लपवला जातो आणि तो कसा राजकीय नेत्यांपर्यंत जात असतो, यावर कटाक्ष टाकलेला होता. दादांनी आपल्या पंचवीस वर्षांच्या कारकिर्दीत मराठी चित्रपटसृष्टीला अनमोल असा ठेवा दिला. सर्व सुपरहिट चित्रपट देताना त्यांनी गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपल्या नावाची नोंद केली होती हे विशेष, पण त्यांचे चित्रपट हे काळाच्या पुढचे होते. दादा कोंडके हा विषय एका लेखात पूर्ण होणे शक्य नसल्याने, दादांच्या विविध दृष्टिकोन आणि बाजू आपण आगामी लेखात पाहणार आहोत.

शिरवाडकर - मराठीला लाभलेले एक लेणे

कुसुमाग्रज ऊर्फ विष्णू वामन शिरवाडकर हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार व समीक्षक होते. आज त्यांचा जन्मदिवस. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने लेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे लेखक मानले जातात. भाषाप्रभू शिरवाडकरांचा आजचा जन्मदिवस ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा केला जातो. सरस्वतीच्या मंदिरातील देदीप्यमान रत्न असे त्यांचे वर्णन करतात. वि. स. खांडेकर यांच्यानंतर मराठी साहित्यात ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे ते दुसरे साहित्यिक होते.


नाशिक येथे त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. बी.ए.ची पदवी मिळाल्यानंतर काही काळ त्यांनी चित्रपट व्यवसायात पटकथा लिहिणे, चित्रपटात छोट्या भूमिका करणे अशी कामे केली. यानंतर सोबत, स्वराज्य, प्रभात, नवयुग, धनुर्धारी, अशा विविध नियतकालिकांचे, वृत्तपत्रांचे संपादक म्हणून त्यांनी काम केले. १९३२ साली झालेल्या काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रहात त्यांचा सहभाग होता. १९३३ साली त्यांनी ध्रुव मंडळाची स्थापना केली. अनेक सामाजिक चळवळींत, सत्याग्रहांमध्ये सहभाग घेतला. पुढील काळातही त्यांनी नाशिक जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली.

पत्रकारितेच्या निमित्ताने मुंबईत आल्यावर शिरवाडकरांना मुंबई मराठी साहित्य संघाचे डॉ. अ. ना. भालेराव भेटले. मराठी रंगभूमीचा सुवर्णकाळ संपून ती मृतप्राय होऊ नये म्हणून झटणारे भालेराव यांनी कवी शिरवाडकरांना नाटके लिहिण्यास प्रवृत्त केले. केवळ कवी असलेले वि. वा. शिरवाडकर बघता बघता एक यशस्वी नाटककार झाले. वि. वा. शिरवाडकर यांच्या स्मरणार्थ नाशिक येथे कुसुमाग्रज प्रतिष्ठान नावाची संस्था उभारण्यात आली आहे.


सामाजिक अन्याय व विषमता या विषयांवर कुसुमाग्रजांनी त्यांच्या लिखाणातून कठोर टीका केली. साहित्यिकाने सामाजिक बांधिलकी मानली पाहिजे, या मताचा त्यांनी पुरस्कार केला. कवितांबरोबरच त्यांनी अनेक नाटकेही लिहिली. याशिवाय कादंबरी, कथा, लघुनिबंध इत्यादी साहित्यप्रकारही त्यांनी हाताळले. कुसुमाग्रजांचा साहित्यविचार पूर्णत: लौकिकतावादी आहे. एका समाजमनस्क कलावंतांच्या सामाजिक चिंतनाचा आलेख त्यात उमटला आहे. कलावादाचा अतिरेक आणि सामाजिकतेचा तिरस्कार अशा द्वंद्वात अडकलेल्या मराठी साहित्य व्यवहारात त्यांनी समन्वय साधला आहे. कलाक्षेत्रात त्या त्या वेळी निर्माण झालेल्या संभ्रमावस्थेतेचे पितामहाच्या भूमिकेतून केलेले ते मार्गदर्शन आहे.

कुसुमाग्रज हे अहंकार, अनुभव आणि अविर्भाव ही कलेची आधारभूत तत्त्वे मानायचे. त्यांचा हा विचार लेखकसापेक्ष आहे. अहंकार लेखकाच्या लेखन प्रक्रियेला प्रेरणा आणि गती देतो. हे तत्त्व लेखकसापेक्ष आहे. अविर्भाव आशयाचा आकार म्हणजे घाट ठरवितो, म्हणजे हे तत्त्व कलाकृतिसापेक्ष आहे. वर्चस्व हे तत्त्व रसिकसापेक्ष आहे, तर लेखकाच्या अनुभवाची समृद्धी लेखकाच्या सामिलकीवर अवलंबून असते, हे तत्त्व समाजसापेक्ष आहे.


कुसुमाग्रजांच्या साहित्यविचाराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य असे तो एकाच वेळी लेखकसापेक्ष आणि समाजसापेक्ष आहे. लेखकाच्या अनुभवाला, त्याच्या स्वातंत्र्याला आणि त्याच्या व्यक्तिमत्त्वाला कुसुमाग्रज महत्त्व देतात. कलेचे आधारभूत तत्त्व ते सौंदर्य, नीती, आत्मनिष्ठा इत्यादींना मानत नाही. त्यांच्या मते अहंकार, अनुभव आणि अविर्भाव ही साहित्याचीच नव्हे, कोणत्याही मानवनिर्मित कलेची आधारभूत तत्त्वे होत. समाजजीवनातील उपेक्षितांचे अनुभव साहित्यात यावे. त्यासाठी समाजजीवनातील व साहित्य व्यवहारातील पुरोहितशाही, जातियता नष्ट होणे गरजेचे आहे, असे कुसुमाग्रज मानायचे.

क्रांती ही साहित्याची प्रेरणा आहे, असे ते मानायचे. साहित्य परिवर्तनास पूरक ठरू शकते. त्यामुळे साहित्याला ते विशुद्ध कला मानत नसून सामाजिक साधन म्हणायचे. त्यांच्या मते, वाचकांपर्यंत पोचण्याची लेखकाची इच्छा लेखनाच्या एकूण प्रक्रियेतच समाविष्ट करायला पाहिजे. असाधारण अहंकारातून इतर अनेक व्यवहारांप्रमाणे माणसाला साहित्यनिर्मितीची प्रेरणा मिळते. जग ऐकत आहे हे माहीत असल्यानेच कवी मोठ्याने बोलतो. माणसाचे सारे अस्तिव म्हणजे भोवतालच्या जगाशी तो प्रस्थापित करत असलेल्या अनेकविध संबंधांची मालिका असते. अविर्भावाने साहित्याचे रूप ठरते, तर अनुभवाने त्याचा आशय निश्चित होतो. अनुभव या संज्ञेचा अर्थ प्रत्यक्षाशी येणारा संबंध असा नसून, लेखकाच्या मनात उद्भवणारी एक भावावस्थेतील जाणीव असा आहे. म्हणजे लौकिक अनुभवानंतरची लेखकाची भावावस्थाच कलाकृतीचा आशय निश्चित करते. अविर्भाव आणि अनुभव यांच्या संयोगाने साहित्याचे पोत तयार होत असले, तरी त्यातील धागेपणाचे स्थान अनुभवाकडे आहे.


कुसुमाग्रज हे नाटककार होते. त्यामुळे त्यांच्या नाट्यविचारातही लेखकसापेक्षता आहे. नाटकाच्या पात्रांमध्ये लेखकाचे मीपण, त्याच्या मीपणाचे एक सूत्र व्यक्त होत असते. नाटकात अनेक पात्रे असतात, पण ती पात्रे लेखकाच्या दृष्टीने अनेक मीच असतात. इतर वाङ्मयप्रकारापेक्षा लेखकाचे मीपण नाटकात अधिक असते. लेखकाला नाटक व्यक्तीत, माणसाच्या स्वभावधर्मात, त्याच्या संघर्षात सापडते, असे सांगून त्यांनी त्यासाठी स्वत:च्या नाटकांची उदाहरणे दिली आहेत. नाटक हे रम्य काव्य आहे, म्हणून इतर साहित्यप्रकाराप्रमाणेच चांगले नाटक हे वाङ्मयीन गुणांचा आविष्कार करणारे हवे. त्याला चांगली वाचनीयता हवी. नाटकाची वाचनीयता म्हणजे वाचकांच्या मानसिक रंगभूमीवर होणारा त्याचा प्रयोग होय. अशा विविध पैलू असलेल्या भाषाप्रभूच्या जन्मदिनाच्या निमित्ताने ‘मराठी भाषा दिन’ साजरा होतो ही आनंदाची बाब आहे.

चला जरा मराठी बनुया!


मराठी भाषा जागतिक पातळीवर पोहोचली असताना आणि त्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवण्याचे प्रयत्न चालले असताना आपल्यावर मराठी भाषा दिन साजरा करायची फार मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे हा दिवस आपण प्रत्येकाने केवळ मराठी बोलून नाही तर जगून साजरा केला पाहिजे. मराठी ही भाषा जगण्याची भाषा आहे, हे जगाला दाखवून देण्याची वेळ आता आलेली आहे म्हणून तरुणाईला सांगावेसे वाटते की चल जरा मराठी बनुया. आज केवळ बोलायचे आणि वाचायचेच मराठी नाही, तर आज व्यक्तही मराठीतच व्हायला हवे, तर मराठी जगण्याचा आनंद आम्हाला मिळेल. संगणकीय युगात संकेतस्थळ आणि ई-मेल हा अत्यावश्यक झालेला आहे, पण त्या मायक्रोसॉफ्टलाही या मराठीचे महत्त्व पटल्याने आता ई-मेल आयडीही मराठी भाषेतून बनवण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. अशावेळी या संगणकीय भाषेतील सगळ्या नामांना, शब्दांना मराठी शब्दकोषात उतरवण्याचे आव्हान स्वीकारले पाहिजे. याचे कारण कोणत्याही भाषेला अस्सल प्रतिशब्द हा फक्त मराठीतच मिळू शकतो. अगदी लग्नानंतरच्या प्रणयदिनांना इंग्रजी संस्कृतीत ‘हनिमून’ म्हणतात, तर त्याला तितकाच चपखल शब्द आमच्या मराठीत ‘मधुचंद्र’ असा आहे. म्हणूनच आज व्यक्त व्हायचेच तर चक्क मराठीत होऊया, चला जरा मराठी बनुया!

तसे ते फारसे अवघड नाहीच. आपण दिवसातून कितीतरी वेळा ‘सॉरी’ म्हणतो. एक दिवस ‘माफ करा’ म्हणून बघा. सॉरी म्हणताना तोंडातून हवा जाते आणि अंतर पडते, पण माफी मागताना ओठ एकमेकांना भिडतात आणि जवळीक लवकर साधली जाईल, ही आहे मराठीची कमाल. म्हणून आज आपण मराठीतच व्यक्त होऊया, चला जरा मराठी बनुया!


आज फोन कोणाचेच रिसिव्ह करू नका. आज फक्त भ्रमणध्वनी किंवा दूरध्वनीवर संभाषण करा. हॅलोला रामराम करा आणि नमस्काराने सुरुवात करा. बघा किती नम्रपणे कामे होतील आपली. कारण आज दिवस आहे ‘मराठी भाषा दिन’. हा दिवस एक दिवस साजरा करण्याचा नाही, तर एक मराठी बनण्याचा संकल्प करण्याचा आहे, म्हणून चला मराठीतून व्यक्त होऊया, जरा मराठी बनून पाहुया!

आपले काम करून घेण्यासाठी प्लीज नका म्हणू प्लीज. कारण आहेना आज मराठी भाषा दिन, मग करूना जरा आपण कृपा मराठी बोलण्याची, मराठी वागण्याची, मराठी बनण्याची. प्लीजला कृपा करून बाजूला सारू आणि कृपया अशी विनंती करू, म्हणजे पहा कशी आपल्यावर काम करणाºयाची छान कृपा होते ते. म्हणून म्हणतो, चला जरा मराठीतून व्यक्त होऊया, थोडे मराठी बनुयात!


काही नवल समोर आले तर व्यक्त होण्यासाठी ओह माय गॉड नको...आज आपण नवल व्यक्त करण्यासाठी आपल्या मराठी भाषेचे शब्द वापरून पाहू. हे देवा, असे शब्द नाहीत का मराठीत? आज व्यक्त होताना मुलींनीही पुन्हा मराठमोळ्या इश्श्य, अगोबाई, अय्याचा वापर करून पहा म्हणजे चेहºयावर कसे नकळत नैसर्गिक सौंदर्य खुलेल आणि समोरच्याला भुरळ पाडेल. कारण शब्दांची ताकद आणि भावनांचा भडिमार करायला आमची मराठी समृद्ध आहे हे कळुद्याना जगाला, म्हणून म्हणतो चला जरा बनुया मराठी.

आज तुम्हाला भांडायचे आहे का कोणाशी? खुश्शाल भांडा, पण त्यासाठी इंग्रजी भाषेतील शिव्यांचा वापर बिल्कूल करू नका. कारण मराठी इतक्या इरसाल आणि अचूक शिव्या तुम्हाला इंग्रजीत देता येणार नाहीत. मराठी शिव्यांची सर अन्य कोणत्याही भाषेतल्या शिव्यांमध्ये नाही. म्हणून आज व्यक्त होताना व्हा मराठीतच, कारण मराठीसारखी ताकदवान भाषा दुसरी नाही. मराठी भाषेसाठी आम्ही मराठी जगायला शिकले पाहिजे, तरच हा दिवस खºया अर्थाने साजरा होईल. मराठी भाषा दिवस हा जगभरातील मराठी भाषिकांकडून दरवर्षी २७ फेब्रुवारीला पाळला जातो. मराठीतील श्रेष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून पाळण्याची प्रथा सुरू झाली. जागतिक मराठी अकादमीने या कामी पुढाकार घेतला. आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, ही समस्त मराठीजनांची मागणी आहे. ‘इये मºहाटिचीया नगरी ब्रह्म विद्येचा सुकाळू करी’, अशा शब्दांतून श्री ज्ञानदेवांनी मराठीचा उल्लेख केला आहे. संत ज्ञानेश्वरांनी मराठीचे वर्णन करताना अनेक उपमा आणि अलंकार वापरून तिचे कौतुक केले आहे. त्यांनी या भाषेला ब्रह्मविद्या म्हंटले आहे, तर कधी शब्दब्रह्मही म्हंटले आहे. जिथे सर्व काही येते ते ब्रह्म. ज्यातून सर्व काही निर्माण होते ते ब्रह्म. अशा शब्दब्रह्मात संपन्न असलेली ही भाषा असल्यामुळे ज्ञानेश्वरांच्या या उपमांची यथार्थता आज आपल्याला मराठी भाषा गौरव दिनी प्रकर्षाने आणि मनोमन पटते. याच ज्ञानेश्वरांनी माझ्या मराठीचा बोल कौतुके म्हणताना तिची थोरवी, अमृतातेही पैजासी जिंकणारी असे म्हटले आहे. हा दिन नाशिकच्या कवी कुसुमाग्रजांचा वाढदिवस आहे, पण कुसुमाग्रजांचे वर्णन नाशिकचे म्हणून नाही, तर संपूर्ण महाराष्टÑाचे, भारताचे आणि जिथपर्यंत मराठी आहे तिथपर्यंत अथांग असे आहे. म्हणूनच आकाशात असलेल्या एका ताºयाचे नावही कुसुमाग्रज आहे. त्या ताºयाप्रमाणे या विशाल प्रतिभेच्या व्यक्तीचे कार्य देदीप्यमान आहे, अढळ आहे. यासाठीच त्यांचा हा जन्म दिन ‘मराठी भाषा दिन’ पाळला जातो. ‘लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी। जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी। धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी। एवढ्या जगात माय मानतो मराठी। ’ असे कविवर्य गझलकार सुरेश भटांनी म्हणून या मराठीची थोरवी वर्णन केली आहे. आपल्या या मराठीची थोरवी अनेकांनी गाताना मुक्तहस्ते शब्दांचे केलेले लालित्य मनाला मोहवून टाकणारे असेच आहे. मराठी असे आमुची मायबोली... म्हणजे मराठी भाषा ही आपल्यासाठी फक्त एक भाषा नसून ममतेचे, वात्सल्याचे बोल आहेत. जसे आईचे बोल लेकरांसाठी हळुवार, प्रेमळ असतात आणि प्रसंगी जी आई मुलांच्या भवितव्यासाठी कठोर शब्दही बोलू शकते, तशीच ही मायमराठी आपली मराठी आहे. हळुवार, गोड, लाघवी, प्रेमळ शब्दांनी सजणारी आणि प्रसंगी वज्राहूनी कठीण शब्दाने वार करणारी जिथे फक्त शब्दच सगळे काम करतात, कुठल्याही शस्त्राची गरज मराठी शब्दांना लागत नाही. अशी ही माझी मायबोली माझी मराठी, कारण या मराठी भाषेच्या शब्दांना सत्याची धार आहे. मराठी साहित्यातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व, ज्ञानपिठ पुरस्कार विजेते साहित्यिक कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून मराठी राजभाषा दिवस साजरा केला जातो. या निमित्ताने आज आपण मराठी भाषा दिनाच्या विविध कार्यक्रमांत सहभागी झाले पाहिजे. मराठीचा पुरस्कार केला पाहिजे. मराठी भाषेतच बोलण्याचा प्रयत्न आपल्या अन्य भाषिक बांधवांना करायला भाग पाडले पाहिजे. त्यात कसलाही संकोच वाटायचे कारण नाही. ापणच आपल्या मुलाबाळांना हा मराठीचा समृद्ध वारसा दाखवायला हवा आणि यानिमित्ताने मराठी वापराचा व अभ्यासाचा वसा आपण घेऊन मराठीला समृद्ध केले पाहिजे. 

रोगापेक्षा इलाजाने माणसे मरतील

रविवारी जनतेशी संवाद साधताना मुख्यमंत्र्यांनी ८ दिवसांचा अल्टिमेटम दिलेला होता. लोकांनी नियमांचे पालन करावे, असे आवाहन केले होते. कठोर कारवाई आणि दंडाची भीतीही दाखवली होती, तरीही अजूनही अनेक लोक जागृत नाहीत. दोन दिवसांत कोरोनाचे रुग्ण वाढलेच आहेत. त्यात मंत्रालयातच ३५ रुग्ण वाढले आणि मुंबईतील रुग्ण वाढ ही अचानक ३६ टक्के झालेली आहे. हा प्रवाह असाच सुरू राहिला, तर पुन्हा लॉकडाऊन अटळ आहे; पण तो कोणालाच परवडणारा नाही. रोगापेक्षा इलाजाने माणसे मरतील, अशी अवस्था पुन्हा लॉकडाऊन लागला तर होईल.


राज्यात पुन्हा करोनाचे प्रमाण वाढले आहे. वेगाने रुग्णसंख्या वाढत आहे. पुन्हा लॉकडाऊन करणार का, हा प्रश्‍न वेगाने व्हायरल झाला आहे. रुग्णसंख्या वाढीच्या कैकपटीने प्रश्‍नाचा वेग जास्त आहे. ते स्वाभाविक आहे. गेल्या काही दिवसांतील स्थिती आणि मंत्र्यांनी केलेली विधाने पाहता लोक चिंतेत आहेत. त्यावर आता खुद्द मुख्यमंत्र्यांनीही दम भरला आहे. निर्बंध काटेकोरपणे पाळा. नागरिकांच्या प्रतिसादाचा अभ्यास केला जाईल. त्यानंतर पुढचा निर्णय घेतला जाईल, म्हणजे लॉकडाऊनबाबत ठरवले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. हे संकट कसे टाळायचे हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे. पुन्हा १५ दिवसांचा लॉकडाऊन घेतला, तरी माणसे उध्वस्त होतील. त्यामुळे ज्या कारणांनी लोक मास्क घालणे टाळतात, त्या कारणांवर नियंत्रण ठेवले पाहिजे. सर्वात प्रथम तंबाखू, गुटखा, पान खाणे यावर बंदी घातली पाहिजे. जेणेकरून थुंकून हे लोक घाण करतात व रोगराई पसरते. त्यासाठी मास्क काढतात. त्यामुळे सगळ्या पानपट्ट्या बंद करून टाका. तंबाखू खाणे, जवळ बाळगणे हा गंभीर गुन्हा समजला जावा आणि ज्याच्याकडे तंबाखू, गुटखा याची पुडी सापडेल त्याला भरपूर दंड करा, कारावासाच्या शिक्षेची तरतूद करा. याशिवाय रस्त्यावर थुंकणारे, मास्क न घालणाºया लोकांना सामान्य लोकांनी विरोध करण्यासाठी प्रोत्साहन मिळाले पाहिजे. एखादा थुंकत असेल, तर त्याला कोणी विरोध केला, तर तो अंगावर धावून येतो. कारण हे तंबाखू खाणारे गुंड स्वरूपाचे असतात. सभ्य माणसे तंबाखू, पान खात नाहीत. या असभ्य माणसांवर कारवाई करण्यासाठी ठिकठिकाणी मदतीची पथके असली पाहिजेत. अशाप्रकारे गैरवर्तन करणारे, विनामास्क वावरणाºयांची तक्रार करण्यासाठी व्यवस्था असली पाहिजे. मी जबाबदार असे सरकारने वदवून घेतले आहे, तर जबाबदार घटकांना पकडून देणाºया सामान्य माणसांना बक्षीस देण्याची योजना सरकारने जाहीर करावी. विना मास्क पकडला त्याला २०० रुपये दंड केला, तर जो सामान्य माणूस असा विना मास्कवाला पकडून देईल, त्याला त्या दंडातील काही टक्के रक्कम बक्षीस म्हणून देण्याची व्यवस्था असावी. याचा चांगला परिणाम होईल आणि एकमेकांना पकडून देण्याच्या नादाने काहींना अर्थार्जन होईल आणि नियम मोडणाºयांना आळा बसेल.

मुख्यमंत्र्यांनी सार्वजनिक ठिकाणची गर्दी कमी करण्यास सांगितले आहे. राजकीय पक्षांनीही स्वत:ला आवरावे, असे नमूद केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या हातात जादूची छडी नाही. त्यांनी छडी फिरवली, म्हणजे कोरोना थांबणार नाही. कोरोनाची त्रिसूत्री सगळ्यांनाच माहिती आहे. त्याचे पालन आवश्‍यक आहे. लोक ज्या भीतीने शंका कुशंका व्हायरल करत आहेत, त्यातले थोडे जरी गांभीर्य त्यांनी कृतीत दाखवले, तरी बरेच आटोक्‍यात येणार आहे; पण राजकीय लोकांना त्याचे अजूनही भान नाही. १५ दिवस गायब झालेले मंत्री संजय राठोड यांनी मंगळवारी केवढे शक्तिप्रदर्शन केले. हजारोंच्या संख्येने लोक जमले होते. त्यात एकजरी कोरोना बाधित असेल, तर तो किती जणांना संसर्ग करेल? तेव्हा अशा नेत्यांवर सरकारने कारवाई केली पाहिजे. पूजा चव्हाण प्रकरणाची चौकशी करण्याअगोदर अशी गर्दी का केली, याची चौकशी करणे आवश्यक आहे, कारण या लोकांमुळे संपूर्ण महाराष्ट्र वेठीला धरला जाणार आहे. अशा लोकांवर कारवाई झाली पाहिजे. कारण आता लॉकडाऊन परवडणारा नाही. वारंवार निर्बंध, संचारबंदी होणे हे योग्य नाही. त्यामुळे खरोखरच कठोर पावले उचलावी लागतील हे नक्की.


आजवर राज्यात ९ लाख लोकांना लस देण्यात आलेली आहे. आता पुढचा टप्पा सुरू होईल; पण लस देण्याचे तंत्र केंद्राच्या हातात आहे. खरं तर स्थानिक स्तरावर निर्णय घेतले गेले असते, तर वेगात काम झाले असते; मात्र ते उशिरा समजले. आता लसीबाबतही तीच चूक होताना दिसत आहे. ठराविक संख्येने डोस आणि समूह निर्धारित करून देण्याची योजना आहे. बरे, ज्यांचे सुरुवातीला नाव समाविष्ट केले आहे त्यांच्यापर्यंत मेसेजच गेलेले नाहीत. ज्यांच्यापर्यंत गेले ते लोक उदासीन असल्याचे आढळून आले आहेत. १ कोटी ११ लाख जणांना आतापर्यंत लस दिली गेली आहे. १३० कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या आहे. एकटे सरकार आणि त्यांची यंत्रणा यासाठी पुरी पडणार नाही. काही निर्बंध शिथिल करावे लागतील. विश्‍वास ठेवून अन्य लोकांना यात सामावून घ्यावे लागेल. रोग रोखण्यासाठी प्रभावी लसीकरण, वेगाने लसीकरणाची सोय झाली पाहिजे आणि लॉकडाऊन न करता निर्बंध मोडणाºयांवर कारवाई हे महत्त्वाचे असेल.

विषद्रव्याची माया


फेब्रुवारी महिना संपताना कडक उन्हाळ्याची चाहूल लागलेली आहे. पारा दिवसेंदिवस वाढत आहे. याची साक्ष रस्त्यावर शीतपेयविक्रीला बसणाºयांचे स्टॉल वाढताना दिसत आहेत. टीव्हीवर शीतपेयांच्या जाहिराती वाढत आहेत. त्याचप्रमाणे हॉटेल, रेस्टॉरंटमध्येही त्याची चाहूल लागली आहे. गेल्या काही दिवसांत शीतपेये, सरबत पिण्याचे प्रमाण वाढले आहे. पण ही कृत्रिम शीतपेये शरीराला अतिशय घातक आहेत. हेही लक्षात घेतले पाहिजे. कारण जेव्हा कृत्रिम शीतपेय आपण सेवन करतो, तेव्हा अनेक घातक द्रव्ये पोटात जातात. या शीतपेयांमुळे शरीरावर विपरीत परिणाम होत असतो. या शीतपेयांचे सातत्याने सेवन केल्यास मधुमेहासारखा गंभीर विकार जडू शकतात.

आपण टॉयलेट क्लीन करण्यासाठी हार्पिकसारखी द्रव्ये वापरतो. हार्पिकच्याऐवजी पेप्सी, थम्सअप आदी पेयांचा वापर करून पाहिला, तर टॉयलेट तितकेच चकाचक होतात. हा प्रत्येकाने सहज करण्यासारखा प्रयोग आहे. यावरून तेच द्रव्य पोटात गेल्यावर काय अवस्था होत असेल, हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे ही पेये पिण्याऐवजी देशी शीतपेये पिण्यास प्राधान्य द्यायला हवे. याबाबत काही वर्षांपूर्वी एक आकडेवारीही प्रसिद्ध झाली होती.


उन्हाळा आला की, साध्या पाण्याने तहान भागत नाही. मग तहान भागवण्यासाठी सर्वसामान्यांचा ओढा आपोआपच काहीतरी थंड पिण्याकडे जातो. कृत्रिम शीतपेयांचा आस्वाद घेऊन आपण समाधान मानतो; पण या कृत्रिम शीतपेयांच्या सेवनाने कितीतरी घातक द्रव्ये आपण पोटात ढकलत असतो.

या शीतपेयांमध्ये प्रामुख्याने फॉस्फरिक अ‍ॅसिड, कॅफीन, घातक कृत्रिम रंग, कार्बन डायआॅक्साईड, अ‍ॅल्युमिनियम आदींचा वापर प्रामुख्याने असतो. फॉस्फरिक अ‍ॅसिडमुळे शरीरातील पोटॅशियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम यांचे प्रमाण बिघडते. हाडातील कॅल्शियम रक्तात येऊन बाहेर जात असल्याने आर्थरायटिस, मूतखडा, रक्तवाहिन्या कठीण होणे आदी विकार जडण्याची शक्यता तज्ज्ञांनी वारंवार व्यक्त केली आहे. याचबरोबर दात, मणके, कमरेची हाडे ठिसूळ होणे हे दुष्परिणाम तर होतातच.


शीतपेयांवर वारंवार झालेल्या संशोधनानुसार, व्यक्ती जर सातत्याने शीतपेयाचे सेवन करीत असेल, तर त्यात असलेल्या साखरेच्या अतिप्रमाणामुळे मधुमेहासारखा गंभीर आजार जडू शकतो. खरे तरी कितीही उन्हाळा पडला, तरी आता यावर्षी शीतपेयांचा वापर कमीच केला पाहिजे. कारण शीतपेये सेवन केल्यानंतर थंड वाटते; पण सर्दी होण्याचा धोकाही अधिक असतो. कोरोनाच्या काळात शक्यतो सर्दी होणे टाळणेच गरजेचे आहे. त्याशिवाय ही शीतपेय माणसाच्या यकृताला आणि मूत्रपिंडाला हानी पोहोचविते आणि कॅन्सरसारख्या दुर्धर आजाराला आमंत्रण देते. इम्पिरिअल कॉलेज आॅफ लंडनमधील प्रो. नीक वेअरहॅम यांच्या अभ्यासानुसार शीतपेयांच्या सततच्या सेवनाने वजन तर वाढतेच, पण शरीरातील इन्सुलिनचे कार्य कमी होते. अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिना येथील प्रो. बेरी पॉपकीन यांनी तर आपल्या अन्नपदार्थातील साखर हा पदार्थ तंबाखूसारखा शरीरावर दुष्परिणाम करतो, असे निष्कर्ष काढले आहेत.

या शीतपेयांच्या बाबतीत काही वर्षांपूर्वी जनहित याचिका देखील आली होती. ही याचिका उच्च न्यायालयात सुनावणीसाठी आली, त्यावेळी न्यायालयाने हे प्रकरण अतिशय गंभीरपणे घेतले आणि अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाला असे आदेश दिले की, शीतपेयांचे सेवन हे प्रत्यक्षपणे नागरिकांच्या जीवनाशी निगडित असल्यामुळे या कार्बोनेटेड शीतपेयांची वेळोवेळी योग्य ती तपासणी करण्यात यावी, तसेच त्यावर नियंत्रण ठेवण्यात यावे; पण याची अंमलबजावणी झालेली कुठेच दिसत नाही. आज बाजारात येणारी शीतपेये आणि त्यांचा वाढता खप पाहता न्यायालयाने दिलेल्या या आदेशांचे पालन केले जात नाही हेच दिसून येते.


सेंटर फॉर सायन्स इन दी पब्लिक इंटरेस्ट (सीएसपीआय) या केंद्राने काही वर्षांपूर्वी प्रसिद्ध केलेला अहवाल धक्कादायक आहे. या अहवालानुसार कोकाकोला आणि पेप्सीसारख्या शीतपेयांच्या उत्पादन कंपन्या मध्यमवर्गीय आणि कमी उत्पन्न असलेल्या विकसनशील देशांमध्ये प्रचंड गुंतवणूक करीत आहोत. कारण या देशांतील अफाट लोकसंख्येमुळे प्रचंड बाजारपेठ आहे. शीतपेयांच्या दुष्परिणामांची गंभीरताही या लोकांकडून दुर्लक्षित केली जाते. याचा फायदा उत्पादक उठवित आहेत. या केंद्राने प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार भारतामध्ये १२.४ अब्ज डॉलर्स इतकी प्रचंड गुंतवणूक या कंपन्यांची आहे. याचाच अर्थ या कंपन्या मधुमेह, स्थूलत्व, दातांची हानी, हृदयरोग या आजारांना जणू खतपाणीच घालत आहेत.

भारतातील शीतपेयांची बाजारपेठ १० अब्ज डॉलर्स आहे. ती प्रतिवर्षी सहा ते सात टक्क्यांनी वाढत आहे. कोक या कंपनीने विकत घेतलेले पेप्सी हे शीतपेय भारतात प्रथम क्रमांकाचे आवडते शीतपेय आहे. या कंपन्यांनी जरी असे जाहीर केले असले, की लहान मुलांना लक्ष्य केले जाणार नाही, तरीसुद्धा या शीतपेयांच्या जाहिराती प्रामुख्याने मुलांवरच चित्रीत केलेल्या दिसतात. शासनाने शीतपेयातील साखरेच्या प्रमाणावर निर्बंध घातले पाहिजेत. त्याची कठोर अंमलबजावणी होते ना? याबाबतही वेळोवेळी तपासण्या केल्या पाहिजेत. साखरमिश्रित शीतपेयांवर धोक्याची जाणीव करून देणारे लेबल लावणे बंधनकारक असावे. तसेच शाळांमधून शीतपेयांच्या विक्रीस बंदी असणे, अशी कठोर उपाययोजना करणे आवश्यक आहे. भारतासारख्या विकसनशील देशात जाहिरातींचे प्राबल्य तर खूप जास्त प्रमाणात आहे. आरोग्यास हानिकारक अशा शीतपेयांच्या जाहिराती तर लोकप्रिय कलाकारांच्या अवास्तव स्टंटबाजीने पुरेपूर असतात. लिंबू सरबत, कोकम सरबत, आवळा सरबत, शहाळ्याचे पाणी, कैरीचे सरबत, पन्हे आदी नैसर्गिक पेयांचे सेवन करणे अधिक फायद्याचे ठरेल; पण आपल्याला बाटलीबंद पेये पिण्याचे लागलेले वेड हे घातक असेच आहे. ही सर्व विषद्रव्याची माया आहे, असेच म्हणावे लागेल.


मालिकांमधील सासवा


अस्सं माहेर सुरेख बाई खायाला मिळतं

अस्स सासर द्वाड बाई कोंडुनी मारीत, असे एक भोंडल्यातील लोकगीत होते. सासुरवास हा मुलींना कोणत्याही काळात सहन करावाच लागतो. त्यामुळे चार चार तास संध्याकाळी विविध वाहिन्यांसमोर बसायचं म्हणजे कोणती सासू जास्त छान छळते आणि कोणती सून जास्त सोशिक आहे हे पाहण्यात वेळ घालवायचा, पण या मालिकांमधील सासवा जेव्हा सासुरवास किंवा छळ करतात तेव्हा खूप ते विनोदी वाटते किंवा काही मालिकांमध्ये सासवा इतक्या आपल्या सुनेवर प्रेम करतात की ते पाहूनही हसू येते.


या सासवा-सुनांच्या कुरघोड्यांच्या मालिका कधी सुरू झाल्या, कशा सुरू झाल्या आणि त्याशिवाय दुसरे काही कथानक मिळतच नाही का, असा प्रश्न पडतो. काहीतरी वेगळे करायला जाणारे निर्माते पुन्हा तसलाच आचरटपणा करतात. म्हणजे ‘होणार सून मी या घरची’ या मालिकेत जान्हवीला पाच पाच सासवा दाखवल्या आहेत, तर आता ‘माझा होशील ना’मध्ये तेच कथानक पाच सासवांच्या जागी चार सासरे घेतले आहेत. प्रत्येकाची मनं जिंकत जिंकत नवºयाचे मन जिंकायचे हाच प्लॉट. यापलीकडे काहीच नाही.

ती रमाबाई पेशवेंच्या जीवनावर ‘स्वामिनी’ नावाची मालिका होती, ती तर अत्यंत दिव्य होती. त्या रमाबाईला छळण्यासाठी ती चुलत सासू आनंदीबाई काय काय खटाटोपी करते हे पाहणे हास्यास्पद होते. बागा काय जाळते, विंचू काय चावून घेते, स्वयंपाक काय बिघडवते. हे पाहिल्यावर हसू आणि संताप यायचा. राज्यकर्ते असलेल्या पेशव्यांच्या बायका पाचशे पाचशे माणसांचा स्वयंपाक करणाºया स्वैपाकिणी होत्या का? वड्यांचा आळू कुठला आणि खाजरा आळू कुठला यावरून रमेला छळण्याचे दाखवलेले प्रकार हे अतर्क्य होते. इतिहासाला कल्पनेची जोड देण्यास हरकत नाही, पण ती अळू आणि खाज यात का अडकली गेली? माधवराव पेशवे आणि रमाबाई यांचे रुसणे, अबोला, भांडण यापलीकडे पेशवे काहीच करत नव्हते का? पेशव्यांचे राजकारण हे फक्त सासवा आणि सुनांची भांडणे याबाबत दाखवण्याचा आचरटपणा केला होता.


या उलट झी मराठीवरची ‘अग्गं बाई सासुबाई’मधली सासू म्हणजे अग्गोबाई रडुबाई आहे. निवेदिता जोशी या जाणत्या कलाकाराने असली फालतू भूमिका का करावी हेच समजत नाही. म्हणजे धड सासू म्हणून सासुरवास नाही करता येत. सुनेशी मैत्री करायची आणि मुलाकडून छळून घ्यायचे. फावल्या वेळात नव्या नवºयाशी प्रेमप्रकरण करायचे. नाव सासुबाई आणि सुनेला छळायचे नाही तर रडत बसायचे. सगळा सासुरवास करतो तो बबड्याच फक्त.

‘माझ्या नवºयाची बायको’मध्ये मात्र राधिका भाग्यवान. म्हणजे पतीसुख नसले तरी तिच्या वाट्याला सासूसुख मात्र चांगले आहे. पहिल्या नवºयाची आई आणि दुसºया नवºयाची आई दोघीही तिला चांगल्या सासवा मिळाल्या. नवरा-बायकोचीच इतकी भांडणं आणि कुरघोड्या या मालिकेत आहेत की भारत-पाक सारखे शत्रूदेशही परस्परांवर कुरघोड्या करत नाहीत, धडा शिकवायची भाषा करत नाहीत, इतक्या उचापती हे नवरा-बायको करतात. त्यामुळे सासूला बिचारीला कुठे सासुरवास करायचीच संधी मिळत नाही. मग ती आपली यांना जेवायला, चाय तरी मांडते, राहायलाच याना, असा खानाखजाना चालवते. दुसरी सासू सौमित्रशी लग्न झाल्यावर जी परागंदा झालेली आहे त्याचा काहीच पत्ता नाही, उल्लेख नाही.


त्या मानाने सुनेला छान छळण्याचे काम ‘दिल्या घरी तू सुखी रहा’ या काही वर्षांपूर्वी असलेल्या मालिकेत आतिषा नाईकने चांगले केले होते. घरजावयाच्या मदतीने मस्तपैकी छळकाम तिने केले. २१ व्या शतकातील मुकाटपणे छळ सहन करणारी सुशिक्षित मुलगी लोकांना पटो ना पटो पण छळकाम छान केले होते. अर्थात ते विनोदीच वाटत होते.

२०१२ मध्ये ‘मला सासू हवी’ ही एक मालिका गाजली होती. विधूर वडील आणि त्याची लग्न झालेली तीन मुले. यातील धाकटी मीरा आपल्या सासºयाला बायको हवी म्हणून आणि मला सासू हवी म्हणून धडपडत असते. त्यातून ती आनंद अभ्यंकर आणि आसावरी जोशीला लग्न करून घेऊन येते. मग काय घरातील उर्वरित दोन सुना कॅश, अभिलाषा विरुद्ध ही सासू आणि मीरा यांच्या कुरघोड्यांचा सीलसीला सुरू होतो, पण तो नंतर इतका भरकटत जातो की, त्यात आता मला सासू कशाला हवी म्हणायची वेळ येते. डॅशिंग, मॉड आणि स्कूल व्हॅन चालवणारी आसावरी जोशी सासू म्हणून लग्न करून घरात आल्यावर इतकी सोज्ज्वळ कशी होते हा न उलगडलेल्या कथानकाचा भाग आहे. मग ती इतका सुनवास भोगते, कुठल्याशा लांबच्या नात्याच्या सासूकडून पाण्याच्या घागरी भरून झाडाला फेºया मारण्याची शिक्षा काय भोगते. अक्षरश: वीट आणला होता या मालिकेने. काही अपघातात मृत पावल्याने आणि काही कंटाळल्याने कलाकार या मालिकेला सोडून गेले आणि कशीबशी ही मालिका बंद झाली, पण सासूची पुरती वाट लावून संपली.


झी मराठीवर तत्कालीन अल्फा टीव्हीवर २० वर्षांपूर्वी अवंतिका ही एक चांगली मालिका होती. त्यात दाखवलेली सासू दीपा श्रीराम ही जहागीरदारीण बाई भन्नाट होती. सुनेवर कसलीही बंधने लादणारी नव्हती, पण मुलांचे बाहेर लफडं आहे हे म्हटल्यावर त्याला मला आवडलेल्या मुलीशी लग्न कर, हवं तर तू तुझ्या मैत्रिणीशी संबंध ठेवू शकतोस, असे सांगणारी सासू दाखवली आहे. कुठली आई आजकाल बाहेर लफडं कर, सांभाळ, पण बायकोशीही नीट रहा असे सांगेल? प्रेक्षक पाहतायत ना चालतंय सगळं.

‘उंच माझा झोका’ ही पण मालिका रमाबाई रानडे यांच्या जीवनावर गाजलेली मालिका. या मालिकेतही रमेला भरपूर जाच झालेला दाखवला आहे. तिथेही ताई काकू थोड्या छळतात, पण बाकीच्या प्रेमळ सासवा, पण सासू हा प्रत्येक मालिकेतील अविभाज्य घटक. कथानकात जसा हीरो-हिरोईन व्हिलन पाहिजे तशी मालिकांमध्ये सासू ही हवीच असते. कधी प्रेमळ तरी कधी खाष्ट, पण सासूशिवाय मालिका दाखवणे हे मालिकेच्या संकेताला सोडूनच. अगदी हॉररमधील मालिका असली तरी त्यात सासू छान लागतेच. ‘रात्रीस खेळ चाले’मध्ये आपण पाहिले सासवा-सुनांचे प्रेमळ संबंध. यात वच्छी आणि शोभा या सासू-सुनेचे नाते खाष्ट आणि प्रेमळ असे दोन्ही प्रकारचे बघायला मिळते, तर सरिता आणि आण्णा नाईकाची बायको आई या दोघींतील नातेही सुंदर दाखवले आहे. या दोन्ही सासवा भाव खाऊन जातात.


यथा राजा तथा प्रजा

भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात कोरोनाने अमेरिका, इटलीत घातला तसा गोंधळ घातला नाही. गेल्या वर्षी कोरोनाची चाहुल लागताच केंद्र सरकार आणि सगळ्या राज्य सरकारांनी प्रारंभापासूनच जी काळजी घेतली, सतर्कता बाळगली, उपाय केलेत त्यामुळे आपल्याकडे कोरोनाने एका विशिष्ट प्रमाणाबाहेर हातपाय पसरले नाहीत. ज्याप्रमाणे सरकारांनी प्रयत्न केलेत, त्याप्रमाणेच आपल्याकडच्या आरोग्य यंत्रणेने, यंत्रणेत सहभागी असलेल्या डॉक्टरांनी आणि अन्य कर्मचा‍ºयांनीही कोरोनाला एका मर्यादेत रोखले. कोरोनाची साथ मोठ्या प्रमाणात पसरू नये यासाठी डॉक्टर्स आणि आरोग्य क्षेत्रात काम करणा‍ºया परिचारिका, अन्य कर्मचारी यांना जास्त श्रेय दिले पाहिजे. जीवावर उदार होत त्यांनी सेवा दिली. उन्हाळ्यात पीपीई किट घालून उकाड्याचा प्रचंड त्रास सहन करून त्यांनी जी सेवा दिली त्यामुळेच आपण त्यातून कुठे बाहेर पडत असताना, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने अनलॉक केले असताना गेल्या पंधरा दिवसांपासून पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. रुग्णांमध्ये गतीने वाढ होत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात आणि देशात भीतीचे वातावरण आहे. पुन्हा लॉकडाऊनच्या भीतीने राहुरीत मंगळवारी एकाने आत्महत्या केली. असे प्रकार वाढण्याची शक्यता दाट आहे.


विदर्भ, पुणे, नाशिक, औरंगाबादमध्ये ज्याप्रकारे कारवाई सुरू आहे हे पाहता राज्याची वाटचाल पुन्हा टाळेबंदीकडे सुरू झाली आहे. नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य येऊ लागले आहे. अनेकांना रोजगार टिकवण्याची कसरत करावी लागत आहे. अनेक व्यवसाय संकटात सापडले आहेत. या सगळ्याला कोरोना जबाबदार असला, तरी कोरोनाचा प्रसार करण्यास जबाबदार आपणच आहोत, हे मान्य करावे लागेल. मुख्यमंत्र्यांनी रविवारी ‘मी जबाबदार’ असे का वदवून घेतले आहे? नागरिक सुधारत नाहीत त्यामुळे हा संसर्ग वाढतो आहे. इतके कळकळीचे आव्हान करूनही शिवसेनेचा एक मंत्री हजारोंच्या संख्येने गर्दी जमवतो. ज्या भागात कोरोनाचा शिरकाव झाला आहे तिथे केलेले हे शक्तीप्रदर्शन अत्यंत घातक आहे. त्यात एक जरी संसर्ग झालेला रुग्ण असेल तर संपूर्ण महाराष्ट्र त्यातून धोक्यात येऊ शकतो. एवढेही या वनमंत्र्यांना समजू नये का?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला संबोधित करताना नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे, पण त्याकडे मंत्री आणि स्वपक्षीय लोकच दुर्लक्ष करीत आहेत. गेल्या वर्षी नव्हती, एवढी अभूतपूर्व परिस्थिती यंदा पश्चिम विदर्भात निर्माण झाली आहे. अमरावती, अकोला, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ अशा पाचही जिल्ह्यांमध्ये परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता बळावली आहे. दररोज रुग्णसंख्या वाढतेच आहे. प्रत्येकाने काळजी घेण्याची आणि नियमांचे कठोर पालन करण्याची आवश्यकता आहे, पण प्रत्यक्ष व्यवहारात आम्ही चुका का करतो, कळायला मार्ग नाही. चुकांमध्ये सुधारणा केल्या नाहीत तर येणारा काळ आपल्याला विनाशाकडे घेऊन जाईल, हे आजच लक्षात घेतले पाहिजे. रोजगार, शिक्षण, आरोग्य सर्व धोक्यात येईल आणि सर्वस्व गमावून बसण्याची वेळ येईल. कोरोनाने मरायचे की, टाचा घासून मरायचे हाच पर्याय असेल. त्यामुळे आता तरी जागरूक होण्याची गरज आहे. नियम मोडणाºयांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. आज मुख्यमंत्री, हे सरकार जर संजय राठोड आणि त्या गर्दीतील लोकांवर कारवाई करतील, त्यांना दंड, शिक्षा करतील तर चांगला संदेश जाईल, नाहीतर लोक मोकाट सुटतील आणि आपल्याला विनाशाकडे नेतील हे नक्की. ‘यथा राजा तथा प्रजा’ अशी म्हण आहे. आपले नेते जसे वागतात तसेच कार्यकर्ते आणि जनता. संजय राठोड यांच्यासारखे नेते, सरकारमधील घटक असलेले मंत्रीच नियम मोडत असतील, तर सगळे त्याचे अनुकरण करतील हे नक्की.


नेतेमंडळीच जर कसलीही बंधने पाळणार नसतील, तर जनता कशी पाळेल? याबाबत आपल्याकडे एक दाखला दिला जातो. तो म्हणजे, एकदा एका साधूकडे एक माणूस जातो. त्या साधूकडे लोकांचे समाधान करण्याची फार मोठी ताकद होती. त्यामुळे रांग लागलेली असायची. त्यामुळे आपल्या मुलाला घेऊन जातो आणि दाखवतो. महाराज, हे पोरगं गूळ लई खातंय. किती समजावलं तरी ऐकत नाही. इतका गूळ आहे याच्या अंगात की झोपला तरी त्याच्याभोवती मुंगळे जमतात. साधूने त्या मुलाकडे पाहिले आणि सांगितले, ८ दिवसांनी या. आठ दिवसांनी आल्यावर साधू त्या मुलाकडे बघतो आणि सांगतो, बाळा आता गूळ खायचा नाही. मुलगा मान हलवतो आणि गूळ खाणे सोडून देतो. तो माणूस म्हणतो, महाराज एवढेच करायचे होते, तर आठ दिवसांनी या का सांगितले? तर तो साधू म्हणाला, मलाही गूळ खूप आवडत होता, पण मी गूळ खायचा आणि गूळ खाणे वाईट आहे हे त्या मुलाला कसे सांगणार? त्यासाठी आठ दिवस झाले मी गूळ खाणे थांबवले आहे. आता मी जे करतो तेच लोकांना सांगू शकतो. मी नीट वागायचे नाही आणि लोकांना उपदेश करायचा याला अर्थ नसतो. आज राज्यकर्ते नियम पाळत नसतील तर जनता कशी काय नियम पाळेल? सभा-संमेलने, उत्सव सगळं नीट चालले आहे. लग्न समारंभ होत आहेत. मग जनता बाहेर पडली तर काय फरक पडतो? हा चुकीचा संदेश आहे. त्यामुळे कारवाई होणे आवश्यक आहे. तरच कोरोनाला थांबवता येईल.

यावर एकमत असले पाहिजे


गेल्या आठ महिन्यांपासून पूर्व लडाखच्या सीमेवर सुरू असलेला भारत व चीन यांच्यातील तणावपूर्ण संघर्ष निवळण्यास सुरुवात झाली आहे. चीनने नमते धोरण घेत भारताबरोबर सामंजस्य करार केल्याने आता दोन्ही देशांचे सैन्य माघारी घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्थात आपल्याकडे सीमेवरील बाबींचे राजकारण केले जाते त्याचा फायदा बाहेरच्या शक्ती उठवत असतात. नाहीतर कोणाची हिंमत होणार नाही की, भारताकडे वटारून बघायला. म्हणजे सरकारने वाद मिटवून सैन्य माघारी घ्यायला लावले, तरी त्यांच्यावर टीका, सरकारने सर्जिकल स्ट्राइक केला तरी टीका आणि घातपाती हल्ला झाला तरी टीका. त्यामुळे अशा बाबतीत विरोधी पक्षांनी राजकारण न आणता सरकारच्या पाठीशी ठाम असले पाहिजे हे भान विरोधकांना शिकवण्याची वेळ आली आहे. ते शिकले तर हे सीमाप्रश्न निर्माण होणार नाहीत. पाक, चीन हे आपोआप शांत राहतील. चीन-पाक शत्रूंना नमवण्यासाठी सर्व शक्ती पणाला लावणाºया लष्कर आणि सरकारच्या पाठीशी राहण्याबाबत सर्व राजकीय पक्षांचे एकमत असले पाहिजे, उगाच शुक्लकाष्ट काढून विरोधासाठी विरोध करण्याची प्रवृत्ती थांबली पाहिजे.

आता गेली जवळपास ८ महिने भारत आणि चीन यांच्यामध्ये पूर्व लडाखमध्ये युद्धजन्य परिस्थिती होती. एकीकडून कोरोनाशी लढा आणि दुसरीकडे सीमेवर डोळ्यात तेल घालून राहण्याची परिस्थिती. कोणत्याही क्षणी युद्धाचा भडका उडेल अशा स्वरूपाचा तणाव निर्माण झाला होता. दोन्ही देशांकडून मोठ्या प्रमाणावर शक्‍ितप्रदर्शन होत होते. अशा वेळी चीन आणि भारत यांनी एक सामंजस्य करार करून दक्षिण पेंगाँग क्षेत्रातून सैन्य माघार घेण्याचे मान्य केले. या सैन्यमाघारीची आणि रणगाडे, तोफा यांसारख्या युद्धसामग्री माघारी घेण्याची सुरुवात केली. त्यामुळे आता हा संघर्ष निवळल्यासारखी परिस्थिती आहे. भारताने चीनला जशास तसे प्रत्युत्तर देण्याचा कणखरपणा दाखवल्यामुळे आणि चिनी सैन्याला अतिउंच हिमशिखरांवरील लढाई लढणे कठीण जाणार हे लक्षात आल्यामुळे जिनपिंग यांनी नमते धोरण स्वीकारले आहे. असे असले, तरी येणाºया काळात भारत-चीन यांच्यात संघर्ष उद्‌भवणारच नाही, असे नाही. अशा परिस्थितीत राजकीय मतभेद काहीही असले, तरी काँग्रेस आणि सर्वच विरोधी पक्षांनी सरकारच्या कृतीचे समर्थन केले पाहिजे. सीमेपलीकडील शत्रूची बाजू घेणे, शत्रूची भाषा वापरणे सोडले पाहिजे. काँग्रेसला अनेकवेळा पाकिस्तानची भाषा बोलायची खुमखुमी येते. हा बालीशपणा आता त्यांनी थांबवला पाहिजे.


लडाखमधील संघर्ष ८ महिने चीनने लावून धरला. यादरम्यानच्या काळात चीनने अरुणाचल प्रदेश आणि सिक्‍कीम भागात कुरघोड्या करण्याचे प्रयत्न केले. विशेष म्हणजे अरुणाचल प्रदेशाजवळ चीनने एक नवीन खेडे वसवल्याचे उपग्रहाद्वारे घेतलेल्या छायाचित्रांतून समोर आले. गेल्या काही वर्षांमध्ये अशा स्वरूपाच्या कुरघोड्या सातत्याने चीनकडून केल्या जात आहेत. काही दिवसांनंतर परिस्थिती चिघळल्यासारखे वातावरण तयार होते आणि पुन्हा ती निवळते. २०१७मध्ये डोकलामचा संघर्ष ७३ दिवस चालला होता आणि नंतर तो निवळला. आता पूर्व लडाखमधील संघर्षही जवळपास २५० दिवसांनी निवळला आहे. तथापि, मूळ प्रश्‍न कायम असल्याने भविष्यात अशी संघर्षाची परिस्थिती पुन्हा उद्‌भवू शकते. त्यामुळे मूळ प्रश्‍नाकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकार जो काही विचार करत असेल, तो अत्यंत विवेकाने आहे हे लक्षात घेऊन त्याकडे साशंक नजरेने पाहून सरकारला आरोपीच्या पिंजºयात उभे करण्याची वृत्ती सोडून दिली पाहिजे. शत्रूला पोषक वातावरण निर्माण करण्याचे राजकीय पक्षांचे प्रयत्न थांबवले पाहिजेत, तरच आपल्यातील एकजूट पाहून चीन-पाक शांत राहतील हे भान असले पाहिजे.

भारत आणि चीन यांच्यामध्ये ३ हजार ८०० किलोमीटरची सीमारेषा असून, तिला लाइन आॅफ अ‍ॅक्‍च्युअल कंट्रोल (एलएसी) असे म्हणतात. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये जी सीमारेषा आहे ती प्रामुख्याने जम्मू-काश्‍मीर आणि पंजाबमधून जाते ती एलओसी म्हणजेच लाइन आॅफ कंट्रोल म्हणून ओळखली जाते. एलओसी आणि एलएसीमध्ये एक मूलभूत आणि महत्त्वाचा फरक आहे. तो म्हणजे एलओसीची सीमारेषा अधोरेखित करण्यात आलेली आहे. त्यासंदर्भामध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये एक प्रकारचा समझोता झालेला आहे; परंतु एलएसीबाबत तशी परिस्थिती नाही. एलएसीमध्ये जो भूभाग भारताच्या ताब्यात आहे तो भारताच्या नियंत्रणातील भूभाग आणि चीनच्या नियंत्रणाखालील भूभाग चीनचा असे ढोबळमानाने मानले जाते. कारण ही सीमारेषा अधोरेखित (कोडिफिकेशन आॅफ बॉर्डर लाइन) नाही. १९९४ पासून २०२१ पर्यंत भारत व चीनमध्ये आतापर्यंत चार सीमाकरार झाले, परंतु या चारही करारांमध्ये सीमारेषा अधोरेखित करण्याबाबत कोणत्याही पद्धतीची तरतूद नाही. १९८८ मध्ये भारत आणि चीन यांच्यामध्ये सीमारेषेवर जॉइंट डायलॉग ग्रुप म्हणजेच एक संयुक्‍त संवाद गट निर्माण करण्यात आला. असे असूनही सीमारेषा अधोरेखित करण्यात आलेली नाही. त्यामुळे चीन कुरघोड्या करत असताना हे मोदींच्या काळात झाले आहे, असले आरोप करण्यात विरोधकांनी वेळ घालवू नये. नेमकी परिस्थिती काय आहे ते समजून घ्यावे आणि जनतेत गैरसमज पसरवण्याचे काम थांबवले पाहिजे.

सहकारचे पुनरुज्जीवन करा


महाराष्टÑाच्या स्थापनेनंतर पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी ‘विना सहकार नही उद्धार’ अशी हाक दिली. सहकारातूनच समृद्धीकडे जाता येईल, हे त्या काळात यशवंतराव चव्हाणांनी सांगितले. त्याप्रमाणे सहकाराने एक सुवर्णकाळ पाहिलाही. १९७० आणि १९८०चा काळ हा सहकाराचा सुवर्णकाळ होता, परंतु १९९०च्या दशकात जागतिकीकरणाचे आणि मुक्त अर्थव्यवस्थेचे धोरण स्वीकारल्यावर या सहकाराला ग्रहण लागले. यामध्ये सहकारातून साधल्या जाणाºया विकासाची कल्पना गिळंकृत केली गेली. मोठ्या माशाने छोट्या माशाला गिळावे त्याप्रमाणे स्थानिक पातळीवर असलेल्या सहकाराला मल्टिनॅशनल कंपन्यांच्या धोरणाने गिळंकृत केले. परिणामी सहकारी संस्था बंद पडत गेल्या. सहकार हा शब्द आणि कल्पना नामशेष होण्याची अवस्था आता निर्माण झालेली दिसते. म्हणूनच या सहकाराला वाचवण्यासाठी त्याचे पुनरुज्जीवन करण्याची गरज आहे.

सहकार हा सामान्य माणसांच्या एकत्रीकरणातून निर्माण होत असतो. भांडवलदारांशी स्पर्धा करण्यासाठी आता सहकाराला तयार व्हावे लागेल. म्हणूनच सहकाराची तत्व आता बदलली गेली पाहिजेत. या पारंपरिक तत्वांमधून काळाची गरज म्हणून बाहेर पडले पाहिजे. नवी धोरणे आखली गेली पाहिजेत, कारण सर्वसामान्यांची ताकद ही सहकारात आहे. सहकाराचे धोरण आहे की, नफा मिळवणे हे आमचे काम नाही, तर सेवा देणे हे सहकाराचे काम आहे; पण आता आपण सेवेवरही कर भरत असताना नुसती सेवा म्हणजे फक्त नुकसानीला आमंत्रण असेच म्हणावे लागेल. यासाठीच आता सहकाराचे पुनरुज्जीवन करायला पाहिजे.


महाराष्टÑ सहकार कायद्यात आणि एकूणच सहकारी तत्वांमध्ये बदल करणे गरजेचे आहे. १९६० च्या दशकातील परिस्थिती आज शिल्लक नसताना आपण सहकाराचे स्वरूप का बदलू नये? यासाठी सरकारने सहकार कायद्यात बदल करून सध्याच्या परिस्थितीत, मॉल संस्कृतीत सहकाराचे महत्त्व लक्षात घेऊन त्याचे पुनरुज्जीवन करावे. सहकाराचे उद्दिष्टही भांडवलीबाजाराप्रमाणे नफा मिळवणे हेच असले पाहिजे. सेवेच्या नावाखाली होणारा भ्रष्टाचार आणि काळा कारभार त्यामुळे थांबेल. यासाठीच आता आम्हाला सहकारातही नफा मिळवण्याचा विचार केला पाहिजे.

महाराष्टÑात सहकार खºया अर्थाने रुजला होता तो पश्चिम महाराष्टÑात. सहकारी साखर कारखाने निर्माण होऊन तिथल्या शेतकºयांचे राहणीमान पूर्णपणे बदलले होते. खेडी अतिशय समृद्ध झाली ती याच सहकाराने. मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण केला होता तो याच सहकाराने. एक सहकारी साखर कारखाना उभा केल्यावर त्यावर आधारित किती संस्था निर्माण झाल्या होत्या याचा विचार केला पाहिजे. त्यामुळे निर्माण झालेला रोजगार आणि विकास याचा विचार केला पाहिजे. अशा परिस्थीतीत जागतिकीकरणाच्या प्रवाहात हे वैभव केवळ जुन्या तत्वांमुळे लयास जात असेल, तर त्याचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.


सहकार हा काही समाजवाद्यांचा नाही, तर तो सामान्य माणसांकडून प्रभावीपणे चालवला जाऊ शकतो हे दाखवणे गरजेचे आहे. एका साखर कारखान्यामुळे कामगारांच्या वसाहती निर्माण होत्या. नवी गावे तयार होत होती. त्यांच्यासाठी सहकारी बँका तयार झाल्या. त्यांच्यासाठी शाळा, हॉस्पिटल्स उभी राहिली. याशिवाय कुक्कुटपालन संस्था, पाणीवाटप संस्था, खरेदीविक्री संघ, ग्राहक भांडार अशा अनेक संस्थांमधून हजारो तरुणांना रोजगार मिळत होता. आज ते चित्र दिसत नाही. १९८० च्या दशकात साखर कारखानदारीवर असलेले सहकारी बझार हे आजच्या मॉलप्रमाणेच समृद्ध होते. एकाच ठिकाणी सर्व काही देण्याचे काम आमच्या बझारनी केलेले होते. तीच कल्पना भांडवलदारांनी उचलून सहकाराचे मातेरे करायचा प्रयत्न केला. अशा परिस्थितीत सहकार वाचवण्यासाठी आणि बंद पडत चाललेल्या सहकारी संस्थांना वाचवण्यासाठी या सहकाराचे शुद्धीकरण केले पाहिजे. त्याचे पुनरुज्जीवन केले पाहिजे.

हे सहज शक्य आहे, फक्त राजकीय इच्छाशक्तीचे त्याला पाठबळ मिळायला हवे. पश्चिम महाराष्टÑाच्या नावाने बोटे मोडत बसण्यापेक्षा विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातही नव्या प्रकारे सहकार रुजवण्याची गरज आहे. अनेकवेळा पश्चिम महाराष्टÑातले नेते कोकणात सहकार रुजत नाही, असे म्हणून टीका करतात. त्या सगळ्यांची तोंडे बंद करून विकासाचे नवे मॉडेल देणारा सहकार देता येऊ शकतो. त्यासाठी त्याचे योग्य प्रकारे पुनरुज्जीवन करण्याची गरज आहे. पश्चिम महाराष्ट्रातील ऊसाप्रमाणे कोकणातील उद्योगांचे सहकाराच्या माध्यमातून विकासाचे चित्र उभे राहू शकते. आंबा, काजू आणि मासे ही कोकणातील महत्त्वाची उत्पादने आहेत. आज बाहेरचे व्यापारी, दलाल येऊन आंब्याच्या बागा चालवायला घेतात. त्याचा फायदा या दलालांना होतो आणि आमचा आंबा उत्पादक शेतकरी मात्र गरीब राहतो. अशा परिस्थितीत एक मोठे सहकारी तत्वावर महामंडळ उभे केले आणि आंब्याचा हमीभाव ठरवून त्यालाच सगळ्यांनी आंबे विकले, तर बँ्रडेड हापूस आंबा जागतिक बाजारपेठेत येऊ शकतो.


आज उत्तर प्रदेशातील भय्ये आम्हाला हापूस आंबे विकतात आणि पावडर, केमिकल लावून आमच्या उत्तम प्रतीच्या आंब्याला बदनाम करतात. त्यापेक्षा सहकारी तत्वावर सगळे आंबे एकाच ठिकाणी विकले जाण्याची यंत्रणा उभी केली, तर सहकारातून समृद्धी येईल. आंबा फळांवरील प्रक्रिया उद्योग हे यातून चालवता येतात, तसेच सहकारी मत्स्योत्पादन संस्था, सहकारी काजू उत्पादन आणि प्रक्रिया संस्था विकसित करता येतील. यातून फार मोठा रोजगार निर्माण होईल. शेअर मार्केटमधील शेअरप्रमाणे आमच्या सहकारी संस्थेतील शेअरचे मूल्यमापन करण्याची तयारी आता केली पाहिजे. किंबहुना अनेक मोठ्या कंपन्यांप्रमाणे सहकारी संस्था, बँका यांच्या शेअरमध्येही बाहेरची गुंतवणूक होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. नियंत्रण आमचे सामान्य माणसांचे असेल; पण गुंतवणूक नफ्याच्या विभागणीसाठी भांडवलदारांची लागली, तर काय हरकत आहे. यासाठी सर्वात प्रथम आम्ही फक्त सेवा देऊ असे न म्हणता आम्ही चांगली सेवा देऊन नफा कमवू, असा विचार करण्याची वेळ आलेली आहे. नफा मिळवणे ही भांडवलदारांची मक्तेदारी नाही, तर तो आमचाही हक्क आहे हे सांगण्यासाठी सहकाराने आता सिद्ध झाले पाहिजे. त्यासाठी सहकाराचे पुनरुज्जीवन आवश्यक आहे.


वाढती नकारात्मकता घातक

गेल्या काही दिवसांपासून माणसांमधली नकारात्मक प्रवृत्ती वाढीस लागल्याचे दिसत आहे. कोणत्याही गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहण्याऐवजी नकारात्मकतेने पाहायचे. यातून खून, आत्महत्या यांचे प्रमाणही वाढल्याचे दिसत आहे. अपघातांचे प्रमाण वाढल्याचे दिसत आहे. राजकारणातही परस्परविरोधी मतप्रवाह निर्माण करून नकारात्मकतेने बोलण्याची प्रथा वाढत आहे. ही एवढी नकारात्मकता कशाने निर्माण झालेली आहे? का हे पण कोरोनाचे लक्षण, कोरोनाचा परिणाम आहे, याचा शोध घेतला पाहिजे.


वसईत एका माणसाने बायकोचे केस कापले, एका महिलेला विवस्त्र करून झाडाला बांधून ठेवले, पनवेलजवळ लग्नाला नकार दिला म्हणून मुलगी आणि आईचा खून केला आणि स्वत:ही आत्महत्या केली. अनेक अभिनेते आत्महत्या करताना दिसत आहेत. रविवारी एका टीकटॉक हिरोने आत्महत्या केली. अपघातात मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे, याचे कारण चालकाचे लक्ष विचलीत झालेले आहे. हे पण नकारात्मकतेचे कारण आहे. ही नकारात्मकता कशाने तयार झाली आहे? कसला विचार करत असतात माणसे? त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्याची गरज आहे. नाहीतर ते समाजहिताचे नाही.

महाराष्ट्राच्या कानाकोपºयात गेल्या काही दिवसांत घडलेल्या विविध घटनांवर नजर टाकली, तर समाजातील सर्वच स्थरातील लोकांना समजावायची गरज निर्माण झालेली आहे. नेत्यांवर, सरकारवर लोकांचा विश्वास नाही. त्यामुळे भविष्यात आपले काय होणार या चिंतेने सामान्य माणूस नकारात्मक होत आहे. आरक्षणाचा प्रश्न सुटत नाही, रोजगारनिर्मिती नाही, शाळा-कॉलेज शिक्षणाचा प्रश्न लटकत आहे. त्यामुळे निराशेचे वातावरण मोठ्या प्रमाणावर तयार होत आहे. याला राजकीय कारणे असली, तरी लोकांचा कोणावर विश्वास नाही हे दिसत आहे. शेतक­ºयांचे आंदोलन थांबत नाही, कुठलाही प्रश्न आंदोलनाने सुटत नाही, त्यामुळे एक विचित्र मनोवृत्ती तयार झाल्याचे दिसत आहे. त्यासाठी थोडे समाजप्रबोधन करून या प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी काही प्रयत्न आवश्यक आहेत. राशीन येथील एका डॉक्टराने केवळ आपल्या मुलाच्या आजारपणामुळे संपूर्ण कुटुंबाची हत्या करून नंतर स्वत: आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यामुळे आजकाल समाजमन किती कमकुवत झाले आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. ही नकारात्मकतेची लक्षणे आहेत. नाशिक जिल्ह्यातील एका गावामध्ये पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीने तिला स्वत:चे पावित्र्य सिद्ध करण्यासाठी उकळत्या तेलात हात घालून पाच रुपयाचे नाणे बाहेर काढायला लावले. काय आहे हा प्रकार? विश्वास नावाची गोष्ट या जगात राहिली नाही का? स्त्रियांना आपले पावित्र्य सिद्ध करण्यासाठी आजही अग्निपरीक्षा द्यावी लागते आहे? कोठून निर्माण झाली ही नकारात्मक प्रवृत्ती? कोरोनापेक्षा भयानक असा हा समाजाला लागलेला मानसिक, सामाजिक रोग आहे. त्यावर सर्व स्तरावर चिंतन, मार्गदर्शन, प्रबोधन करण्याची गरज आहे.


कोणत्याही साध्या गोष्टीने स्वत:चे किंवा इतरांचे जीवन संपवायला लोक का प्रवृत्त होतात, याचा सामाजिक शोध घेतला जात असतानाच समाजातील सर्वच घटकांना आता मानसिक समुपदेशनाची गरज असल्याची गोष्ट समोर येऊ पाहत आहे. गेल्या वर्षभराच्या कालावधीमध्ये भारतासह जगात सर्वत्रच कोरोना महामारीने समाजातील सर्वच व्यवस्था कमकुवत आणि खिळखिळी केली असताना जगायचे कसे, हा प्रश्न समाजातील सर्वच घटकांना पडला आहे. वर्षभराच्या कालावधीनंतर आता कुठे समाजव्यवस्था आणि अर्थव्यवस्था सावरायला लागली असताना, पुन्हा एकदा भारताच्या विविध भागांमध्ये कोरोनाचे संकट वाढू लागले आहे. कोरोना संपला या विचाराने नव्या उमेदीने पुन्हा एकदा कामाला लागण्याचा विचार करणाºया समाजातील सर्वच घटकांसाठी हा आणखी एक झटका मानावा लागेल. ही नकारात्मकता अनामिक चिंतेतून तयार झालेली आहे. चिता मेलेल्या माणसाला जाळते, तर चिंता जीवंत माणसाला जाळते. त्यामुळे चिंतेतून चितेकडे जाण्यापूर्वीच सर्वांनी चिंतन करण्याची गरज आहे. यासाठी सरकारी पातळीवरही काही प्रयत्नांची गरज आहे. नकारात्मकता वाढण्यामागे आपली काही धोरणे कमी पडतात काय, याचाही सरकारने विचार केला पाहिजे. लोकांचा आत्मविश्वास वाढेल, लोक सकारात्मक राहतील, आनंदी राहतील, असे वातावरण निर्माण करण्याची हीच ती वेळ आहे. नाहीतर ही वाढती नकारात्मकता घातक आहे.

सरकारमधील विविध मंत्र्यांची वक्तव्ये पाहता राज्यात कधीही पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षीच्या लॉकडाऊनच्या कालावधीमधील परिस्थिती पाहता लोकांना पुन्हा एकदा त्याच नकारात्मक परिस्थितीशी सामना करावा लागणार आहे. मुख्यमंत्र्यांनी रविवारी जनतेशी संवाद साधताना आठ दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे. या आठ दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या कमी झाली नाही, तर पुन्हा एकदा लॉकडाऊन होईल. रोजगार जाईल. अर्थचक्र थांबले या चिंतेनेच अनेक जणांना धडकी भरली आहे. त्यामुळे आता सरकारने जनतेच्या मनातील ही नकारात्मकता दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. नव्या वर्षात नव्या उमेदीने कामाला लागण्याची तयारी सुरू असतानाच पुन्हा एकदा लॉकडाऊन झाले, तर लोकांना याच मानसिकतेशी सामना करावा लागणार आहे. सरकार सध्या ज्याप्रमाणे कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी मास्क, सोशल डिस्टन्सिंग आणि सॅनिटायझरचा वापर या त्रिसूत्रीचा वापर करण्याचा सल्ला देत आहे, त्याचप्रमाणे सरकारने स्वत:हूनच समाजातील सर्व घटकांचे प्रबोधन करण्याची गरज आहे. सोशल मीडियावरून कोणीतरी कसला तरी व्हिडीओ, माहिती अथवा अफवा पसरवतो आणि समाजात घबराहट पसरते. या प्रकारांना कुठेतरी आळा बसला पाहिजे. त्यासाठी अशा समाजमाध्यमांवरही नियंत्रण ठेवण्याची गरज आता वाटू लागली आहे.


लॉकडाऊनची चिंता

राज्यात पुन्हा कोरोनाचा संसर्ग वाढताना दिसत आहे. त्या पार्श्वभूमीवर नेमकी काय खबरदारी घ्यायची यासाठी सरकारने रविवारी एक बैठक बोलावली आहे. या बैठकीत तज्ज्ञांबरोबर अनेक मंत्री असणार आहेत. त्या बैठकीत पुढील दिशा ठरणार आहे, पण पुन्हा एकदा लॉकडाऊनचे सावट राज्यावर आहे असे आज वाटू लागले आहे. तसे झाले तर सामान्यांना आयुष्यातून उठायची वेळ येईल. यासाठी नागरिकांनी आता तरी सावध असले पाहिजे.


मुंबई, पुणे आणि विदर्भातील काही जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर पसरतोय. कोविड-१९ चा संसर्ग ग्रामीण भागात पसरत असल्याने राज्य सरकारची चिंता वाढली आहे. कोरोना संसर्गावर आळा घालण्यासाठी राज्य सरकार विदर्भातील अमरावती, अकोला आणि यवतमाळमध्ये एक दिवसाचा लॉकडाऊन तर काही निर्बंध लावण्यात आले आहेत. कुठे संचारबंदी जारी करण्यात आली आहे. वाशिम आणि वर्धा जिल्ह्यांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. मुंबईत गेल्या १२ फेब्रुवारीपासून ४,८९१ कोरोनाग्रस्त रुग्णांची नोंद झाली आहे. ही परिस्थिती का ओढवली तर त्याचे कारण म्हणजे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगमध्ये शिथिल पडलेली सरकारी यंत्रणा. कोविड-१९ हा संसर्गजन्य आजार आहे. एका व्यक्तीपासून दुसºया व्यक्तीमध्ये झपाट्याने पसरणारा. त्यामुळे कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील लोकांचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग महत्त्वाचं आहे. कोरोनाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य यंत्रणेकडून मोठ्या प्रमाणावर हायरिस्क व्यक्तींचं कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करण्यात आलं होतं. कोरोना रुग्णांच्या संपर्कातील हायरिस्क कॉन्टॅक्टना ट्रेस करणं फार महत्त्वाचं आहे. अमरावतीमध्ये १२ फेब्रुवारीपासून ३ हजार कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले आहेत, तर १८ फेब्रुवारीला अमरावती शहरात ५४२ रुग्ण आढळले. पूर्वी लोक सतर्क होते. नियम पाळायचे, मात्र आता लोक नियम पाळत नाहीत, हेदेखील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढण्याचं कारण आहे. याशिवाय लॉकडाऊन उघडल्याने राज्यात मोठ्या संख्येने लग्नसमारंभ होऊ लागलेत. लग्नात ५० लोकांना परवानगी असताना मोठ्या संख्येने लोकांची हजेरी दिसू लागली आहे.

लग्नसमारंभातील लोकांच्या मोठ्या संख्येने उपस्थितीवर निर्बंध घालण्यासाठी मुंबईसह इतर जिल्ह्यांत लग्नसमारंभांवर निर्बंध घालण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेने शहरातील मंगल कार्यालयांवर धाड टाकण्याची सूचना अधिकाºयांना दिली आहे. लग्नसमारंभाचे नियम मोडणारे आयोजक आणि व्यवस्थापनावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. ही स्वागतार्ह बाब आहे, पण नागरिक ही वेळ का येऊ देतात हा खरा प्रश्न आहे. राज्यात जानेवारी महिन्यात १४ हजारांपेक्षा जास्त ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. निवडणुकीसाठी ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर प्रचार झाला. लोक प्रचार, मतदान यासाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. शहरांमध्ये काम करणारे लोक मतदानासाठी ग्रामीण भागात गेले. प्रचार मोठ्या प्रमाणावर करण्यात आला. लोकांची सरमिसळ झाली. त्याचप्रमाणे विविध आंदोलने, सभा, राजकीय निवडीनंतर घेतलेल्या सभा यांमुळे गर्दी वाढली आणि त्यातून कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. आपल्याकडे कितीतरी मंत्री, आमदार यांना संसर्ग झाला आहे. हेच लोक स्टेजवर होते, त्यांच्या संपर्कात शेकडो लोक होते. हे पण कोरोनावाढीचे कारण असू शकते. नाना पटोलेंच्या निवडीनंतर काँग्रेसने जी ट्रॅक्टर रॅली काढली, सभा घेतली त्या स्टेजवर किती लोक होते, बाहेर उपस्थित किती कार्यकर्ते होते याचाही विचार केला पाहिजे. नेते, कार्यकर्ते आणि नागरिक सगळेच बेजबाबादार झाल्याने हा रोगाचा प्रसार वाढत आहे. त्यामुळे ही लॉकडाऊनची नवी चिंता आहे.


आणखी एक बाब म्हणजे रुग्णसंख्या वाढण्याचं खापर फक्त लोकल ट्रेनवर फोडून चालणार नाही. राजकीय नेते, पुढारी यांचे कार्यक्रम, मोठमोठ्या रॅली होत आहेत. लोकांना कोविड-१९ बाबत भीती राहिली नाही. त्यामुळे लोकल बंद करण्याचा आततायीपणा आता करू नये. लोकल प्रवासात प्रवासी बºयापैकी काळजी घेत आहेत, पण सभा-संमेलन आणि आंदोलन यावर कुठेतरी निर्बंध येण्याची गरज आहे. रस्त्यावरून चालताना अनेक लोकांचे मास्क हनुवटीवर, गळ्याभोवती लटकलेलं किंवा हातात असल्याचं पाहायला मिळतं. काही लोक मास्कशिवाय फिरताना आढळून येतात. हे चुकीचे आहे. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून राज्यात पुन्हा थंडी वाढली आहे. उत्तर भारतातील थंडीच्या लाटेमुळे राज्यात अनेक जिल्ह्यांत तापमान कमी झालेलं पाहायला मिळालं आहे. अवकाळी पावसाचाही काही परिणाम असू शकतो हे लक्षात घेतले पाहिजे. कोरोनाबाबत लोकांमध्ये आजही अनेक गैरसमज आहेत. त्यातील एक प्रमुख म्हणजे, कोरोना खरा नाहीच. कोरोना नाहीच, असा अपप्रचार मोठ्या प्रमाणात करण्यात येतोय. हा समज पसरणेही धोक्याचे आहे, पण यामुळे पुन्हा एकदा राज्यावर लॉकडाऊनचे सावट आहे. त्याचा फटका सामान्यांना बसणार आहे.

लॉकडाऊनच्या काळात घरात बसून राहावे लागल्यामुळे, रोजगार गेल्यामुळे, आर्थिक फटका बसल्यामुळे एक वर्ग अत्यंत आक्रमक झालेला आहे. त्यातच शाळा सुरू झाल्यामुळेही पुन्हा गर्दी वाढायला लागली आहे. रस्त्यावरच्या विक्रेत्यांची संख्या वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून रोजगार गेलेले लोक काहीतरी विकायला म्हणून रस्त्यावर बसलेले दिसतात. त्यांच्याभोवती जमणारी गर्दी, बाजारपेठेतील गर्दी ही सगळी फैलाव करण्याची कारणे ठरू शकतात. विशेष म्हणजे बिनधास्त मास्क न वापरता लोक हिंडताना दिसतात. आता मास्कशिवाय कोणी दिसले तर दंड आकारला जाणार आहे, पण त्यातून माणसांमध्ये सुधारणा होणार नाही. आपल्याला कायदेभंगाची चळवळ करून स्वातंत्र्य मिळाले, पण कायदे मोडायची सवय मात्र आपली गेली नाही. आपल्या राज्यातही आपणच कायदे मोडायचे हे फार मोठे दुर्दैव आहे. कायदे पालन करणारा माणूस म्हणजे मूर्ख ठरतो आहे, अशी अवस्था झाली आहे. ही मनोवृत्ती बदलण्याची गरज आहे.

संशयकल्लोळची धमाल


मराठी रंगभूमीला पावणेदोनशे वर्षांची परंपरा आहे. त्यातील काही नाटके ही चिरतरुण असतात. त्यापैकीच एक नाटक म्हणजे ‘संगीत संशयकल्लोळ’. किती संचात आणि किती कलाकारांनी हे नाटक केले याचा हिशोबच नाही, पण आजही तितकेच ते सुंदर वाटणारे नाटक आहे. अर्थात प्रत्येक संच आणि दिग्दर्शकांनी त्यात काही कालानुरूप बदल केले, पण मूळ संहितेला धक्का लागणार नाही याची काळजीही बºयापैकी घेतली गेली. त्यामुळे हे नाटक गेली १०५ वर्षं टिकून राहिले आहे. कालानुरूप नाटके बंद पडतात. एखादा कलाकार गेल्यावर काही नाटके बंद पडतात, पण सतत नवनव्या संचात येणारे हे एव्हरग्रीन असे नाटक आहे.

संगीत संशयकल्लोळ हे गोविंद बल्लाळ देवल यांनी १९ व्या शतकात लिहिलेले आणि एकविसाव्या शतकातही सुरू असलेले असे एक विनोदी नाटक आहे. २० आॅक्टोबर, १९१६ रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग गंधर्व नाटक मंडळीने केला होता. तत्पूर्वी या नाटकाचा पहिला गद्य प्रयोग १८९४ मध्ये तसबिरीचा घोटाळा ऊर्फ फाल्गुनरावाचा फार्स या नावाने झाला होता. तब्बल २२ वर्ष म्हणजे १९१६ पर्यंत या गद्य नाटकाचे सतत प्रयोग होत होते, मात्र त्यानंतर गंधर्व नाटक कंपनीने मूळ नाट्यसंहितेत थोडाफार बदल करून नाटकात ३० पदे घातली. ही बहुतेक सर्व गाणी देवलांनी रचली होती. देवल हे अण्णासाहेब किर्लोस्करांचे शिष्य होते आणि एक उत्कृष्ट तालीममास्तर, कवी आणि संगीताचे जाणकार होते. त्यामुळे त्यांनी संहितेला योग्य अशी पदे रचली होती. त्याकाळात ही सर्व गाणी पदे सादर होत असत आणि रात्र रात्र नाटके चालत असत, पण कालांतराने त्यातील ठराविक पदेच घेतली जाऊ लागली. आता तर मोजकीच तीन-चार पदे वापरली जातात.


‘संशयकल्लोळ’ या नाटकात अश्विनशेठ आणि रेवती हे या नाटकाचे नायक-नायिका आहेत. फाल्गुनराव आणि कृत्तिका या भूमिका विनोदी अंगाने जाणाºया पण नकारात्मक स्वरूपाच्या आहेत. नायक-नायिकेत गैरसमज करून देण्यामागे त्यांचा सहभाग आहे. याशिवाय अश्विनशेठचा मित्र वैशाखशेठ, रेवतीची आई मघा नायकीण, तसेच भादव्या, रोहिणी, आषाढ्या, स्वाती, तारका आदी दुय्यम पात्रेही नाटकात कथानकाच्या संदर्भात महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतात. त्यामुळे नाटकाच्या रंजकतेमध्ये अधिक भर पडली आहे. लेखकाने पुरुष पात्रांची नावे महिन्यांप्रमाणे, तर स्त्री पात्रांची नावे नक्षत्रांवरून ठेवली आहेत. फाल्गुनराव हा संशयी स्वभावाचा आहे. तो आपली बायको कृत्तिकावर संशय घेतो. तीही संशयग्रस्त आहे. या संशयाच्या जाळ्यात ते नकळत अश्विनशेठ-रेवती या नायक-नायिकेलाही ओढतात. ही गुंतागुंत शेवटी सर्व संशय फिटेपर्यंत वाढतच जाते आणि नाटक, बघणा‍ºयांची उत्सुकता ताणत ताणत अखेरपर्यंत मनोरंजक राहते. यात १९७० ते १९९० पर्यंत शरद तळवलकर यांनी फाल्गुनराव ही भूमिका दीर्घकाळ केली. या नाटकात शरद तळवलकरांचा विनोदी ढंगाने संवादफेक आणि सहगायक कलाकारांचे सुमधुर गायन याचीच जुगलबंदी असायची. शरद तळवलकरांच्या टायमिंगला दाद द्यायची का गाण्याला द्यायची असा प्रश्न पडायचा, कारण अनेक दिग्गज गायकांनी यात भूमिका केलेल्या आहेत. वसंतराव देशपांडे, रामदास कामत, प्रकाश घांग्रेकर, शरद जांभेकर अशा कितीतरी दिग्गजांनी यातील विविध पदांवर आपले नाव कोरले आहे.

बोलता बोलता गायचे आणि गाता गाता बोलायचे, हा देवल आणि किर्लोस्कर यांच्या संगीत नाटकांचा आत्मा ‘संशयकल्लोळ’मध्येही राखला गेला आहे. प्रशांत दामले यांनी २०१६ मध्ये हे नाटक पुन्हा नव्या संचात आणले होते. यात स्वत: राहुल देशपांडे यांनी भूमिका केली होती, पण अन्य विनोदी नाटकांत प्रेक्षकांच्या मनावर पकड घेणाºया प्रशांत दामले यांना यात फाल्गुनराव सापडला नाही. त्यात ‘गेला माधव कुणीकडे’मधील माधवच जास्त डोकावत होता किंवा प्रशांत दामलेची बोलण्याची लकबच जाणवत होती. शरद तळवलकर यांच्या फाल्गुनरावाची सर त्याला आली नाही हे मान्य करावे लागेल. राहुल देशपांडे यांनी संगीताची परंपरा जपली होती.


‘संगीत संशयकल्लोळ’मधील काही पदेही अजरामर आहेत. ती अजूनही रेडिओवर ऐकताना किंवा रेकॉर्ड लावून ऐकताना आनंद मिळतो. यात, कर हा करीं धरिला, चिन्मया सकल हृदया, धन्य आनंददिन पूर्ण मम, मजवरी तयांचें प्रेम, मृगनयना रसिक मोहिनी, संशय का मनि आला, सुकांत चंद्रानना पातली, ही बहु चपल वारांगना, हृदयि धरा हा बोध, ही गाणी कायम लक्षात राहणारीच आहेत. वेगवेगळ्या गायक कलाकारांनी ती सादर केली, पण प्रत्येकाची एकेका पदावर छाप आहे. यामध्ये सुकांत चंद्रानना हे पद प्रभाकर कारेकर हे आपल्या मेहफीलीत हमखास सादर करायचे. धन्य आनंद दिन या गाण्यावर शरद जांभेकर यांच्या लोभस आवाजाची मोहेर आहे, तर कर हा करि धरिला शुभांगे आणि मृगनयना रसिक मोहिनी ही गाणी वसंतराव देशपांडे यांनी सादर केल्यावर त्याला वन्स मोअर हमखास असायचाच. त्याचप्रमाणे ही बहु चपल वारांगना हे पद प्रकाश घांग्रेकर यांच्या आवाजात ऐकताना अत्यंत आनंद मिळायचा. तसाच आनंद हृदयी धरा बोध खरा हे गीत रामदास कामत म्हणायचे तेव्हा होत असे. वसंतराव देशपांडे आणि प्रभाकर कारेकरांनी यातील अनेक पदे लोकप्रिय केली आणि ‘संगीत संशयकल्लोळ’चा ठेवा मराठी संगीत रंगभूमीला अजरामर केला. राहुल देशपांडे हे पण मृगनयना रसिकमोहिनी हे अलीकडच्या काळात अप्रतिम सादर करतात. एका गाण्यातून दुसºया गाण्यात प्रकाश बदल करून ते घुसतात आणि त्यावेळी प्रेक्षकांची मिळणारी दाद आजही राहुल देशपांडे घेतात. त्यावेळी जाणवते की, हे नाटक किती एव्हरग्रीन आहे.

नानांच्या मागे काँग्रेसची फरफट

काँग्रेसला राज्यात चेहरा नसल्यामुळे एक आक्रमक चेहरा देण्यासाठी नाना पटोले यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदासाठी नेमणूक केली गेली. नेमणूक यासाठी कारण काँग्रेसमध्ये निवड होत नसते, तर नेमणुका होत असतात. त्यामुळे आक्रमक वागून काँग्रेस पक्ष चर्चेत राहण्यासाठी नाना पटोले यांना नेमले आहे. याचे कारण महाविकास आघाडीत असलेले अन्य दोन पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस कायम आक्रमक असतात. विरोधी पक्ष असलेला भारतीय जनता पक्ष हा कायम आक्रमक असतो. छोटा असला, तरी मनसे हाही आक्रमकपणे चर्चेत राहतो. या तुलनेत काँग्रेस एकदम मवाळ अशी दिसते. त्यामुळे ज्याप्रमाणे राष्ट्रवादीकडे छगन भुजबळ, अजित पवार, जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या मुलुखमैदान तोफा आहेत, तसे काँग्रेसमध्ये कोणीच नाही. सगळे मुखदुर्बळ नेते असल्याने नानांची नेमणूक या पदावर करण्यात आली. शिवसेनेची खिंड संजय राऊत, निलम गोºहे लढवत असतात. भाजपात देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, राम कदम हे सतत आक्रमक असतात. मनसेत स्वत: राज ठाकरे, संदीप देशपांडे हे आक्रमक असतात; पण काँग्रेसमध्ये सगळे हाताची घडी तोंडावर बोट असते. त्यामुळे हाताची घडी झाली, तर पक्ष शिल्लक राहणार नाही या भीतीने नानांना नेमले आहे.


आता आक्रमक म्हणून आपल्याला नेमले म्हटल्यावर काही तरी आक्रमण हे केलेच पाहिजे. त्यामुळे अमिताभ बच्चन, अक्षय कुमार यांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, अशी धमकी त्यांनी दिली. जोपर्यंत अमिताभ आणि अक्षय कुमार मोदी सरकारवर टीका करत नाहीत, तोपर्यंत महाराष्ट्रात त्यांचे चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, असे आव्हान त्यांनी दिले. आता ही काँग्रेसची संस्कृती नाही; पण नानांमुळे आता काँग्रेसची फरफट होणार आहे. तोडफोड करायला काँग्रेसचे नेते कार्यकर्ते बाहेर पडतील, अशी अपेक्षा आहे. मुळात काँग्रेसचे निष्ठावंत नेते आहेत ते बाळासाहेब थोरात, अशोकच चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण हे सगळे शांत संयमी नेते. त्यांचा तो स्वभाव नाही. या शांतपणालाच कंटाळून नारायण राणे यांनी काँग्रेसला राम राम ठोकला. कारण आक्रमकता असल्याशिवाय पक्ष शिल्लक राहणार नाही; पण त्यांचे कोणी ऐकले नाही. आता नानांचे हे जुने जाणते निष्ठावान नेते ऐकणार का? नानांच्या मागे काँग्रेसची फरफट होणार का हे पहावे लागेल.

नानांनी अमिताभ व अक्षय कुमार यांचे चित्रपट प्रदर्शित करू देणार नाही, अशी धमकी देताच २४ तासांच्या आत अमिताभ आणि अक्षय कुमार यांचे चित्रपट केव्हा प्रदर्शित होणार याच्या तारखाच समोर आल्या. नागराज मंजुळे यांनी जून महिन्यात आपला झुंड हा चित्रपट प्रदर्शित होणार असल्याचे जाहीर केले. झुंडमध्ये अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत आहे. मग आता जर तो चित्रपट प्रदर्शित होईपर्यंत अमिताभने मोदी सरकारवर कडाडून टीका केली नाही, मोदींवर टीका करणारे ट्विट केले नाही, काँग्रेसची स्क्रीप्ट बोलली नाही, तर काँग्रेस हा चित्रपट बंद पाडणार. मग नानांच्या बरोबर रस्त्यावर उतरून राडा करायला अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण असे शांत संयमी सहिष्णू नेते येतील का? हातात काठ्या, दगड घेऊन पोस्टर फाडायला अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात आले आहेत हे किती छान चित्र असेल. पण ते उतरणार का रस्त्यावर? ते जर दंगली करायला उतरले, तर ती काँग्रेसची नानांच्या मागे झालेली फरफटच असेल.


नाना पटोले यांना कोणी निष्ठावंत म्हणू शकत नाही, कारण ते काँग्रेस सोडून भाजपात गेले होते. बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण हे खानदानी आणि परंपरेने आलेले निष्ठावंत आहेत. तरीही केवळ आक्रमकता आणि चर्चेत राहिले पाहिजे यासाठी काँग्रेसने नानांची प्रदेशाध्यक्षपदावर नेमणूक केली आहे; पण नानांची करणी आणि कथनी यात फरक असतो.

नाना पटोले यांनी त्यांच्या कुटुंबातील एकाला कोरोनाची लागण झाल्याने काही दिवस आयसोलेशनमध्ये राहणार असल्याचे स्पष्ट केले होते; मात्र त्यानंतरही शुक्रवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जुहू येथील आयोजित कार्यक्रमात भाग घेतला होता. नाना पटोले यांनी स्वत: ट्विट करून त्यांचा कार्यक्रमातील फोटोही शेअर केला होता. कोरोना बाधितांच्या सान्निध्यात राहिल्यामुळे विलगीकरणात रहायचे सोडून सुपर स्प्रेडर होण्यासाठी ते कशासाठी कार्यक्रमाला गेले? केवळ चर्चेसाठी. पण आज राज्यात कोरोनाचा फैलाव पुन्हा वाढत असताना त्यांचे हे कामही किती धोकादायक आहे? याचा अर्थ नानांच्या पाठीमागे काँग्रेसची फरफट होणार असेच दिसते. नानांनी कामापेक्षा आपले उपद्रवमूल्य किती आहे हे दाखवण्यावर भर दिलेला आहे, हे यातून स्पष्ट होते आहे. साहजिकच काँग्रेस आपले उपद्रवमूल्य दाखवून मोठी होणार का?


काँग्रेस संस्कृतीत रूजलेल्यांना हे कधीच मान्य होणार नाही. त्यामुळे काँग्रेसमध्ये आणखी गटबाजी उफाळून येईल. त्याला जातीचे लेबल चिकटेल, कारण नाना पटोले हे ओबीसी नेते आहेत. प्रदेशाध्यक्षपद ओबीसींकडे देण्याची मागणी होतीच. त्यात जर या आक्रमकपणाला अशोच चव्हाण, थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांनी साथ दिली नाही, तर मराठा लॉबी सहकार्य करत नाही, असा कांगावा नानांना करावा लागेल. त्यामुळे एकूणच काँग्रेसची फरफट होणार हे नक्की.

भुईला भार


जयंता मुंबईत कामाला होता. शिक्षण झाल्यापासून गाव सोडलं आणि मुंबईत नोकरीला लागला होता. इथेच त्याचे लग्न झाले होते. मुलंबाळं, कुटुंब आता मुंबईकर म्हणूनच राहत होते. वर्षातून एकदा गावाकडच्या जत्रेला जायचं नाही, तर कोणाच्या लग्न कार्याला जायचं एवढाच गावाशी त्याचा संबंध होता.

गावी म्हातारे आई-वडील होते, घरदार शेतीवाडी होती. वर्षाकाठी कधी गावाला गेलं, तर घरची ज्वारी म्हणून एखादं बाचकं एसटीत टाकून आणण्यापलीकडे जयंता आणि त्याच्या कुटुंबाची कसली अपेक्षाही नव्हती. जत्रेला दिवाळीला गावाकडे मदत पाठवायची म्हणून हमखास सगळ्यांना कपडे, काही भेटवस्तू, आर्थिक मदत केली जायची. एक मुलगा मुंबईत सुखी आहे आणि एक गावी शेतीवाडी सांभाळून उदरनिर्वाह करतो आहे यात आई-बापाला आनंद होता.


शेती करायची म्हणजे कायमच पैशांची टंचाई असायची. दाणापाणी मिळत असलं, तरी हातात रोख पैसा तसा थोडाच असायचा. मोलमजुरी, खतपाण्याला वेळोवेळी जयंता पैसे पाठवायचा. त्यामुळे कुटुंबाचं कसं छान चालायचं; पण मार्च महिना उजाडला आणि एक फार मोठं संकट आलं. जयंताची नोकरी सुटली. कंपनीनं टाळेबंदी केली. परप्रांतातले लोक निघून गेले तसाच आपल्या कुटुंबाला घेऊन दोन मुलांबरोबर जयंता गावी आला. अचानक जयंता बायको मुलांसह आल्याने सर्वांना आनंद झाला; पण हा आनंद काही फार काळ टिकला नाही.

कंपनी सुरू होण्याची चिन्ह नाहीत. लॉकडाऊन वाढत चालला आहे. जयंताचा पगारही येणार नाही, त्यामुळे आता तो आणि त्याचे कुटुंब खायला कहार आणि भुईला भार होणार याची चिंता भावाला लागली. शेवटी भावाभावात उभा दावा असतोच. आई जन्म देताना म्हणते मला दुसरा मुलगा झाला, तर भाऊ म्हणतो माझा वैरी जन्माला आला. तसंच हे घडत होतं. चार आठ दिवस घरात बसून आनंदात गेल्यानंतर जयंता भावाच्या पाठोपाठ शेतात कामाला जायला निघाला. तशी वहिनी फणफणली. ‘तुमा शेरातल्या लोकांना काय येनार हाय शेतातली कामं?’. त्यावर जयंता सहजपणे म्हणाला, ‘वैनी, अगं शेतकºयाचा पोरगा हाय मी. लानपणी केलंय न्हवं शेतात काम? ’


हा संवाद चालू असताना जयंताचा मोठा भाऊ म्हणाला, ‘पर जयंता, आरं त्येला कित्येक वर्स झाली? आरं पुलाखालून किती पानी गेलंय ठाव हाय का? आता समदं बदललंय. तू नगं शेतात येऊ.’

सुरुवातीला जयंताला वाटलं आपण काम करू नये, मातीत राबू नये म्हणून भाऊ प्रेमानं सांगतोय. पण नंतर त्याला कळलं की, समदं बदललंय. शेतकºयाची मुलं जेव्हा मुंबईत कामाला येतात आणि कोणत्याही संकटानंतर त्यांना परत गावी जायची वेळ येते, तेव्हा परतीचा रस्ता बंदच झालेला असतो. अगदी असंच चाळीस वर्षांपूर्वी झालं होतं. गिरणी कामगारांचा संप सुरू झाला. अनेकांच्या नोकºया गेल्या. काम नाही म्हणून गावाकडं गेले, तर भावांनी जमिनी आपल्या नावावर केल्या होत्या. गावात फक्त राहायला छप्पर कसंबसं मिळालं; पण जमिनीचा हक्क गेला होता. गवंड्याच्या हाताखाली मोलमजुरीला जाण्याशिवाय अनेकांजवळ पर्याय नव्हता. जयंताची परिस्थिती तशीच झाली.


शहरात वाढत असलेली मुलं गावी गेल्यावर कोमजल्यासारखी झाली. बायको अवघडल्यासारखी वावरू लागली. हळहळू आनंद कमी आणि हेटाळणी, टोमणे मारणे सुरू झाले. आम्ही बगा कसं शेतात राबतोय, म्हनून सर्वांना खायला मिळतंय. बाकीचे कसे खायला कहार आणि भुईला भार झालेत. हे भुईला भार होण्याचे दुर्भाग्य अनेक लोकांवर या कोरोनामुळं आलं होतं. काही जण अपमान गिळत जगत होते, आज कंपनी सुरू होईल, उद्या मुंबईहून बोलावणं येईल म्हणून वाट पाहत अपमान पचवत जगत होते. तर काही जण अपमान सहन न झाल्याने मरणाला कवटाळत होते. मुंबईतला गर्दीचा भार कमी झाला होता; पण शेतीवर अवलंबून राहणारी ही तोंडे वाढल्याने हा झालेला भुईचा भार अस्वस्थ करणारा होता. अपमान गिळत गावात राहणं किंवा आत्महत्या करणं हे दोनच पर्याय जयंताला दिसत होते. बायका मुलांचं सगळं स्वप्न, भवितव्य अंधारात लोटलं गेलं होतं. आई-बाप आपले म्हणायचे; पण जयंता शहरात गेला आणि आता इकडं परत येणार नाही म्हणून बापानं सगळी जमीन दुसºया मुलाच्या नावावर करून टाकली होती. त्यामुळे आई-बापही भुईला भार म्हणून जगत असताना जयंताला काही पर्यायच सापडत नव्हता. असे अनेक जयंता कोरोनाच्या काळात उध्वस्तपणे लॉकडाऊन होऊन पडले होते. गावात कुठंही कामधंदा मिळणं शक्य नव्हतं. मुंबईतील राहणीमान आणि गावातील राहणीमान जुळवून घेणं मुलांना अवघड जात होतं. लहान असली, तरी मुलं समजूतदार होती, हीच जमेची बाजू होती. एरवी शहरात लाडाकोडात वाढलेली मुलं आता हेटाळणी सहन करत होती. पाहिजे तेव्हा मॅगी, पिझ्झा, बर्गर मागवणारी मुलं आत काकू बनवत असलेला शेवयांचा उपमाही का कू न करता खात होती. खरंच या लहान मुलांमध्ये कुठून आला हा समजूतदारपणा याचेच जयंताला आश्चर्य वाटत होते. आश्रीतासारखा भावाकडं राहतो आहे ही भावना आता मनात रूजली होती. आपलं गाव, आपली शेतीवाडी आता काही राहिली नाही. आता नाईलाजाने भुईला भार म्हणूनच इथं जगायचं आहे हे त्याच्या लक्षात आलं, आभाळाकडं बघून डोळ्यात आलेलं पाणी टिपलं. शहरातून गावाकडं आपल्यासारखाच आलेला दुसरा कुणी भेटला आणि त्याचे आणि आपले दु:ख सारखेच आहे हे समजल्यावर जरा हलकं वाटायचं. चला आपण एकटेच हे सहन करत नाही, तर अशी अवस्था अनेकांची आहे यातच समाधान मानून दिवस काढावे लागत होते.


मालिकांमधील महिला पोलीस अधिकारी


झी मराठी वाहिनीवर सध्या दोन रहस्यमय मालिका सुरू आहेत. एक ‘देवमाणूस’ आणि दुसरी ‘काय घडलं त्या रात्री’. या दोन्ही मालिकांमधील खून, रहस्याचा तपास करण्यासाठी महिला पोलीस अधिकाºयांची नेमणूक केलेली आहे, पण यामधून फार वेगळा संदेश जात आहे हे मालिका निर्माते, दिग्दर्शक, लेखक विसरत आहेत. मालिकांमधील महिला पोलीस अधिकारी या दोन्ही मालिकांत अत्यंत एकसूरी दाखवल्या आहेत.

अगोदर या दोन्ही मालिकांतील महिला पोलीस अधिकाºयांची साम्य पहायला हवीत. ‘काय घडलं त्या रात्री’ या मालिकेत रेवती ही पोलीस अधिकारी आहे. तीही अचानक तपासासाठी येते आणि आधीच्या अधिकाºयाकडचा तपास ती आपल्याकडे घेते. तोच प्रकार ‘देवमाणूस’मध्ये दिसतो. ‘देवमाणूस’मध्ये दिव्यासिंग नावाची पोलीस अधिकारी येते आणि ती तपासाची सूत्रं आपल्या हातात घेते. या दोन्ही महिला पोलीस अधिकारी अत्यंत सुंदर दाखवल्या आहेत. त्यांच्या सौंदर्यावर सगळे खूश होताना दाखवले आहेत. ‘देवमाणूस’मध्ये तर अतिरेकच दाखवला आहे, पण दिग्दर्शक हे विसरत आहेत की त्यात कर्तबगार अधिकारी दाखवणे आवश्यक आहे, सुंदर नाही. आणखी एक गोष्ट म्हणजे या दोन्ही महिला पोलीस अधिकाºयांना एक मुलगी दाखवली आहे. मुलीचे सगळे करून या बायका ड्युटी करताना दाखवले आहे. विशेष म्हणजे या दोन्ही महिला पोलीस अधिकारी, एक मुलगी पदरात किंवा पँटच्या खिशात असूनही घटस्फोटित आहेत. मुलींची कस्टडी आपल्याकडे ठेवून नवºयापासून वेगळ्या झालेल्या आहेत. यातून नक्की काय दाखवायचे आहे?


यातून एकच संदेश जातो की, महिला पोलीस खात्यात भरती झाल्या की त्या संसार करू शकत नाहीत. घरातही त्या आपला पोलिसी खाक्या दाखवतात आणि त्यामुळे कायदे कानून माहिती असल्याने त्या सहजपणे घटस्फोट मिळवून वेगळ्या होतात. असा जर संदेश या मालिकांमधून नकळत दिला असेल, तर महिला पोलीस अधिकाºयांशी कोणी लग्न करायला तयार होईल का? त्या चांगला संसार करून, घर सांभाळून आपल्या हुशारीने तपास करत आहेत हे दाखवले असते, तर काय फरक पडला असता? पण नवºयाबाबत त्या जितक्या कठोर दिसतात तेवढ्या गुन्हेगारांबाबत दिसत नाहीत असेच दिसते.

‘काय घडलं त्या रात्री’मध्ये तर घटस्फोट झालेला आहे, पण रेवती आणि तिचा नवरा एकमेकांना भेटतात. तो तिच्या विरोधातील केस घेतो आणि मुलीशीही भेटत राहतो. ‘देवमाणूस’मध्ये अजून तसे काही दाखवले नाही, पण ती पहिल्याच भेटीत डॉक्टरला सांगून टाकते की मी डिव्होर्सी आहे. डिव्होर्सीच पोलीस महिला अधिकारी का दाखवल्या आहेत हे न उलगडणारे कोडे आहे. लग्न न झालेली तरुणी दाखवली असती, किंवा वयस्कर किरण बेदी यांच्याप्रमाणे दाखवली असती, तर काय फरक पडला असता? पण यातून चुकीचा संदेश जात आहे हे नक्की.


याशिवाय या महिला अधिकारी आपल्या हाताखालच्या पोलीस कर्मचाºयांना तुच्छ लेखतात, विश्वासात न घेता काम करतात, डॉमिनेट करतात, असे सातत्याने दिसून येत आहे. प्रत्येक ठिकाणीच कामावर असताना मग कोणतेही क्षेत्र असो राजकारण, एकमेकांना अडचणीत आणण्याचे प्रकार घडत असतात, पण पोलिसांमध्ये एकमेकांवर कुरघोडी करण्याचे, तपासात अडथळे आणण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात चालतात असे या मालिकांमधून दाखवले आहे. विशेषत: ‘काय घडलं त्या रात्री’ या मालिकेत आयएसपी रेवती बोरकर काय करणार आहे याची इत्यंभूत माहिती रमाकांत ढवळे हा पोलीस राजनला देत असतो. पोलीस आपल्या तपासाची दिशा गुंडांना कळवतात आणि तपासकार्यात अडथळा आणतात. गुंडांना, राजकारण्यांना सामील असतात आणि त्यांच्या तालावर नाचतात असे स्पष्टपणे दाखवले आहे. अर्थात हे काही जुने नाही. आजवर निर्माण झालेल्या लाखो चित्रपटांतील ७० टक्के चित्रपटांतून हे आपण नेहमीच पाहत आलो आहे, पण त्यात प्रामाणिक अधिकाºयांपेक्षा जास्त अधिकारी भ्रष्ट असतात हे दाखवण्याचे नेमके कारण काय असते हे समजत नाही. रेवती बोरकर आपल्या सहकाºयांवर विश्वास ठेवत नाही. जे विश्वासात घेऊन सांगते ते अगोदरच जगजाहीर होते. यातून पोलिसांची प्रतिमा किती मलिन केली जात आहे हे लक्षात घेतले पाहिजे.

तोच प्रकार ‘देवमाणूस’मध्ये केलेला दिसतो. दिव्यासिंगपण गावातील पोलिसांच्या तपासावर विश्वास ठेवत नाही. आल्या आल्या दुसºया दिवशी किंबहुना ती बाहेरगावी असताना तिला या खुनांच्या मालिकेची इतकी छान कल्पना आहे की तिथे असलेल्या पोलिसांना नाही. हा जादूचा प्रयोग वाटतो. म्हणजे ‘काय घडलं त्या रात्री’मध्ये मीडियामुळे, वृत्तवाहिन्यांमुळे पोलिसांवर दबाव येतो, सिद्धांत छाया हा सेलिब्रिटी असल्याने त्याचे चाहते लाखो आहेत. साहजिकच त्याच्या आत्महत्येची बातमी होते, पण ‘देवमाणूस’मध्ये झालेल्या कोणत्याही खुनाची कुठेही वाच्यता झालेली नसताना, कोणाचाही खून झाल्याचे निष्पन्न झालेले नसताना, त्याची कुठेही बातमी आलेली दाखवली नसताना बाहेरच्या अधिकाºयांची तपासासाठी नेमणूक करण्याची मागणी कोण करते? हा तपास तिकडे कसा जातो हे अनाकलनीय आहे. या मालिकेत दिव्यासिंगची एण्ट्रीही दिव्यच दाखवली आहे. गावात गाडी घेऊन येते, गाडी पंक्चर होते. ती स्वत: आपल्या ताकदीने कोणाही पुरुषाच्या मदतीशिवाय स्टेफनी चेंज करते. मग दुसºया दिवशी तोकड्या कपड्यांत जॉगिंगला संपूर्ण गावभरातून पळते. सगळं गाव तिला पाहण्यासाठी आतूर होतो. ती पोलीसच्या वेशात कार्यालयात एण्ट्री करते, पण तिच्या मागावर अख्खा गाव असताना ती पोलीस अधिकारी आहे हे कोणालाच समजत नाही. किती पोरकटपणा आहे ना हा? ती तपासासाठी गाडीतून हिंडते आहे, पोलिसांबरोबर आहे. हे उघडपणे ती करत असताना गावात फक्त चर्चा काय, तर कोणीतरी नवीन देखणी बाई गावात आली आहे. ती सर्वांना चाळवती आहे. किती फालतूपणा आहे हा? ती पोलीस अधिकारी आहे हे कोणाच्याच लक्षात आले नाही, ती उघडपणे हिंडत असतानाही, हा विनोदच म्हणावा लागेल.


पण मालिकांमधून दाखवण्यात आलेले महिला पोलीस अधिकारी म्हणजे महिलांचे, पोलिसांचे अवमूल्यन करणारे दाखवले जात आहे हे नक्की. त्यामुळे फार चुकीचा संदेश जात आहे याचे भान राखायला पाहिजे. ‘काय घडलं त्या रात्री’मध्ये मानसी साळवीने पोलीस अधिकाºयाची भूमिका केलेली आहे. तर ‘देवमाणूस’मध्ये नेहा खान ही भूमिका करत आहे.

बुडत्याचा पाय खोलात

बुडत्याचा पाय खोलात म्हणतात त्याप्रमाणे काँग्रेसची अवस्था झाली आहे. एकीकडे पक्षाध्यक्ष पदाचा निर्णय होणे दूर, तर दुसरीकडे पक्षातून बाहेर पडणाºयांची संख्या वाढत आहे. काँग्रेसचा दक्षिण भारतातील एक बालेकिल्ला नुकताच ढासळला आहे. त्यामुळे आणखी खोलात काँग्रेसचे पाय चालले आहेत. पुद्दुचेरीमधील काँग्रेस-द्रमुक आघाडीचे सरकार अल्पमतात गेले. काही दिवसांपूर्वी सरकार पक्षातील दोघा आमदारांनी राजीनामे दिले होते आणि त्यानंतर आणखी एकाने व लागोपाठ मंगळवारी दुस‍ºयाने राजीनामा दिल्याने चार जण साथ सोडून गेल्याने मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांचे सरकार जवळजवळ कोसळल्यात जमा आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी बुधवारीच पुद्दुचेरीच्या दौ‍ºयावर त्यासाठी आले आहेत, पण ही परिस्थिती सावरणे त्यांच्या हातात नाही. त्यांच्या भेटीच्या आदल्या दिवशीच तिथले त्यांचे सरकार अल्पमतात येणे हे नामुष्कीजनक आहे, परंतु राजीनामा देणा‍ºयांपैकी दोघे जण भारतीय जनता पक्षात सामील झाले आहेत. त्यामुळे या सगळ्या राजीनामानाट्याचे सूत्रधार कोण आहेत, असा प्रश्न निर्माण झाला आहे. भाजपला एकीकडे दक्षिणेत शिरकाव करायचा आहे. लवकरच तामिळनाडूच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे तशी वातावरण निर्मिती करायला ही परिस्थिती चांगली आहे. दक्षिणेत खरं तर तिथल्या पक्षांशिवाय कोणाला फारशी संधी नसते. काँग्रेसलाही तिथे पाय रुजवायला खूप काळ लागला होता, पण त्यातल्या त्यात पुद्दुचेरीत पाय ठेवणे जमले होते, पण ते पायही उखडून टाकण्याचे काम सध्या होत आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत इथे काय होणार हे स्पष्ट दिसत आहे.


भारतीय जनता पक्षाने आपले विस्तारवादी धोरण काही लपवून ठेवलेले नाही. जास्तीत जास्त राज्ये आपल्या पक्षाच्या सत्तेखाली आणण्यासाठी भाजपचा आटापिटा चालला आहे. सध्या पश्‍िचम बंगालवर त्या पक्षाने लक्ष केंद्रित केलेले आहेच, दक्षिण भारतामध्ये आपले अस्तित्व निर्माण करण्याचाही जोरदार प्रयत्न भाजपने गेल्या काही काळापासून चालवलेला आहे. पुद्दुचेरी हा छोटासा संघ प्रदेश, परंतु तामिळनाडूला जोडून तो असल्याने त्या राज्यातील निवडणुकांबरोबरच पुद्दुचेरीतही निवडणुका होणार आहेत. त्यामुळे भाजपने छोट्याशा पुद्दुचेरीमध्येही चंचुप्रवेश करण्यावर लक्ष केंद्रित केलेले दिसते. अशाच प्रकारे ईशान्येतील विरोधकांची सर्व सरकारे भारतीय जनता पक्षाने बंडखोरी घडवून आणून आपल्या अंमलाखाली आणली आहेत. परिणामी मेघालयात एनपीपीसोबत, नागालँडमध्ये एनडीपीपीसोबत, सिक्कीममध्ये एसकेएमसोबत, त्रिपुरामध्ये आयपीएफटीसोबत अशा प्रकारच्या आघाड्या करून तेथे भाजप सत्तेत सामील आहे. आसाम, अरुणाचल आणि मणिपूरमध्ये तर पक्षाची सरकारे आहेतच. त्यामुळे पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूत शिरकाव करणे हे भाजपचे धोरण आहे. त्या धोरणाचा हा एक भाग आहे, पण यामध्ये तेथील मुख्य पक्ष मागे जाण्याऐवजी काँग्रेसला फटका बसत आहे. प. बंगालमध्ये तृणमूलपेक्षा काँग्रेस संपणार आहे तोच प्रकार पुद्दुचेरी आणि तामिळनाडूत होणार हे दिसते आहे. त्यामुळे भाजप हा काँग्रेसला गिळंकृत करून मोठा होणारा पक्ष आहे.

छोट्या छोट्या राज्यांमध्ये, संघ प्रदेशांमध्ये आधी तिथल्या प्रादेशिक पक्षाशी हातमिळवणी करायची आणि नंतर तो पक्ष संपवून स्वत:चा विस्तार करायचा ही भाजपची चाल फार जुनी आहे. गोव्यामध्ये मगो पक्षाला संपवून भाजपने असाच चंचुप्रवेश केला होता हेही सर्वज्ञात आहेच. त्यामुळे हीच नीती सर्वत्र अवलंबिण्याचे सत्र आजही सुरू दिसते. सध्या लक्ष केंद्रित केलेल्या पश्‍िचम बंगालमध्येदेखील भाजपने तृणमूल काँग्रेसमधील एकेका रथी-महारथीला आपल्याकडे वळवून घ्यायला, राजीनामे द्यायला लावायला सुरुवात केलेली आहे. भाजपचे मिशन बंगाल यावेळी जोरात आहे. यंदाच निवडणूक होणार असलेल्या तामिळनाडूमध्येदेखील भाजपने आक्रमक पावले टाकायला सुरुवात केलेली आहे. त्यामुळे शेजारच्या छोट्याशा पुद्दुचेरीतही निवडणुकीच्या तोंडावर बंडखोरी झाल्याने भाजपच्या ते पथ्थ्यावरच पडणार आहे. तितकाच तो काँग्रेसला आणखी गाळात घालणारा ठरणार आहे.


राहुल यांच्या भेटीच्या आदल्या दिवशीच त्यांचे तेथील सरकार अल्पमतात गेल्याने त्यांच्यासाठी अनवस्था प्रसंग तेथे ओढवला आहे. पुद्दुचेरीच्या राज्यपालपदी असलेल्या किरण बेदी तर भाजपच्या हस्तक असल्यागतच वावरत आल्या आहेत. त्यांनी मध्यंतरी तेथे भाजपच्या तीन आमदारांना नियुक्त करून मताधिकारही दिले आहेत. त्यामुळे त्यांची उचलबांगडी होताना दिसत आहे. भाजपचे नेते जे राज्यपाल म्हणून जातात ते पक्षप्रसार करतात काय, असा प्रश्न पडतो.

भाजपची विस्तारवादी पावले देशभरामध्ये पडत असताना महाराष्ट्र, पंजाब, केरळ, पश्‍िचम बंगाल, दिल्ली, उडिशा, राजस्थान, छत्तीसगढ अशी काही राज्ये अजूनही विरोधी पक्षांचे झेंडे फडकावीत उभी आहेत. त्यातील काही राज्यांतही सत्तांतरे घडवून आणण्याचे प्रयत्न झाले, परंतु ती सरकारने पुरून उरली आहेत. अर्थात आज भाजपची केंद्रात स्वबळावरची भक्कम सत्ता आहे. काँग्रेस जेव्हा केंद्रात सत्तेवर होती, तेव्हाही आपल्या एकाधिकारशाहीच्या बळावर सर्व राज्यांमध्ये बंडाळ्या, लाथाळ्या घडवून आणून तेथे आपली सरकारे प्रस्थापित करण्यात काँग्रेसची मंडळीही वाकबगार होती. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे दिसते. एकमेकांना गिळंकृत करून संपवायचे आणि मोठे व्हायचे हे धोरण या दोन्ही पक्षांचे आहे, पण आज तरी काँग्रेसपुढे अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होताना दिसतो आहे. त्यात पुद्दुचेरीमुळे ‘बुडत्याचा पाय खोलात’ अशी अवस्था झालेली दिसते. छोटी छोटी राज्ये मिळवण्यात भाजपने जी जागरूकता दाखवली ती त्यांना महाराष्ट्रात दाखवता आलेली नाही हेही न उलगडणारे कोडे आहे, पण भाजपची पक्षवाढ ही फोडाफोडीतून होताना दिसते आहे. नवे कार्यकर्ते घडवण्यापेक्षा रेडिमेड नेतृत्व आयात करणे हाच त्यांचा अजेंडा पुन्हा पुन्हा दिसत आहे.

पडद्यावरचे छत्रपती शिवराय


छत्रपती शिवाजी महाराज आणि मराठी साम्राज्य उभे राहत असताना घडणाºया इतिहासातील कथांवर अनेक चित्रपट महाराष्ट्रात आजवर घडून गेले. किंबहुना मराठी माणसांचे असणारे शिवप्रेम आणि महाराजांविषयी असलेल्या आदरामुळे हे चित्रपट भरपूर चालणार याची खात्रीच असल्यामुळे गेल्या साठ वर्षांत अनेक मराठी चित्रपट यावर येऊन गेले. त्यामध्ये छत्रपतींची भूमिका साकारणारे अनेक कलाकार होऊन गेले. आजही स्वराज्यरक्षक संभाजीराजे, जिजाऊंवरील मालिका गाजताना दिसत आहे. त्यातूनही आपल्याला महाराजांचे दर्शन घडले आहे. यासाठी आजवर कोणी कोणी महाराजांच्या भूमिका केल्या आणि प्रेक्षकांना भारावून टाकले त्यावर नजर मारतानाही आपल्याला आनंद झाल्याशिवाय राहात नाही.

पौराणिक चित्रपटांतील देवदेवतांची भूमिका करणारे कलाकार जेव्हा वास्तवात दिसतात तेव्हा देव समजून त्यांच्या पाया पडणारे भोळे प्रेक्षक असंख्य असतात. किंबहुना त्या भूमिकेतून बाहेर पडणेही त्या कलाकारांना सहज शक्य होत नाही. त्याचप्रमाणे छत्रपतींची भूमिका पडद्यावर साकारणाºया कलाकारांना पाहून मनात अभिमान आणि शौर्याची भावना उभी राहते. आपल्याकडे भालजी पेंढारकरांनी छत्रपतींवर अनेक चित्रपट बनवले. या चित्रपटांमधून काम करणाºयांमध्ये आणि छत्रपतींची भूमिका साकारणाºयांमध्ये चंद्रकांत मांढरे आणि सूर्यकांत मांढरे यांचा वाटा मोठा आहे. इतका मोठा आहे की, महाराज म्हटल्यावर चंद्रकांत, सूर्यकांत यांपैकीच एक चेहरा डोळ्यासमोर येतो. अनेक ठिकाणी महाराजांचे फोटो, चित्र, पोस्टर्स जेव्हा पहायला मिळतात तेव्हा ते फोटो महाराजांचे नाही तर चंद्रकांत, सूर्यकांत यांच्यापैकी कोणाचा तरी असतो हे चाणाक्ष रसिकांच्या सहज लक्षात येते, पण महाराजांच्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाने या कलाकारांना केवढी लोकप्रियता मिळवून दिली हे पण आश्चर्य म्हणावे लागेल.


भालजी पेंढारकर यांच्या चित्रपटांमधून या दोघांनी आलटूनपालटून केलेल्या महाराजांच्या भूमिका असल्या तरी त्या चित्रपटांची नावे लक्षात घेतली पाहिजेत. भारताला स्वातंत्र्य मिळाले होते. गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त झाल्याच्या भावनेचा व स्वातंत्र्याचा दिव्य संदेश भालजींनी आपल्या चित्रपटांतून दिला. ‘बहिर्जी नाईक’, ‘नेताजी पालकर’, ‘मोहित्यांची मंजुळा’ यांतील संवादांमधून भालजींनी दुबळेपणा व लाचारीविरुद्ध शाब्दिक आसूड ओढले. स्वातंत्र्य मिळाले तरी सुराज्य निर्माण करण्यासाठी त्याग, निष्ठा, औदार्य व संयमी असा खंबीरपणा आणि आत्मविश्वास असलेली तरुण पिढी तयार व्हावी यासाठी त्यांनी समृद्ध आशयासह कला व तंत्र या दोन्ही दृष्टिकोनातून उत्कृष्ट अशा चित्रपटांची निर्मिती केली. यामागचा उद्देश छत्रपती शिवरायांना अभिप्रेत असलेले सुराज्य येणे हाच होता.

हे सगळे चित्रपट १९६० च्या दशकापर्यंत निर्माण झालेले होते. कृष्णधवल असे होते. फक्त ‘गनिमी कावा’ हा एकमेव भालजी पेंढारकरांनी निर्माण केलेला रंगीत चित्रपट होता. याशिवाय ‘ती पावनखिंड’, ‘राजा शिवछत्रपती‘, ‘सर्जा’, ‘बाल शिवाजी’ असे अनेक चित्रपट नंतरच्या काळात निर्माण झाले. त्यातून वेगवेगळ्या कलाकारांनी महाराजांची भूमिका सादर केलेली दिसून येते. चंद्रकांत मांढरे आणि सूर्यकांत मांढरे यांच्यानंतर महाराजांची भूमिका रंगीत चित्रपटाद्वारे ‘राजा शिवछत्रपती’मधून श्रीराम गोजमगुंडे या कलाकाराने साकारली होती. या चित्रपटालाही तुफान यश मिळाले होते. १९७५ च्या सुमारास आलेल्या या चित्रपटात मराठी, हिंदी अशी सरमिसळ कलाकारांची जंत्रीच होती. श्रीराम गोजमगुंडे हे रंगीत चित्रपटातील पहिले शिवाजी महाराज साकारणारे कलाकार. यात अनेक दिग्गज कलाकार होते. स्मिता पाटील, इफ्तेकार, विजू खोटे अशा कलाकारांना घेऊन छत्रपतींची रणनीती चांगल्या प्रकारे दाखवण्याचे काम या चित्रपटातून केले होते.


१९८१ च्या दरम्यान ‘बाल शिवाजी’ हा चित्रपट आला होता. या चित्रपटात बाल शिवाजीची भूमिका आनंद जोशी या कलाकाराने साकारली होती. मराठी चित्रपटसृष्टीत सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात कौटुंबिक चित्रपटातून काम करणारा देखणा कलाकार म्हणजे रवींद्र महाजनी. कोल्हापूरच्या या कलाकाराने १९८६ च्या सुमारास रमेश देव यांनी निर्माण केलेल्या ‘सर्जा’ या चित्रपटात महाराजांची भूमिका साकारली होती. त्यानंतर दहा वर्षांपूर्वी सध्याच्या परिस्थितीवर आधारित असलेल्या ‘मी शिवाजीराजे भोसले बोलतोय’ या चित्रपटात महाराजांची भूमिका महेश मांजरेकर यांनी केली होती. महेश मांजरेकर एक यशस्वी निर्माने, दिग्दर्शक आहेत, पण कितीही आपण मोठे झालो तरी महाराजांच्या पायाशीच आपण असू शकतो. त्यामुळे महाराजांची ही भूमिका करायचा मोह त्यांना आवरणे शक्यच नव्हते. आज महाराष्टÑाला, मराठी माणसाला स्वाभिमानाची गरज आहे आणि स्वाभिमानानेच तो पुढे जाऊ शकतो हे सांगणारा, ऐतिहासिक नसला तरी महाराजांचे विचार पुढे नेणारा चित्रपट होता. गेल्या वर्षीपर्यंत झी मराठीवर गाजत असलेल्या ‘स्वराज्यरक्षक संभाजीराजे’ या मालिकेत शंतनू मोघे या कलाकाराने महाराजांची केलेली भूमिकाही अनेकांना आवडली होती. याशिवाय नाटक आणि अन्य मालिकांमधून अमोल कोल्हे यांनी शिवाजी महाराजांची भूमिका केली होती. याशिवायही अनेक कलाकारांनी महाराजांच्या भूमिका साकारल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे आकर्षण, प्रेम सर्वांना कायमच असल्यामुळे महाराजांच्या प्रेमापोटी या कलाकारांना प्रेक्षक स्वीकारतात. त्यात महाराजांचे रूप पाहून महाराजांना अभिवादन करत असतात, पण महाराजांचे नाव कोणत्याही रूपात आले, कोणत्याही माध्यमातून आले तरी फक्त प्रेरणा, स्फूर्ती आणि अभिमानच मिळतो याची साक्ष हे चित्रपट आणि मालिका देत असतात.

गेल्या वर्षी आलेल्या ‘तान्हाजी’ या हिंदी चित्रपटात छत्रपती शिवरायांची भूमिका लक्षवेधी होती. अजय देवगणची निर्मिती आणि ओम राऊत यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात शरद केळकर या कलाकाराने छत्रपती शिवरायांची भूमिका केली होती. ती पण अत्यंत चांगली आणि लक्षवेधी होती. शिवरायांचा उजवा हात म्हणजे तान्हाजी मालुसरे असे कथानक असले तरी शिवरायांभोवतीच हा चित्रपट फिरत होता. तान्हाजींची भूमिका अजय देवगणने केली होती, तर सैफ अली खानने उदयभानची भूमिका केली होती.


त्याअगोदर २०१८ मध्ये ‘फर्जंद’ हा एक भव्यदिव्य चित्रपट आला होता. दिग्पाल लांजेकर या तरुण दिग्दर्शकाने निर्माण केलेल्या या चित्रपटात चिन्मय मांडलेकरने शिवरायांची भूमिका साकारली होती, पण छत्रपतींची भूमिका कोणीही साकारली तरी ती पाहण्याचा आनंद नेहमीच सर्वांना सुखद असा असतो.