तब्बल 50 दिवस संपूर्ण देश तोंड लपवून बसला आहे. कोरोना या महामारीवर मात करण्यासाठी घरात कोंडून घेतले आहे. पण हे असे किती दिवस चालणार आहे? किती दिवस आपण तोंड लपवून बसणार आहोत? हा प्रकार म्हणजे बकासूराला घाबरून लोकांनी लपून बसायचे आणि रोज एक बळी देण्याचा प्रकार आहे. आज सामान्यांचे असे दैनंदिन बळी पडत असताना आता किती दिवस लपून बसायचे हा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे संपूर्ण अर्थव्यवस्था शरपंजरी झालेली आहे. उद्योग, व्यवसायधंदे. शेती आणि रोजगाराच्या सगळ्या संधी या शरशय्येवर पडल्या आहेत. अशा अवस्थेत आता आपल्याला कुठे तरी सावरायची गरज आहे. हे महाभारत युद्ध इथेच थांबवले नाहीतर आपल्या हातातून सर्वस्व जाईल याची भिती आज सामान्यांना वाटते आहे. म्हणूनच ही गांधीरीने डोळ्यावर बांधली होती तशी आपण तोंडावर बांधलेली पट्टी काढायची वेळ आली आहे याचा विचार करावा लागेल. कारण किती दिवस असे लपून घरात बसायचे? कोरोनाच्या संकटाबरोबर जगण्याचा सराव केला पाहिजे. जागतीक आरोग्य संघटनेने आणि देशाच्या आरोग्य मंत्र्यांनीही हे बोलून दाखवले होते. हा रोग कायमचा संपुष्टात येेईल आणि तो पुन्हा कधीच कोणाला होणार नाही, इतक्या लवकर तो संपून जाईल असे समजणे हे अत्यंत भाबडेपणाचे असेल. म्हणूनच आता घरात बसून राहणे योग्य आहे काय याचा विचार केला पाहिजे. सगळे उद्योगधंदे असे नाहीत की जे घरातून करता येतील. वर्क फ्रॉम होम कितीजण करू शकतील? शेतकरी आपले काम घरात बसून करू शकणार नाही. पावसाळा तोंडावर आलेला आहे, त्याला मशागतीची, शेतीची कामे करावीच लागतील. व्यापारीवर्ग काय काय वर्क फ्रॉम होममधून करू शकेल? किराणा माल ऑनलाईन मागवायचा म्हणजे सामान्य दुकानदारांचे काय होणार? ज्या तातडीच्या गरजेच्या वस्तू आहेत त्या काही ऑनलाईन मागवता येत नाहीत. कपडे, छानछोकीच्या वस्तू, गीफ्ट आर्टीकल ऑनलाईन मागवता येतील पण औषधे, किराणा माल ऑनलाईन कसे मागवता येईल? त्यामुळे क़धीतरी बाहेर पडावेच लागणार आहे. हे संकट वाढतच जाणार आहे. त्याला भिउन किती दिवस घरात बसणार आहोत आपण? आज लोकांचे रोजगार बुडत आहेत. हातावरची पोटं आहेत त्यांची वाईट अवस्था आहे. गॅरेजवाले, इस्त्रीवाले, बांधकाम कर्मचारी, मजूर, रिक्षाचालक, सलून व्यावसायिक यांचे अतोनात नुकसान होत आहे. त्याचप्रमाणे सामान्य कंपन्या, छोट्या आस्थापना, छोटी खाजगी कार्यालये येथील कर्मचार्यांना दिलेल्या सुट्टीमुळे त्यांचे फार हाल झालेले आहेत. हेे कुठेतरी थांबले पाहिजे. नाहीतर कोरोनापासून वाचायचे आणि उपासमारीने मरायचे अशी अवस्था निर्माण होईल. म्हणूनच आता हा बुरखा काढून टाकला पाहिजे. हे घाबरणे सोडून काळजी घेत काम करायला सुरुवात करण्याची गरज आहे. कोरोनापेक्षाही भयंकर रोग यापूर्वी येउन गेले आहेत. देवी, पोलीओ अशा अनेक रोगांशी आपण दशकानुदशके लढत आहोत. त्या रोगांपासून मुक्त होण्याची धडपड आपली सुरू आहे. 1994 पासून आपण पोलीओमुक्तीसाठी प्रयत्न करत आहोत. सरकार कोट्यवधी रूपये त्यावर खर्च करत आहे. आज पंचवीस वषर्र्र्र् उलटली तरी आपण पोलीओवर मात करू शकलेलो नाही. पण म्हणून काय सगळे व्यवहार बंद ठेवले नाहीत. भले तो संसर्गजन्य रोग नसेल, पण त्याच्याशी लढा देत आपण बाकीचे व्यवहार सुरू ठेवले आहेत ना?1970 च्या दशकात कसल्याही सुविधा नसताना, दुष्काळ, टंचाई, महागाई अशा परिस्थितीत देश असतानाही आपण देवी या रोगावर मात केली होती. त्याचे सार्वत्रिक प्रयत्न झाले होते. मग आजच या रोगाचा इतका बाजार मांडून, त्याचा एवढा बकासूराप्रमाणे दबदबा निर्माण करण्याची गरज आहे काय? कोणत्या जगात आपण वावरत आहोत याचा तरी विचार करायला हवा होता.आपल्याकडे एखाददिवशी बंद पाळला, मोर्चा, हरताळ असला तरी कोट्यवधींचे नुकसान होते. आता दोन दोन महिने बंद ठेवून लाखो कोट्यवधींचे नुकसान करत आहोत. यातून नेमके काय साध्य होणार आहे? लोकांना देशोधडीला लावायचे हे प्रकार आहेत. त्यामुळे याचा कुठेतरी उद्रेक होण्यापूर्वीच आता बाहेर पडले पाहिजे. कारण किती दिवस असे घाबरून, तोंड लपवून बसणार आहोत आपण? 17 मे पर्यत लॉकडाउन 3.0 आहे. तो जर आता वाढवला तर मात्र या देशात अंदाधुंदी माजेल. जनतेचा उद्रेक होईल. जनता रस्त्यावर येईल. घरात बसून देशोधडीला लागून मरण्यापेक्षा काम करून कोरोनाशी लढत आपण मरूया असे विचार जनता करेल. म्हणजे एखादा सैनिक, क्षत्रिय योध्दा जर युद्धाला आणि शत्रूला घाबरून घरात लपून बसेल तर त्याला षंढ म्हटले जाते. त्याने लढायचे असते. या परिस्थितीत जनतेने स्वत:चा काळजीपूर्वक़ बचाव करत लढण्याचे आवाहन करायची आता गरज आहे. शेंदाड शिपायाप्रमाणे तोंड लपवून बसण्यात आता काहीच अर्थ नाही हे लक्षात घेतले पाहिजे. हातात पैसा नाही, जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी नागरिकांकडे पैसे नसतील, कामधंदा बंद करायची वेळ येत असेल तर गुन्हेगारी वाढेल. त्यामुळे हा जो जालीम उपाय गेल्या 50 दिवसांपासून सुरू आहे तो आता थांबवण्याची वेळ आलेली आहे. संपूर्ण जग जिंकायला निघालेल्या सिकंदर अलेक्झांडरची सेना जशी थकली आणि दमून मेली. त्यांनी विद्रोह करून आपसात लढायला सुरूवात केली तशी अवस्था सामान्य नागरिकांत निर्माण होणार नाही याची काळजी सरकारने घेतली पाहिजे. जनता रस्त्यावर उतरेल, लुटमारी होतील, पैसा आणि साधने नसल्याने चोरी, लांडीलबाडीचे प्रकार वाढतील. हे प्रकार त्या कोरोनाच्या रोगापेक्षा भयंकर असतील. आज न शिकलेले, कमी शिकलेले जे मजूर, कामगार आहेत, असंघटीत आणि असुरक्षित क्षेत्रातील कामगार आहेत ते गुन्हेगारी जगताकडे वळणार नाहीत याची खबरदारी घ्यावी लागेल. आपण असेच तोंड लपवून बसलो तर या भित्र्या भैताडांपुढे दहशत माजवायला असे लोक गुन्हेगारी जगताकडे वळतील आणि अंदाधुंदी माजेल. ही माजलेली यादवी या देशाचा घात करतील. त्यामुळे रामराज्याचे स्वप्न पाहणार्या सरकारने आता 17 नंतर लॉकडाउन वाढवण्याचा आत्मघातकी निर्णय न घेता आता सगळे काही पूर्वीसारखे कसे करता येईल यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.
रविवार, १७ मे, २०२०
किती दिवस लपून बसणार?
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा