देशात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. पण पक्षीय राजकारण काही संपत नाही. अर्थात याला कोणी एकच पक्ष जबाबदार आहे असे नाही. तर प्रत्येक पक्षातील अतीरथी महारथी काही ना काही वक्तव्ये करून लोकांचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. यात शिवसेनेचे संजय राउत, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण, भाजपची तर फौजच लागली आहे. म्हणजे एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना महामारीशी लढण्याची तयारी त्यांच्या पद्धतीने केली. दोन महिन्यांपूर्वी त्यांनी देशात लॉकडाऊनची घोषणा केली. लगेच राजकारण सुरू झाले. काही मुख्यमंत्री म्हणाले, ‘आमच्याशी सल्लामसलत केली नाही.’ ममता बॅनर्जी म्हणाल्या, ‘आर्थिक अपयश झाकण्यासाठी कोरोनाची ढाल पुढे करण्यात आली आहे.’ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणाले, ‘आम्ही अगोदरच लॉकडाऊन केले. आमचे अनुकरण नरेंद्र मोदी यांनी केले.नरेंद्र मोदींनी 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. त्यावेळी तातडीची प्रतिक्रिया काँग्रेसकडून आली आणि त्याचे स्वागत केले. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही त्याचे कौतुक केले, पॅकेज पर्याप्त असल्याचे जाहीर केले. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी त्याचे स्वागत केले. पण अचानक नंतर चार दिवसांनी काय झाले त्यांना की लगेच हे पॅकेज पुरेसे नाही, लोकांना पैसे वाटले पाहिजेत अशा मागण्या काँग्रेस करू लागली. त्याचीच री लगेच राज्यात देेवेंद्र फडणवीस आसि भाजप नेत्यांनी ओढली. कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रानेही बारा बलुतेदारांना पॅकेज वाटावे अशी मागणी केली. त्यासाठी आंदोलनही केले. या पॅकेजनंतर पैसे उभारण्यासाठी देवस्थानांमधील सोने ताब्यात घ्यावे, कर्जरूपाने घ्यावे असा सल्लाही माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिला होता. पण हा सल्ला अंगलट आल्याने काँग्रैसने बोंबाबोंब सुरू केली. देशभर त्यावरून टीका सुरू केली. अर्थात पृथ्वीराज चव्हाण यांना यामुळे देशभरातून रोष पत्करावा लागला. अनेक देवस्थानांनी काशीच्या विश्वेश्वर मंदीरानेही त्यांच्यावर बहिष्कार टाकला. त्यामुळे हे पॅकेज भाजपला भविष्यात फायदेशीर ठरेल, मोदी त्याचा बाजार मांडतील या भितीने काँग्रेसने त्यावर टीका करायला सुरूवात केली.या टीकेचा सूर इतका जोरात आळवला गेला की राज्यात आपण सत्तेत आहोत हेही काँग्रेसनेते विसरले. अजूनही शिवसेना आपला मित्र पक्ष आहे, त्यांच्याशी आपण आघाडीतील घटक पक्ष आहोत हा काँग्रेसला विश्वास वाटत नसावा. किंबहुना शिवसेना हा भाजपचाच मित्र पक्ष आहे हेच ते अजून गृहीत धरत आहेत काय असा प्रश्न पडतो. कारण चारच दिवसांपूर्वी पृथ्वीराज चव्हाण यांनी हे सरकार आमचे नाही, शिवसेनेचे आहे असे वक्तव्य केले. त्यामुळे पुन्हा त्यांना वादाच्या भोवर्यात जावे लागले. नंतर मी असे बोललोच नाही, त्या व्हायरल झालेल्या आवाजाचा शोध घेतला पाहिजे, हा आवाज कोणा मराठवाड्यातील कलाकाराचा आहे असा कांगावा सुरू केला. आता तो तपास व्हायचा तेंव्हा होईलच पण एक वादग्रस्त वकत्व्य काँग्रेसच्या खात्यात जमा झाले. त्यांचे खरे दात समोर आले.अर्थात काँग्रेसची ही प्रथा आहे. जे निष्ठावंत म्हणजे ज्यांनी खर्या अर्थाने इंदिरा गांधींपासून काँग्रेसवर निष्ठा ठेवली आहे त्या काँग्रेसमधील हे इंदिरा निष्ठ अशी वक्तव्ये हमखास करत असतात. ते इंदिरा काँग्रेसचे एक वैशिष्ठ्यच आहेत. हे इतके निष्ठावंत आहेत की काँग्रेसची मालकी ही इंदिरा गांधींनंतर सोनिया गांंधींकडे व्हाया राजीव गांधी गेल्यानंतर हे लोक सोनिया गांधींमध्येच इंदिरा गांधी पाहू लागले. त्यामुळे या निष्ठावंत महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये शिवराज पाटील चाकूरकर, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण अशा नेत्यांची वर्णी लागते. हे नेते आघाडीमध्ये असताना नेहमीच अशी वक्तव्ये करून आघाडीतील मित्र पक्षांना दुखावत असतात. हे काही आजचे नाही. पंधरावर्ष राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार होते तेंव्हाही हे होत होते तेच आजही होते आहे. ती काँग्रेसची एक बरळशैली आहे. राष्ट्रीयपातळीवर या बरळशैलीचे काम दस्तुरखुद्द राहुल गांधी, पी चिंदंबरम, मणिशंकर अय्यर, दिग्विजयसिंग असे लोक करत असतात. राज्यात चाकूरकर आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या निवृत्तीच्या काळानंतर ही जबाबदारी पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर येउन ठेपली आहे. पण सगळ्या पक्षात असे अतिरथी महारथी आपले बाण सोडत आहेत. सध्या भाजपत असलेले नारायण राणे सोमवारी राज्यपालांना भेटून राज्यात राष्ट्रपती राजवट लावा म्हणून मागणी करून आले. त्याने काय होणार आहे? सरकारपेक्षा शिवसेनेवर नारायण राणे यांचा राग आहे. त्यातून उद्धव ठाकरे यांच्याकडे मुख्यमंत्रीपद गेल्याने नारायण राणेंची पोटदुखी आणखी वाढू लागली. पण अशी वक्तव्ये, मागणी करण्याची ही वेळ नव्हे. पण एकुणच भाजपला या कोरानाचे राजकारण करून राज्यात राष्ट्रपती राजवट आणायची आहे हे दिसून येते आहे. महाराष्ट्रात 50 हजारावर कोरोनाबाधितांचा आकडा गेला, मुंबईतील आकडा 30 हजारांच्या पुढे गेला. त्यामुळे देशातील सर्वाधिक रूग्ण महाराष्ट्रात आहेत. राज्यातील परिस्थिती हाताबाहेर गेली आहे हे दाखवून राष्ट्रपती राजवट आणायचे प्रयत्न सुरू आहेत अशीच शंका यातुन येते. त्याची कुणकूण कदाचित आघाडीतील सर्वच पक्षांना लागली असावी. त्यामुळे राज्यपाला भगतसिग कोश्यारी यांची राजभवनावर जाउन सगळे नेते भेट घेत आहेत. मुख्यमंत्र्यांऐवजी त्यांचे पीए राज्यपालांना भेटले. शिवसेनेचे खासदार आणि महाविकासआघाडीचे प्रवर्तक संजय राउत राज्यपालांना भेटून आले. त्यानंतर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्रातील मोठे नेते शरद पवार यांनी राज्यपालांची भेट घेतली. या कोणत्याही भेटीत काय बोलणी झाली, कशासाठी भेटले याचा तपशील कुणीही सांगितला नाही. संजय राउत म्हणाले, काही नाही मुख्यमंत्री आणि राज्यपाल यांचे संबंध पितापुत्रांसारखे आहेत, सुमधूर आहेत म्हणून भेटायला आलो होतो. मग आपल्या कार्यालयात गेल्यावर लगेच राज्यपालांच्या नावाने खडे कशासाठी फोडले? नेमके काय बोलायचे आणि काय करायचे आहे हे समजेनासे झाले आहे. पण या कोरोनाच्या कारणावरून राज्यात, देशात प्रचंड राजकारण चालले आहे. कोरोनापेक्षा राजकारणाच्या या रोगाने देशाला पोखरले आहे असे वाटायला लागले आहे. वेगवेगळ्या राज्यांत अडकलेल्या मजुरांना रेल्वेने आपापल्या राज्यांत नेऊन सोडण्याचा निर्णय झाला.’ सोनिया गांधी म्हणाल्या, ‘या प्रवाश्यांचे रेल्वे भाडे आम्ही देऊ.’ सोनिया गांधी यांनी आतापर्यंत पंतप्रधान मोदी यांना पत्रे लिहिली आहेत. केंद्र सरकार कोरोना व्हायरसशी लढण्यासाठी जे उपाय करीत आहेत, त्यांना काँग्रेसचा पाठिंबा दिला. या पाठिंब्याला अनेक ‘पण’ जोडले. त्या म्हणतात, मीडियाला जाहिराती देणे बंद करावे. खासदारांच्या पगारातील 30 टक्के कपातीची रक्कम असंघटित मजुरांसाठी खर्च करावी. विदेशवार्या स्थगित कराव्या इत्यादी. अर्थात सल्ला देण्याइतकी सोपी गोष्ट जगात कोणतीही नाही. सल्ला देणार्याला दुसरे काही करायचे नसते. पण आपण आधी केलेल्या वक्तव्याच्या विपरीत वक्तव्ये करत आहोत हे राजकारणी लोकांच्या लक्षात का येत नाही? पृथ्वीराज चव्हाण, सोनिया गांधी, काँग्रेस नेते अगोदर मोदींनी देउ केलेल्या पॅकेजचे स्वागत करतात आणि नंतर टीका करतात. हा नक्की काय प्रकार आहे? राज्यात देवेंद्र फडणवीस तेच करतात. सरकारला लागेल ते सहकार्य करायला आम्ही तयार आहोत असे वक्तव्य करतात आणि दुसरीकडे नारायण राणे यांना पाठवून राष्ट्रपती राजवटीची मागणी करतात. नारायण राणे राज्यसभेत भाजपचे खासदार आहेत. त्यांनी त्यांचा पक्ष बंद करून मुलालाही भाजपचे आमदार केलेले आहे. त्यामुळे ते अधिकृतपणे भाजपचे आहेत. मग त्यांनी कोणत्या नात्याने, अधिकाराने राष्ट्रपती राजवटीची मागणी केली? ही भूमिका भाजपची आहे की नारायण राणेंची आहे? भाजपची भुमिका असेल तर नारायण राणेंकडे ही जबाबदारी देताना त्यांची नेमकी पोस्ट काय आहे? मग चंद्रकांत पाटील हे प्रदेशाध्यक्ष आहेत, देवेंद्र फडणवीस हे विरोधीपक्ष नेेते आहेत त्यांनी ही मागणी न करता भाजपने नारायण राणे यांच्यामार्फत ही मागणी का केली आहे? फडणवीस - चंद्रकांत पाटील यांना बाजूला करायचे केंद्रीय पातळीवर हे प्रयत्न होत आहेत का? नक्की काय चालले आहे? नारायण राणे आणि नितीन गडकरी यांचे मैत्रिचे संबध जगजाहीर आहेत. मग नितीन गडकरींनी हे राणेंचे अस्त्र वापरले आहे काय? हे सगळंच विचित्र आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे झाले. त्यांचे मंत्रिपद स्थिर होण्याच्या आतच कोरोनाचे भयानक संकट उभे राहिले. उद्धव ठाकरे मीडियापुढे येतात आणि काही सूचना करतात. त्यांचे बोलणे, देहबोली हे सांगते की, ते शिवसैनिकांपुढे बोलत आहेत, मला हे चालणार नाही, मी हे खपवून घेणार नाही, मला महाराष्ट्र कोरोना मुक्त करायचा आहे, ही भाषा शिवसैनिकांच्या सभेपुढे चांगली आहे. महाराष्ट्रातील सगळी जनता काही शिवसैनिक नव्हे. या जनतेशी कसा संवाद साधायचा, हे त्यांच्या सल्लागारांनी त्यांना शिकविले पाहिजे. त्यामुळे राजकीय गोंधळात राजकारण चाचपडते आहे. प्रत्येकजण नेमके काय करतो आणि त्यासाठी व्यासपीठ काय वापरतो आहे हेच त्याला समजेनासे झालेले आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा