कोरोनाच्या या संकटात आणि धामधुमीत एका गोष्टीकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले. ते म्हणजे केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील मोदी -2 या सरकारची वर्षपुरती झालेली आहे. हे वर्ष इतके वेगात, अनेक घटना, संकटांनी भरून गेले की ते कधी पूर्ण झाले हेही समजले नाही. पण हा वर्षभराचा काळ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारकीर्दीतला फार कठीण आणि संघर्षमय काळ होता हे नक्की. पण त्यातही त्यांनी केलेली कामगिरी ही अनमोलच आहे. कौतुक आणि टीका अशा दोन्ही परिस्थितीला सामोरे जात हे वर्ष त्यांनी काढले आहे. अनेक महत्वपूर्ण ऐतिहासिक निर्णय त्यांनी या काळात घेतले आहेत तर राजकीय, सामाजिक आणि नैसर्गिक संकटांनाही त्यांना या वर्षात तोंड द्यावे लागले आहे. दोन दिवसांपूर्वीच नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपाचे सरकार सत्तेत येऊन एक वर्ष पूर्ण झाले. गेल्या वर्षी नरेंद्र मोदी यांनी लागोपाठ दुसर्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. 2014 साली काँग्रेस नको, या ठाम विचाराने मतदारांनी नरेंद्र मोदी यांना बहुमत दिले होते. तर 2019 साली मोदीच हवे, हा विचार मतदारांच्या मनात प्रबळ होता त्यामुळे प्रसारमाध्यमांनी मोदींची लोकप्रियता कमी झाली असा आभास निर्माण केला तरीही मोदींना 2014 पेक्षा जास्त यश मिळाले. भाजपचे 2014 ला 283 इतके संख्याबळ होते ते वाढून 303 इतके म्हणजे स्वबळावर सत्ता स्थापन करण्याइतके संख्याबळ त्यांना मिळाले. असा हा जनादेश भारतीय राजकारणात दुर्मिळच म्हणावा लागेल. असा हा दुर्मिळ योग नरेंद्र मोदी यांना प्राप्त झाला म्हणून त्यांचे व तो प्राप्त करून देणारे म्हणून भारतीय मतदारांचे आणि तसा कौल मिळवल्याबद्दल मोदी आणि भाजपचे अभिनंदन केले पाहिजे. आज एक वर्षानंतर पुन्हा अभिनंदन करण्याचे कारणच हे आहे की पहिल्या वर्षातच त्यांच निर्णय या बहुमताच्या जोरावर क्रांतीकारक ठरले आहेत, जगाचे लक्ष वेधून घेणारे ठरले आहेत. सलग दुसर्यांदा पंतप्रधान बनलेल्या नरेंद्र मोदी यांच्या एक वर्षाच्या कारकीर्दीचे वर्णन हे दोन टप्प्यातून पहावे लागेल. त्यातला पहिला टप्पा म्हणजे कोरोनापूर्व आणि दुसरा कोरोनापश्चात. कारण कोरोना हा गेले सहा महिने या देशावर नजर ठेवून आहे. म्हणूनच दोन्हीही भागांचे वर्णन करायचे झाल्यास ते आश्चर्यकार या एकाच शब्दात करता येईल. सहा महिनेही पूर्ण होेण्याआधीच मोदी सरकारने असे काही धडाकेबाज निर्णय घेतले आहेत की, केवळ भारतच नाही, तर सारे जग या निर्णयांनी स्तिमित झाले. समर्थक आणि विरोधक दोघेही दिङ्मूढ झालेत. मोदींनी केलेली कामगिरी धाडसी आणि लक्षणीय होती. त्यामुळे नाईलाजाने का होईना कौतुक हे करावेच लागणार होते. पण दुर्दैवाने विरोधकांकडे तेवढा मोठेपणा नव्हता, तेवढे मोठे मन नव्हते. त्यामुळेच विरोधक अजूनही सैरभैरच आहेत.पंतप्रधान मोदींनी मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात म्हणजे 2014 ते 2019 या काळात देशातील मुस्लिम भगिनींच्या आत्मसन्मानाचे रक्षण करण्यासाठी तिहेरी तलाकविरोधी कायदा आणण्याचा मोदी सरकारने खूप प्रयत्न केला होता. परंतु, त्यात त्यांना पूर्ण यश प्राप्त झाले नव्हते. पण गेल्यावर्षी पूर्ण बहुमताने भाजप सत्तेत आला आणि त्यांनी तो कायदा मोदी सरकारने दुसर्या कारकीर्दीत आल्या आल्या करून टाकला. मुस्लिम महिलांनी आणि काही शिकल्या सवरलेल्या, जाणकार तज्ज्ञ मुसलमानांनी या कामगिरीचे कौतुक केले. काही फतव्यावर विश्वास ठेवणारे होते त्यांनी विरोध केला पण नंतर त्यांनाही त्याचे गांभिर्य कळाले. आज भारतातील प्रचलित राजकारण बघितले, तर मुस्लिम हा काही भाजपाचा मतदार नाही. त्यामुळे मुस्लिम भगिनींवरील, माणुसकीला काळिमा फासणारा हा अन्याय दूर करण्याची एवढी घाई करण्याची मोदी सरकारला असण्याची गरज नव्हती, असे अनेक राजकीय पंडितांचे मत होते. परंतु, मोदींनी पक्षाच्या लाभाचा विचार बाजूला ठेवून, एक संवेदनशील भारतवासी म्हणून आपले कर्तव्य पूर्ण केले. आपल्या हे लक्षात आले पाहिजे की निवडणुकीपर्यंत विरोधात असलो, एका विशिष्ठ पक्षाचे असलो तरी निवडून आल्यावर आपण सर्वांचे असतो. पंतप्रधान हा काही भाजपचा किंवा काँग्रेसचा नसतो तर तो देशाचा असतो. पण अजूनही आपली मानसिकता तशी झालेली नाही हा भारतीय लोकशाहीचा अपमान आहे. यापूर्वी भारतीय राजकारणाचा हा एक नवाच आविष्कार होता. मुल्ला-मौलवी आणि त्यांच्या समर्थक राजकीय पक्षांकडून तिहेरी तलाकविरोधी कायद्याला विरोध सुरू असतानाच, मोदी सरकारने सर्व जगाला एक जबरदस्त धक्का दिला. 5 ऑगस्ट 2019 रोजी भारतीय संसदेने संविधानात तात्पुरते म्हणून टाकलेले कलम 370 व त्याचा दुसरा भाग 35 ए निरस्त करून टाकले. संपूर्ण देशभरातून त्यामुळे मोदी आणि अमित शाह यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत राहिला. तरूणांमध्ये मोदींची लोकप्रियता वाढतच गेली. काश्मिर आमचे आहे हे नुसते सांगून भागणार नाही तर ते आपण सिद्ध केले पाहिजे हे त्यांनी दाखवून दिले. 370 कलमाचा विचार करून त्यांनी पाकीस्तानला जोरदार दणका दिला. त्यामुळे संपूर्ण जगाने आश्चर्याने आणि कौतुकाने बोटे तोंडात घातली. हा प्रश्न सोडवल्याने काँग्रेसआदी पाकधार्जिण्या पक्षांना थोडे वाईट वाटले. काँग्रेसने बरळणारे नेते पाकीस्तानची भाषा बोलू लागले. देशहिताचा चांगला निर्णय घेउनही मोदी सरकारचे अभिनंदन करण्याचे धाडस काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधींना झाले नाही. त्यामुळे काँग्रेसमध्येच गट पडला. ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासारख्या तरूणांनी काँग्रेसचा खोडसाळपणा ओळखून देशहितासाठी मोदींबरोबर जाण्याचा निर्णय घेतला. काँग्रेस नेत्यांना त्यांच्या अविचारीपणाची शिक्षा आणि धडा दोन्हीही यातून मिळाल. मोदी -2 च्या काळातील पहिल्याच वर्षात तिहेरी तलाकविरोधी कायदा हा पहिला धक्का असेल, तर कलम 370 निरस्त करणे हे मोदी सरकारने निर्माण केलेले एक वादळच होते, एच त्सुनामी होती. भारताचा अभिन्न अंग असलेल्या काश्मीरला संविधानातील ज्या कलमामुळे विभक्त राहण्यास बळ मिळत होते, जे कलम आपल्या पूर्वसुरींनी काही अपरिहार्य कारणांमुळे संविधानात घातले व त्याला तात्पुरते असे विशेषण देऊन ते संविधानातून काढण्याचा भार भावी पिढ्यांवर सोपविला, अशा त्या कलम 370 ला गेल्या 70 वर्षांत कुणी स्पर्शही करण्याची हिंमत केली नव्हती. भाजपाच्याच नाही, तर त्याचा पूर्वावतार जनसंघाच्या घोषणापत्रात कलम 370 रद्द करण्याचे आश्वासन नेहमीच राहिले आहे. परंतु, लोकांना माहीत होते की, घोषणापत्रात प्रत्येक वेळी हे आश्वासन देणे, निव्वळ औपचारिकता आहे. हे काही होणे नाही. परंतु, संविधाननिर्मात्यांनी या कलमाबाबत भावी पिढ्यांवर सोपविलेला भार, नरेंद्र मोदी यांच्या सरकारने इतक्या तडकाफडकी उतरविला, की जगाला समजलेच नाही! काँग्रेसची अवस्था अक्षरश: जयद्रथासारखी झाली. पण अमित शाह, नरेंद्र मोदी या जोडगोळीने हा सूर्य हा जयद्रथ संविधानाच्या आधारे करून दाखवला आणि काँग्रेसचा नाकर्तेपणा जनतेसमोर अधोरेखीत केला. भारताच्या शिरोभागावर, माथ्यावर ठळकपणे गोंदविला गेलेला एक कलंक, मोदी सरकारने साफ केला. एकापाठोपाठ बसलेल्या धक्क्यांतून लोक अजून सावरले नव्हते. परंतु, मोदी सरकारला दम घ्यायला उसंत नव्हती. त्यातच श्रीरामजन्मभूमी प्रकरणाचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयही आला. या निर्णयाने सुमारे पाचशे वर्षांपासून भारतावर होत असलेला अन्याय दूर झाला. या निर्णयासाठी तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या नेतृत्वातील न्यायासनाचे नाव भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षराने कोरले गेले. खर्या अर्थाने ऐतिहासिक म्हणता येतील, अशा या दोन घटना मोदी सरकारच्या कारकीर्दीच्या एक वर्षाच्या आतच घडल्या आहेत. यामुळे भारताचे सामाजिक व राजकीय क्षेत्र घुसळून निघाले, अजूनही घुसळले जात आहे. काश्मीरवर भारत सरकारची संप्रभुता पूर्णपणे प्रस्थापित होण्याची प्रक्रिया वेगाने सुरू झाली आहे, तर दुसरीकडे अयोध्या येथे प्रभुरामाचे भव्य व दिव्य मंदिर निर्माणाचे काम युद्धस्तरावर सुरू आहे. आता त्याचे काम सुरू असताना तिथे खोदकामात अनेक अवशेषही सापडत आहेत की जे हिंदु संस्कृतीची साक्ष देत आहेत. त्यामुळे मोदी सरकारच्या दुसर्या काळातील पहिले वर्ष विशेषता कोरोनापूर्वीचे दिवस हे सुवर्णाक्षरांनी लिहीण्यासारखे आहेत. पण कोरोनामुळे याला थोडे ग्रहण लागले आहे. या वर्षभरातील आर्थिक क्षेत्राचा विचार केला, तर गेल्या वर्षी जगभरात मरगळ आलेली दिसली. उदारीकरणामुळे जगातील घडामोडींपासून भारत अलिप्त राहूच शकत नव्हता. त्यामुळे त्याची झळ भारताला बसत होती. परंतु, मोदी सरकारने आपल्या आधीच्या पाच वर्षांत, भारताची आर्थिक घडी मजबूत आधारावर बसविली असल्यामुळे, ही झळ भारताला कमीत कमी बसत होती. त्यातून बाहेर पडण्याची जोरदार तयारी मोदी सरकारने केली असतानाच, कोरोनाचे संकट येऊन धडकले. इथपासून मोदी सरकारच्या कारकीर्दीचा दुसरा टप्पा सुरू झाला. सारे जग आज कोरोनाच्या संकटात होरपळून निघत आहे. स्वत:ला जगाचे पुढारी मानणारे, स्वत:ची आरोग्ययंत्रणा जगात सर्वोत्कृष्ट असल्याचा डांगोरा पिटणारे सर्व देश या कोरोना विषाणूमुळे धुळीत मिसळले आहेत. प्रगत देशांचीच ही गती, तर भारतासारख्या प्रगतिशील देशाचे काय होणार? त्याची किती प्रचंड प्रमाणात धुळधाण होणार, याचे अंदाज व्यक्त होऊ लागले. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्या दिवसापासून कोरोना संकटाशी लढण्याची धुरा स्वत:च्या हातात घेतली. भारताची 130 कोटींची लोकसंख्या, सार्वजनिक आरोग्ययंत्रणा पुरेशी सक्षम नसणे, यांसारख्या उत्तुंग अडथळ्यांना पार करीत, नरेंद्र मोदी यांना ही लढाई लढायची होती आणि यशस्वीही करायची होती. एका माणसाच्या एका शब्दावर कोट्यवधी जनता तो शब्द पाळण्यास तयार होते, हे अद्भुत दृश्य सार्या जगाने पाहिले. अत्यंत नियोजनपूर्वक नरेंद्र मोदी यांनी कोरोनाविरुद्धचे हे युद्ध आखले आहे. त्यात काही विरोधी आणि भारतविरोधी शक्तींनी धिंगाणा घालण्याचे काम केलेच. भारताला कोरोनाच्या विरोधात यश जरी मिळाले नसले, तरी या रोगाला फार मोठ्या प्रमाणात नियंत्रित करण्यात भारताला यश मिळाले आहे.मोदी सरकारचा तिहेरी तलाकविरोधी कायदा, कलम 370 निष्प्रभ करणे, सीएए व एनआरसीचे धोरण यावर सर्वच जनता सहमत असेलच असे नाही. काहींना तर हा सर्व नसता उपद्व्यापही वाटू शकतो. मोदींना दुसर्यांना उगीचच प्रचंड बहुमत मिळाल्याचा पश्चात्तापही होऊ शकतो. परंतु, कोरोनाविरुद्धचे युद्ध नरेंद्र मोदी ज्या प्रकारे लढत आहेत, त्यानंतर मात्र भारताच्या प्रत्येक नागरिकाच्या मनात एकच भावना उत्पन्न झाली आहे व ती म्हणजे, मोदी पंतप्रधान होते म्हणून बरे झाले! म्हणूनच मोदी सरकारच्या पहिल्या वर्षपूर्तीनिमित्त त्यांचे अभिनंदन. भविष्यातील भारत घडवण्यासाठी आणि रोजगाराचे दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी आगामी काळात त्यांना शुभेच्छा! आता कोरोनोच्या संकटातून बाहेर पडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी आत्मनिर्भर भारताची घोषणा केली आहे ती सत्यात उतरली पाहिजे. ज्याप्रमाणे 370 कलम, तिहेरी तलाक आणि राममंदीराचा प्रश्न मार्गी लागला आहे तसाच आत्मनिर्भर भारताचा संकल्प पूर्ण झाला पाहिजे. या देशात कोणी भिकारी असता कामा नये. कोणीही भुका कंगाल असणार नाही यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत. जो स्वदेशीचा मंत्र त्यांनी नव्या प्रकारे आत्मनिर्भर भारताच्या कल्पनेत मांडला होता तो प्रत्यक्षात आला पाहिजे. कोरोनाच्या संकटाने निर्माण केलेली संधी आणि भारताकडे जर चीनमधील उद्योग वळत असतील तर त्याचा फायदा घेत इथला उद्योग वाढवण्याचे प्रयत्न झो पाहिजेत. तसेच रोजगाराला चालना मिळाली पाहिजे. स्थानिक उद्योग व्यवसायाला प्रोत्साहन देण्याचे केलेले निर्धार प्रत्यक्षात आले पाहिजेत. त्यासाठी अर्थपुरवठा करण्याच्या सुविधा निर्माण झाल्या पाहिजेत. 2014 ला आलेल्या मोदी 1 च्या काळात मुद्रा आणि जनधन योजना या पूर्णपणे फसल्या होत्या. कारण राष्ट्रीयीकृत बँकांनी फसवी आकडेवारी देउन मोदी सरकारच्या डोळ्यात धूळफेक केली होती. प्रशासानाने निर्माण झालेल्या झारीतील शुक्राचार्यांमुळे अडकून पडलेला हा विकास बाहेर काढण्याचे काम आता पंतप्रधान नरेद्र मोदींना आगामी काळात करण्याची संधी आहे. मुद्रा कर्ज न देण्याची बँकांची प्रवृत्ती, जनधन योजनेची खाती उघडून न घेता फसवी आकडेवारी देण्याची प्रवृत्ती मोदी सरकारने आत्ताच खोडून काढली तर भारत लवकरात लवकर उभा राहील यात शंकाच नाही. 370 कलमाचा निर्णय घेउन सीमेवरील पाक शत्रूला नामोरहरम केले आहे. आता अंतर्गत असलेले प्रशासकीय शत्रू दूर करण्याचे काम या सरकारने करावे ही अपेक्षा या वर्षपुर्तीच्या निमित्ताने करावी लागेल.
रविवार, ३१ मे, २०२०
मोदी -2 ची वर्षपूर्ती
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा