चौथा लॉकडाउन तरी आम्हाला तारेल का?
कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी देण्याच्या लढ्यातील चौथा लॉकडाउन सुरू आहे. 31 मे पर्यंत चालणारा हा लॉकडाअन अखेरचा असेल अशी अपेक्षा करायला पाहिजे. पंतप्रधान मोदींचे मत विचारात घेउन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही भूमिपुत्रांना आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे या चौथ्या टप्प्याकडे नीट पहावे लागेल. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी देशभर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरू झाला आहे. कोरोनावर सध्यातरी लॉकडाऊनशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. मात्र, लॉकडाऊन हासुद्धा एकमात्र आणि शेवटचा पर्याय नाही. जोपर्यंत कोरोनावर औषध वा लस येत नाही, तोपर्यंत लॉकडाऊनसारख्या प्रतिबंधात्मक मार्गाचाच आपल्याला नाइलाजाने अवलंब करावा लागणार आहे. पहिल्या दोन लॉकडाऊनच्या तुलनेत तिसर्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणात शिथिलता देण्यात आली होती. तशीच वा त्यापेक्षा थोडी जास्त शिथिलता चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये देण्यात आली आहे. पहिल्या दोन टप्प्यांतील लॉकडाऊनच्या तुलनेत कोरोनामुळे उद्भवलेली परिस्थिती नियंत्रणात आल्यामुळे, तिसर्या आणि चौथ्या टप्प्यात शिथिलता देण्यात आली, असे नाही. उलट, प्रत्येक टप्प्यातील लॉकडाऊननंतर कोरोना संक्रमितांची संख्या वाढतच गेली. आज भारतातील कोरोना बाधितांच्या संख्या एक लाखाच्या घरात पोहोचली आहे. अर्थात याचाच अर्थ, लॉकडाऊन फसले असा काढणे चुकीचे ठरेल. लॉकडाऊनमुळे ही संख्या नियंत्रणात राहिली, अन्यथा ती कधीच दहा लाखावर गेली असती. आपला देशही चीन, अमेरिका, ब्रिटन, स्पेन, इटलीच्या मार्गावर गेला असता. त्यामुळे लॉकडाऊन हा अपरिहार्य होता.आत्तापर्यंत झालेल्या तीन टप्प्यांत आपल्या देशात 55 दिवसांचे लॉकडाऊन झाले आहे. 55 दिवसांपासून देश थांबला आहे. व्यापार, व्यवसाय, उद्योग आणि कारखाने बंद आहेत. अर्थव्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आहे. या काळात देशाचे अपरिमित असे आर्थिक नुकसान झाले आहे, ज्याची भरपाई करता येणार नाही.आज परिस्थिती अशी आहे की सरकारला देशातील लोकांचा जीवही वाचवायचा आहे आणि अर्थव्यवस्थाही. त्यामुळे लॉकडाऊन तीनपासून सरकारने काही प्रमाणात निर्बंध शिथिल केले. व्यापार, व्यवसाय आणि उद्योग सुरू करण्याची अनुमती दिली. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात त्याची व्याप्ती आणखीन वाढवण्यात आली. यावेळी प्रतिबंधित क्षेत्र आणि मॉल सोडून सर्व प्रकारची दुकाने आणि व्यापारी प्रतिष्ठाने उघडण्याची अनुमती देण्यात आली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यावेळी लॉकडाऊनचे झोन ठरवण्याचा अधिकार केंद्र सरकारने राज्यांना दिला आहे. यावेळी झोनची संख्याही तीनवरून पाच राहणार आहे. ग्रीन, ऑरेंज, रेड, बफर आणि कंटेन्मेंट असे पाच झोन यावेळी राहणार आहेत. मात्र, हे झोन ठरवताना राज्यांना केंद्राच्या निकषांकडे दुर्लक्ष करता येणार नाही. ऑरेंज आणि रेड झोनमध्ये बफर आणि कंटेनमेंट झोनचा समावेश राहणार आहे. कंटेन्मेंट झोनमध्ये फक्त अत्यावश्यक सेवाच सुरू ठेवता येतील. राज्य सरकार सरकारी आणि खाजगी कार्यालये सुरू करू शकते, फॅक्टरी आणि कारखाने सुरू करण्याची अनुमती देऊ शकते. मात्र, या ठिकाणी सगळ्यांना आरोग्यसेतू अॅप डाऊनलोड करणे बंधनकारक राहणार आहे.याशिवाय स्थलांतरित मजुरांचा प्रश्न दिवसेंदिवस उग्र होत आहे. हा प्रश्न हाताळण्यात कोणत्याच राज्य सरकारांना अद्याप यश आले नाही. गुजरात उत्तरप्रदेश ही राज्ये मजुरांची चिंता न करता त्यांना आपल्या राज्यात घेण्यास मज्जाव करत आहेत. काही ठिकाणी त्यामुळे उद्रेकही झाल्याचे पहायला मिळाले आहे. ही चिंतेची बाब म्हणावी लागेल. हा प्रश्न अधिक जबाबदारीने आणि संवेदनशीलतेने हाताळण्याची गरज आहे. या चौथ्या लॉकडाऊनमध्ये सरकारने शिथिलता दिली असली, तरी कोरोनाने कोणत्याही प्रकारची सवलत दिली नाही. त्यामुळे लोकांनी याचा गैरफायदा घेण्याचे कारण नाही. कोरोना संपल्यामुळे सरकारने लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिली नाही, तर अर्थव्यवस्था डोळ्यांसमोर ठेवून काही प्रमाणात शिथिलता दिली, याची जाणीव देशातील जनतेने ठेवली पाहिजे. लॉकडाऊनचे पालन करण्यासाठी लोकांनी स्वयंशिस्त बाळगण्याची गरज आहे. सकाळी सात ते सायंकाळी सातपर्यंत लोकांना आवश्यक नाही, तर अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडण्याची अनुमती सरकारने दिली आहे. सायंकाळी सात ते सकाळी सातपर्यंत लोकांना घराबाहेर निघण्याची परवानगी नाही. एकप्रकारे ही संचारबंदी आहे. तिचे पालन करणे आवश्यक आहे. हे केेले नाही तर आपल्याला पाचवा, सहावा लॉकडाउन घेत संपूर्ण देशच बंद करावा लागेल. हे योग्य नाही.लॉकडाऊनच्या पालनासाठी पोलिस आणि प्रशासनाची गरज पडणार नाही, एवढ्या जबाबदारीच्या वागणुकीची लोकांकडून अपेक्षा करणे गैर ठरणार नाही. पोलिसांचे दंडुके पडल्याशिवाय आम्ही शहाणे होणारच नाही, अशी वागणूक या काळात लोकांकडून अपेक्षित नाही. मुळात लॉकडाऊन हे आपल्या भल्यासाठी आहे, हे लोकांनी लक्षात घेण्याची गरज आहे. तुमच्यामुळे तुमच्या घरातील लोक संक्रमित होऊ शकतात, त्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो, याची जाणीव सर्वांनी ठेवली तर आम्ही कोरोनावर मात करू शकतो.लॉकडाऊनमध्ये दुकाने आणि बाजार उघडण्याची परवानगी दिल्यावर, दुकानात आणि बाजारात गर्दी होणार नाही, भौतिक दूरतेचे पालन केले जाईल, याची काळजी लोकांनाच घ्यावी लागणार आहे. चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनच्या पहिल्या दिवशी देशातील अनेक शहरांत जे चित्र होते, ते धक्कादायक आणि म्हणूनच चिंताजनक होते. कोणत्याही बंधनाशिवाय मुक्तपणे लोकांचे व्यवहार सुरू होते. रस्त्यावर, बाजारात आणि अन्य सार्वजनिक ठिकाणी गर्दी होती. हा प्रकार टाळायला हवा. परिस्थिती एकदा हाताबाहेर गेली की कुणीही- मग ते पोलिस असो, प्रशासन असो की सरकार- तुम्हाला वाचवण्यासाठी येऊ शकणार नाही. आपला जीव आपल्यालाच वाचवायचा आहे, याचे भान लोकांनी ठेवले पाहिजे. लॉकडाऊनमुळे कोरोना संक्रमितांची संख्या नियंत्रणात असल्यामुळे आज जे रुग्ण आहेत, त्यांच्यावर योग्यप्रकारे उपचार होत आहेत, त्यांच्यासाठी व्हेंटिलेटर आणि अन्य जीवरक्षक यंत्रणा उपलब्ध आहेत. मात्र, एकदा का संक्रमितांची संख्या हाताबाहेर गेल्यावर, याच्यावर उपचार करायचे की त्याच्यावर, हे डॉक्टरांना ठरवावे लागेल. कारण, रुग्णालयात बेड कमी आणि रुग्ण जास्त, अशी वेळ आल्यावर याशिवाय त्यांच्यासमोर पर्याय राहणार नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा