रविवार, १७ मे, २०२०

आपली जीवनशैलीच बदलावी लागेल

लॉकडाउनमधून देशाला आज ना उद्या बाहेर पडावेच लागेल. देश किती काळ ठप्प ठेवणार? पण यातून एक लक्षात घेतले पाहिजे की मुंबईसह महाराष्ट्राची यातून पुनर्रचना करावी लागेल. नवे इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण करावे लागेल. हा रोग गर्दीचा फायदा उठवणारा आहे. किंबहुना इथून पुढे कोणतेही संसर्गजन्य रोग हे गर्दीचा फायदा उठवणारे आणि वाहक असणार आहेत. त्यामुळेच गर्दी कमी करण्याचे प्रयत्न करणे, त्याचे शिक्षण देणे, तशी सामाजिक शिस्त निर्माण करणे हेच आता देशापुढचे आव्हान असेल. कारण कायम लोकाना घरात कोंडून ठेवता येणार नाही.
   आज महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या सर्वाधिक आहे. ही संख्या आणखी वाढण्याची भीती आहे. त्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्नही करताना दिसतं आहे. पण काही नवे प्रयोग करावे लागतील. स्पष्ट नियोजन असले पाहिजे. नियोजनात गोंधळ असता कामा नये. कारण आज महाराष्ट्रातली परिस्थिती चिंता करण्यासारखी आहे, असं वक्तव्य केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी पण केलं आहे. विशेषतः मुंबई आणि पुण्यातली परिस्थिती वाईट आहे. महाराष्ट्र सरकार प्रयत्न करतें आहेच.
यात राजकारण न करता आम्ही सगळ्यांनी मिळून या परिस्थितीचा सामना करायला पाहिजे. राज्य सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे. भारत सरकार त्यांच्या मागे उभं आहे आणि सगळ्यांनी मिळून कोरोनाविरोधातली लढाई जिंकली पाहिजे, हाच यात भाव आहे.
  यात राजकारण करणं, टीकाटिप्पणी करणं, एकमेकांची उणीदुणी काढणं, दोष काढणं हे बरोबर होणार नाही. ते या काळात काढू नये. एकदा ही लढाई संपल्यानंतर प्रत्येकाला आपापलं राजकारण करण्याचा अधिकार आहे, स्वातंत्र्य आहे. पण राजकारण वीस टक्के आणि बाकीचे समाजकारण असले पाहिजे. निवडणुका संपल्यावर कोणताही पक्षभेद असता कामा नये तर प्रत्येकाने विकासासाठी एकत्र आले पाहिजे. यातून महाराष्ट्राची पुनर्रचना करण्याची आवश्यता आहे. विशेषत: मुंबईतील लोकलची गर्दी कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. त्यासाठी लोकलचे डबे वाढवणे, त्यांची संख्या वाढवणे याकडे लक्ष दिले गेले पाहिजे. आज पश्चिम मार्गावर तीन मिनिटाला, मध्य मार्गावर 8 मिनिटाला आणि हार्बर मार्गावर 15 मिनिटाला लोकल धावते. हे अंतर कमी करून प्रत्येक मिनिटाला लोकल धावता येते काय याचा विचार करण्याची वेळ आली पाहिजे.
   सध्या लॉकडाऊनचा तिसरा टप्पा आता सुरू आहे आणि लोकांच्या मनात एकच प्रश्न आहे की यापुढे काय होणार? 17 मे नंतर काय होणार? लॉकडाऊन आणखी वाढणार, शिथील होणार, याबद्दल सरकारची नेमकी एक्झिट स्ट्रॅटेजी काय आहे?
यासंदर्भात पंतप्रधान सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. देशात आणि विशेषतः काही राज्यात आणि काही शहरांमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यामुळे एकीकडे कोरोनाशी लढायचं आणि दुसरीकडे आपलं आयुष्य सुरळितपणे जगायचं, अशी पद्धत विकसित केली पाहिजे. तेच हे इन्फ्रास्ट्ऱक्चर असणार आहे. म्हणजे आता आपण कायम मास्क लाउन काम करायची तयारी ठेवलीच पाहिजे. जपानसारख्या काही देशात तसे केले जाते. त्याचप्रमाणे तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. शक्यतोवर आपल्या घरीच रहावं. घराबाहेर पडताना मास्क वापरलाच पाहिजे.
दुसरं दोन व्यक्तींमधलं सोशल डिस्टन्स एक मीटरपेक्षा जास्त असलं पाहिजे. तिसरं म्हणजे जाता-येता हात सॅनेटायझरने स्वच्छ केले पाहिजे. याशिवाय उद्योजकांनी त्यांच्याकडे येणार्‍या मजुरांमध्ये संक्रमण होणार नाही, यासाठी अन्न आणि निवार्‍याची व्यवस्था करायला हवी. हे केवळ कोरोनासाठी नाही तर भविष्यात येणार्‍या कोणत्याही साथीच्या रोगासाठी ही सवय आवश्यक आहे. 2014 ला पहिल्यांदाच 2 ऑक्टोबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेचा मंत्र दिला होता. तो आता अधिक काटेकोरपणे पाळावा लागेल.
   त्याचबरोबर वाहतुकीदरम्यान संक्रमण होणार नाही, यासाठीही काळजी घ्यावी लागणार आहे. आता सरकारने राष्ट्रीय महामार्ग खुले केले आहेत. 65-70% ट्रॅफिक आलेलं आहे. सगळे पोर्ट्स सुरू झाले आहेत आणि आता हळूहळू कोरोनाच्या संकटामध्ये आपलं जीवनसुद्धा आपल्याला जगायचं आहे. किंबहुना कोरोनाबरोबर जगायची सवय लावावी असे सरकार आवाहन करत आहे. असं कायमचं घरात बसून चालणार नाही. त्यामुळे कोरोनाच्या अनुषांगिक जीवनपद्धती आपल्या सर्वांनाच शिकावी लागणार आहे. किंबहुना आपली प्रतिकारशक्ती वाढवणे हेच यासाठी महत्वाचे आहे. तसेच आपली कार्यालयीन रचना, मिटींग, संवाद याची पद्धती आपल्याला बदलावी लागेल. आपल्या सवयी आपल्याला बदलाव्या लागतील. कोरोना यापुढेही काही काळ राहणार आहे, हे आपण गृहित धरायला हवं.
 आज देशातील गोवा आणि अरुणाचल प्रदेश या दोन राज्यांमध्ये कोरोनाचे शून्य रुग्ण आहेत. गोवा हे पर्यटनाचे राज्य आहे. सर्वाधिक पर्यटक, परदेशी नागरिक इथे येत असतात. तरी ते शून्य आहे. केरळमध्ये सुरुवातीला रुग्ण वाढत होते, मात्र आता त्यांनी परिस्थिती आटोक्यात आणली आहे. हे सर्वांना जमले पाहिजे. आपण सर्वात आधी परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. या आजारावर लस मिळेपर्यंत थोडं असुरक्षिततेचं वातावरण असणार आहे.
   दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे कोरोनाग्रस्ताची ओळख तात्काळ पटवणं, याबाबतीतली तांत्रिक प्रगती होणं गरजेचं आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टींवर सध्या काम सुरू असल्यामुळे आपल्या सर्वांना थोडा संयम ठेवून अशापद्धतीने जीवन जगण्याची कला आपण हस्तगत केली पाहिजे.
   आपण जर गर्दीने भरलेल्या लोकल ट्रेनमध्ये बसल्याशिवाय कामावर जाऊ शकणार नसू तर येणार्‍या दिवसांमध्ये आपण कशापद्धतीने काम करायचं हे ठरवलं पाहिजे. अर्थात  बर्‍याच जणांनी यातूनही मार्ग काढलेला आहे. बरेज जण घरी बसून काम करत आहेत. आता पूर्वीप्रमाणे खचाखच लोकल भरतील, अशी परिस्थिती होणं कठीण आहे. दुसरं एखाद्या इंडस्ट्रीमध्ये रोज हजारो कामगार जात असतील. तर त्यांनी परिसरातच राहुट्यासारखी सोशल डिस्टन्सिंगचं पालन होईल, अशी तात्पुरती व्यवस्था करायला हवी. त्यादृष्टीने सोशल डिस्टन्सिंग ठेवायला हवे.
  आपली जीवनशैली बदलणे, नव्या सवयी लावून घेणे, थोडे इन्फ्रास्ट्रक्चर बदलणे, वेळेत बदल करणे असे काही नियोजन करून आपल्याला लढायला हवे. ही जगण्याची लढाई जिंकण्यासाठी काम करायला हवे. तशी पुनर्रचना करायला हवी. आपले पेहेराव, स्वच्छतेच्या सवयी, खाण्यापिण्याच्या सवयी यातून आपल्याला हे बदल निर्माण करावेच लागतील.
  रस्त्यावरचे खाणे, गर्दी करणे, खरेदीच्या सवयी यातही बदल करावे लागतील. ऑनलाईन खरेदी शक्य तितकी करावी लागेल. होम डिलीव्हरीचा पर्या्य जास्तीत जास्त स्विकारावा लागेल. आपल्या शैलीत बदल करून यावर मात करता येईल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: