शनिवार, १६ मे, २०२०

मालेगावातील कोरोनाचा धोका

महाराष्ट्रात मुंबई पाठोपाठ मालेगांव हे शहर धोकादायक शहर म्हणून दिसत आहे. अर्थात कोणत्याही परिस्थितीत मालेगांव हे चर्चेत आणि वादग्रस्त असेच शहर राहिले आहे. भिवंडी आणि मालेगांव ही कायम वादग्रस्त आणि चर्चेतील शहरे राहिली आहेत. तीच शहरे आज कोरोनाचे फार मोठे हॉटस्पॉट ठरत आहेत. ही चिंतेंची बाब आहे. कारण हे शहर एक जैविक बाँम्ब बनते आहे काय असाच सवाल यामुळे उपस्थित होताना दिसत आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी, गर्दीचे शहर आहे. देशभरातून नव्हे तर जगभरातून तिथे लोक येत असतात. त्यामुळे तिथे कोरोनाचा प्रसार होणे स्वाभाविक आहे. पण मालेगांवात एवढा प्रसार होण्याचे कारण काय? इथे मुद्दाम काही केले जात आहे का? सरकारला असहकार करून रोगप्रसार वाढवला जात आहे का? असे अनेक प्रश्न यातून निर्माण होतात.  नाशिक जिल्ह्यातील मालेगाव हे शहर कोरोना व्हायरसचं हॉटस्पॉट बनले आहे. असा एकही दिवस जात नाही की तिथे नवे कोरोना पॉझिटिव्ह पेशंट्स सापडत नाहीत. त्यामुळेच ही एक महाराष्ट्राची फार मोठी चिंता आहे. मालेगांवातून मुंबईत येणारांचेही प्रमाण मोठे असते. त्यामुळे इथे आज जरी सीमाबंदी केली तरी हे विषाणू, मानवी कोरोना बाँम्ब इथे तसेच शिल्लक राहणार नाहीत ना अशीही चिंता यातून निर्माण होउ शकते.    एकीकडे सुविधा अपुर्‍या असल्याचा स्थानिकांचा आरोप इथे होत आहे. तर दुसरीकडे लोकांकडून पोलिसांवर होणारे हल्ले ही इथली दुसरी समस्या आहे. त्याचवेळी कर्तव्य बजावत असलेले पोलीस आणि आरोग्य सेवकांना कोरोनाची होणारी लागण, अशा तिहेरी कात्रीत मालेगावचं कोरोना व्यवस्थापन सापडलं आहे. यावर लवकरात लवकर उपाय योजणे गरजेचे आहे. अर्थात नाशिक जिल्ह्यातलं हे शहर चर्चेत यायची ही पहिलीच वेळ नाही. कायम या शहराची चर्चा वादग्रस्त शहर म्हणूनच झाली आहे. त्यामुळेच वसंत कानेटकर यांच्यासारख्या सिद्धहस्त नाटककाराने मालेगांवच्या दंगेखोरी, वादग्रस्त पणाचा उल्लेख आपल्या प्रेमाच्या गावा जावे या नाटकातही केलेला आहे. प्रेमानंद या भोंदू महाराजाला त्याच्या शांततेच्या प्रयत्नांचा प्रयोग करण्याचा सल्ला या नाटकात बिंदुमाधव सरनोबत यांच्या तोंडून देतात हे त्यासाठीच. कारण हे शहर कायम वादग्रस्त राहिले आहे.  हे काही आजचेच नाही. अगदी 1857च्या स्वातंत्र्ययुद्धापासून हे शहर चर्चेत राहिले आहे. मोसम आणि गिरणा नदीच्या संगमावर वसलेल्या या शहराचं मूळचं नाव होतं माळीगाव. शिवसेनेने औरंगाबादचे संभाजीनगर केले तसे मालेगांवचे माळीगांव का केले नाही हाही प्रश्न यातून निर्माण होतो. म्हणजे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धात सरदार नारोशंकर राजेबहादूर यांनी मालेगावात किल्ला बांधायला घेतला आणि उपजीविकेच्या ओढीने ठिकठिकाणचे लोक इथे येऊन वसले. यात मुख्यत्वेकरून समावेश होता सुरत आणि उत्तर भारतातल्या विणकरांचा.  आपल्याकडे भिवंडी, मालेंगांव, इचलकरंजी ही हातमाग, यंत्रमागांमुळे मॅचेंस्टर सीटी म्हणून ओळखली जातात ती याच कारणासाठी. पॉवरलूममध्ये काम करणार्‍या व्यक्तींना श्वसनाच्या विकारांचा धोका जास्त असतो. त्यामुळेच 1857च्या युद्धात जेव्हा भारतीय मुस्लीम शासकांचा पराभव झाला, तेव्हा ब्रिटिशांच्या भीतीने उत्तरेकडल्या राज्यांमधून मुस्लीम कामगारांचे लोंढे दक्षिणेकडे निघाले, त्यातले अनेक लोक मालेगावात स्थायिक झाले. 1864 साली वाराणसीमध्ये पडलेल्या भयानक दुष्काळात आणखी काही मुस्लीम विणकर जिवंत राहाण्यासाठी इथे निघून आले. तेव्हापासून हा मुस्लिम बहुल असा प्रदेश बनत गेला.1948 मध्ये हैदराबादच्या मुक्तिसंग्रामात अनेक मुस्लीम इथे आले. सूत कताई, कापड विणणे, रंगवणे अशी वेगवेगळी कामं इथे सुरू झाली. इथून मालेगावची ओळख वस्त्रोद्यागाचं प्रमुख ठिकाण अशी तयार व्हायला सुरुवात झाली. महाराष्ट्रात नाशिकमधील मालेगांव, ठाण्यातील भिवंडी आणि कोल्हापुरातील इचलकरंजीत ही वस्त्रांची ठिकाणे बनू लागली. त्यात मालेगांवचा अग्रक्रमांक लागतो. त्यामुळे मालेगांव हे तसे आपल्याकडील ऐतिहासिक शहर आहे. भारताचे प्रमुख पाच उद्योग आहेत त्यात साखर, सिमेंट, लोखंड पोलाद, ताग आणि सूती कापड उद्योग हे पाच प्रमुख उद्योग येतात. त्यातील सूत उद्योगाचे हे महत्वाचे ठिकाण होते. चांगला रोजगार देणारे हे शहर होते. पण नंतर हे शहर एकप्रकारे वादग्रस्त आणि बदनाम होत गेले.  कालांतरा अशा काही घटना घडल्या, ज्यामुळे मालेगावला ’दंगलींचं शहर’ असं ओळखलं जाउ लागलं. विसाव्या शतकाच्या सुरुवातीपासूनच इथे अनेक दंगली झाल्या. मालेगावमध्ये झालेल्या पहिल्या दंगलीची नोंद सापडते ती 1921 साली. म्हणजे 100 वर्षार्ंपूर्वी या शहराची ओळख बदलण्याचे काम केले गेले. म्हणजे 1921 साली खिलाफतचं आंदोलन झालं तेव्हा जी दंगल झाली, त्या दंगलीने या शहराची ओळखच बदलली. कारण खिलाफत चळवळ रद्द झाली म्हणून मुस्लिमांनी आंदोलन केलं होतं. खवळलेल्या जमावानं दोन पोलिसांना ठार केलं होतं. तेंव्हापासून या शहरात पोलिसांवर सातत्याने हल्ले होत असतात. याठिकाणी कामावर जाण्यासाठी पोलीसही घाबरतात अशी परिस्थिती आहे. त्यामुळे या शहरात पोलिसांवर एक प्रकारची दहशतच असते. राज्याच्या गृह खात्याकडून एखाद्या पोलीस अधिकार्‍याला छळायचे असेल, डोईजड झाला असेल, शिक्षा द्यायची असेल तर त्याला गडचिरोली, मालेगांव नाहीतर भिवंडीत बदली करून पाठवले जाते. मालेगांवात बदली करेन असे धमकावले की वरीष्ठांकडून दिलेली आज्ञा कनिष्ठ निमुटपणे ऐकतात असे सांगितले जाते.1921 नंतर इथे जी दंगलीची परंपरा सुरू झाली तरी आजतागायत कायम आहे. म्हणूनच या शहराला दंगलीचे शहर असेही म्हटले जाते. अर्थात हे भूषणावह नाही. म्हणजे एकीकडे पुण्याला विद्येचे माहेरघर, सातार्‍याला शूरविरांचा जिल्हा, मुंंबईला औद्योगिक शहर अशी ख्याती मिळत असताना दंगलींचे शहर ही ओळख मिळणे ही तशी बदनामीच होती. पण त्यानंतरही अनेक छोट्या-मोठ्या कारणांवरून इथे दंगली झाल्या आहेत. या भागात म्हणजे मालेगावात शेवटची दंगल झाली ती 2001 साली. अर्थात त्यानंतर आजपर्यत मालेगावमध्ये दंगल झालेली नाही. ही अत्यंत समाधानाची बाब आहे. विशेष म्हणजे आता इथल्या लोकांना विकास हवा आहे. दंगली नको आहेत. दंगलींनी काही साध्य होत नाही हे इथल्या लोकांना समजून चुकले आहे.मालेगाव भारतातल्या काही मोजक्या शहरांपैकी असेल, जिथे मुस्लीम बहुसंख्य आहेत. पण इथली लोकसंख्या भौगोलिक आधारावरही विभागलेली आहे. मोसम नदीच्या पूर्वेला मुस्लीम वस्ती आहे तर पश्चिमेला हिंदू वस्ती. सुरुवातीला असं चित्र नव्हतं. मूळ मालेगावात, ज्याला जुनं मालेगावही म्हटलं जातं तिथे सगळ्या प्रकारचे लोक राहात होते. पण ही मोसम नदी ही फाळणीची, विभागणीची नदी या शहरात दिसून येते. आजही इथला मुस्लीम समाज  पारंपारिक पावरलूमच्या व्यवसायावरच अवलंबून राहिला आहे. इथले हिंदु आणि अन्य लोक रोजगारासाठी, शिक्षणासाठी बाहेर पडले. त्यांची संख्या कमी होत गेली. मुस्लीम मात्र आहेत तिथेच राहिले. आपल्या धर्माच्या लोकांमध्येच राहाणं त्यांना सुरक्षित वाटलं. शिक्षणाचा अभाव असल्याने मुस्लीम समाज मात्र पारंपारिक पावरलूमच्या व्यवसायावरच अवलंबून राहिला. आज मालेगावच्या पावरलूममधले 80 टक्के कामगार मुस्लीम आहेत, आणि अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत राहतात. हाच प्रकार भिवंडीतही पहायला मिळतो. यातले अनेकजण बांग्लादेश, उत्तर भारतातून आलेले आहेत. ही माणसं राहातात त्या वस्त्या आणि गल्ल्या अत्यंत दाटीवाटीच्या, कोंदट आणि गर्दीच्या आहेत, त्यामुळे कोणत्याही साथीच्या रोगाला इथली माणसं लवकर बळी पडतात. त्यामुळेच मालेगांव कोरोनाचे केंद्र बनत आहे. इथल्या दाटीवाटीच्या वस्तीमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळणं अवघड आहे. अशीच परिस्थिती धारावीमध्ये आहे, पण तिथे हिंदू-मुस्लीम दोन्ही प्रकारचे लोक आहेत त्यामुळे तिथे जागरुकता आहे. मालेगावांत तसे नाही.मालेगाव महाराष्ट्राच्या वस्रोद्योगाचं केंद्र आहे. इथे तीन लाख पावरलूम्स आहेत आणि इथले बहुतांश रहिवाशी आपल्या उपजीविकेसाठी पावरलूमवर अवलंबून आहेत. इथल्या लोकांना आधीपासूनच श्वसनसंस्थेचे आजार आहेत. सतत पावरलूममध्ये काम केल्याने या लोकांच्या छातीत अत्यंत छोटे कण, धागे, धूळ जाऊन त्यांची श्वसनयंत्रणा आधीच कमजोर झालेली असते. मालेगावमध्ये टीबीचा प्रादुर्भावही प्रचंड आहे. इथल्या लोकांना सतत अनारोग्यात जगावं लागतं, त्यामुळे त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी झालेली असते. कोव्हिड-19 सारख्या आजाराला ते फार लवकर बळी पडू शकतात. आज इथल्या नागरिकांना आरोग्याची हमी देण्याची गरज आहे. सरकार प्रयत्न करते आहे, पण त्याला इथल्या लोकांनी प्रतिसाद देणे गरजेचे आहे. त्यासाठी समाजवादीचे आबू आझमी, एमआयएमचे इम्तियाज जलील, ओवेसी, राष्ट्रवादीचे नबाब मलिक यांनी या लोकांना आवाहन करून डॉक्टर, प्रशासन यांना सहकार्य करण्याचे सुचवले पाहिजे. कसलाही धार्मिक रंग देउन त्यांनी प्रतिष्ठेचा प्रश्न न करता सरकारला सहकार्य करण्याचे आवाहन केले पाहिजे. कारण ही वेळ राजकारणाची नाही. दिल्लीसारख्या घटना घडता कामा नयेत. रमजानचा महिना असला आणि ईद जवळ आली असली तरी गर्दी करण्यापासून रोखले पाहिजे. सर्व धर्मियांनी आपले सण रद्द केले आहेत तर यांनाही सण समारंभ साजरे करण्यापासून आवाहन करण्याची गरज आहे. नाहीतर हा कोरोनाचा बाँम्ब इथे जिंवंत राहील. आज मालेगावात कोरोना पॉझिटिव्ह पेशंटची संख्या जवळपास चारशेच्या पुढपर्यंत पोहचली आहे. अजूनही संख्या वाढेल. इथले चारही मौलाना कोरोनाला बळी पडले आहेत. अजूनही आरोग्य यंत्रणा सक्षम झालेली नाही. इथे तातडीने उपाययोजना केल्या नाहीत तर मालेगावची परिस्थिती आणखी बिघडत जाईल. त्याचा धोका संपूर्ण महाराष्ट्राला, पर्यायाने देशाला बसू शकतो.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: