सुरक्षित अंतर ठेवा हे वाक्य आपण प्रवास करताना वाहनांच्या मागे नेहमी वाचतो. आपल्या वाहनाच्या पुढे ट्रक वगैरे वाहने असतील तर हे वाक्य हमखास आपण वाचतो. अपघात होउ नये आणि सर्वांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी दोन वाहनांमध्ये सुरक्षित अंतर असले पाहिजे हा वाहतुकीचा नियम आता जगण्याच्या प्रवासालाही लागू होत आहे. कारण इथून पुढचे आयुष्य आपल्याला सुरक्षित अंतर ठेवूनच जगायचे आहे. या सुरक्षित अंतर ठेवण्याचा सल्ला आपल्याला कुटुंब नियोजनातही मिळतो. दोन मुलांमध्ये योग्य अंतर असावे यासाठी. तसेच आता हा कायमस्वरूपी मंत्र आगामी काळात राहणार आहे. किंबहुना कोरोना नंतरच्या जीवनात हाच मंत्र जपत आपल्याला जगायचे आहे. म्हणजे कोरोनामुळे संपूर्णणे ठप्प झालेले जनजीवन नियम व अटींसह काही प्रमाणात सुरु होत आहे. रिकामे, सुनसान रस्ते आता वाहनांच्या पळत्या चाकांनी सुखावत आहेत. लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात अत्यावश्यक सेवांशिवाय इतरही उद्योजकांना आणि कार्यालयांना काही प्रमाणात आपले कामकाज सुरु करण्याची मुभा देण्यात आली आहे. जे जिल्हे अतिदक्षता विभागात येत नाहीत त्या ठिकाणच्या प्रवासी वाहतुकीसाठी एसटीही सुरू करण्यात आली आहे. किमान जून महिन्यात तरी अनेकांना आपले दैंनदिन आयुष्य पुन्हा सुरु करता येईल, अशा अपेक्षा आता वाढत आहेत. पण हे जगणे सुरक्षित अंतर ठेवून असणार आहे. कोरोनामुळे बहूतांश कार्यालये, शाळा, कॉलेज आणि शिकवणी वर्गांनी ऑनलाईनचे महत्व जाणले. त्यानुसार, भारतात अगदी महाराष्ट्रात ग्रामीण भागातही ऑनलाईन कामकाज सुरु झाले. ज्यांना ऑनलाईन काम, ‘वर्क फ्रॉम होम’ आदीचे वावडे होते त्यांनाही आता याची चांगलीच सवय होते आहे. राज्य सरकारने जरी झूम अॅपबाबत काही प्रमाणात सांशकता व्यक्त केली असली तरी बहूतांश कार्यालयांनी लॉकडाऊनच्या काळात कर्मचार्यांसोबतच्या मिटींगसाठी झूम अॅप, व्हीडिओ कॉलिंगचा आधार घेतला आहे. थोडी काळजी घेतली तर सुरक्षितपणे ऑनलाईनचे उत्तम पर्याय वापरता येतात. सर्व सरकारी, निमसरकारी आणि खासगी कार्यालयांप्रमाणेच आता न्याय व्यवस्थाही ऑनलाईनच सुरु आहे. अनेक राज्यांनी लॉकडाऊनची व्याप्ती बर्यापैकी कमी करून जनजीवन सुरळीत करण्याला प्राधान्य दिले आहे. याचा अर्थ कोरोनाचा धोका पूर्णपणे टळला आहे किंवा लवकरच तो टळणार आहे, असा निश्चितच नाही. परंतु, सगळे काही बंद करून घरात बसून राहिल्याने फारसे काही साध्य होणार नाही, याची जाणीव आता लोकांना, सरकारला होत असल्याचे दिसते. त्यादृष्टीने सुरक्षित अंतर ठेवत जगायला माणसांनी सुरूवात केलेली आहे.कोरोनाची लागण होणार नाही या दृष्टीने घ्यावयाची ती काळजी घेऊन सामान्य व्यवहार पूर्ववत करण्याकडे लोकांचा आणि सरकारचाही कल दिसत आहे. आज संपूर्ण जग कोरोनामुळे भयग्रस्त झाले आहे. कोरोनाने माणसाला घरात बसण्यास बाध्य केले आहे. अजूनही जर आम्ही स्वत:ला सुधारू शकलो नाही, तर कोरोना व्हायरस आणखी थैमान घालेल ही भीती कायम आहे. अमेरिकेसारख्या प्रगत देशातील मृतांचा आकडा तपासला तर या संकटाचे स्वरूप किती भयंकर राहू शकते, याचा विचार आताच केला पाहिजे. मनुष्यजातीने आत्मसंयम बाळगणे फारच महत्त्वाचे झाले आहे. आपल्या महत्त्वाकांक्षेपायी संपूर्ण मनुष्यजातीचे, जगाचे नुकसान होणार नाही, याची दक्षता सगळ्यांनी घेतली पाहिजे. आर्थिक विकासाची एक मर्यादा प्रत्येक देशाने ठरवून टाकली पाहिजे. तरच निश्चिंतपणे पुढली वाटचाल करता येणार आहे. कोरोना संकटापासून धडा घेत आम्ही दिशा निश्चित करून वाटचाल केली, तर मनुष्यजातीला कुठलाही धोका उत्पन्न होणार नाही, याची खात्री बाळगली पाहिजे. कदाचित आणखी काही दिवस ‘रेड झोन’पुरताच लॉकडाऊन कायम राहील. त्यानंतर जनजीवन हळुहळू जनजीवन पूर्वपदावर येईल. एकीकडे कोरोनाशी सुरू असलेली लढाई तशीच सुरू राहील आणि दुसरीकडे जगरहाटीदेखील नेहमीप्रमाणे सुरू होईल. परंतु, सगळेच काही पूर्वीसारखे नसेल. अंतर ठेवून माणसाला जगण्याची कला शिकावी लागेल. माणसं एकमेकांपासून चार हात दूर राहिली तरी ती मनाने दूर होणार नाहीत याचीही काळजी घेतली पाहिजे. हेच या कोरोनाने शिकवले आहे. कोरोनानंतर जग हे म्हणूनच सुरक्षित अंतर ठेवणारे असेल. तसे या कोरोनाने बरेच धडे आपल्याला दिले आणि जगालाही दिले. हे धडे केवळ आरोग्यासंदर्भात होते किंवा आहेत असे नाही तर जागतिक अर्थशास्त्राचीही नव्याने फेररचना केली जाऊ शकते, इतपत हे धडे व्यापक आहेत. आपल्याजवळ जेवढे आहे, त्यापेक्षा अधिक कमवा, असे आजचे अर्थशास्त्र शिकविते. यातून अधिकाधिक कमावण्यासाठी अनैतिक स्पर्धा सुरू होते आणि त्याचे दुष्परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतात, हे लक्षात घेतले पाहिजे. अधिकाधिक पैसा कमवायचा, त्यातून स्वत:ची ताकद वाढवायची आणि वाढलेल्या ताकदीतून विस्तार करायचा, हा प्रकार भांडवलवाद जन्माला घालून खतपाणी देणाराच म्हटला पाहिजे. जागतिक वर्चस्वाच्या या लढाईतून, स्पर्धेतून अनेक देशांनी महासंहारक शस्त्रास्त्रे निर्माण केली आहेत. या महासंहारक शस्त्रांचा वापर वर्चस्वाच्या लढाईत एकमेकांविरुद्ध झाला, तर संपूर्ण जग उद्ध्वस्त होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कोरोना संकटाने जागतिक बाजाराच्या धावत्या चाकाचीच खीळ काढल्याने संपूर्ण जगासमोर आता आर्थिक महामंदीचे संकट उभे ठाकले आहे. अनेक बड्या उद्योजकांचे कारखाने बंद आहेत, आधीच उत्पादित मालाचा उठाव होत नाही तोपर्यंत नव्या मालाचे उत्पादन जोखमीचे ठरू शकते, याचा अर्थ हे कारखाने इतक्यात सुरू होणार नाहीत. सरकारी तिजोरीवरही प्रचंड ताण आल्याने बाजारात पैसा ओतण्याच्या सरकारच्या क्षमतेला मर्यादा आल्या आहेत. मागणी-पुरवठा साखळीच विस्कळीत झाली आहे, ती पूर्ववत सुरू होण्यास बराच काळ लागू शकतो, शिवाय केवळ उत्पादन पूर्ण वेगाने सुरू होणे पुरेसे नाही, त्या उत्पादनाला बाजारपेठेत उठावदेखील मिळायला हवा. कोरोनामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगार कमी झाले आहेत, होत आहेत आणि पुढेही काही काळ ते होतच राहणार आहेत, त्यामुळे बाजारातील ग्राहकांची संख्या कमी होईल, शिवाय या संकटामुळे पैसा खर्च करण्याबाबतीत लोक हात आखडता घेऊ शकतात. त्यामुळे माणसामाणसांतील अंतर हे त्या अर्थानेही वाढणार आहे. पण आरोग्याच्या दृष्टीनेच फक्त सुरक्षित अंतर ठेवणे महत्वाचे असते. चीन सध्या औद्योगिक इंटरनेट सिस्टिम, पुढील पिढीसाठी ती माहिती व तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान या क्षेत्रासाठी विशेष निर्मिती करून या उदयोन्मुख क्षेत्रावर वर्चस्व राखण्यासाठी प्रयत्नशील आहे. पण या चीनपासूनही आपल्याला सुरक्षित अंतर ठेवावे लागणार आहे.
रविवार, ३१ मे, २०२०
सुरक्षित अंतर ठेवा
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा