पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले. बुधवारी अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी त्याचा ब्रेकअप देत पहिला टप्पा जाहीर केला. यात सूक्ष्म, लघू, मध्यम उद्योगाला प्रोत्साहन देंण्याबरोबरच सामान्य, मध्यमवर्गीय, कामगार, नोकरदार यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. ही सगळी तयारी आता इथून पुढे कोरोनाबरोबर जीवन जगायचे आहे याची तयारी आहे हे लक्षात घेतले पाहिजे. अमेरिका आणि अन्य देशांनी कितीही या रोगावर मात करण्याच्या बाता केल्या तरी ते सहजासहजी शक्य नाही. तर या पाहुण्याला आपल्याकडे आता अॅडजस्ट करायचे आहे. तो जाईल म्हणून आपली कामे थांबू न देता त्याला इथे ठेवून आता पुढजे जीवन जगण्याचा संदेश या सर्व कृतीतून दिसत आहे. म्हणजे देशातील कोरोना रुग्णांची संख्या एका बाजूने दिवसागणिक वाढत असताना, दुसरीकडे सरकारने आपली कोरोनाविषयक रणनीती बदलण्याचा विचार चालवल्याचे संकेत मिळत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याची तयारी करून आता सावरायचे आहे हे लक्षात घेउन या पॅकेजची घोषणा केली आहे. विशेषत: कधी नव्हे ते काँग्रेसच्या गोटातूनही याचे कौतुक केले गेले आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही सरकारच्या या निर्णयाचे स्वागत करून हे पॅकेज पुरेसे आणि पर्याप्त असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे आपल्याला करोनाबरोबर कायमचे जगायचे आहे याची निर्धार प्रत्येकाने करायचा आहे.तत्पूर्वी आधीच केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेले विलगीकरणाबाबतचे नवे शिथील दिशानिर्देश, आरोग्य खात्याने कोरोना रुग्णांच्या चाचण्यांसंदर्भात शिथील केलेले निकष, रेल्वे मंत्रालयाने पंधरा मार्गांवर रेल्वे सुरू करण्याचा घेतलेला निर्णय आदी विविध निर्णय पाहिले, तर त्या सर्वांची एक संगती लावता येते आणि आजवरच्या कडक निर्बंधांपेक्षा वेगळी रणनीती आता भारत सरकार आजमावू पाहात असल्याचेही त्यातून स्पष्ट होते. रेल्वेपाठोपाठ विमान सेवा देखील सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. म्हणजेच यापुढील काळात आपल्याला ‘कोरोनासमवेत जगायचे आहे’ हाच संदेश केंद्र सरकारने या सार्यातून दिलेला आहे. आता त्याची तयारी सर्वांनी करायची आहे. म्हणजे एकुणच सर्व रोगांबरोबर आपण जमवून घेतलेले आहे तसे या रोगाबरोबरही जमवून घेण्याचे आता ठरवलेे आहे. मलेरिया, टायफाईड, फ्ल्यू, गोवर, विविध ताप यांच्या जशा साथी असतात तसेच ही साथ आहे असे समजून जमवून घ्यायचे आहे असा निर्धार आता करायचा आहे. त्यादृष्टीने हे पॅकेज मिळाले आहे हे लक्षात घेतले पाहिजे. अर्थात याची गरज होतीच. कोरोनापेक्षा फार मोठी भिती सामान्यांमध्ये रोजगाराची होती. कारण बहुसंख्य कंपन्यांनी सरसकट चालवलेली कामगार कपात, वेतन कपात, वेतनातील विलंब या सार्या आर्थिक अडचणींतून बाहेर पडायचे असेल तर जनजीवन सामान्य व पूर्ववत होणे आवश्यक आहे. किती दिवस असे तोंड लपवून जगायचे हाही प्रश्नच होता. त्यामुळे काही ठोस निर्णय घेण्याची आवश्यकता होतीच. त्यामुळेच केंद्र सरकार हा धोका पत्करायला निघाले आहे. कोरोनापासून स्वतःचा बचाव करणे हे आता मुख्यत्वे जनतेच्या हाती राहील. समाजात वावरताना विविध खबरदारी गांभीर्यपूर्वक घेणे हाच सुरक्षित राहण्याचा एकमेव मार्ग आहे. आजवर सरकारने भरपूर प्रयत्न केले आहेत. आता जनतेने सावधपणे जगत पुढचा लढा दिला पाहिजे. दोन महिन्यात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. त्यादृष्टीने त्यांनी कंबरही कसली आहे. पण त्याचा सदुपयोग आणि योग्य आचरण करण्याचे काम नागरिकांचे आहे. सरकारने थोडी फार शिथिलता दिली तरी नागरिकांनी संयम राखण्याची जबाबदारी घेतली पाहिजे. सुदैवाने देशात सुबत्ता आहे. सर्व गोष्टींची उपलब्धता आहे. शेतीमालाची रेलचेल आहे. मग माणसे विनाकारण गर्दी का आहे? धान्य, भाजीपाला, किराणा माल खरेदीसाठी गर्दी केली जातेच आहे पण दारूसारख्या वस्तूसाठीही गर्दी केली जाते आहे. घरपोच डिलीव्हरी, होम डिलीव्हरी, ऑनलाईन शॉपींगची सुविधा असताना माणसे विनाकारण गर्दी करत आहेत. हे चुकीचे आहे. म्हणूनच आपल्याला या रोगाला जागा करून दिली आहे तर पुरेसे अंतर हे ठेवावेच लागेल. हे काही इथवर संपणार नाही. त्यामुळे ज्याप्रमाणे आपण अनेक साथीचे रोग आपल्या आयुष्यात स्विकारले आहेत तसेच या रोगाला जागा केली पाहिजे. अलिकडच्या भाषेप्रमाणे कोरोनालाही स्पेस निर्माण करून दिला पाहिजे. तो देताना आपण सावरायचे आहे.सरकारला याची पूर्ण जाणीव आहे. आज जगात आपली लोकसंख्या प्रचंड आहे. अमेरिका, इंग्लंड या देशांची लोकसंख्या भारतातल्या एकदोन राज्यांइतकीही नाहीये. पण भारताचे तसे नाही. आपल्या प्रचंड लोकसंख्येला हा लढा द्यायचा आहे. त्यामुळे या वर्क फ्रॉम होम, होम डिलीव्हरी, सोशल डिस्टन्स या गोष्टी आता अंगवळणी पाडून घेतल्या पाहिजेत. तसे आपल्याकडे कॉलेजच्या मुलींनी बाईकवरून जाताना तोंड लपवून जाण्याची आयडीया अनेक वर्षांपासून सुरू केलेली आहे. तीच आता प्रत्येकाने लावू घेतली पाहिजे. कारण इथून पुढे आपण कोरोनाबरोबर जगायचे आहे. सरकारने जाहीर केलेल्या या सगळ्या योजना आणि येत्या दोन दिवसात जाहीर होणार्या लॉकडाउन 4 च्या घोषणा यासंबंधीच असतील हे लक्षात घेतले पाहिजे. |
शुक्रवार, १५ मे, २०२०
कोरोनाला स्पेस देण्याची वेळ
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा