गेल्या तीन महिन्यांपासून संपूर्ण जगावर कोरोनाचे संकट आहे. अमेरिकेसारख्या महासत्तेला जिथे फटका बसला आहे तिथे भारताची काय अवस्था असणार? नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका माहितीनुसार देशात जवळपास 12 कोटी लोक गेल्या महिनाभरात बेरोजगार झाले आहेत. त्यामुळे कोरानाच्या या संकटाचा सर्वाधिक फटका बसला आहे तो सर्वसामान्यांना. असंघटीत क्षेत्रातील कामगारांना. छोट्या व्यावसायिकांना. त्यांनी कुठे जायचे हा खरा प्रश्न आहे. त्यांची नुकसान भरपाई कोण करून देणार आहे का? त्यामुळे कोरोनापेक्षा जास्त मरण या रोगाने बेरोजगार सामान्यांचे झाले आहे. आज रस्ते ओसाड पडले आहेत. मोकळे दिसतात. पण याच रस्त्यांच्या दुतर्फा अनेक छोटे व्यवसाय असतात. अनेक छोटे जीव जगत असतात. त्यांचे काय? शेतकर्याना जशी अवकाळी पावसाची, दुष्काळाची भरपाई मिळते, तशी या लोकांना मिळणार आहे का? फार मोठे नुकसान झाले आहे या रोगाने सामान्यांचे. अनेक संसार उजाड होण्याची भिती आहे. कोणतेही शहर हे सामान्यांना रोजगार देणारे असते. मग मुंबई सारखे महानगर तर सागराप्रमाणे सर्वांना सामावून घेते. पण आज या सागराच्या पोटात उसळणारी ही वादळाची लाट समुद्रातील लाखो जीवांना किनार्यापासून लांब फेकताना दिसत आहे. इतकी की त्यांना पुन्हा त्या प्रवाहापर्यंत पोहोचणेही अवघड व्हावे. इतके लांब त्यांना या लाटेने फेकले आहे की ते लांब कुठेतरी खडड्ड्यात अडकून पडले आहेत. तिथून पुन्हा बाहेर पडणेही त्यांना शक्य नाही, इतके त्या खोलात ते रूतले आहेत. कोण आहेत हे लोक? हे लोक तेच आहेत, रोजजेच. जे आपल्या असंख्य गरजा भागवतात ते हे लोक. सकाळी उठल्यावर चहा पिण्यासाठी अनेकजण बाहेर पडतात. आजकाल अमृततुल्य, येवले, साई असे मिळत असले तरी वर्षानुवर्ष शहरातील प्रत्येक गल्लीबोळांच्या तोंडाशी चहाच्या टपर्या इथल्या नागरिकांची तल्लफ भागवत आहेत. नोकरदार मंडळी, आसपासचे दुकानदार, शिक्षणासाठी बाहेर राहिलेले विद्यार्थी, बॅचलर असे अनेकजण या टपरीचे ग्राहक असतात. आज त्यांची तल्लफ भागवणारे टपरीवरचे चहावाले गेली दोन महिने टपरी बंद करून घरात बसले आहेत. दिवसभर उभे राहुन चहा विकायचा आणि रात्री जाउन झोपायचे. पुन्हा पहाटे लवकर उठून यायचे. कसली उसंत नाहीच. सुट्टी नाहीच. पण आज दोन महिने हे लोक सुट्टीवर आहेत. हातावरची पोटं यांची. दररोज हजारोंचा गल्ला जमा करणारे आज एकेका रूपयासाठी तडफडत आहेत. कसे जगायचे? हे नुकसान कसे भरून काढायचे? हातावरची पोटं यांची.असेच अनेकजण सकाळी लोकांची नाष्टा आणि पोटापाण्याची सोय करता करता स्वत:चे पोट भरत असतात. कुणी कांदेपोहे, कुणी उप्पीट, कुणी इडली वडा, कुणी बटाटा वडा, कुणी मिसळ. असे कितीतरी पोटभरू व्यावसायिक लोकांची पोटं भरत जगत असतात. गेल्या दोन महिन्यांच्या बंदमुळे अनेकांची पोटं रिकामी आहेत. इतकी त्यांची अर्थव्यवस्थेची पोटंही पार खपाटीला गेली आहेत. रोजची हजारोची कमाई बरबाद झाली आहे गेल्या दोन महिन्यांंपासून. माणसांनी मरायचे तरी कसे? उपासमारीने? पैशाअभावी? की कोरोनामुळे? म्हणजे कोरानाने अनेकाना स्पर्शही न करता मारण्याचा घाट घातला आहे की. इथे मरण आहे ते सामान्यांचे. कारण यांना नुकसान भरपाई कोण देणार आहे का? किती लोक आपल्यावर अवलंबून असतात? किती जणांची सेवा आपल्याला रोज विकत घ्यावी लागते? याचा हिशोबही होत नाही. पण चपलेचा अंगठा तुटला. कोपर्यावरचा मोचीच ऐनवेळी मदतीला येतो. बुटाला पॉलीश नाही, तोच आपल्याला चकाचक बुट करून देतो. सोल गेला. हिल झीजली. लेस तुटली. अशा कितीतरी सेवा आपल्याला आठ पंधरा दिवसांतून एकदा तरी लागत असतात. असे कितीतरी लोक अशा सेवांवर अवलंबून असतात. सामान्य नोकरदारांचे पाय जमिनीवर न अडखळता राहण्यासाठी सेवा देणारे हे लोक पंधरा दिवस बंदचे संकट झेलत आहेत. लोक घरात आहेत. पण त्यांच्या पोटाचे काय? ही नुकसान भरपाई कशी होणार आहे?जीवनावश्यक वस्तू आणि सेवांमध्ये फक्त औषधे, किराणा एवढेच येते का? याशिवाय सेवा देणारांचे जीवन जीवनावश्यक नाही का? म्हणजे पहा ना दर वीस पंचवीस दुकानांनंतर रस्त्याच्या कडेला हेअर कटींग सलून असतात. रोजचे वीस पंचवीस ग्राहक मिळवून या दुकानातील प्रत्येक कारागीर आपला उदरनिर्वाह करत असतो. अनेकांना घरात जमत नाही म्हणून जाता जाता दाढी करून कार्यालयात जाणारे अनेकजण असतात. दाढी ही अत्यावश्यक सेवा आहे. हेअर कटींग चार दोन दिवस इकडे तिकडे चालते. बाकीचे मसाज, फेशीअल सोडा. पण किमान अशा कितीतरी कारागिरांना आज रिकामे बसावे लागत आहे. शटर खाली घेवून हे कारागिर स्वत:ला कोंडून घेवून बसले आहेत. यात स्थानिकच नाहीत तर उत्तर प्रदेश, बिहारवरून आलेलेही अनेक कारागीर आहेत. आलेला ग्राहक काळा की गोरा, गरीब की श्रीमंत, छोटा की मोठा असा कसलाही भेदभाव न करता त्या प्रत्येकाला सुंदर चेहरा देणारे हे कारागीर आज आपला चेहरा काळवंडून बसले आहेत. या सामान्यांचे नुकसान कसे भरून येणार आहे? कारण इथे मरण आहे ते सामान्यांचेच आहे.अशा किती व्यवसायांची नावे घ्यायची? एक ना दोन. पण हे सगळे मोठे व्यावसायिक नाहीत. यांनी फार मोठी पुंजी कमावून ठेवलेली नाही. हातावरची पोटं यांची. पण आज ते तडफडत आहेत. घरात कोंडून घेतले आहे त्यांनी. समोर भिंतीपलीकडे त्यांना त्यांची नेहमीची गिर्हाईके दिसत आहेत. आशेने कधी दुकान उघडणार याची वाट पाहणारी ती गिर्हाईके. तर दुसरीकडे दुकानांच्या पाट्या पाहणारे ग्राहक. ही कोरोनाची दरी कधी संपणार आणि आपल्याला सेवा कधी मिळणार याची वाट पाहणारे ग्राहक.यातले अनेक व्यावसायिक असे आहेत की चार पैसे साठवू आणि गावाकडचे छप्पर दुरूस्त करून घेवू. आईबापाचे दुखणे काढू. औषधोपचार करू म्हणून चार पैसे रोज मागे टाकणारे. पण या दोन महिन्यात फक्त खर्च आहे उत्पन्न नाहीच. त्यामुळे हे शिल्लक टाकलेले पैसेही खर्च करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. हे संकट कसे दुर होणार? हे नुकसान कसे भरून निघणार? हीच चिंता त्यांना आज भेडसावते आहे. सरकार यांना काही मदत करू शकते का? आज तरी सगळं अनुत्तरीतच आहे.
शनिवार, १६ मे, २०२०
सामान्यांचे मरण
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा