सोमवार, १८ मे, २०२०

कसं असेल कोरोना लॉकडाउननंतरचे जीवन?

     गेल्या दोन महिन्यांपासून आपण कोरोनाशी लढा देत आहोत. आता त्यातून बाहेर पडण्याचा आणि देश सुरू करण्याचा विचार आपण करत आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यातून देशाला सावरण्यासाठी मंगळवारी  20 लाख कोटींचे विशेष पॅकेजही जाहीर केले आहे. स्थानिक उत्पादनांना प्राधान्य देण्याचे त्यांनी आवाहन केले आहे. त्याचप्रमाणे कोरोनाबरोबर लढत जगण्याचे त्यांनी जनतेला आवाहन केले आहे. लॉकडाउन 4 ची घोषणा करताना काही शिथील नियम केले जातील. त्यानंतर कधी तर सर्व व्यवस्था सुरू करावी लागेलच. पण हे नंतरचे जगणे कसे असेल हा खरा प्रश्न आहे. कोरोना नंतरजे हे जीवन बरेच बदलून गेलेले असेल.   गेल्या काही महिन्यांपासून कोरोना विषाणुच्या संकटात सापडलेलं जग पुढच्या सहा महिन्यांनंतर, वर्षभरानंतर पुन्हा सुरू होईरू अशी आशा आहेच.पण यानंतर आपल्या भविष्यात काय वाढून ठेवलं आहे? यातून प्रत्येकाचे जीवन पार बदलून जाणार आहे. आपल्या कुटुंबीयांचं, मित्रमंडळींचं काय होणार? याचा विचार आता करावा लागणार आहे. कारण या व्यवस्थेने अनेकजण देशोधडीला लागले आहेत. अनेकांचा कायमस्वरूपी रोजगार गेला आहे तर ही टांगती तलवार अनेकांच्या डोक्यावर अजूनही आहे. अनेकांची यामुळे झोप उडाली आहे. त्यामुळेच आता प्रत्येकाला नवे जीवन सुरू करावे लागणार आहे. म्हणूनच हे कोरोनाचे ग्रहण सुटल्यावर काय हाती पडणार आहे हे फार महत्वाचे आहे.    अनेकांना प्रश्न पडला आहे की आता , माझ्या नोकरीचं काय होणार? अनेक सेल्फ-एम्प्लॉईड मित्रांना पुढचे अनेक महिने पैसे मिळणार नाहीत. अर्थात हे फक्त आपल्याच देशात असेल असे नाही, संपूर्ण जगात ही परिस्थिती असेल. पण यामुळे मनुष्य अधिक सावध होईल का? स्वार्थी होईल का? यामुळे गुन्हेगारी वाढणार नाही ना? संघर्ष तीव्र होतील का? का खरंच आपल्या देशातील लोक पंतप्रधान म्हणतात तसे आत्मनिर्भर होतील? असे अनेक प्रश्न आज आहेत.   परदेशात काम करणारे भारतीय आणि आउटसोर्सींगचा वापर करून भारतातच काम करणारे पण परदेशी कंपन्यात असणारे कर्मचार्‍यांचे काय असेल भविष्य? अनेकांचे वेतन सध्या 80 टक्के दिले जाते आहे. ते आणखी कमी होण्याची शक्यता आहे. कोरोना विषाणुचा जागतीक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे नवी भरती थांबली आहेच पण आहे ती टिकवण्याचे आव्हान प्रत्येकापुढे आहे. पंतप्रधान मोदींनी मंगळवारी अनेक छान स्वप्न पाहिली आहेत. आपल्यापुढे संधीचे चित्र उभे केले आहे. अर्थात भविष्याविषयी अनेक अंदाज वर्तवले जात आहेत. मात्र, सरकार आणि समाज कोरोना विषाणुचा सामना कसा करतात आणि या विषाणुचा अर्थव्यवस्थेवर कसा परिणाम होतो, यावर ते अवलंबून आहे. आपण या परिस्थितीतून अधिक चांगली,अधिक मानवीय, अधिक सहिष्णू अर्थव्यवस्था उभारू, अशी आशा करूया. मात्र,परिस्थिती आहे त्याहून वाईटही होऊ शकते. हे दूरगामी परिणाम असणार आहेत. जगाचा विचार केला पाहिजेच पण आपल्या देशाचाही विचार करावा लागेल. आर्थिक दृष्टीकोनातून संभाव्य भवितव्य काय असेल याचा विचार करण्याची हीच वेळ आहे.  याचे परिणाम हे टोकाचे असू शकतील. अगदी चांगले किंवा वाईट. म्हणजे मंगळवारी पंतप्रधानांनी 20 लाख कोटींचे पॅकेज जाहीर केले आणि त्याचा परिणाम बुधवारी शेअर बाजारात 1100 अंशांनी उसळी मारली. दोन महिन्यात झालेल्या तुफान पडझडीनंतर हा चमत्कार पहिल्यांदाच पहायला मिळाला आहे. त्यामुळे या बदलानंतर अर्थव्यवस्थेला एकदम उभारी येईल किंवा आपण अगदी जुन्या काळातही जाउ शकतो. म्हणजे यातून मजबूत भांडवलशाही व्यवस्था निर्माण होईल किंवा यातून नव्याने समाजवादी राज्यव्यवस्थेची स्थापना होऊ शकते. अर्थात आज थोडी समाजवादी व्यवस्थेची गरज आहेच. कारण देशातील प्रत्येक घटकाचा विचार केला गेला पाहिजे. पण परस्पर सहकार्यावर आधारित एक मोठा समाज निर्माण करण्याची जबाबदारी आता प्रत्येकावर येउन ठेपली आहे. लॉकडाउनमुळे अनेकजण वास्तवात आले आहेत.हवामान बदलाप्रमाणेच कोरोना विषाणुसुद्धा काही अंशी आपल्या आर्थिक रचनेचा परिणाम आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. एखाद्या घरातील कर्ती व्यक्ती खूप आजारी पडावी, अचानक त्याच्या दवापाण्यावर प्रचंड खर्च करावा लागावा, घरातील सोनेनाणे, गुंतवणूक, जमिनजुमला विकून, ठेवी मोडून ही औषधोपचाराची व्यवस्था करावी आणि ती व्यक्ती इतके उपाय करूनही मृत्यूमुखी पडावी. त्यानंतर त्या कुटुंबावर जे ओझे येते तशीच अवस्था ही झालेली आहे. त्यामुळे देशच आज मृत्यूशय्येवर पडलेला असताना तो बरा करण्यासाठी प्रत्येकजण प्रार्थना करतो आहे. पण आता नुसती प्रार्थना नाही तर काही उपाययोजना करावी लागेल. म्हणजे आज कोरोना विषाणुच्या संसर्गाने कोव्हिड-19 आजार होतो. मात्र, या संसर्गाला आळा घालायचा असेल तर त्यासाठी व्यक्तीची वर्तणूक, जीवनशैली आणि त्याचे व्यापक आर्थिक संदर्भ समजून घेतले पाहिजेत. त्यामुळे आपल्याला इथुनपुढे अनावश्यक आर्थिक कार्यांना चाप लावावा लागेल.  म्हणजे अनावश्यक वस्तू, सेवा यांचा मोह सोडावा लागेल.म्हणजे आपल्याला इथुनपुढे जैविक युद्धाची तयारी सतत ठेवावी लागेल. आज कोरोना जाईल आणि नवे काही येईल. गेल्या वीस वर्षात किती नवी रोग आले आहेत? डेगू, बर्ड फ्ल्यू, स्वाईन फ्ल्यू असे अनेक आजार ही या नव्या 21 व्या शतकातील पहिला दोन दशकातील देणगी आहे. त्यामुळे उर्वरीत काळात आणखी काही येईल. त्यामुळे आपल्याला कायम सावध रहावे लागणार आहे याचा विचार करावा लागेल. लॉकडाउन नंतरचे जीवन हेच असणार आहे. म्हणजे लोक एकमेकांना भेटतात आणि त्यातून संसर्ग वाढतो. हे घरात होतं, कामाच्या ठिकाणी होतं आणि प्रवासातही होतं. अशाप्रकारे एकमेकांच्या संपर्कात येणं कमी केलं तर एका व्यक्तीकडून दुसर्‍याला संसर्ग होण्याचं प्रमाण कमी होईल आणि रुग्णांची संख्याही घटेल. म्हणजेच आपले जग संकुचीत करण्याचा संदेश देणारा हा रोग आहे. माणसाची जवळीक कमी करून चार हात दूर रहा असा संदेश देणारा हा रोग आहे. लॉकडाउननंतर आपण एकटे आहोत याचा विचार करूनच आपल्याला जगावे लागणार आहे.सोशल डिस्टंसिंग आणि लॉकडाऊन प्रभावी उपाय आहेत, हे वुहानच्या उदाहरणावरून आपल्याला कळून चुकलं आहे आणि हे उपाय युरोप आणि अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्रांमध्ये अगदी सुरुवातीपासून का अवलंबण्यात आले नाही,याचं उत्तर आपल्याला तिथल्या राजकीय अर्थव्यवस्थेतून मिळेल.आज लॉकडाऊनमुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर बराच ताण आला आहे. आपल्याला मोठ्या मंदीचा सामना करावा लागणार आहे. या दबावामुळेच काही जागतिक नेत्यांनी काही ठिकाणी लॉकडाऊन थोड्या प्रमाणात शिथील केल्याचं दिसतं.  म्हणजे कमी उत्पादन, टंचाई याचा सामना करत पुढचे आयुष्य जगावे लागणार आहे. मुंबलकता असा शब्दप्रयोग न करता आता हातचे राखून खर्च करायची सवय लागणार आहे. साहजीकच सण समारंभ, उत्सव, विविध कार्यक्रम यावर याचा परिणाम होणार आहे. सामाजिक एकतेला धक्का देणारा हा रोग जगाला स्वार्थी बनायला शिकवत आहे हे नक्की. माणसं तोडण्याचे काम हा रोग करणात आहे. त्यामुळे एकमेकांच्या जवळ असणारी माणसं या कोरोनाने दूर केली आहेत हे लक्षात घेतले पाहिजे. त्यामुळे लॉकडाअन चारनंतरचे कोरोनोनंतरचे बदललेले जीवन हे चार हात लांब अंतर राखणारे असेल हे नक्की.व्यावसायिक सध्या गरज नसतानाही आपल्याकडे कामगार ठेवतात आणि ठेवले आहेतही. अर्थव्यवस्थेने पुन्हा उभारी घेतल्यास उत्पादन करण्यासाठी त्यांना कामगारांची गरज भासरणार आहे. मात्र, परिस्थिती अधिक चिघळताना दिसली तर ते कामगार ठेवणार नाहीत. त्यामुळे अनेकांच्या नोकर्‍या जातील किंवा नोकरी जाण्याची भीती असेल. अशा परिस्थितीत लोक खरेदी कमी करतील. त्यामुळे हे चक्र पुन्हा सुरू होईल. आपण आर्थिक मंदीच्या जाळ्यात अडकत जाऊ. सामान्य संकट असेल तर त्यातून मार्ग काढणं सोपं असतं. सरकार पैसे खर्च करतं. नागरिक खरेदी करणं आणि काम करणं सुरू करत नाहीत, तोवर सरकार पैसा ओतत राहतं.मात्र, सामान्य परिस्थितीत लागू होतात तसे उपाय सध्या करणं शक्य नाही. कारण सध्या अर्थव्यवस्था रुळावर येणं, ही प्राथमिकता नाही. तर लोकांनी कामाच्या ठिकाणी जाऊ नये, ही प्राथमिकता आहे. म्हणूनच हे जग, नवी जीवनशैली ही वेगळी असेल. ती अंगवळणी पडणे आपल्याला सोपे नाही, पण ती लादली जाईल हे नक्की.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: