पाचवा लॉकडाउन आजपासून सुरू होत आहे. मुंबई, पुणे आणि ठाणे वगळता महाराष्ट्रात बर्यापैकी मोकळीक आता मिळू लागली आहे. 30 जूनपर्यंत हा लॉकडाउन वाढवला असला तरी 8 जूनपासून धार्मिकस्थळे, मॉल, हॉटेल रेस्टॉरंट सुरू होण्याचे संकेत दिले आहेत. गर्दीची ही स्थळे सुरू करून लॉकडाउन 5 मध्ये अनलॉक करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. पण आज खर्या अर्थाने सामान्य माणूस, हातावर पोटे असलेला माणूस, कर्मचारी वर्ग याला मुंबई सुरू होण्याची अपेक्षा आहे. सामान्य माणसाला चिंता लागलेली आहे. कारण जोपर्यंत संपूर्ण देश, मुंबई महाराष्ट्र अनलॉक होत नाही तोपर्यंत सामान्य माणसाचा एकच प्रश्न आहे की कधी जाणार हे कोरोनाचे संकट?खरं तर आजच्या कोरोनाच्या महासंकटाला सरकारचे अपयश कारणीभूत आहे. या संकटामधून कधी मुक्तता होते, याची जनता वाट पाहत आहे. राज्यात कोरोनावरून भाजप आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात घाणेरडे राजकारण सुरू झाले असून त्यालाही जनता कंटाळली आहे. आपली जबाबदारी झटकण्याचे प्रकार चालले आहेत. सगळं बंद ठेवून किती दिवस माणूस राहणार आहे? घरात बसून त्याचे उत्पन्न थांबले आहे. राज्य सरकारने केंद्रावर खापर फोडायचे आणि गप्प बसायचे असे राज्य सरकार करत आहे. केंद्राकडून मदत मिळत नाही असा कांगावा करून गप्प बसायचे. याला सामान्य माणूस खूप कंटाळला आहे. म्हणूनच त्याला प्रश्न पडला आहे की या संकटातून आपण कधी मुक्त होणार आहोत?कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला आहे. जगातील बढया राष्ट्रांच्या तुलनेत भारताची हानी कमी झाली आहे. भारताने लॉकडाऊनचा योग्य निर्णय घेतल्याने कोरोनाचा प्रादुर्भावाचा प्रभाव अन्य देशांच्या तुलनेत कमी झाला. मात्र, महाराष्ट्र कोरोनामुक्त कधी होणार, हा प्रश्न सध्या अनुत्तरीत आहे. संपूर्ण देशात महाराष्ट्रात या रोगाचा फैलाव जास्त झालेला आहे. याला कारण तीन पक्षांचे असलेले सरकार आणि परस्परविरोधी मतांनी निर्णय घेण्याची क्षमता नसलेले सरकार आहे अशी समज सामान्य माणसाची झालेली आहे. काल 31 मे रोजी लॉकडाऊनचा चौथा टप्पा संपला आणि आजपासून अनलॉक 1 हा नव्या अर्थाने पाचवा लॉकडाउन सुरू झाला आहे. पण हे किती दिवस चालणार आहे हा सामान्य जननेला प्रश्न भेडसावत आहे. या अनलॉकचा फायदा मुंबई ठाण्याला काहीच नाही. इथली परिस्थिती जैसे थे आहे, त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता अन्य व्यवहार, दुकाने, हॉटेल्स, स्टॉल आदी बंद आहेत. त्यामुळे कामगार, नाका कामगार, नोकरदार, फेरीवाले, लहान दुकानदार, पान-तंबाखू टपरीवाले, इस्त्रीवाले, टेलर, सलून, प्लंबर, कुंभार, चर्मकार, लघु उद्योग करणारे, पोळी भाजी पेंद्र, खानावळ, वडा, भजी पाव, मिसळ पाव, भाजी, खेळणी विक्रेते आदींचे खूप आर्थिक नुकसान झाले आहे. दोन महिन्यात झालेले हे नुकसान भरून काढण्यासाठी या सेवांचे दर आता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सामान्य माणसांवर बोजा पडणार आहे. त्यातच अनेक कंपन्या बंद पडल्याने त्या कंपनी मालकांचे लाखो रु.चे आर्थिक नुकसान झाले. त्यामुळे तेथे काम करणारे लाखो सामान्य कामगार यांच्या नोकऱया गेल्या आहेत. काही ठिकाणी तर सरकारी आदेश असतानाही कामगारांना पगार दिलेले नाहीत, तर काहींना अर्धाच पगार देण्यात आलेला आहे. तोही एक आठवडा, पंधरा दिवस उशिराने दिला आहे. काही कंपन्यांनी तर कामगारांना जबरदस्तीने त्यांच्या हक्काच्या रजा वापरायला सांगत रजेवर पाठवले आहे. राज्यात जसजसा कोरोनाचा प्रभाव वाढत गेला, रुग्णांची संख्या आणि बाधीतांची संख्या ही झपाटयाने वाढत गेली तसेतसे परप्रांतीय मजुरांची, मुंबईकरांची चिंता वाढली. हा लॉकडाऊन उठणार कधी, आम्हाला कामे मिळतील कधी, आम्ही कधी पूर्वीसारखे जीवन जगणार, असे प्रश्न मुंबईकर उपस्थित करीत आहेत. मुंबईची जीवनवाहीनी लोकलसेवा जेव्हा सुरू होईल तेंव्हाच मुंबई सुरू झाली असे म्हणता येईल. पण हे केव्हा होणार, कधी जाणार राज्यातले हे संकट याची काळजी प्रत्येकजण करत आहे.मुंबईसह राज्यात पोटापाण्यासाठी युपी, बिहार, एम पी आदी राज्यातून आलेले मजूर भाडयाच्या खोलीत राहत होते. मुंबई वा इतरत्र राहून काबाडकष्ट करून ते जगत होते. मात्र, सर्व काही बंद पडल्याने परप्रांतीय कामगारांना मुंबई, महाराष्ट्रात व इतर राज्यात दिवस काढणे कठीण झाले. त्यांनी वांद्रे येथे उठाव केला. घरी पाठविण्याची मागणी लावून धरली. अखेर त्यांची व्यवस्था राज्य आणि केद्र सरकार यांनी केली आणि या परप्रांतीय मजुरांनी सुटकेचा निश्वास सोडला. पण हा काही पर्याय नव्हता. शेकडो लोकांनी पायी, मिळेल त्या वाहनाने घर गाठण्याचा प्रयत्न केला. यात काही जणांचा अपघातात तर काहींचा थकल्याने मृत्यू झाला.पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणातून कामधंद्यासाठी सामान्य माणूस मुंबईत येतो. या नोकरदार, कष्टकरी माणसाचीही काही प्रमाणात अशीच स्थिती झाली. कोकणामधून, राज्याच्या कानाकोपर्यातून मुंबईत नोकरीसाठी यायचे, नातेवाईकांकडे राहायचे आणि शिमगा, गणपतीला, सणाला, जत्रेला, लग्नाकार्याला गावी जाऊन कुटुंबीयांसमवेत आनंद घ्यायचा. पण आता काम बंद, नोकऱया गेल्या. अनेकांनी आपले गाव गाठले. ज्या मुंबईत कोणीही उपाशी झोपत नव्हते, प्रत्येकाच्या हाताला काम मिळत होते, ती मुंबई काही लाखाने खाली झाली आहे. लॉकडाऊनमुळे कोरोनाचा मोठा फैलाव होण्यापासून देशाला वाचवले जात आहे, तर दुसरीकडे नोकऱया गेल्या, आयुष्याची कमाई खाण्यावर जात आहे. अनेकांकडे घराचे भाडे देण्यासाठी, वीज, पाणी बिल भरण्यासाठी पैसे नाहीत. अनेकांनी कर्ज काढले आहे. ते व्याजासह परत करावे लागणार आहे. त्यामुळेच ही परिस्थिती बदलणार कधी याची चिंता प्रत्येकाला लागली आहे. मुंबई ही महाराष्ट्राची, देशाची पोशिंदा असलेली नगरी आहे. त्यामुळेच पोशिंदा जगला पाहिजे ही प्रत्येकाची अपेक्षा आहे.आज कोरोनामुळे मनुष्यप्राण्यांवर बिकट परिस्थिती ओढवली आहे. जगायचे आहे म्हणून या कोरोनाच्या महासंकटात कसे तरी श्वास घेत आहेत. कोरोनाच्या गंभीर रुग्णाला आज व्हेंटिलेटरवर ठेवण्यात येत आहे. अनेकांना व्हेंटिलेटर, खाटा उपलब्ध होत नसल्याने त्यांची प्रकृती अधिक गंभीर होऊन अनेकजण दगावले आहेत. मुंबईत आजया रोगाला बळी पडलेल्यांचा आकडा 35 हजारांच्या पुढे गेलेला आहे. शेकडो लोकांचा आतापर्यंत बळी गेला आहे. तर महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 60 हजारांच्यापुढे गेलेला आहे. बळींचा आकडा दोन हजारांच्या दिशेने चालला आहे. रोज या रूग्णांचा आकडा वाढतो आहे. आजही मोठया संख्येने कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून येत आहेत. परदेशातून भारतीय मुंबईत दाखल होत आहेत. त्यांच्यामध्येही काहीजण हे कोरोना पॉझिटिव्ह आढळून येत असल्याने मुंबईचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. ही परिस्थिती कशी हाताळायची? 30 जूनपयर्र्त मुंबईतील लॉकडाउन वाढवल्याने अनेकांच्या पोटात गोळा आला. या भितीने कोणी हार्टअॅटॅकने मृत्यूमुखी पडल्याची बातमी आता आली तर आश्चर्य वाटायला नको. त्यामुळे ही परिस्थिती सरकारने योग्य प्रकारे हाताळली आहे काय असा प्रश्न सर्वांना पडला आहे. कधी संपणार आहे हे संकट ही चिंता प्रत्येकाला लागी आहे. कोरोनामुळे काम बंद असल्याने, नोकरी गेल्याने आर्थिक स्रोत बंद झाल्याने आज त्या माणसांना व त्यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा श्वास देणारे व्हेंटिलेटर अद्याप कोणीही बनू शकलेले नाही. काहींनी कोरोनाला आणि रुग्णालयीन उपचाराला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. म्हणजे आज एकीकडे कोरोनासोबत लढा द्यावा लागणार आहे तर दुसरीकडे कंपनी, उद्योगधंदे बंद ठेवल्याने सरकारचे उत्पन्नाचे मार्गही बंद पडले आहेत. परिणामी सरकारने काही उद्योग सुरू केले आहेत. ऑनलाइन दारू विक्री सुरू केली आहे. गरिबांना, मजुरांना शिजवलेले अन्न, रेशनिंगवर स्वस्त दरात काही किलो धान्य पुरवठा करण्यात येत आहे. मात्र इतर सामान, वस्तू, गरजा यासाठी गरीब, मजूर, सामान्य नागरिकांच्या हातात पैसे नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे केवळ अन्नधान्याने नागरिकांच्या सर्व गरजा भागत नाहीत.आज खर्या अर्थाने गरज आहे कोरोनाला कायमस्वरुपी रोखण्याची आणि दुसरीकडे उद्योग, मोठे कारखाने सुरू करून गरीब, मजूर, कामगार, सामान्य नागरिक यांच्या हाताला काम देण्याची. शेतकऱयांना शेतपीक काढू देणे अत्यंत गरजेचे आहे. धान्यच पिकले नाही तर खायचे काय, हा प्रश्न भविष्यात निर्माण होण्याची भीती आहे.मानसून तोंडावर आला आहे. शेतीची कामे झपाट्याने व्हायला हवीत. तसेच मुंबईतील मानसून पावसाळीपूर्व देखभालीची कामेही व्हायला हवीत. उद्या लॉकडाउन उठेल आणि पाणी तुंबणे आणि नको ते साथीचे रोग येतील अशी भिती आहे. त्यामुळे आता वेळीच हातपाय हालवण्याचे निर्णय सरकारने घेतले पाहिजेत. हे संकट नेमके कधी जाईल याचा कसलाही हिशोब आजतरी आपल्याकडे नाही. पण म्हणून सगळे बंद ठेवूनच चालेल असे नाही. आज देशात कोरोनाच्या संकटाला हद्दपार करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार दोघांच्याही उपाययोजना कमी पडत आहेत. ठोस निर्णय होत नाहीत. दुर्दैवाने केंद्र सरकारला कोरोना चीनमध्ये असताना तेथील परिस्थितीवरून जागे होऊन स्वत:हून ज्या काही उपाययोजना तातडीने करणे आवश्यक होते. नेमके तेथे त्याचवेळी राज्य सरकार व केंद्र सरकार कमी पडले. त्यामुळे आजच्या कोरोनाच्या महासंकटाला सरकारचे अपयश हे सर्वात जास्त कारणीभूत आहे. चीनमध्ये या रोगाची कुणकुण लागल्यावर सगळी आंतरराष्ट्रीय विमानतळे बंद ठेवली असती तर आज या देशाला 60 दिवस बंद ठेवायची वेळ आली नसती. पण आज प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की, या कोरोनाच्या संकटामधून कधी मुक्तता होते, याची जनता चातकासारखी वाट पाहत आहे. राज्यात कोरोनावरून भाजप आणि महाविकास आघाडी सरकार यांच्यात घाणेरडे राजकारण सुरू झाले असून त्यालाही जनता कंटाळली आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव, त्यामुळे होत असलेली जीवितहानी पाहूनही काही बेफिकीर नागरिक उघडपणे कुठेही फिरतात. त्यामुळे त्यांना कोरोनाची लागण होऊन कोरोनाचा फैलाव वाढत आहे. जोपर्यंत कोरोना आटोक्यात येत नाही, कायमस्वरुपी हद्दपार होत नाही तोपर्यंत तरी देशाचा, राज्याचा व मुंबईचा आर्थिक गाडा पूर्वपदावर येणे अशक्य आहे. संकटाला घालवण्यासाठी संकटापासून पळून जाण्याची गरज नाही, संकटाला सामोरे जाउनच त्यावर मात करता येईल असे प्रत्येकाला वाटत आहे. कामधंदे बंद झाल्यामुळे, हातात पैसा नसल्याने उपाशी मरण्यापेक्षा या रोगाने मेलेले बरे असे प्रत्येकाला वाटत आहे. म्हणूनच आज प्रत्येकजण विचारत आहे की कधी होणार महाराष्ट्र या रोगापासून मुक्त? मुंबई कधी येणार मुळपदावर?
रविवार, ३१ मे, २०२०
कधी येणार आपण मूळ पदावर?
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा