शनिवार, १६ मे, २०२०

संधीचा फायदा घ्यावा

2020 या वर्षाचे स्वागत करत असतानाच जगभरात कोरोनाची लागण झाली. भारतात त्याचा शिरकाव जगाच्या तुलनेत थोडा उशिरा म्हणजे साधारण फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीस आणि महाराष्ट्रात मार्चच्या दुसर्‍या आठवड्यात झाला. पण जगभरातील संकट पाहता भारतातील यंत्रणा ही अगोदरच सज्ज होती. त्यामुळे आता दोन महिने झाले तरी आपण तिसरा टप्पा गाठला नाही. त्यावर नियंत्रण मिळवताना दिसतो आहे. हे सांगण्याचे कारण म्हणजे जगाच्या तुलनेत आपली लोकसंख्या प्रचंड असताना हे नियंत्रण मिळवणे सोपे नव्हते. म्हणूनच आगामी कालखंड भारताला महत्वाचा असेल. विशेषत: कोराना युद्धावर नियंत्रण मिळवल्यानंतर भारताला भरपूर संधी असतील. त्यासाठी प्रयत्न करणे गैर काहीच नाही.हे लक्षात येण्याचे कारण म्हणजे गेल्या दोन महिन्यात आपण जी यंत्रणा उभी केली ती लक्षणीय अशीच होती. अर्थात अनेकांना ही सुसज्ज यंत्रणा पाहून खूपच आश्चर्य वाटत आहे. भारतात हे कसे काय शक्य झाले? म्हणजे या कोरोनाच्या बचावासाठी लागणारी यंत्रणा, उपाययोजना इतक्या जलद कोरोनापेक्षाही चौपट गतीने कशी काय पोहोचली? हे आश्चर्यकारक, कौतुकास्पद, तितकेच संशयास्पदही आहे. बाजारात उपलब्ध झालेले मास्क, सॅनिटायझर, टिश्यूपेपर आणि अन्य वस्तू इतक्या पटापट मार्केटमध्ये उपलब्ध कशा झाल्या? त्याचे उत्पादन इतक्या गतीने कसे काय झाले? चीनसारखा शेजारी देश कोणत्याही थराला जाउ शकतो, त्यामुळे भारताने असेज सज्ज असणे आवश्यक होते. ते भारताने करून दाखवले आहे. म्हणूनच आगामी काळात भारताला संधी आहे. चीनमध्ये अमेरिका, इटली आणि युरोप अमेरिकेतील प्रगत देशांचे मोठे उद्योग आहेत. ते भारताकडे वळून भारतात रोजगार निर्मितीसाठी, विकासासाठी हे नवे दालन यामुळे निर्माण झाले आहे असेच आता वाटू लागले आहे.   भारत हा क्रांतिकारक देश आहे. परिवर्तनाची ताकद भारतात आहे. त्यामुळेच कोरोनाची साथ अचानक आल्यावर एवढ्या मोठ्या प्रमाणात बाजारात मास्क कसे काय उपलब्ध झाले? हा न उलगडणारा प्रश्नच आहे. साधारणपणे आपल्याकडे एखादा सण जवळ असला की, त्याची चाहूल बाजारपेठेत दिसते. त्या सणाच्या अगोदर काही दिवस त्या वस्तू मार्केटमध्ये येतात आणि तो सण उरकल्यावर त्या वस्तू आत जातात, म्हणजे वर्तमानपत्रात काही बातम्या अशा येतही असतात. संक्रांतीसाठी बाजारपेठ सजली. मग दुकाने आणि बाजारपेठा या पतंग, तीळगूळ, तिळाचे लाडू, हलवा, छोट्या छोट्या लुटण्याच्या वस्तू, काळे कपडे, साड्या दुकानातून डोकावू लागतात. ही तारीख सणाची निश्चित असते. त्यामुळे व्यापारी आणि उत्पादक त्याचे नियोजन करून योग्य वेळी बाजारात या वस्तू आणतात.पाडवा जवळ आला की, छोट्या गुढ्या, कळक, नवनव्या रंगाच्या साड्या, साखरेच्या गाठी किंवा माळा, कुंची, कलश, कडुलिंबाचे डहाळे या वस्तू बाजारपेठेत दिसतात. उत्पादकांची तयारी असते. बाजारपेठेचे नियोजन असते. याचप्रमाणे अगदी छोटे सण ते मोठे उत्सव काहीही असले, तरी त्याची जय्यत तयारी त्या काळात बाजारपेठेत डोकावत असते. मग अगदी नागपंचमी असो वा गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी, ख्रिसमस या सगळ्या सणांना बाजारपेठेत बदल झालेला दिसतो. 25 डिसेंबरला ख्रिसमस असतो, तेव्हा लाल उबदार टोप्या, सांताक्लॉजचे मुखवटे, ख्रिसमस ट्री हे सगळे 20 डिसेंबरच्या दरम्यानच बाजारपेठेत आलेले असते.म्हणूनच आश्चर्य वाटते की, हे संकट येणार आहे याची कसलीही कल्पना नसताना कोरोनाशी लढणारी यंत्रणा इतक्या सहजपणे कशी काय उभी राहिली?ही शक्तीच भारतासाठी महत्वाची आहे. आज देशात 130 कोटी नागरिक आहेत. त्यातील जवळपास 100 कोटी नागरिक तरी आज मास्क वापरताना दिसत आहेत. हे एवढे मोठे उत्पादन आपल्याकडे इतक्या कमी वेळेत कसे काय झाले? इतक्या प्रचंड प्रमाणात मास्क बाजारात उपलब्ध आहेत की, ते कसे आले? हाच प्रश्न आहे. सुरवातीला म्हणजे लॉकडाउन होण्यापूर्वीच फुटपाथवर, लोकलमध्ये दुकानात कुठेही आज 10 ररुपये ते 30 रुपये दराने मास्क विकले जात होते. विविध रंगांचे, मॅचिंगचे मास्क उपलब्ध होते. काही महिला साडीला आणि पोशाखाला मॅचिंग पाहिजे म्हणून विविध रंगांचे मास्क घेताना दिसल्या. ही एवढी उपलब्धता कशी काय एकाएकी काही दिवसांत झाली? त्याचे उत्पादक कोण आहेत? त्यांची टंचाई बिल्कूल नाही? म्हणजे एकीकडे शेअर बाजार कोसळत आहे, लोक रस्त्यावर येत आहेत, विविध उद्योगांना फटका बसत आहे, व्यापार आणि व्यवसायाला झळ बसली आहे, पण मास्कचा बाजार मात्र तेजीत आणि अतितेजीतच आहे. हेच फार मोठे आश्चर्य आहे. जसे पंचांग, कॅलेंडरमधून कोणता सण केव्हा आहे याची माहिती मिळते आणि त्याप्रमाणे बाजारपेठेत वस्तूंची आवक होते. तशी याची चुणूक कुणाला लागली होती का? हे नियोजन कसे झाले हेच फार मोठे गूढ आहे.अशीच भरपूर उत्पादन करण्याची आणि जलदगतीने बाजारपेठेत माल आणण्याची आमच्या उत्पादक आणि विक्रेत्यांची तयारी असेल, तर भारत हा जगात एक नंबरचा देश होईल.गेली पंचवीस वर्षे भारतातील सर्वात मोठी बाजारपेठ ही चीनने काबीज केली होती. इतकी की, आमची खाण्याची सवय, लहान मुलांची खेळणी, घरातील इलेक्ट्रॉनिक्स वस्तू इतकेच नव्हे, तर ते फेंगश्युईचे देवही घराघरांत घुसले होते, पण आम्ही जर आमच्या गरजांसाठी आमची उत्पादने निर्माण केली, तर चीनच्या अर्थव्यवस्थेला दणका देऊन जगातील सर्वात मोठी उत्पादने आणि विक्रीची यंत्रणा उभी करू शकतो. हे या मास्कवरून दिसून येते.केवळ मास्कच नाही, तर ज्या गतीने सॅनिटायझर आणि इतर खबरदारीची उत्पादने बाजारात आली, वितरित झाली ते खरेच कौतुकास्पद आहे. हे एक चांगले लक्षण आहे. भारत यातून वाचून स्वबळावर उभा राहू शकतो, हे दाखवण्याची हीच संधी आहे, म्हणजे चीनच्या वुहान प्रांतातून उगम पावलेल्या कोरोना विषाणूचा प्रसार जगभरातील 200 हून अधिक देशांमध्ये झाला आहे. कोविड 19 मुळे मृत्युमुखी पडणाजयांची संख्याही दिवसागणिक वाढते आहे. या सर्व परिस्थितीचे अत्यंत दूरगामी सामाजिक परिणाम दिसून येत आहेतच, परंतु त्याबरोबरीने याचे अत्यंत गंभीर आर्थिक परिणामही येत्या काही काळात समोर येणार आहेत. त्यात भारत याच प्रयत्नांनी सावरू शकतो. ते आपल्याला जमले पाहिजे.आज चीनमधील आर्थिक परिस्थिती बिकट झाली आहे. जागतिक महासत्ता बनू पाहणाजया या देशाची अर्थव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे.  चीन हा जगातील पुरवठा साखळीतील अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. चीनची निर्यात अब्जावधी डॉलर्सची आहे. एकट्या अमेरिकेबरोबर चीनचा 700 अब्ज डॉलर्सचा व्यापार आहे. जपानबरोबरचा चीनचा व्यापार 450 डॉलर्सचा आहे. संपूर्ण जगाला कच्चा माल पुरवणारा कारखाना म्हणून चीनकडे पाहिले जाते. बहुतांश अमेरिका आणि युरोपियन देश हे चीनकडूनच कच्चा माल घेतात, परंतु आज चीनमधील 50 टक्क्यांहून जास्त उद्योग-धंदे बंद पडले आहेत. चीनकडून होणारी निर्यात 50 टक्क्यांहून अधिक प्रमाणात कमी झाली आहे. चीन सरकारने कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यश आले असल्याचे घोषित केले असले, तरी तेथील बंद झालेले उद्योग, कारखाने सुरू होण्यासाठी, पूर्ववत होण्यासाठी पुढील सहा महिन्यांचा अवधी लागणार आहे.आजघडीला चीनमधील केवळ 25 टक्के उद्योग उघडण्याच्या मार्गावर आहेत. चीनमधील कोळश्याची विक्री 75 टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे कोळशाचे उद्योग ठप्प झाले आहेत.आज जगभरातील विविध देशांमध्ये असंख्य प्रकारच्या पक्क्या वस्तू निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारा कच्चा माल चीनकडून निर्यात केला जातो. यामध्ये वाहनाचे सुटे भाग, रसायने, सिरॅमिक्स, रबर, कपडे, तसेच कार्बन यांचा समावेश होतो, पण गेल्या महिन्याभरापासून हा पुरवठा बंद झाला आहे. तत्पूर्वी जवळपास दोन वर्षे अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापारयुद्ध सुरू होते. त्या काळात अमेरिकेतील बहुराष्ट्रीय कंपन्यांनी चीनला पर्याय शोधायला सुरुवात केली होती. हा पर्याय भारत बनू शकतो का? यासाठी तातडीने प्रयत्न झाले पाहिजेत. हीच वेळ आहे. आपण संधीसाधू नाही, पण परिस्थितीवर मात करत असताना आलेली संधी गमावणेही योग्य नाही.आज अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी चीनमधून आपले उद्योग गुंडाळायला सुरूवात केली. उदाहरणच घ्यायचे तर मोबाइल आणि इलेक्ट्रॉनिक्स जगतातील दिग्गज कंपनी असणाजया सॅमसंग या कंपनीचे 50 टक्के मोबाइल चीनमध्ये उत्पादित होत असत, पण त्यांनी ते युनिट बंद केले असून, उत्तर प्रदेशातील नोएडा येथे हे युनिट उभारण्याचा निर्णय झाला आहे. अशाच प्रकारे आता अन्य अनेक कंपन्याही कच्च्या मालासाठी पर्यायांचा शोध घेत आहेत. ही फार मोठी संधी भारताला आहे. अनेक उद्योग असे भारतात आले, तर इथला रोजगाराचा प्रश्न सुटणार आहे, म्हणूनच या आश्चर्यकारक घटनेकडे क्रांती म्हणून बघावे लागेल. संकट म्हणून न पाहता संधी म्हणून पाहायला हवे.गेल्या दोन एक महिन्यात घडलेल्या घडामोडींमुळे दिसून आले आहे की, सिरॅमिक्स, रबर, रसायने, गाड्या, कपडे आणि दागिने यांसारख्या विशिष्ट क्षेत्रांमध्ये युरोपियन देश, अमेरिका यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर भारताकडे पुरवठ्याविषयी चौकशी केली जात आहे. 100 कोटींपेक्षा अधिक रकमेच्या कराराविषयी चौकशी सुरू आहे. आज संपूर्ण जग चीनचा पर्याय म्हणून भारताकडे पाहात आहे. अमेरिकेनेही चीनवरील त्यांचे अवलंबित्व कमी करत आणले आहे. भारताने या संधीचा फायदा नेमका कसा घ्यायचा, याचा विचार केला पाहिजे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: