प्रत्येकजण वाट पाहतो आहे
कोरोनाचा कहर वाढत चालल्याची भिती पुन्हा पुन्हा घातली जात आहे. लवकरच लॉकडाउन पाच सुरू होणार आहे आणि आणखी काही दिवस लोकांना कोंडून घ्यावे लागेल असे बोलले जात आहे. पण सामान्य माणूस वैतागला आहे. हे कधी सुरू होणार पूर्वीचे दिवस अशी प्रत्येक सर्वसामान्य माणसाला चिंता लागली आहे. प्रत्येकजण वाट पाहतो आहे की कधी आमची मुंबई सुरू होणार?दुकाने, लोकल्स, रिक्षा, टॅक्सी, सलून, शाळा, कॉलेजेस कधी सुरू होणार हे प्रश्न प्रत्येकाला भेडसावत आहे. दैनंदिन प्रवास करून मुंबईच्या दिशेने येणार्या चाकरमान्यांसाठी हे लपून बसण्याचे दिवस फार वाईट आहेत. डेक्कन क्वीन, पंचवटी, कोकण कन्या कधी सुरू होणार याची चाकरमानी आतुरतेने वाट बघत आहेत. कोरोनाने सर्वांचे जीवनमान बदलून टाकले आहे. आज कोरोना विषाणुंचा सर्वात जास्त फास मुंबई आणि महाराष्ट्रा भोवती आवळला गेला आहे. कोरोना बाधितांची राज्यातील संख्या 50 हजारावर गेली आहे. मुंबईतील रूग्णांची संख्या तीस हजाराच्या पुढे झेपावली आहे. मुंबईचे गेले दोन महिने जनजीवन ठप्प झाले आहे. उपनगरी रेल्वे ही मुंबई महानगराची जनवाहिनी आहे पण गेले कित्येक दिवस लाखो मुंबईकर लोकल्स बंद असल्याने घरातून बाहेरही पडू शकलेले नाहीत. कधी आपली ही जीवनवाहिनी सुरू होणार याची प्रत्येकाला चिंता लागली आहे. मुंबईची दशकांनुदशके असलेली दुसरी सेवा म्हणजे बेस्ट बस. आणि आमची लाल परी महामंडळाची बस बंद आहे. मुंबईत दिवस रात्र धावणारी काळी पिवळी टॅक्सी, ओला उबरसारख्या खाजगी कूल कॅब्ज कुठेही दिसत नाहीत. लॉकडाऊनमुळे सदैव चोवीस तास जागे असलेल्या या महानगराला कोरोनाने झोपवले आहे. त्या महानगराला उठवण्याची हीच वेळ आहे. कधी हे सगळे सुरू होणार म्हणून प्रत्येकाला वेध लागले आहेत. संकटं आम्हा मुंबईकरांना तशी नवीन नाहीत. मुंबईवर यापुर्वी अनेक संकटे आदळली. पण मुंबईकर कधी खचला नाही किंवा मुंबई कधी बंद पडली नाही. बॉम्बस्फोट झाले, रक्तपात झाला, शेकडो लोक मरण पावले पण मुंबईच्या रूळावरून धावणार्या लोकल्स किंवा रस्त्यावरून धावणार्या बसेस- रिक्षा वा टॅक्सीस कधी बंद पडल्या नाहीत. पण या कोरोनाने मुंबई बंद पाडली. मुंबईत 26जुलै 2005 रोजी अतिवृष्टी झाली, अर्धी मुंबई पाण्याखाली गेली, पण त्या पाण्यातूनही बेस्टच्या बसेस आपला मार्ग काढत राहिल्या. पण आजच्या संकटाने बेस्ट आणि लोकलला लाल कंदील दाखवून थांबवून ठेवले. बाबरी मशीद पडल्यावर मुंबईत दोन वेळा मोठया दंगली झाल्या, हजारावर लोक मारले गेले. पण दोन्ही बाजुंनी आगीच्या ज्वाळा भडकल्या असतानाही मुंबईत ट्रेन, बसेस, टॅक्सीस चालू होत्या. कोणत्याही संकटात मुंबई कधीच थांबत नाही हा जगाला दिलेला संदेश या कोरोनाने खोटा ठरवला आहे. आज या सक्तीच्या लॉकडाऊनमुळे मुंबई महानगरातील कुलाबा ते कसारा, कर्जत, पनवेल नि वसई विरारपर्यंत राहणार्या रहिवाशांना जबरदस्तीने घरात बसून राहावे लागले आहे. सर्व व्यवहार, व्यवसाय, उद्योग, धंदे, व्यापार, कार्यालये बंद आहेत. देशाला चाळीस टक्के महसूल देणार्या मुंबईचे अन्य कोणत्याही राज्यापेक्षा सर्वाधिक म्हणजे कित्येक हजार कोटींचे नुकसान झाले आहे. म्हणूनच हे कधी सगळे सुरू होणार याची प्रत्येकाला ओढ लागली आहे, चिंता लागली आहे. जोपर्यंत कोरोना बाधितांची संख्या रोखली जाणार नाही तोपर्यंत मुंबई बंद ठेवणे हे फार मोठे धोक्याचे आहे. कारण मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. आज आर्थिक घडी विस्कटलेली असताना मुंबईला खडबडून जागे करण्याची वेळ आली आहे. तीला झोपवणे, बंद ठेवणे म्हणजे देशाला झोपवण्यासारखे आहे असेच म्हणावे लागेल. मुंबई महापालिका ही देशातील एक श्रीमंत महापालिका म्हणून ओळखली जाते. मग मुंबईत कोरोना बाधित रूग्णांची संख्या का आटोक्यात येत नाही. दोन महिने लॉकडाऊन असून, रस्त्यावर सारी दुकाने बंद असुन, कोणतीही ट्रेन, रिक्षा- टॅक्सी धावत नसतानाही पेशंट का वाढत आहेत. लॉकडाऊन म्हणजे संचारबंदी नाही. त्यामुळे रोज सकाळी भाजीपाला, फळे, दूध, औषधे , किराणा खरेदीसाठी लोक बाहेर पडतात हे सर्वत्र घडते आहे. खबरदारी म्हणून मंडई बंद केली, रस्त्यावर भाजीपाला विकायला मनाई केली. गर्दी रोखली, लोक घरात बसले पण अजूनही जर या रोगावर मात करता येत नसेल तर घरात बसून चालणार नाही तर रस्त्यावर उतरावे लागेल. लॉकडाऊन करूनही मुंबईत तीस हजारावर पेशंटची संख्या होत असेल तर काही तरी नियोजन चुकते आहे असे म्हणावे लागेल. आज डॉक्टरांच्या शिफारसीशिवाय कोरोना टेस्ट होत नाही. मुंबई व राज्यात हजारो खाजगी दवाखाने बंदच आहेत. रूग्ण वाढत चालले आहेत. त्यातले खरे किती खोटे किती, संशयास्पद किती, बाउ केलेले किती याचा विचार केला पाहिजे. आज सरकारी किंवा महापालिकेच्या कोणत्याही इस्पितळात बेड मिळत नाहीत. मग तपासणीत पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णाने कुठे जाव? त्याला इस्पितळात नेण्यासाठी रूग्णवाहिका लवकर मिळत नाही. मिळाली तर इस्पितळात बेड नक्की मिळाला आहे काय असे विचारतात. आपल्या घरात क्वारंटाईन करायचे तर सारे कुटुंबच त्यासाठी सहभागी करून घ्यावे लागते, वसाहतीतील लोक वेगळ्या नजरेने बघतात. रोजचे शेजारी वैरी झाल्याप्रमाणे तिरस्काराने पाहू लागतात. एकमेकांना साथ देणारी, मदतीला धावून जाणारी ही मुंबई आहे. ती अशी आपल्या शेजार्याकडे तिरस्काराने पहात नव्हती. त्यामुळे मुंबईच्या अॅडजस्टमेंटच्या संस्कृतीलाच या कोरोनाने बाधा आणलेली आहे. म्हणूनच मुंबईला लवकरात लवकर उठवले पाहिजे. या महानगराला अक्राळ विक्राळ झोपडपटयांनी विळखा घातला आहे. साठ लाख लोक अशा गलिच्छ वस्तीत जीवन जगत आहे. चर्चा केवळ धारावीची होते पण वरळी, कुर्ला, गोवंडी, शिवाजीनगर, जोगेश्वरी, मालवणी अशा मोठ मोठया झोपडपटयांतून दहा बाय दहाच्या खोपटात आठ ते दहा लोक आहेत. तिथे कुठे सोशल डिस्टन्सिंग होणार? कॉमन टॉयलेट, बाथरूम असतील तर स्वच्छता तरी कुठून राहणार? त्यातून संसर्ग वाढत राहतोय आणि मुंबईचा आकडा फुगत राहतो आहे. मग असे घरात कोंडून घेउन, लॉकडाउन होउन, सगळे बंद करून काय साध्य होणार आहे? लवकरात लवकर सगळे पूर्वपदावर आले पाहिजे. लोकांची कामे सुरू झाली पाहिजेत. त्यांचा रोजगार सुरू झाला पाहिजे. मुंबईला संजिवनी मिळेल ती त्या मुंबईचे कामकाज पुन्हा सुरू केल्यानेच. पण मुंबई लवकरात लवकर सुरू झाली पाहिजे. आज राज्याचे, मुंबईचे निर्णय नेमके कोण घेते हेच समजत नाही. आहे गर्दी आमच्या मुंबईत. पण अनेक रोगांना आम्ही सामोरे गेलो आहोत. अनेक साथी आम्ही पचवल्या आहेत. त्यामुळे मुंबईला लवकरात लवकर सुरू होण्यासाठी प्रयत्न केले आहेत. आता दोन महिन्याच्या लॉकडाऊननंतर लोकांचा संयम सुटत चालला आहे. धुणे भांडी, झाडू पोछा करणारी कामवाली, लॉण्ड्रीवाला, मोटारी व बाईक धुणारा मुलगा हे कधी यायला लागणार दुकाने, लोकल्स, रिक्षा, टॅक्सी, सलून, शाळा, कॉलेजेस कधी सुरू होणार हे प्रश्न प्रत्येकाला भेडसावत आहेत. प्रत्येकाला आस लागली आहे कधी सुरू होणार सगळे? लवकरात लवकर हे सगळे सुरू झाले पाहिजे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा