जेव्हा सांस्कृतिक वातावरणात राजकारण शिरते आणि कुठेतरी अभिव्यक्तीवर घाला घालण्याची चर्चा होते, तेव्हा तेव्हा शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरलेली आहे. त्यांनी अत्यंत निस्पृहपणे कोण आपला कोण परका याचा विचार न करता तारणहाराची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे शरद पवार हे कोणाचे असत नाहीत, तर ते न्यायबाजूचे असतात. संस्कृती, कला, क्रीडा क्षेत्राला विटाळणाºया राजकारणाला ते अत्यंत अचूकपणे सावरतात म्हणूनच त्यांची ख्याती ही सांस्कृतिक तारणहार अशी झालेली आहे.
सध्या गाजत असलेल्या किरण माने प्रकरणात त्यांनी हस्तक्षेप करावा, अशी मागणी किरण माने यांनी केली. किरण माने यांनी रविवारी याप्रकरणी शरद पवार यांची भेट घेतली. आपल्या विरोधात झालेल्या अन्यायाची बाजू पवारांकडे मांडल्याचे किरण माने म्हणाले, पण शरद पवारांची आजवरची भूमिका आणि किरण मानेंचे प्रकरण यात खूप फरक आहे.
१९७०च्या दशकात घाशीराम कोतवाल या विजय तेंडुलकरांच्या नाटकावरून खूप हंगामा झाला होता. त्यावेळी हे प्रयोग होऊ द्यायचे नाहीत, त्याचे परदेश दौरे रोखायचे, असा चंग या नाटकाला विरोध करणाºयांनी मांडला होता. या कलाकारांवर हल्ले होऊ नयेत म्हणून त्यावेळी शरद पवारांनी सर्व कलाकारांना संरक्षण दिले होते. गनिमी काव्याने त्या सर्व कलाकारांना नाट्यप्रयोगापर्यंत पोहोचवले होते, पण अभिव्यक्ती स्वातंत्र्याला त्यांनी तडा जाऊ दिला नव्हता. ही शरद पवारांची ख्याती आहे. त्यावेळी विरोधक करणारे कोण आहेत, कोणत्या पक्षाचे आहेत याच्याशी त्यांचा संबंध नसतो. सांस्कृतिक आक्रमणाचे वेळी ते पक्ष न बघता कलाकार आणि संस्कृती बघत असतात. त्यामुळेच आपल्याला काही न्याय शरद पवारांकडून मिळेल, असे किरण मानेंना वाटले असावे म्हणून ते त्यांना भेटले, पण किरण माने यांचे प्रकरण वेगळे आहे.
शरद पवार हे इतके स्पष्ट भूमिका घेणारे आहेत की, २०००साली आलेल्या मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकाला विरोध होत होता. ठाण्यात या नाटकाची गाडी पेटवली होती. त्यावेळीही त्यांनी अत्यंत संयमाची भूमिका घेतली होती. अशी जाळपोळ करून, कलाकारांना मारून काही होणार नाही. त्यांना त्यांची मते नाटकातून मांडायची तर मांडू देत, पण आपण नाटक न पाहता त्यांच्याकडे दुर्लक्ष करू शकतो हा संदेश अत्यंत जबाबदारीने त्यांनी दिलेला होता. त्यामुळे त्यांनी त्यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनाही आवरले होते. ते अशा प्रकरणात कोणाची एकाची बाजू घेत नाहीत, तर जे सत्य आहे तेच मांडतात. त्यामुळे ते कायम तारणहार राहिलेले आहेत. ते अशा बाबतीत कोणा एकाचे नसतात. म्हणूनच कलाकारांना त्यांच्याबाबत प्रेम वाटते. या प्रेमातून किरण माने ज्येष्ठ नेते शरद पवारांना भेटले असतील, तर ते मान्य करता येईल. पण एकूणच किरण माने यांचे प्रकरण वेगळे आहे. त्यात शरद पवार काही करतील असे बिल्कूल वाटत नाही.
शरद पवार यांच्या न्यायबुद्धीचा आणखी एक फार मोठा दाखला म्हणजे, २००३ला झी मराठीच्या घडलंय बिघडलंय या कार्यक्रमातून छगन भुजबळांवर टीका केली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या छगन भुजबळ समर्थक कार्यकर्त्यांनी झी मराठीची तोडफोड केली होती. त्यावेळी छगन भुजबळ हे उपमुख्यमंत्री होते, त्यांच्याकडे गृह खात्याचा कारभार होता. पण कसलाही विचार न करता छगन भुजबळांच्या कार्यकर्त्यांकडून ही चूक झालेली आहे हे मोठेपणाने मान्य करत शरद पवारांनी छगन भुजबळ यांचा राजीनामा घेतला, त्यांना मंत्रिपदावरून दूर केले होते. आपल्या पक्षाचा मोठा नेता आहे म्हणून त्यांना पाठीशी घातले नाही. त्यामुळे शरद पवार हे कोणा एकाचे नसतात. सांस्कृतिक कार्यक्रम, कलाकार, खेळाडू, अभिव्यक्ती याबाबत ते अत्यंत न्याय भावनेने काम करतात. ते कोणाचे नाहीत तर न्याय देणारे तारणहार असतात.
हे सगळे पाहिल्यावर किरण माने यांची बाजू किती भक्कम आहे? कोणत्या एका पक्षाला किंवा संघटनेला या महाराष्ट्रात दहशत माजवून कोणाची रोजीरोटी काढून घेता येणे शक्य तरी आहे का? सत्तेत असूनही शरद पवारांसारख्या ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांनी छगन भुजबळांना पाठीशी घातले नाही. ते असताना एखादा पक्ष किंवा संघटना एखाद्या कलाकाराला मालिकेतून काढून टाका, असा दबाव टाकेल आणि कोणाचे काम जाईल हे खरेच वाटत नाही. त्यामुळे यातील दुसरी बाजू जास्त महत्त्वाची आहे.
किरण माने पवारांकडे गेल्यामुळे मालिकेच्या निर्मात्यांनीही त्यांची बाजू शरद पवारांकडे मांडली आहे. किरण माने सेटवर कलाकारांना त्रास देत होते, असा आरोप त्यांच्याकडून करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत या प्रकरणात शरद पवार हस्तक्षेप करतील असे वाटत नाही.
दुसरीकडे किरण माने यांच्यावर मालिकेतल्या सहकलाकारांनीच आरोप केले आहेत. किरण माने यांचे वर्तन सेटवर फारसे चांगले नव्हते, असे आरोप बहुतांश कलाकारांनी केले आहेत. एबीपी माझाने घेतलेल्या मुलाखतीत या सर्वांनी किरण मानेंवर आरोप केले आहेत. त्यात शर्वणी पिल्ले, सविता मालपेकर या नामांकित कलाकारांनी स्पष्टपणे त्यांच्या वर्तनाबाबत आक्षेप घेतला आहे. मालिकेत किरण माने यांच्या पत्नीच्या भूमिकेत असलेल्या शर्वणी पिल्ले यांनी त्यांना राजकीय भूमिकेमुळे नव्हे, तर त्यांच्या वर्तनामुळच काढून टाकण्यात आल्याचे सांगितले आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर यांनीही किरण मानेंची सेटवरची वागणूक योग्य नसल्याने त्यांना काढल्याचे म्हटले आहे. किरण माने कायम स्वत:बद्दल बोलायचे, असा आरोपही त्यांनी केला आहे. इतरही सहकलाकारांनी त्यांच्या विरोधातच बाजू मांडली आहे. किरण माने यांनी अनेकदा मालिकेतून काढून टाकेन अशाप्रकारे धमकावल्याचेही सहकलाकारांनी सांगितले. हे सगळे संपूर्ण महाराष्ट्र वाहिनीवरून बघत असताना यात शरद पवार हस्तक्षेप करतील, असे वाटत नाही. चुकीच्या व्यक्तीला चूक म्हणण्याचे सामर्थ्य असलेले ते नेते आहेत. त्यामुळे ते या प्रकरणात गप्पच बसतील. मुख्य म्हणजे, किरण माने परखड राजकीय भूमिका असलेले कलाकार आहेत. ते कायम त्यांची भूमिका मांडत असतात. गेल्या दोन-तीन वर्षांपासून ते अशा प्रकारच्या भूमिका मांडत आलेले आहेत, पण त्यांच्या या भूमिकेविषयी सर्वांना माहिती होते, तरीही स्टार प्रवाहने त्यांना कास्ट केलेच होते. मराठी इंडस्ट्रीमध्ये असा प्रकार कधीही झालेला नाही. वेगवेगळ्या राजकीय भूमिका असलेले कलाकार, इथे काम करतात, पण त्यांच्यावर कधीही असा दबाव आलेला नाही, मग किरण मानेंवरच दबाव कसा येईल? त्यामुळे कोणा पक्षाला, संघटनेला बदनाम करण्यासाठी हा कांगावा केला असण्याचीच शक्यता आहे. इथे शरद पवार न्याय भूमिका घेतील हे नक्की.
- प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाइन्स
9152448055
18/1/2022
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा