साधारण तीस एक वर्षापूर्वी हेमंत एदलाबादकरची सत्यं शोधं सुंदरम ही एकांकीका महाराष्ट्रात गाजली होती. त्यात त्याने राजकारण सत्य, महाभारत सत्य, नागरिक सत्य, मदारी सत्य आणि हैराण सत्य यावर भाष्य केले होते. त्यामध्ये हैराण सत्य फक्त कवी, कविता आणि कवित्व यावर होते. कवी कसे वाटेल, त्या कविता करून लोकांना हैराण करतात असे ते सत्य होते; पण सध्या आलेले एक सत्य म्हणजे त्याहून हैराण करणारे असे सत्य आहे.
हे सत्य म्हणजे कोरोना कालावधीमध्ये जवळजवळ १ लाख ५० हजार मुलांच्या डोक्यावरील आई-वडिलांचे छत्र हरपले आहे. कोरोनानंतरचे कवित्व काय असेल ते माहिती नाही; पण या मुलांचे नेमके भवितव्य काय असणार आहे? या मुलांच्या आई किंवा वडिलांचे किंवा दोघांचेही निधन झाल्याने ती अनाथ झाल्याची माहिती राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने (एनसीपीसीआर) सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटले आहे. १ एप्रिल, २०२० पासून ११ जानेवारी, २०२२ पर्यंत देशातील १ लाख ४७ हजार मुलांनी कोरोना किंवा अन्य कारणामुळे आपल्या आई-वडिलांना किंवा दोघांपैकी एकाला गमावले आहे, असे आयोगाने म्हटले आहे. थोडक्यात त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे.
एनसीपीसीआरने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये कोरोना कालावधीमध्ये ११ जानेवारीपर्यंत १० हजार ९४ मुले पूर्णपणे अनाथ झाल्याचे म्हटले आहे. १ लाख ३६ हजार ९१० अशी मुले आहेत ज्यांच्या आईचे किंवा वडिलांचे या कालावधीमध्ये निधन झाले आहे. ४८८ मुले पालकांनी सोडून दिलेली आढळून आल्याचेही एनसीपीसीआरने म्हटले आहे. हे तर अक्षरश: हैराण करणारे असे सत्य आहे. याचे कारण मुलांना पोसायची ताकद नाही, रोजगार गेला त्यामुळे मुलांना वाºयावर सोडून दिले गेले, हे फार हैराण करणारे असे सत्य आहे.
आयोगाच्या आकडेवारीनुसार १ लाख ४७ हजार मुलांपैकी ७६ हजार ५०८ मुले असून, ७० हजार ९८० मुलींचा अनाथ झालेल्यांमध्ये समावेश आहे. चार मुले ही ट्रान्सजेंडर आहेत. ही माहिती आयोगाला राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांकडून बाल स्वराज पोर्टल कोविड केअरच्या माध्यमातून मिळाली आहे. काय असणार आहे यांचे भवितव्य? कोणी कोणी मध्यंतरीच्या काळात अशा मुलांना दत्तक घेत असल्याचे जाहीर केले होते. तसा उदारपणा बातम्यांमधून अनेक नेत्यांनी दाखवला होता; पण खरोखरच त्यांचे पुनर्वसन होत आहे का याची शहानिशा, आॅडीट सातत्याने होणे गरजेचे आहे, म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर आपले समाजकार्य दाखवण्यासाठी याचा वापर केला जाईलही पण नंतर त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाणार नाही ना हे पण महत्त्वाचे आहे. कोणत्याही संकटानंतर राजकीय शक्ती त्याचा फायदा उठवतात हे एक भीषण असे हैराण सत्य आहे. आपल्याकडे शेतकरी आत्महत्या झाल्यानंतर काही वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधींना या शेतकºयांचा खूप पुळका आला होता. विदर्भातील एका आत्महत्याग्रस्त शेतकºयाची पत्नी कलावती नामक महिलेच्या झोपडीत जाऊन राहुल गांधी भाकरी खाल्ल्याची बातमीही रंगतदारपणे प्रसिद्ध झाली होती. तिचे पुनर्वसनापासून तिला निवडणुकीला उभे करण्यापर्यंतच्या घोषणा केल्या गेल्या. प्रत्यक्षात तिच्या हातात काहीच पडले नव्हते, अशीही बातमी आली होती. त्यामुळे या कोविड काळातील अनाथ झालेल्या बालकांचे नाथ होण्यासाठी येणारे कोणी वैयक्तिक लाभ उठवण्यासाठी येणार असतील, तर ते सत्य आणखी हैराण करणारे असेल.
एनसीपीसीआरच्या प्रतिज्ञापत्रानुसार अनाथ झालेल्यांपैकी ५९ हजार १० मुले अशी आहेत ज्यांचे वय ८ ते १३ वर्षांदरम्यान आहे. २६ हजार ८९ मुले अशी आहेत, जी वयाच्या चार ते सात वर्षांदरम्यान अनाथ झालीय. तर १४ ते १५ वर्षे वयोगटामधील २२ हजार ७६३ मुलांनी आपल्या पालकांपैकी एकाला गमावलेय. आयोगाच्या आकडेवारीनुसार १ लाख २५ हजार २०५ मुले आपल्या पालकांपैकी एका पालकासोबतच सध्या राहत आहे. ११ हजार २७२ मुले पालकांपैकी एक जण वारल्यानंतर आपल्या कुटुंबीयांसोबत राहत आहेत, तर १ हजार ५२९ मुले बालसुधारणा गृहांमध्ये राहत आहेत.
कोरोना साथीच्या कालावधीमध्ये अनाथ झालेल्या मुलांची सर्वाधिक संख्या ओडिशा राज्यातील आहे. या राज्यातील २४ हजार ५०५ मुलांचा यामध्ये समावेश आहे. त्या खालोखाल महाराष्ट्रामधील १९ हजार ६२३ मुलांवरील पालकांचे छत्र हरवले आहे. गुजरातमधील १४ हजार ७७०, तामिळनाडूमधील ११ हजार १४, उत्तर प्रदेशमधील ९ हजार २४७ आणि आंध्र प्रदेशमधील ८ हजार ७६० मुले अनाथ झालीय. मध्य प्रदेशमधील ७ हजार ३४०, पश्चिम बंगालमधील ६ हजार ८३५, दिल्लीतील ६ हजार ६२९ आणि राजस्थानमधील ६ हजार ८२७ मुले अनाथ झाली आहेत. म्हणजे त्या-त्या राज्यातील स्थानिक, प्रादेशिक पक्ष आणि नेत्यांनी या मुलांच्या पुनर्वसनाचा विषय हाती घेतला, त्यांना दत्तक घेतले तर हा प्रश्न सहज सुटू शकतो. फक्त याचे राजकारण झाले, तर ते मात्र वाईट असेल. त्यामुळे दत्तक म्हणजे नेमके काय करणार? प्रत्यक्षात दत्तक घेऊन अगदी आपले नाव देण्यापासून वारस बनवण्यापर्यंत जबाबदारी घेणार की, फक्त खर्चाची जबाबदारी घेणार हे पण स्पष्ट केले गेले पाहिजे. नाहीतर या बालकांचे आयुष्य अधांतरी असेल, हे एक हैराण सत्य बाकी राहील.
20/1/2022
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा