सध्या गोव्याच्या राजकारणात चर्चा आहे ती माजी मुख्यमंत्री आणि संरक्षण मंत्रीपदावर उत्कृष्ट काम केलेले मनोहर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर यांची. भारतीय जनता पक्षाने त्यांना उमेदवारी नाकारली आहे, तर आम आदमीच्या अरविंद केजरीवाल यांनी त्यांना उघड उघड आॅफर दिली आहे. आम आदमी पार्टीत पर्रिकर यांचे स्वागत आहे, असे त्यांनी रविवारीच स्पष्ट केले. काँग्रेसही हा मासा आपल्या गळाला लागतो का यासाठी चाचपणी करत आहे. इतके असूनही भाजपने मात्र उत्पल पर्रिकरांना तिकीट नाकारायचेच ठरवलेले आहे. अर्थात याचे कारण एकच आहे की, संपूर्ण देशभर संदेश गेला पाहिजे की, भाजप हा पक्ष विचारांवर चालणारा पक्ष आहे. इथे घराणेशाहीला थारा नाही. हे स्पष्ट करताना भाजपने म्हटले आहे की, ‘केवळ पर्रिकरांचा पुत्र आहे म्हणून उत्पलला उमेदवारी दिली जाऊ शकत नाही.’
भारतीय जनता पक्षाचे गोवा प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी उत्पल पर्रिकर यांचा पणजीच्या उमेदवारीवरील दावा भरपत्रकार परिषदेत निकाली काढला. आपण केवळ पर्रिकरांचा मुलगा म्हणून उमेदवारी मागत नव्हतो, अशी प्रतिक्रिया उत्पल यांनी त्यावर दिली आहे. ‘फडणवीस हे पक्षाचे मोठे नेते आहेत. त्यामुळे त्यांना मी प्रत्युत्तर देणे योग्य नव्हे,’ अशी शालीनताही त्यांनी यावेळी दाखवली हे विशेष आहे. पर्रिकरांचे पुत्र म्हणून उत्पल यांच्याविषयी गोव्याला निश्चितच ममत्व आहे. आपुलकी आहे. मात्र, आजच्या गलिच्छ राजकारणामध्ये त्यांच्यासारख्याचा निभाव लागणे शक्य आहे का ही विचार करण्याजोगी बाब आहे.
अर्थात सध्याचा भाजप हा मुळात त्यांचा पक्षदेखील आज पूर्वीचा राहिलेला नाही. केवळ सत्ता हेच ज्या पक्षाचे साध्य बनले आहे, त्यांनी पर्रिकरांचा वारसा एका फटक्यात असा निकाली काढला, तर त्यात आश्चर्य वाटू नये. सरकारच्या स्थैर्यासाठी म्हणून अनेक कलंकित व्यक्तींना पक्षात घेऊन पावन करण्यात आले. प्रत्येक निवडणुकीत हेच घडताना दिसत आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले त्यांना महाराष्ट्रात २०१९च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश देऊन पावन करण्यात आले. त्यामुळे या पतीत पावन अशा पक्षात उत्पल पर्रिकर यांचा निभाव कसा लागणार?
भाजप आज तेच करते आहे जे पूर्वी काँग्रेस करत होती. निवडून येण्याचा निकष लावून, जो पैसा खर्च करू शकेल अशाला उमेदवारी देणे आणि आपले संख्याबळ वाढवणे. शेवटी निवडणुका म्हणजे काय तर आकड्यांचा खेळ. पैशांचे आणि संख्याबळाचे आकडे इथे महत्त्वाचे असतात.
त्यामुळे निवडून येण्याची शक्यता नाही असे जेव्हा वाटते तेव्हा गरज संपताच दूर फेकण्याचे तंत्र त्यांनी विकसीत केलेले आहे. आतादेखील निवडणुकीमध्ये केवळ जिंकून येण्याची क्षमता या एकाच निकषावर अनेकांचे इनकमिंग सुरू झाले आहे. दुसरीकडे पर्रिकरांचा भाजप उरलेला नाही असे सांगत काही निष्ठावंत बाहेर पडत आहेत. सत्तेच्या या साठमारीमध्ये उत्पल पर्रिकरांचा पत्ता काटला गेला यात आश्चर्य नाही.
उत्पल पर्रिकर यांनी राजकारणात येण्याची इच्छा फार पूर्वीच व्यक्त केलेली होती व तसा प्रयत्नही सुरू केला होता.
शरद पवारांसारख्या मुरब्बी नेत्याला दोन पानी खरमरीत पत्र लिहून आपल्या दिवंगत पित्याच्या नावाने राजकारण करू नका, असे बजावण्यासही त्यांनी कमी केले नव्हते. पक्षकार्यातही त्यांनी आजवर सक्रिय सहभाग घेतला, परंतु ‘राजकारण हे फार क्रूर क्षेत्र आहे. येथे समोरून नव्हे, पाठीत खंजीर खुपसले जातात.’ असा इशारा आम्ही त्यांना तेव्हाच दिला होता. ‘आपल्या पित्याची सहानुभूती त्यांना नजीकच्या भविष्यात कदाचित हात देईल, परंतु राजकारणाच्या या क्षेत्रात टिकायचे असेल, वाढायचे असेल, तर तेथे स्वत:ची कर्तबगारीच लागेल. सहानुभूती काही काळापुरतीच असेल. ती काही कायम उरणार नाही. पुढचा प्रवास स्वत:च्या हिमतीवरच करावा लागेल. स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करावी लागेल. त्यासाठी राजकारणात शिकायचा पहिला धडा म्हणजे कमी बोलणे आणि जास्त काम करणे. ‘नेमके हेच काम आता उत्पल पर्रिकर यांना करावे लागणार आहे. आता त्याचा फायदा कोण कसा उठवेल हे सांगता येत नाही. पण पर्रिकर यांनी आता कोणाच्याही हातचे सोंगटे, बाहुले बनू नये.
खरे म्हणजे उत्पल पर्रिकर यांनी शांतपणे मतदारसंघात आपले काम जरूर सुरू ठेवले होते, परंतु बाबुश मोन्सेर्रातसारख्या दिग्गज ताकदवान उमेदवाराला आव्हान निर्माण करण्याइतपत आपली राजकीय ताकद त्यांना निर्माण करता आली नाही. उत्पल यांनी राजकारणात सक्रिय व्हावे यासाठी पर्रिकर समर्थक, निष्ठावंत भाजप कार्यकर्त्यांचा एक मोठा गट पणजीमध्ये सतत कार्यरत होता. बाबुश मोन्सेर्रात यांचे पक्षात येणे त्यांना कधीच रूचले नाही. ज्या मोन्सेर्रातविरुद्ध भाजपचेच नेते ते प्रचाराला येतात, तेव्हा आयाबहिणी घरात लपतात अशी टीका करायचे, त्यांनीच त्यांच्यासाठी केवळ सरकार बळकट करण्यासाठी लाल पायघड्या अंथरल्या. त्याखाली पक्षनिष्ठा, नैतिकता चिरडली गेली तरी त्याची फिकीर केली नाही. उत्पल पक्षनेत्यांच्या याच शरणागत वृत्तीचे बळी ठरले आहेत. जेमतेम ४० आमदारांच्या विधानसभेत एकेक जागा महत्त्वाची असल्याने भाजपने आकड्यांचे गणित लावले असले, तरी यात नाराजी वाढून पक्षाला फटका बसणार नाही ना याचाही विचार होणे आवश्यक आहे. भारतीय जनता पक्ष आपली अंतर्गत धूसफून, नाराजी वाढवून आपल्या पराभवाची पार्श्वभूमी तयार करत आहे. पूर्वी काँग्रेसच्या बाबतीत बोलले जायचे ते आता भाजपच्या बाबतीत बोलावे लागते आहे. ते म्हणजे काँग्रेसचा पराभव विरोधक नाही, तर काँग्रेसच करू शकते. तसेच भाजपला हटवण्याचे काम भाजपच करू शकते. तोच प्रकार महाराष्ट्रात, पश्चिम बंगालमध्ये घडलेला आपण यापूर्वी पाहिला आहे. या नाराजीनाट्य, बंडखोरी यातून भाजपला पराभवाचा सामान करावा लागला किंवा संख्याबळाअभावी एखादी तिसरीच आघाडी तयार झाली आणि भाजपच्या हातून सत्ता खेचून घेतली, तर ते यश कोणत्याही आघाडीचे नसेल तर भाजपने भाजपचा केलेला तो पराभव असेल हे लक्षात घेतले पाहिजे.
निवडून येणार नाहीत त्यांनी पक्ष सोडला, असे फडणवीस म्हणत आहेत, परंतु त्याचबरोबर निष्ठावंतांना डावलून ‘निवडून येऊ शकतात’ त्या उपºयांना पक्षात घेण्याची सध्या मालिकाच लागली आहे त्याचे काय? हा प्रश्न आज पक्षातील जुना कार्यकर्ता विचारत असताना भाजप सत्तेचे गणित मांडत आहे. भाजप एखाद्याला नेत्याचा मुलगा म्हणून उमेदवारी देत नसेल, तर फ्रान्सिस डिसोझांच्या मृत्यूनंतर पोटनिवडणुकीत जोशुआला कसे तिकीट मिळाले होते? असे त्याचे काय पक्षकार्य होते? आता पक्षाचे काही नेते आपल्या बायकांनाही रिंगणात उतरवू पाहात आहेत ते सहन केले जाणार आहे का? असे अनेक प्रश्न निश्चित उपस्थित होतात, ज्याची उत्तरे फडणवीसांना द्यावी लागतील. मनोहर पर्रिकरांनी राजकारणात आपल्या कुटुंबीयांना कधीच उतरवले नाही वा त्यांना त्याचा फायदा मिळवून दिला नाही. त्यांच्या लोकप्रियतेचे तेही एक महत्त्वाचे कारण होते, याकडे दुर्लक्ष करता येणार नाही.
18/1/2022
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा