सकारात्मक लिखाण यामुळे गेल्या तीस-पस्तीस वर्षांपासून एक नाटककार मोठा संघर्ष करून आपले नाव एका उंचीवर नेऊन ठेवतो आणि नव्या नाटककारांना, लेखकांना प्रेरणादायी ठरतो ते लेखक, नाटककार म्हणजे आनंद म्हसवेकर. रंगभूमीवरचा आनंदयात्री हीच त्यांनी ओळख निर्माण केलेली आहे. गेली अनेक दशके संघर्ष करत असताना त्यांच्या आयुष्याला खºया अर्थाने ओळख आणि कामगिरीची पोहोच पावती मिळाली ती ‘यू टर्न’ या नाटकाने.
आनंद म्हसवेकर हे मुळचे सातारचे. वैराटगडाच्या पायथ्याशी असलेल्या म्हसवे या गावातील. पांडवांनी आपला अज्ञातवास ज्या भागात नाट्यमयपणे घालवला, त्या विराट नगरीत बृहन्नडा बनून अर्जुन, सैरंध्री बनून द्रौपदी, कंक बनून युधिष्टीर, बल्लव बनून भीम आपल्या नव्या भूमिकांचे नाटक करत होते. हे एक वर्षभराचे महानाट्य ज्या भूमीत घडले, त्या भूमीतून महाराष्ट्राला आनंद देणारा हा आनंदयात्री जन्माला आला. त्यांनी आपली कर्मभूमी स्वप्ननगरी, मायानगरी मुंबई केली आणि एक संघर्षमय पण यशस्वी नाटककार म्हणून नाव कमावले.
आजवर आनंद म्हसवेकरांनी ४२ एकांकिका, १५ प्रायोगिक नाटके, २५ व्यावसायिक नाटके, ८ चित्रपट, ३००० विविध मालिकांचे एपिसोड लिहिले. यात त्यांनी तत्कालीन ईटीव्ही आणि सध्याचे कलर्स मराठीसाठी लिहिलेल्या या गोजीरवाण्या घरात आणि चार दिवस सासूचे या मालिकेचे केलेले लेखन आणि मालिका तुफान गाजल्या होत्या.
आनंद म्हसवेकर यांचा खरा पिंड हा एकांकिका लेखनाचा. त्यांच्या तमाशा आॅफ ह्युमॅनिटी अर्थात भिकाºयाच्या चोरीचा फार्स या एकांकिकेने अक्षरश: संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे, तर देश-विदेशात धूमाकुळ घातला. १९९०च्या नाट्यदर्पण दिवाळी अंकात ती एकांकिका प्रकाशित झाली आणि रंगकर्मींच्या त्यावर उड्या पडल्या होत्या. गुरुवारी त्यांनी मुंबई चौफेरच्या कार्यालयाला भेट दिली आणि गेल्या पन्नास वर्षांतील त्यांच्या जीवनाचा आणि कर्तत्वाचा पट लिलया उलगडला.
‘तमाशा आॅफ ह्युमॅनिटी’ ही एकांकिका सातारला झालेल्या ७१व्या नाट्य संमेलनात मी सादर केली होती. त्यावेळी फक्त पत्रोपत्री त्यांची ओळख झाली होती. फोन, मोबाइल किंवा जलद संपर्काचे तेव्हा कोणतेही साधन ही नव्हते, पण त्या प्रयोगाच्या परवानगीचे त्यांचे पत्र हा त्याकाळी मला मिळालेला अनमोल ठेवा होता. त्यावेळी अक्षरपाने भेटलेले आणि यशाची शिखरे गाठणारे म्हसवेकर यांची प्रत्यक्षात केव्हा भेट होईल हे माहिती नव्हते, पण गुरुवारी अचानक त्यांनी भेट दिली आणि मला तिसरी घंटा या सदराचा शनिवारचा विषयच साक्षात उभा राहिला.
यावेळी आनंद म्हसवेकर यांनी फार छान मते व्यक्त केली. एकांकिका लेखनामध्ये रमणाºया या आनंदयात्रीने स्पष्ट केले की, एकांकिका आपल्याकडे म्हणावी तशी रुजली नाही. ज्याप्रमाणे मराठी साहित्यात लघुकथा रुजली तशी एकांकिका रुजली नाही. नाटककार झाल्यावर एकांकिका लिहिणे लेखकांना कमी पणाचे वाटते. एकांकिका हे प्रस्थापितांचे माध्यम नाही, तर नवोदितांचे माध्यम आहे, तो एक स्टेपिंग स्टोन आहे असे त्याकडे पाहिले जाते. पण तो पूर्ण प्रकार आहे. यासाठी वर्षातून किमान एक तरी एकांकिका ते लिहितात. जोपर्यत जिवंत आहे तोपर्यंत दरवर्षी एक एकांकिका लिहिणार हा त्यांचा संकल्प आहे. हे फार मोठे योगदान आनंद म्हसवेकर यांचे आहे.
साताºयातून मुंबईत आल्यावर एमए मराठी केले. स्टेट बँकेत दीर्घकाळ नोकरी केली आणि २०००नंतर मात्र पूर्णवेळ लेखनासाठी त्यांनी दिला. भाषेवर अत्यंत प्रेम करणाºया आनंद म्हसवेकर यांना कोणताही प्रश्न सुटला नाही, ते ज्ञानेश्वरीचे वाचन करतात आणि त्यातून त्यांना उत्तर सापडते. आंतरबँक नाट्य एकांकिका स्पर्धा, कामगार कल्याण स्पर्धा, एसटीच्या परिमंडळीय स्पर्धा, एमएसईबीच्या आंतरविभागीय नाट्यस्पर्धा, राज्य नाट्य स्पर्धा या आनंद म्हसवेकर यांनी लिहिलेल्या नाटक आणि एकांकिकांशिवाय अपूर्ण राहिल्या असत्या. हौशी आणि प्रायोगिक नाटके करता करता सहजपणे ते व्यावसायिक रंगभूमीवर आले आणि एकापेक्षा एक सरस नाटके त्यांनी दिली. यातील ‘सुनेच्या राशीला सासू’ आणि ‘यू टर्न’ ही नाटके सध्या चांगलीच गाजत आहेत. यू टर्न या नाटकाला झी मराठीसह एकूण २७ अॅवॉर्ड्स २००९ मध्ये मिळाले. त्यामुळे परप्रांतियांनाही या नाटकाने वेड लावले. कानडीमधून या नाटकाचा अनुवाद होऊन कन्नड रंगभूमीवरही त्याचे भरपूर प्रयोग होत आहेत. हे त्यांच्या लेखणीचे वैशिष्ट्य आहे. आपल्याकडे परकीय भाषेतील नाटके आणणारे भरपूर आहेत, पण मराठी नाटक परक्या भाषेत जाणे हा खरा अभिमान आहे, म्हणून आनंद म्हसवेकर यांचे रंगभूमीवरचे योगदान फार महत्त्वाचे आहे.
भाषेवर त्यांचे अत्यंत प्रभुत्व आहे. बाळ कोल्हटकर, शन्ना नवरे, रमेश पवार, प्र. ल. मयेकर आणि सुरेश खरे यांना ते गुरुस्थानी मानतात. या सर्व भाषाप्रभूंचा वरदहस्त लाभलेल्या या आनंदयात्रीकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा अजूनही वाढत आहेत. नाटक, सिनेमा, मालिका यातून त्यांना वेळ मिळत नाही. पण लेखकाला लिहिण्यापासून कोणी रोखू शकत नाही. लॉकडाऊनच्या काळात कोविडमुळे सगळे थांबले, पण या घरात बसण्याचाही त्यांनी चांगला फायदा करून घेतला आणि ‘कुणा एकाची रंगयात्रा’ हे त्यांच्या नाट्यप्रवासाचे प्रवासवर्णनपर पुस्तक लिहिले. डिंपल प्रकाशनने ते प्रकाशित केले आणि त्यांच्यातील लेखक कार्यरत ठेवला. रंगभूमीसाठी खºया अर्थाने आनंदयात्री असे हे रंगकर्मी आहेत. त्यांच्या लेखणीला ‘सलाम’. ‘सलाम’ हा शब्द त्यांच्या तमाशा आॅफ ह्युमॅनिटीने खूपच फेमस केला, त्यामुळे सलाम या शब्दातच आनंद म्हसवेकर यांचे अभिनंदन करायला आवडेल.
प्रफुल्ल फडके/ तिसरी घंटा
9152448055\\
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा