गुरुवार, १३ जानेवारी, २०२२

समाजवादी राम


समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी सोमवारी असा दावा केला की, भगवान कृष्ण रोज रात्री त्यांच्या स्वप्नात येतात आणि त्यांना सांगतात की, ते राज्याच्या आगामी विधानसभा निवडणुकीनंतर उत्तर प्रदेशमध्ये सरकार स्थापन करतील आणि रामराज्य स्थापन करतील. भाजपच्या बहराइचच्या आमदार माधुरी वर्मा यांना त्यांच्या पक्षात सामील करण्यासाठी आयोजित कार्यक्रमादरम्यान उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री यादव यांनी हा दावा केला आहे. किती विनोदाचा भाग आहे हा. जे लोक राम मंदिराला विरोध करत होते, ज्यांना राम आणि बाबर सारखाच होता. त्यांना आता राम आठवू लागला आहे. रामराज्य याशिवाय राजकारणात कोणताही राम आता उरलेला नाही हेच नक्की.

उत्तर प्रदेशातील निवडणुका या रामाशिवाय होऊ शकत नाहीत हे नक्की. गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसलाही या रामाची आठवण होऊ लागली आहे. राम आणि मंदिर, पूजा याबाबत राहुल गांधी सातत्याने बोलताना दिसतात. आपले हिंदुत्व आणि राम याबाबत ते उघडपणे भाष्य करताना दिसतात. त्यावर मुख्यमंत्री योगींनी राहुल गांधींना मंदिरात कसे बसतात हे तरी समजते का?, असा प्रश्न उपस्थित केला आहे. पण रामाशिवाय इथल्या राजकारणाचे पानही हालताना दिसत नाही हे नक्की. मायावतींनीही काही दिवसांपूर्वी राम मंदिराचा उल्लेख केला होता. त्यामुळे उत्तर प्रदेशातील प्रमुख पक्ष असलेल्या भाजप, काँग्रेस, समाजवादी आणि बसपा या सर्वांनाच रामाची जवळीक साधायची आहे. अयोध्येत लवकरच होणाºया राम मंदिराचे श्रेय घ्यायचे आहे. अयोध्येच्या, रामाच्या नावावर आपले उखळ पांढरे करण्याचे स्वप्न आज प्रत्येकाचे आहे.


विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी, दशकांपूर्वी धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणाºया समाजवादी पार्टी, काँग्रेस यांना राम, अयोध्या, हिंदुत्व याचे इतके वावडे होते की, हिंदू धर्मावर टीका केली तरच तो खरा धर्मनिरपेक्ष. हिंदुत्वाचा उल्लेख केला की, तो धर्मांध असे समीकरण होते, पण हेच पक्ष आता रामाला साकडे घालताना दिसतात, तेव्हा त्याच्या इतका राजकीय विनोद कोणता नसेल.

अखिलेश यादव यांना आता उपरती झालेली आहे की, रामराज्याचा मार्ग हा समाजवादाच्या मार्गाने आहे. ज्या दिवशी समाजवाद स्थापन होईल, त्याच दिवशी राज्यात रामराज्य स्थापन होईल, असे अखिलेश यादव म्हणाले. आपले हे मत ठामपणे सांगताना रामराज्यासाठी रामाबरोबर अखिलेश यांना कृष्णाचीही मदत घ्यावी लागली. त्यामुळे कृष्णनीतीतून रामराज्य आणण्याचे अखिलेश यांचे स्वप्न आहे. तसे ते स्वप्न पाहात आहेत. अखिलेश यादव म्हणतात की, भगवान श्रीकृष्ण रोज रात्री माझ्या स्वप्नात येऊन मला सांगतात की, आमचे सरकार उत्तर प्रदेशात येत आहे. त्यांनी असा दावाही केला की, योगी आदित्यनाथ सरकार राज्यात अपयशी ठरले आहे. उत्तर प्रदेशात निवडणूक प्रचार करत असलेल्या भाजप नेत्यांपैकी, यादव यांनी उत्तर प्रदेश आणि बिहारसह काही राज्यांमधील काही विद्यार्थ्यांच्या पालकांच्या कुप्रसिद्ध प्रथेचा संदर्भ दिला, त्यांच्या परीक्षा केंद्रांवर उतरून त्यांच्या पाल्यांना अन्यायकारक मार्गाचा अवलंब करण्यास मदत केली. आता भगवान कृष्ण असे कोणाच्याही स्वप्नात कसे काय जाऊ लागले? ज्या श्रीकृष्णाने यादवी निर्माण झाली म्हणून अनाचार करू लागले, म्हणून सगळ्या यादवांसकट आपली द्वारका समुद्रात बुडवून टाकली. ते श्रीकृष्ण पुन्हा यादवाला आशीर्वाद देण्यासाठी कसे येतील स्वप्नात? यादवांकडे राज्य दिले तर काय होते हे ज्या श्रीकृष्णाने आपल्या डोळ्याने पाहिले आणि दारूच्या नशेत एकमेकांशी भांडणाºया यादवांना धडा शिकवला त्या श्रीकृष्णाला आता यादव हे उत्कृष्ट आणि समाजहित करणारे राज्यकर्ते आहेत असे कसे वाटले? अखिलेश यादव यांचे वडिलांबरोबर पटत नाही, चुलत्यांबरोबर पटत नाही, पक्षांतर्गत यादवी सुरूच आहे. अशा परिस्थितीत श्रीकृष्णांना हे वास्तव माहिती नसेल असे अखिलेश यादव यांना वाटते का? त्यामुळे अशी स्वप्ने पडली सांगणे म्हणजे राजकीय भोंदुगिरी सुरू करण्याचा प्रकार आहे.


पण राम आणि कृष्ण यांना सोडून या देशात राजकारण करता येत नाही हे पुन्हा एकदा अधोरेखित होताना दिसते आहे. समाजवादात कसला राम उरलेला नाही. हे मतदारांना स्पष्टपणे कळले असताना आता समाजवाद्यांना राम आठवू लागला हे फारच गमतीशीर म्हणावे लागेल, पण एका गोष्टीचे आश्चर्य वाटते ते हे की, रामराज्य येईल आणि ते समाजवादी पार्टी आणेल हे सांगण्यासाठी भगवान कृष्ण अखिलेश यादव यांच्या स्वप्नात येतात. रामराज्य येईल हे सांगण्यासाठी अखिलेश यादव यांच्या स्वप्नात राम का बरे आला नसावा? रामाचे राज्य समाजवादी होते असे जर अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीला वाटते, तर यापूर्वी अयोध्येतील राम मंदिराला यांनीच का विरोध केला होता? हिंदू धर्मीय रामाला विरोध करणाºया त्यांचे तीर्थरूप मुलायमसिंह यादव यांना त्यामुळे मुल्ला यम सिंह असे संबोधले जात होते, पण त्यांना आता खºया अर्थाने रामाचे महत्त्व पटले हे नक्की. म्हणजे एका कवितेत असा उल्लेख आहे की, ‘अरे रामकृष्णही आले गेले, त्याविण जग का ओसची पडले?’ पण हे राजकारणाच्या बाबतीत मात्र खरे नाही. रामकृष्ण यांचा आधार घेतला नाही, तर उत्तर प्रदेशातीलच नव्हे तर या देशातील राजकीय पक्ष आणि राजकारण ओस पडेल हे यातून स्पष्ट झालेले आहे.

5/1/2022

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: