ज्येष्ठ लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट यांचे पुण्यात निधन झाले. एक अत्यंत दूरदर्शी विचारवंत आणि लेखक आपल्यातून गेलेला आहे. दूरदर्शी यासाठी की, पुढे काय संभाव्य धोका असेल, परिस्थिती असेल त्याचे ते आपल्या लेखनातून सहजपणे आणि निर्भिडपणे मांडत होते. याचे जीवंत उदाहरण म्हणजे २००५ च्या २५ जानेवारीला सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील मांढरदेवी दुर्घटना घडली होती, ज्यामध्ये हजारच्या आसपास मृत्युमुखी पडले होते, तशी घटना घडू शकेल, असा अंदाज त्यांनी कित्येक वर्षे अगोदर आपल्या लेखनातून मांडला होता, पण त्याची दखल घेतली गेली नाही आणि अटळ असा तो अपघात घडला.
सामाजिक विषयांवर अत्यंत आत्मियतेने लिखाण करण्याची त्यांची सहजता होती. सामाजिक प्रश्नांसोबतच अनिल अवचट यांनी विविध विषयांवर लेखन केले. ‘रिपोर्ताज’ हा दीर्घ लेखन प्रकार त्यांनी मराठीत रूढ केला. लेखनासोबतच चित्रकला आणि ओरिगामीचीही त्यांना आवड होती. ते उत्तम बासरीही वाजवत. खºया अर्थाने ते बहुरंगी कलाकार होते. आत्मचिंतन करायला लावणारी ताकद त्यांच्या कलेत होती, विचारात होती. त्यांचे आडनाव इतके छान की, त्यात एकही काना मात्रा, वेलांटी, उकार असा कसलाही विकार नव्हता. त्याप्रमाणेच अनिल अवचट हे खºया अर्थाने कोणत्याही गोष्टीकडे निर्विकारपणे पाहू शकत होते.
मित्र परिवार, वाचक आणि मुक्तांगणचे रुग्ण या सगळ्यांमध्येच अनिल अवचट ‘बाबा’ म्हणूनच लोकप्रिय होते. अनिल अवचट यांनी पत्नी डॉ. सुनंदा अवचट यांच्यासोबत ‘मुक्तांगण’ या व्यसनमुक्ती केंद्राची स्थापना केली होती. आज मुक्तांगण व्यसनमुक्तीसोबतच अनेक क्षेत्रांत कार्य करत आहे. मुक्तांगणमधले अनुभव सांगणारे ‘मुक्तांगणची गोष्ट’ हे पुस्तक समकालीन प्रकाशननाने २०१०मध्ये प्रसिद्ध केले आहे.
ओरिगामी म्हणजे कागदाच्या घड्या घालून विविध प्राणी, आकार करण्यात त्यांचा हातखंडा होता. एखाद्या व्यक्तीशी गप्पा मारता मारता ते सहज ओरिगामीतून गोष्टी तयार करत होते. २०२१मध्ये त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला होता, तर त्यांच्या ‘सृष्टीत गोष्टीत’ या पुस्तकाला साहित्य अकादमीचा उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार मिळाला होता.
अनिल अवचटांचा जन्म ओतूर येथे झाला. त्यांनी पुण्याच्या बी. जे. मेडिकल कॉलेजमधून वैद्यकीय शिक्षण घेतले. त्यात त्यांचे मन रमले नाही म्हणून ते युक्रांदच्या चळवळीत सामील झाले. त्यातही फार काळ टिकले नाही. मग त्यांनी पूर्णवेळ लेखन क्षेत्रात उडी घेतली. लेखनातून त्यांनी जी चळवळ उभी केली ती फारच जबरदस्त होती. कळत नकळत घडणाºया चुकांवर बोट ठेवण्याची त्यांची खुबी होती. पूर्वीच्या काळात त्यांचा क्रिकेटची नशा नावाचा एक धडा पाठ्यपुस्तकात समाविष्ट होता. तो तसा अंजन घालणारा होता. त्यांनी आपल्या लिखाणातून इतके जबरदस्त विषय मांडले आहेत की, माणसाच्या मनाचा शोध घेण्याचे काम त्यांनी खºया अर्थाने लिखाणातून केले होते.
त्यांची पत्नी सुनंदा मानसोपचारतज्ज्ञ होती. त्यांच्या साथीने अवचटांनी पुण्यात मुक्तांगण हे व्यसनमुक्ती केंद्र चालू केले. हे केंद्र अजिबात चालू नये अशी प्रतिक्रिया त्याच्या उद्घाटनप्रसंगी पु. ल. देशपांडेंनी दिली होती. याशिवाय पत्रकार म्हणून त्यांनी विविधांगी विषयांवर लेखन केले. ते वेळोवेळी दिवाळी अंकातून प्रसिद्ध झाले आहे. या लेखांचे संकलन ‘रिपोर्टिंगचे दिवस’, ‘माणसे’ अशा अनेक पुस्तकांतून त्यांनी मांडले. स्वत:विषयी थोडेसे या आत्मचरित्रपर लेखनात त्यांनी स्वत:च्या आयुष्याबद्दल विस्ताराने लिहिले आहे. मेडिकलच्या दिवसांतच आपण लोकांशी बोलून योग्य पद्धतीने ते उतरवू शकतो, अशी उपरती झाल्याचे ते ‘रिपोर्टिंगचे दिवस’ या पुस्तकाच्या प्रस्तावनेत लिहितात.
विशेष म्हणजे, तळागाळातल्या लोकांशी सहज संवाद हे अवचटांचे आणखी एक वैशिष्ट्य होते. त्या अनुभवांविषयी अवचट सांगायचे की, समाजातल्या खालच्या थरातल्या लोकांशी बोलायला गेलो, कागद काढला की, त्यांची बोलतीच बंद व्हायची. त्या भीतीमागे अनेक सरकारी लोकांनी फसवलेले पूर्वीचे प्रसंग असतील, कोर्टकचेºया असतील, आणखीही काही प्रसंग असतील. कागदाची भीती आपल्या मध्यमवर्गीयांना कळूच शकणार नाही. आपल्यापुढे कागद येतो, तो प्रेमपत्राच्या स्वरूपात, धार्मिक पोथीच्या स्वरूपात. इथे येतो तो भीतीच्या स्वरूपात. मग मी कागदच सोडून दिला. केवढे हे भेदक सत्य त्यांनी मांडले होते. ते फार पुढच्या काळाचा विचार करायचे. काळाच्या पुढचे त्यांना दिसतेय असे वाटायचे.
आनंदाची व्याख्या सांगताना अनिल अवचट यांनी एका मुलाखतीत म्हटले होते, माझी आई पहाटे उठून सडा घालायची, घरासमोरचा रस्ता झाडायची आणि मग दररोज वेगवेगळी रांगोळी काढायची. ते बघायला आणि कौतुक करायलाही कुणी नव्हते. मग ती रांगोळी पुसली जायची. त्याची तिला काही खंत नव्हती. तिच्यापासून मी एक शिकलो की, एखादी गोष्ट करताना जो आनंद मिळतो तोच आपला आनंद. बाकी आनंद काही आपल्या हातात नाहीये. कुणीतरी कौतुक केले पाहिजे, असे काहीही नाही. माझ्यासाठी प्रोसेसमधला आनंद हे महत्त्वाचे आणि तो मला माझ्या आईने शिकवला. हा विचार फार महत्त्वाचा आहे. म्हणजे अठरा अध्यायातील गीतेतून फळाची अपेक्षा न करता काम करण्याचा जो निष्काम कर्मयोग आहे, तो अनिल अवचट साक्षात जगले होते.
आज काळाच्या पुढचा विचार करणारे एक फार मोठे विचारवंत आपल्यातून गेल्याचे दिसत आहे. अनिल अवचट यांच्याबद्दल त्यांच्या विचारसरणीबद्दल लिहिण्यासारखे खूप आहे. कारण त्यांची वागणूक, राहणीमान हे फार वेगळे आणि सहज होते. कृत्रिमपणा त्यांच्या वागण्यात नव्हता, तर त्यांचे वागणे हे नैसर्गिक होते. माणूस म्हणून कसे जगावे, एखाद्या गोष्टीकडे कसे पहावे याचे ते विद्यापीठ होते. असे हे विद्यापीठ आज थांबले आहे, याचे दु:ख आहे.
- प्रफुल्ल फडके/ बिटवीन द लाईन्स
9152448055\\
28/1/2022
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा