पूर्वी आकाशवाणीवर सकाळच्यावेळी गांधी वंदना म्हणून एक कार्यक्रम असायचा. निवेदिकेने गांधी वंदना म्हटल्यावर एक भजन सुरू व्हायचे,
‘वैष्णव जन तो तेने कहिये, जे पीड परायी जाणे रे,
पर दु:खे उपकार करे, तोये मन अभिमान ना आणे रे।’
केवढा मतीतार्थ यात भरलेला होता, म्हणजे व्यासांनी अठरा पुराणांत जो काही संदेश दिला तो हाच होता. ‘अष्टादश पुराणेषु व्यासस्य वचनद्वयम। परोपकार: पुण्याय पापाय परपीडनम।।’ आज महात्मा गांधींच्या पुण्यतिथीनिमित्ताने या विचारांची गरज आहे. स्वातंत्र्य आणि स्वराज्य यातील नेमके अंतर बापू जाणून होते. स्वातंत्र्यानंतर स्वराज्याची लढाई लागेल, ती आपल्याच माणसांबरोबर याचीही त्यांना परिपूर्ण कल्पना होती. त्यामुळेच गांधींनी स्वराज्याचा पुरस्कार केलेला आहे. स्वराज्य याचा अर्थ स्वत:च्या मनावर राज्य. स्वत: बदलणे, परिवर्तन घडवून आणणे आणि या निसर्गाच्या कुशीत राहून विकास घडवून आणणे, ही गांधींच्या स्वराज्याची कल्पना आहे. स्वराज्य, सुराज्य आणि आत्मनिर्भर हे फार जवळचे आहेत. त्याचा एकमेकांशी परस्पर संबंध आहे. त्यामुळे गांधी विचारांशिवाय हा देश चालू शकत नाही, हे लक्षात घेतले पाहिजे.
बालकांमध्ये असलेली निरागसता महात्मा गांधीजींच्या वर्तनामध्ये होती. मनातील भाव व्यक्त करणे, झालेल्या चुका दुरुस्त करणे, नवनवीन विचार मांडणे हा त्यांचा प्रमुख स्थायीभाव होता. तसेच, निसर्गातील पंचमहाभूतांशी मैत्रीपूर्ण राहण्यासाठी आवश्यक असणारा साधेपणा त्यांच्याठायी होता. निसर्गाशी एकरूप होण्यासाठी सत्य, अहिंसा, करुणा, सहवेदना, नैतिकतेचे मूल्य असल्यावर एकात्म होण्यासारखे कार्य त्यांचे होते.
‘सकल लोकमां सहुने वंदे, निंदा न करे केनी रे,
वाच काछ मन निश्चल राखे, धन धन जननी तेनी रे।’
पण आज परिस्थिती अशी आहे की, प्रत्येक जण परदु:ख शीतलम या वृत्तीने वागत आहे. माणसामाणसांत भेदभावाच्या भिंती, जाती-धर्माच्या भिंती निर्माण होण्याचे कारण तेच आहे. या देशात जाती-पातीच्या भिंती निर्माण होऊ नयेत, म्हणून त्यांनी एक भिंत उभी केली आणि पाकिस्तानला मान्यता दिली; पण तरीही या देशातील दरी कमी होत नाही यांसारखे दुर्दैव काय? आजही राजकारण आणि समाजकारण हे विकासाऐवजी गट-तट, जात-धर्म याभोवती फिरत आहे, हे गांधींना कधीच अभिप्रेत नव्हते, म्हणूनच गांधी विचारांवर अभ्यास करण्याची गरज आहे.
मूल्यांमध्ये प्रामुख्याने परिस्थितीनुसार बदलणारे अन् कोणत्याही स्थितीत न बदलणारे, असे प्रकार पडतात. त्यामध्ये सत्य हे कायम टिकणारे जीवनमूल्य असून, त्याबाबत स्पष्ट बोलणे आवश्यक आहे. मनातील विचार व्यक्त केलेच पाहिजेत. त्यासाठी पोषक वातावरणही आवश्यकच आहे. तुम्ही आमच्यावर राज्य केले, आता देश सोडून जावा, असे ठणकावून सांगण्याची क्षमता सत्यामध्ये असून ते बापूजींनी निर्भीडपणे ब्रिटिशांना सांगितले. सत्याचा कधीच पराजय होत नाही, त्याचप्रमाणे अहिंसेचाही पराजय होत नाही. जगातील कोणत्याही प्रश्नाचे उत्तर शस्त्राने दिले जाऊच शकत नाही. शस्त्राने दिलेल्या उत्तरांमध्ये कदाचित राज्य बदलेल, राजे बदलतील. पण, मूलभूत प्रश्न कधीच मिटणार नाही. ते मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी अहिंसकता हाच एकमेव मार्ग आहे; पण आज हिंसाचार वाढत आहे. नोकºया नाहीत, म्हणून रेल्वेची जाळपोळ होत आहे. सहिष्णुता हा प्रकार दिसत नाही. त्यामुळे नथुराम गोडसेने एकदा हत्या केली; पण गांधी विचारांची नित्य हत्या होत आहे, त्याचे काय? पण काहीही झाले, तरी हा देश चालवण्यासाठी गांधी विचारांचीच गरज आहे.
‘समदृष्टीने तृष्णा त्यागी, परस्त्री जेने मात रे,
जिव्हा थकी असत्य न बोले, पर धन नव झाले हाथ रे।
महिलांचे होणारे शोषण, अत्याचाराच्या वाढत्या घटना, हे वाढते प्रकार मनाला क्लेशदायी आहेत. असे असताना खोटे बोलणे; पण रेटून बोलणे अशा प्रकारे चाललेले राजकारण आणि होत असलेला भ्रष्टाचार पाहता आजची परिस्थिती सुधारण्यासाठी कोणी तरी त्या गांधीबाबांची आठवण ठेवली पाहिजे, असे वाटते.
समाजव्यवस्था कशी असावी, माणसं कशी, त्यांचे व्यवहार कसे होते, त्यांच्यात कोणती मूल्ये रुजली, त्याचा आविष्कार समाज जीवनावर होतो, यावर गांधीजी सतत विचार करीत होते. या प्रक्रियेला अनुकूल साधन म्हणजे सत्याग्रह, सविनय कायदेभंग, असहकाराद्वारे त्यांनी केलेले प्रबोधन आहे. देशभक्तांच्या राष्ट्रभक्तीबाबत कुणीही कधीच शंका घेऊ नयेच. त्यांची राष्ट्रभक्ती त्यांच्या कृतीतून व्यक्त होणारी होती; पण गांधीजींनी देशभक्तीची चळवळ ही सर्व सामाजाला जागृत करून एका विशिष्ट पातळीवर नेण्याचा प्रयत्न केला. सर्वसामान्य माणसांना हिंसा पेलत नाही, शस्त्र पेलत नाही, मनातील प्रेमाची, सत्य-अहिंसेच्या ताकदीस साद घालून समस्त लोकांपर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. आज या विचारांची गरज आहे.
ब्रिटिश राजवट मिठासारख्या जीवनावश्यक वस्तूंवर कर लावते, म्हणून सत्याग्रह केला. गांधीजींनी मिठात हात घातल्याबरोबर भारतीय स्वातंत्र्याची चळवळ देशातील चुलीपर्यंत जाऊन पोहचली. तेव्हा देशातील महिला आंदोलनात अधिकच सक्रिय झाल्या. साम्राज्यवादी विस्ताराला धक्का देण्याचे काम महात्माजींच्या चरख्याने केले. स्वच्छतेची चळवळ सुरू करताना त्यांनी झाडू वरिष्ठ वर्गातील व्यक्तींकडे सोपविला. त्याकाळी स्वच्छता करणाºया कनिष्ठ वर्गांचे अस्तित्व नाकारण्यात येत. सार्वजनिक जीवनात त्यांना प्रवेश नव्हता. ती परिस्थिती बदलण्यासाठीचे साधन म्हणून महात्माजींनी स्वच्छतेसाठी झाडू उचलला. पण, तो वरिष्ठ वर्गाच्या हातामध्ये देऊन एकसमानता आणण्याचा प्रयत्न केला. हा विचार फार महत्त्वाचा आहे. ‘
‘वैष्णव जन तो तेने कहिये, जे पीड परायी जाणे रे,
पर दु:खे उपकार करे, तोये मन अभिमान ना आणे रे।’
हा गांधीजींचा संदेश होता; पण प्रत्यक्षात आपण कोरोनाच्या काळात पाहिले की, कोणी तरी मूठभर मदत करतो आणि त्याची ढीगभर जाहिरात करत फिरतो. या थोथांडाला आळा घातला पाहिजे. देशहितासाठी पुन्हा एकदा गांधी विचारांचा वारसा जपला पाहिजे.
प्रफुल्ल फडके/बिटवीन द लाईन्स
9152448055\\
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा