जात-धर्म, वय आणि मुख्यत्वे लिंग, या पलीकडे जाऊन एकमेकांना जीव लावणाºया दोन व्यक्तींमधील प्रेम व्यक्त करण्यासाठी # लव्ह इज लव्ह ही संकल्पना अलीकडच्या काळात तुफान रूजली आहे, रूजते आहे. समाजातील तथाकथित रूढींना झुगारून दोन तरुणींनी आयुष्यभरासाठी एकमेकींची सहचर होण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. नागपूरची डॉ. सुरभी मित्रा आणि कोलकात्याची पारोमिता यांनी नुकताच साक्षगंध म्हणजेच साखरपुडा सोहळा केला. दोघींना भावी आयुष्यासाठी सर्व स्तरातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. माध्यमांनीही त्याला जोरदार प्रसिद्धी दिली. साखरपुडा झाला म्हणजे आता लवकरच लग्नही होईल आणि एका लग्नाची नवी कहाणी सुरू होईल.
खरेतर मनुष्य हा समाजप्रिय प्राणी आहे. समाज म्हणजे समुहाने, कळपाने राहणारा प्राणी आहे. त्यामुळे त्याला एकाकी जगणे ही कल्पनाच करवत नाही. त्यामुळे तो सतत कोणाच्या तरी साथीची प्रतिक्षा करत असतो. ही प्रतिक्षा करता करता त्याला आपले सुरक्षित आयुष्य कोणत्या साथीदाराबरोबर जाईल याची जाणिव होते आणि एखादा जोडीदार तो निवडतो. परंपरेने स्त्री-पुरुषाची जोडी असे म्हटले जाते, पण आजकाल समलिंगी मैत्रीसंबंधांचे प्रकारही वाढलेले आहेत. एखाद्याला समलिंगी जोडीदाराबरोबर जास्त आरामदायी, कम्फर्टेबल वाटत असेल, तर त्यात गैर काहीच नाही. तसाच हा साखरपुडा झाला आणि दोघींचे लवकरच सहजीवन सुरू होईल. याकडे वेगळ्या नजरेने, तिरस्काराने पाहण्याची गरज नाही. तर आता इथून पुढे अशा गोष्टी स्वीकारायला शिकले पाहिजे.
या घटनेतीली नागपूरची सुरभी मित्रा डॉक्टर आहे, तर पश्चिम बंगालची पारोमिता एका कॉर्पोरेट कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी म्हणून कार्यरत आहे. नुकताच नागपुरातील एका रिसॉर्टवर त्यांचा साक्षगंध सोहळा पार पडला. प्रेम करणाºया दोन तरुणींना बंधनात अडकताना कुटुंबीयांचाही पाठिंबा मिळाला आहे. येत्या वर्षभरात दोघी एकमेकींसोबत लग्नबंधनात अडकणार आहेत. विशेष म्हणजे दोघींनाही आई होण्याची इच्छा असून, त्या मूल दत्तक घेण्याचा किंवा सरोगसीचा पर्याय निवडणार आहेत.
जगरहाटीच्या, प्रवाहाच्या विरुद्ध बाजूला कोणी काही केले की, त्याची चर्चा होते, भुवया उंचावल्या जातात. नावेही ठेवली जातात, पण त्यात त्या दोघींना आनंद मिळत असेल, आणि निसर्गाने त्यांना तसेच बनवले असेल, तर त्यावर बाकीच्यांनी चिंता करण्याचे कारण नाही. शुभेच्छा देऊ नका आणि नाकेही मुरडू नका. त्यांना आवडले तसे त्या वागल्या, तुम्ही तुमच्या पद्धतीने जगा इतका हा सरळ विषय घेतला पाहिजे. आखिर मिया बीबी राजी तो क्या करेगा काझी? अर्थात इथे दोन्ही बीबीच आहेत, पण या दोन बीबींचा हा मामला असला, तरी त्यात त्यांना आनंद मिळत आहे हे महत्त्वाचे आहे.
याबाबत सुरभीने स्पष्टपणे सांगितले आहे की, मी मुलीसोबत आयुष्य व्यतीत करण्याचा निर्णय घेतला, तेव्हापासून मला कधीच विरोध झाला नाही. मित्र, कुटुंब, नातेवाईक, भावंडे सगळ्यांनीच स्वीकारले, एकाही व्यक्तीने माझ्याशी संबंध तोडले नाहीत, उलट पाठिंबाचा मिळत गेला. ही खरेच कौतुकाची बाब म्हणावी लागेल. कोणाला नावे ठेवण्यापेक्षा फक्त बघत राहा. कदाचित उद्या असा प्रकार आपल्या जवळच्या व्यक्तीच्या बाबतही घडू शकतो. निसर्ग कोणाकडे कोणाचे आकर्षण वाढवेल हे सांगू शकत नाही.
विशेष म्हणजे सुरभीने वयाच्या १९व्या वर्षी, सगळ्यात आधी वडिलांना सांगितले होते. बाबांची प्रतिक्रिया सुरुवातीला तटस्थ होती. ही फेज आहे, निघून जाईल, असे त्यांचे म्हणणे होते. दोन वर्षांनी जेव्हा त्यांचे पुन्हा बोलणे झाले, तेव्हा आपल्याला आजही महिलांविषयीच रोमँटिक अॅट्रॅक्शन वाटत असल्याचे तिने त्यांना सांगितले. अर्थात सुरभीचे वडील डॉक्टर आहेत. त्यांनी अभ्यास केला, काही मानसोपचार तज्ज्ञांनी ते बोलले. त्यांना याविषयी माहिती मिळाली, तसा त्यांचा विरोध मावळला. पण हे नैसर्गिक आहे हे लक्षात घेतले पाहिजे. पुरुषाने स्त्रीवरच प्रेम केले पाहिजे आणि स्त्रीला पुरुषच आवडला पाहिजे, असा कोठेही नियम नाही. त्यामुळे असे प्रकार भविष्यात आपल्याला खूप बघायला मिळाले, तरी त्याकडे तिरस्काराने बघायचे नाही हा विचार आता केला पाहिजे. जग बदलते आहे. त्याप्रमाणे आपल्या विचारातही आधुनिकता आणि पुरोगामीत्व दिसले पाहिजे.
तसे पाहिले तर चोरी चोरी चुपके चुपके समलिंगी संबंध ठेवणारे हजारो लाखो लोक असतील, पण या दोघींनी सत्य स्वीकारले आणि ते नाते लग्नबंधनात नेण्याचे ठरवले हे कौतुकाचे आहे. सुरभी ही स्वत: डॉक्टर आहे. तिला तिची आई म्हणत होती की, घरी तुम्ही एकमेकींसोबत राहा, मात्र तुमचे नाते जगजाहीर कशाला करता, परंतु आपण सर्वसामान्य मुलींपेक्षा वेगळे आहोत याची जाणिव सुरभीला होती. जसे स्त्री, पुरुष तसेच समलिंगी किंवा लेसबियन, होमो, गे अशा माणसांच्या जाती आहेत. त्या समलिंगी लेसबियन समुहाचे आपण प्रतिनिधीत्व करत आहोत याची जाणिव तिला झाली आणि ते उघडपणे कबूल करण्याचे धाडस तिने दाखवले हे कौतुकास्पद आहे. सुरभीला वाटते तिच्या या मोकळ्या वर्तनाने अशा प्रकारच्या अनेकांना बळ मिळेल. जर एखादी सुशिक्षित तरुणी आपल्या लैंगिकतेविषयी मोकळेपणाने बोलली, तर आणखी लोकांना प्रेरणा मिळेल, असे आपल्या मनात आल्याचे सुरभीने सांगितले.
पारोमिता आणि सुरभीची भेट कोलकात्यात कॉन्फरन्समध्ये झाली. सुरुवातीला इन्स्टाग्राम, आणि नंतर व्हॉट्सअॅपवर त्यांचे बोलणे झाले. त्यांनी आॅगस्टमध्ये एंगेजमेंटचा निर्णय घेतला, मात्र त्याला कमिटमेंट सेरेमनी असे नाव द्यायचे ठरले. ती अकरावीत असताना २००३ मध्ये तिचे बाबा आणि बहिणीला तिच्याविषयी समजले. आईला आता सांगितले, मात्र तिचा विरोध नाही, असे पारोमिता सांगते.
या लग्नात आम्ही दोघीही पत्नीच असणार आहे असे त्या सांगतात. आमच्या घरातही कधी जेंडर रोल बाळगले गेले नाहीत, मुलींनी आणि मुलांनी करायची कामे यात कधी फरक केला गेला नाही, असे सुरभीचे म्हणणे आहे. सुरुवातीला दोघींत गप्पा रंगल्या, बोलता-बोलता आवडी जुळल्या, मग पारोमिताने प्रपोज केले, असे सुरभीने सांगितले. सुरभीचा फोन सहा-सात दिवसांसाठी बंद होता. सात दिवसांनी तिचा मेसेज आला, तेव्हा पारोमिताने न राहवून विचारले की ठीक आहेस ना. तिची काळजी आणि प्रेम सुरभीला जाणवले. मी प्रपोज केले, तर रिजेक्ट करशील का? असा प्रश्न पारोमिताने विचारला. त्यावर मी असे का करेन? या उत्तराने सुरभीने अप्रत्यक्षरित्या आपला होकार कळवला आणि नुकताच हा साक्षगंध अर्थात साखरपुडा संपन्न झाला.
एका नव्या लग्नाची ही गोष्ट आहे. अशा गोष्टी इथून पुढे सातत्याने घडत राहतील. यापूर्वी चोरी चोरी चुपके चुपके होत्या आता उघड होतील इतकेच. पण त्याकडे तिरस्काराने न पाहता हाही निसर्गाचा नवा अविष्कार आहे म्हणून बघायला शिकले पाहिजे.
- मुखशुद्धी/ प्रफुल्ल फडके
9152448055\\
9/1/2022
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा