भारतीय प्रजासत्ताक दिन हा दरवर्षी २६ जानेवारी रोजी पाळला जाणारा राष्ट्रीय सण आहे. यावर्षी ७२वा प्रजासत्ताक दिन आपण साजरा करत आहोत. कोविडच्या पार्श्वभूमीवर होणारा हा दुसरा प्रजासत्ताक दिन आहे. गेल्या वर्षीपासून हा दिवस वेगळ्याप्रकारे साजरा होत आहे. प्रजासत्ताक दिनाला परदेशी पाहुणे हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असते, पण गेली दोन वर्षे पाहुण्यांविना हा दिवस साजरा होत आहे.
अर्थात खºया अर्थाने दिल्ली राजधानी असली, तरी आर्थिक राजधानी मुंबईत संपूर्ण भारताचे चित्र दिसते. सर्व प्रांतातील लोक इथे असल्यामुळे अख्खा भारत मुंबईत एकवटलेला असतो. इथेच खºया अर्थाने विविधता आणि विविधतेतील एकता पाहायला मिळते.
भारताची राज्यघटना घटना समितीने २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी स्वीकारली व ती २६ जानेवारी, १९५०रोजी अंमलात आली. पंडित जवाहरलाल नेहरूंनी २६ जानेवारी, १९३० रोजी लाहोर अधिवेशनात तिरंगा फडकावून पूर्ण स्वराज्याची घोषणा केली होती. त्याची आठवण म्हणून २६ जानेवारी हा दिवस राज्यघटना अंमलात आणण्यासाठी निवडण्यात आला.
२६ जानेवारी, १९५० रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधान अंमलात आणून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली. प्रजासत्ताक दिन भारतातील तीन राष्ट्रीय सुट्ट्यांच्या दिवसांपैकी एक आहे. या दिवशी भारताची राजधानी नवी दिल्ली येथे एक मोठी परेड (संचलन) राजपथ मार्गावरून निघते. यामध्ये भारतीय फौजांचे (नौदल, पायदल, वायुसेना) वेगवेगळे सेना विभाग, घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अद्ययावत शस्त्रे/क्षेपणास्त्रे (जसे पृथ्वी, अग्नी)समवेत संचलन करतात. भारतीय राष्ट्रपती या फौजांची मानवंदना स्वीकारतात. या संचलनाबरोबरच भारतातील विविध संस्कृतींची झलक यावेळी सादर केली जाते. भारतातील राज्यांनी आपापल्या राज्याचे चित्ररथ पाठविलेले असतात. त्यामध्ये महाराष्ट्राचा चित्ररथही असतो. नवी दिल्ली येथे होणाºया संचलनाप्रमाणेच भारतातील सर्व राज्यांतही एकेक संचलन होते. प्रत्येक राज्यात त्या-त्या राज्याचे राज्यपाल फौजांची मानवंदना स्वीकारतात.
यामागचा इतिहास असा आहे की, ४ नोव्हेंबर, १९४७ रोजी भारताच्या घटनाकारांच्या मसुदा समितीने कच्चा मसुदा तयार केला. त्यानंतर तो सार्वजनिक चर्चेसाठी सभागृहात मांडण्यात आला. २ वर्षे, ११ महिने व १८ दिवस या मसुद्यावर खुली चर्चा करण्यात आली व त्यानंतर तो २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी स्वीकारला गेला. तेव्हापासून म्हणजे २६ जानेवारी, १९४९ पासून दर वर्षी भारताच्या राजधानी नवी दिल्ली येथे एक मोठे संचलन आयोजित केले जाते. हे संचलन रायसीना हिलपासून राष्ट्रपती भवनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते. संचलनाच्या अगोदर अनाम सैनिकांसाठी बनवले गेलेले स्मारक, अमर जवान ज्योती येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात. यावर्षी त्यामध्ये बदल झालेला आहे. ही अमर ज्योत नुकतीच विलीन करण्यात आलेली आहे. त्याजागी सुभाषबाबूंचे स्मारक आता होत आहे. यादिवशी पंतप्रधान राजपथाच्या मुख्य मंचावर जातात व आलेल्या पाहुण्यांना भेटतात. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांसोबत राष्ट्रपतींचे आगमन होते. राष्ट्रगीत सुरू होण्यापूर्वी ध्वजारोहण होते आणि २१ बंदुकांची सलामी दिली जाते. त्यानंतर राष्ट्रपतींच्या हस्ते अशोक चक्र आणि कीर्ती चक्र, हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात. प्रमुख पाहुणे म्हणून परराष्ट्रीय राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण दिले जाते.
गेली सात दशके या पारंपरिक पद्धतीने हा आनंदोत्सव या देशात साजरा केला जातो. याचे कारण भारतीय राज्यघटने इतकी सुंदर घटना कुठेही पाहायला मिळत नाही. या घटनेने या देशातील प्रत्येकाला सर्व काही दिले आहे. खºया अर्थाने प्रजेचे राज्य आल्याचे या घटनेने आपल्याला दिसून येते.
गेल्या काही वर्षांपासून या देशाला दहशतवादाचा सामना करावा लागत आहे; पण या दहशतवादाचा सामना करण्याचे बळ या देशातील घटनेमुळेच आपल्याला मिळते, हे लक्षात घेतले पाहिजे. २६ नोव्हेंबर, २००८ला मुंबईत फार मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. एकप्रकारे पाकिस्तानने पुकारलेले ते छुपे युद्धच होते. भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईवरील या हल्ल्यामुळे संपूर्ण जग हादरून गेले होते; तरीही मुंबई अवघ्या २४ तासांत सुरळीत सुरू झाली. कोणताही कारभार बंद पडला नाही. मुंबईतील लोकल, बस, टॅक्सी आणि सार्वजनिक सेवा सुरळीत होत्या. मुंबईतील माणूस नेहमीप्रमाणे कामावर जात होता. याचे कारण मुंबई ही संपूर्ण देशाची प्रतिनिधीत्व करणारी जादुईनगरी आहे; पण कोरोनामुळे मुंबई बंद पडली होती. देशाचे नुकसान झाले आहे. लाइफलाइन लोकल बंद राहिली, ही खंत मनात बाळगून हा दिवस आपण साजरा करत आहोत. मुंबईत देशातील प्रत्येक प्रांतातील माणूस मुक्तपणे वावरत असतो. विविध देशांतील लोक येत असतात. अशा संकटातही तो सुरक्षितपणे वावरू लागला, कारण या मुंबईतील लोकांनी, ज्ञात-अज्ञात व्यक्ती, शक्तींनी कसलाही भेदभाव न करता एकमेकांना मदत केली. संकटग्रस्त परिस्थितीत एकमेकांना मदत करणारी प्रवृत्ती म्हणजे आपली मुंबई आहे. हे खºया प्रजासत्ताकाचे लक्षण आहे. विविधतेतून एकता आणि राष्ट्रीय एकात्मतेचे खरे चित्र दिसते, ते या संकट काळात प्रखरपणे दिसते. या विश्वासाच्या जोरावरच या देशाला महासत्ता होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही.
- प्रफुल्ल रघुवीर फडके/ बिटवीन द लाईन्स\\
26/1/2022
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा